Saturday, December 22, 2018

नाती आणि ‘स्पेस’

शाळेत कधीतरी ‘मला एक कोटी रुपये मिळाले तर...’ या विषयावर निबंध लिहिल्याचं आठवतंय. त्यावेळी कौन बनेगा करोडपती जोरात सुरु झालं होतं, त्याचा परिणाम असावा. पण विषय चांगलाच रंजक होता. डोक्यात कितीही वेगवेगळ्या कल्पना आल्या तरी शाळेत मार्क मिळवण्यासाठी निबंध लिहितो आहोत ही गोष्ट डोक्यात पक्की असल्याने आपोआप आपण ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टी लिहित जातो. मग साहजिकच त्या निबंधात गरजूंना मदत करणे, हॉस्पिटल बांधणे, ग्रंथालय उभारणे अशा भरपूर गोष्टींचा भरणा होता. आणि मग निबंधाच्या सगळ्यात शेवटी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही काहीतरी एक छोटी गोष्ट होती. सगळं कसं अगदी आदर्श! माझा आणि इतर मुलांचा निबंध फार वेगळा नव्हता. ‘आपल्याकडे असलेले एक कोटी रुपये कसे लोकांना ऐकायला आवडेल अशा गोष्टीत आपण खर्च करू’ याच विचाराने सगळ्यांनी निबंध लिहिल्यावर वेगळं काही असण्याची शक्यता नव्हतीच फार. मर्यादित रिसोर्सेस (स्त्रोत) असतील तर ते कसे वापरावेत याबद्दलची स्वतःची कल्पना लिहिताना, त्याही वयात आमच्यावर, कोणत्याही कारणाने का असेना, एका विशिष्ट प्रतिमेचा पगडा होता. ‘अमुक अमुक पद्धतीनेच करणे म्हणजे योग्य’ अशी ती भूमिका. हे असं प्रतिमेत अडकणं आणि उपलब्ध रिसोर्सेसचा वापर या दोन्ही गोष्टी मला नुकत्याच एकदम आठवल्या त्याचं कारण म्हणजे आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात ‘स्पेस’ या शब्दावर झालेली चर्चा.

“अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे जी मला आमच्या नात्यांत ‘स्पेस’ देईल,”, ही अपेक्षा अनेक मुला-मुलींकडून येते. नुकतेच एका गप्पांच्या कार्यक्रमात उपस्थित मुला-मुलींशी मी याबद्दल बोलत होतो. ‘स्पेस हवीच’ याबद्दल बहुसंख्य मंडळींचं एकमत होतं. “स्पेस हवी ते बरोबर, पण किती स्पेस द्यायची ते कळत नाही..”, उपस्थितांमध्ये असणारी स्नेहा म्हणाली. स्पेस द्यायची तर किती द्यायची हाही प्रश्न महत्त्वाचा आहे यावरही सगळ्यांनी माना डोलावल्या. मग अनीश म्हणाला की, “इतकी स्पेस द्यावी की दुसऱ्याला आपण कशाततरी येऊन अडकलो आहे असं वाटू नये.”, त्यावर ऋचा म्हणाली,“पण स्पेस देण्याच्या नादात असंही होऊ नये की, कोणी कोणाला आन्सरेबलच (उत्तरदायी) नाही. तसं झालं तर लग्न करण्याचा फायदा काय?”. वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे मुलंमुली चांगलीच गोंधळात पडू लागली होती. नेमकं कशाला स्पेस म्हणावं इथपासून ते किती स्पेस देणं म्हणजे योग्य अशा प्रश्नांचा शोध घेणं सुरु झालं. ‘नात्यात स्पेस देणे’ याविषयी प्रत्येकाच्या अनेक कल्पना आणि त्याबद्दलचे अनेक आडाखेदेखील. बघितलेल्या किंवा ऐकीव गोष्टींच्या आधारे तयार केलेले अनेक समज-गैरसमज आणि त्यातून तयार झालेल्या ‘स्पेस’ विषयीच्या अनेक प्रतिमा. नात्यातली स्पेस देणं-घेणं म्हणजे नेमकं काय?

जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात किंवा कोणतंही नातं निर्माण करतात, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते. आणि ती म्हणजे, ते एक प्रकारे त्यांच्याकडे असणाऱ्या ‘रिसोर्सेस’चं पुनर्वाटप करतात. म्हणजे काय? तर नातं निर्माण होतं तेव्हा, माझ्याकडे असणारा वेळ, पैसा, प्रत्यक्षातली जागा (घर) हे जे रिसोर्सेस माझ्याकडे असतात त्यातला सर्व किंवा काही भाग मी जोडीदाराला देण्याचं मान्य करतो आणि ते प्रत्यक्षातही आणू लागतो. नात्यातल्या दोन्ही व्यक्ती हे करतात.मला असं वाटतं, माझ्या रिसोर्सेसचं वाटप मी कसं करायचं हे ठरवण्याचं मला असणारं स्वातंत्र्य म्हणजे ‘स्पेस’ असणं. आपली गंमत अशी होते, की नात्यात रिसोर्सेसचं वाटप कसं असलं पाहिजे याबद्दलच्या पारंपारिक प्रतिमांच्या चौकटी एवढ्या घट्ट आहेत की हे आपण स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी बाजूलाच पडतं. आणि मग ‘स्पेस मिळत नाही’ ही तक्रार होऊ लागते.

स्पेस देणं/घेणं हा मुद्दा मुख्यतः ‘वेळ’ या महत्त्वपूर्ण रिसोर्सशी निगडीत आहे. आणि इतर कशाहीपेक्षा या विषयात संघर्ष लवकर होण्याची शक्यता अधिक. कारण पैसा आजपेक्षा उद्या जास्त मिळू शकतो, आज एक बेडरूमचे घर असेल तर उद्या ते तीन बेडरूम्सचं असू शकतं. पण वेळ? आजही २४ तासच हातात आहेत आणि उद्याही. थोडक्यात मर्यादित रिसोर्स असल्याने या वेळेचं वाटप हा फार गंभीर मामला बनतो. इथेच शाळेत निबंध लिहिताना डोक्यात येत असे त्याप्रमाणे, मर्यादित रिसोर्स आणि पारंपारिक कल्पनांमधून तयार झालेल्या प्रतिमा यांची सांगड घालून योग्य काय, अयोग्य काय याच्या अपेक्षा ठरतात. नात्यात असणाऱ्या वा लग्नाला उभ्या व्यक्तींकडून तर हे घडतंच घडतं. आणि मग निबंध लिहावा तसं ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टींची आश्वासनं दिली जातात. “माझा सगळा वेळ तुझ्याचसाठी असेल”, “आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करू” इ.इ. गोष्टी ठरवल्या जातात. पण आपलं नातं हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा ‘एक’ भाग असला तरी ‘एकमेव’ नसतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपण अगदी सगळ्या गोष्टी एकत्र करत नाही. दोघं वेगळ्या ठिकाणी कामावर जाणं, आपापल्या आवडीच्या गोष्टी करण्यात स्वतंत्र वेळ घेणं, घरातली कामे वेगळी वाटून घेऊन वेगवेगळी करणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र केल्या जातातच असं नाही. पण तरीही हे अनेकदा सहज चालतं, कारण पारंपारिक प्रतिमेत या गोष्ट बसणाऱ्या आहेत.पण प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला/जेवायला जाणं अशा कित्येक इतर गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधनं घालण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे, दुसऱ्याच्या रिसोर्स वाटपाबाबतच्या निर्णयस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, म्हणजेच दुसऱ्याची ‘स्पेस कमी करण्याचा प्रयत्न होतो.अर्थातच, स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे. आपला आपल्या जोडीदारावर, आपल्या नात्यावर विश्वास आहे ना? नसेल तर कदाचित ‘स्पेस’पेक्षाही मोठे प्रश्न तुमच्या नात्यात तुमच्यासमोर आ वासून उभे आहेत!

आता हे टाळण्यासाठी काय बरं करावं? चार पायऱ्या माझ्या डोक्यात येत आहेत. एक म्हणजे समोरची व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, या सत्याचा स्वीकार. “मेरे रंग में रंगने वाली...” वगैरे म्हणत जोडीदार शोधायचे दिवस केव्हाच संपले. ते गाणं येऊनही तीस वर्ष उलटली. अजूनही तुम्ही तिथेच असाल तर कठीणच आहे. आता तुमच्या रंगात रंगणारी व्यक्ती मिळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित तुम्ही दोघे मिळून नवीन रंग निर्माण कराल किंवा आपापल्या रंगाचं स्वतंत्र अस्तित्व राखत, एक बहुरंगी सहजीवन तयार कराल. यातलं काहीच अयोग्य नाही. दुसरी पायरी आहे प्रतिमांच्याचौकटी मोडीत काढण्याची. ‘नवरा आहे म्हणजे त्याने अमुकच वागलं पाहिजे’, ‘गर्लफ्रेंड आहे म्हणजे याच पद्धतीने मला वेळ दिला पाहिजे’ यासारख्या प्रतिमा फेकून द्याव्या लागतील. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, स्वतंत्र आहे, त्यामुळे प्रत्येक नातं देखील वेगळं आहे, युनिक आहे. ते प्रतिमांच्या चौकटीत बसवायला जाण्यात कसलं आलंय शहाणपण?

‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. तिसरीपायरी आहे संवादाची. यावरून मला एका जोडप्याचा किस्सा आठवतो. त्यांना आपण मधुरा आणि समीर म्हणूया. लग्न ठरल्यावर एकदा समीरने मधुराला सहजच विचारलं की तुला माझ्याकडून, एक नवरा म्हणून काय काय अपेक्षा आहेत. मधुरा म्हणाली, “मला तुझा रोज एक तास हवाय.”. बस्स, एवढंच? समीरला आश्चर्य वाटलं. त्यावर मधुरा म्हणाली, “हा एक तास पूर्णपणे माझा असला पाहिजे. म्हणजे त्यात आपले नातेवाईक, मित्र, सिनेमा, टीव्ही, पुढे मुलं झाली की ती, आपला बेडरूममधला वेळ, मोबाईल, काम यातलं काहीही नसेल. रोजचा एक तास फक्त माझ्यासाठीचा असेल.” मला तुझ्या ‘२४ तासांतला एक तास हवाय’ इतकी स्पष्ट अपेक्षा मधुराने समीरसमोर मांडली. समीरकडे असणाऱ्या रिसोर्सपैकी नेमकं काय हवंय याबाबत मधुराने नेमका संवाद साधला. प्रतिमांच्या चौकटी मोडीत काढल्यावर हा संवादच आपल्याला आपल्या नात्याला आपलं हवं ते रूप द्यायला मदत करेल. नातं निर्माण होतं तेव्हा काही स्पेस ही ओव्हरलॅप होईल, काही मात्र स्वतंत्र राहील याची स्पष्टता आणि मानसिक तयारी आपल्याला लाग्नाच्याच नव्हे तर कोणत्याही नात्यात ठेवावी लागते. त्यासाठीच संवाद महत्त्वाचा आहे. चौथी, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे लवचिकता. नात्याच्या सुरुवातीच्या काळात कदाचित सगळ्यांना मधुराइतकी स्पष्टता असेलच असं नाही. पण या गोष्टी वारंवार बोलण्याच्या आहेत, केवळ सुरुवातीला नव्हे. अधून मधून सिंहावलोकन करून, आपण आपल्या स्वतःच्या रिसोर्सेसच्या वाटपाबाबत आणि एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षांबाबत काय बोललो आहोत, आत्ताची परिस्थिती काय आहे, आपल्याला काय हवं आहे, कसं हवंय अशा गोष्टींवर संवाद व्हायला हवा. या संवादातून असा निष्कर्ष निघाला की काही गोष्टी बदलण्याची गरज आहे, तर त्याचा स्वीकारही व्हायला हवा. तेवढी लवचिकता आपल्याला दाखवायला हवी. मला वाटतं, या चार पायऱ्या नीट पाळल्या तर आयुष्यातला ‘नात्यातली स्पेस’ या विषयावरचा प्रत्येकाचा निबंध वेगळा आणि मस्त होईल!

‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. मला हा शब्द आवडतो. यात खुल्या आकाशाचा भास आहे. स्वातंत्र्याची अनुभूती आहे. स्वातंत्र्य माणसाला जबाबदार बनवतं असं सामाजिक क्षेत्रात मानलं जातं. नात्यातल्या निर्णयस्वातंत्र्यातून निर्माण होणारं अवकाश, नात्याला आणि नात्यातल्या व्यक्तींना जबाबदार बनवतं. चुकलो, धडपडलो तरी, प्रगल्भ बनवतं. वर्षभर आपण वेगवेगळ्या विषयांवर इथे चर्चा केली. अगदी नातं म्हणजे काय इथून सुरुवात होत ते तडजोड, नव्याची नवलाई, अहंगंड, लिव्ह इन, सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी, तुलना, पर्याय, पारदर्शकता अशा अनेक विषयांत मुशाफिरी केली. अर्थातच या विषयांत कसलं गाईडबुक नाही. अमुक अमुक म्हणजेच काहीतरी अंतिम फंडा आहे असंही नाही. उलट स्वतःला पुरेशी ‘स्पेस’ देत (म्हणजे त्यात रिसोर्सेसचं स्वतःसाठी वाटप आलंच!) या विषयांवर मुक्त चिंतन करणं, चर्चा करणं; आणि आपली नाती फुलवण्याचा, बहरवण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं यातच शहाणपण आहे. या वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

(दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या 'मैफल' या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, December 8, 2018

आर या पार


‘नातं टिकवण्यासाठी नात्यात पारदर्शकता हवी’ हे किंवा असली वाक्य वापरून वापरून किती गुळमुळीत झाली आहेत, नाही का? पण तरीही, माणसामाणसांच्या नात्यात लपवाछपवी, अर्धसत्य, अपारदर्शकता हे प्रकार काही हद्दपार झालेले नाहीत. खोटं पकडायचा एक मार्ग शोधला की माणूस खोटं बोलण्याचे नवीन दहा मार्ग शोधतो. माणूस दुसऱ्याशी खोटं का बरं बोलतो?

गेल्या वर्षीच्या जूनमध्ये नॅशनल जिओग्राफिक मासिकाने कव्हर स्टोरी केली होती- ‘आपण खोटे का बोलतो?’. यात लेखक युधीजीत भट्टाचार्य म्हणतो की, ‘प्रामाणिकपणा हे चांगलं धोरण असलं तरी खोटं बोलणं हे अगदी मानवी आहे, नैसर्गिक आहे.’ रंग बदलणारे सरडे किंवा अंग फुगवून शत्रूला घाबरवू बघणारे मासे/प्राणी यांच्यासारखंच मानवामध्येही जगण्यासाठी, स्वतःच्या बचावासाठी फसवेगिरी (डिसेप्शन) करण्याची उपजतच वृत्ती असते. हार्वर्ड विद्यापीठाच्या नितीशास्त्राच्या तज्ज्ञ सिसेला बॉक म्हणतात, शारीरिक दृष्ट्या फसवेगिरी करणं किंवा बळाचा वापर करणं यापेक्षा भाषेच्या शोधानंतर खोटं बोलणं हा सोपा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला! आपल्यातला खोटेपणा हा असा आदिम वृत्तीचा परिपाक आहे. पण मानवात आणि इतर प्राण्यांमध्ये फरक हाच आहे की, आपण आपल्या काही आदिम वृत्तींना काबूत ठेवत, मोठ्या संख्येने, सौहार्दाने एकत्र राहण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी ठरवल्या आणि त्यांचं पालन करायचं असंही ठरवून घेतलं. प्रसिद्ध लेखक युवाल नोआह हरारी या ठरवून घेण्याला ‘काल्पनिक वास्तव’ म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या पण, अनेक व्यक्तींच्या एकत्रित कल्पनेत असणाऱ्या गोष्टी. धर्म, पैसा, देश या गोष्टी ‘काल्पनिक वास्तव या सदरात मोडतात. या काल्पनिक वास्तवातल्या गोष्टी नीट प्रत्यक्षात येण्यासाठी ‘परस्पर विश्वास’ हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. एक उदाहरण बघूया. भारतीय रुपया हे चलन आपण वापरतो. एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करायची तर खरेदी करणारी व्यक्ती आणि विक्री करणारी व्यक्ती या दोघांचाही भारतीय रुपया या चलनावर विश्वास असतो. त्यामुळे व्यवहार सुरळीत होऊ शकतो. अशा विश्वासावरच व्यापक व्यवस्था उभ्या राहिल्या. पण खोटेपणा, फसवेगिरी यामुळे विश्वासाला तडा जाऊन व्यवस्थाच ढासळण्याचा धोका असतो. कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्याला देखील हेच लागू होतं.

आपण अगदी सुरुवातीच्या, २० जानेवारीच्या, लेखात बघितलं होतं, नातं म्हणजे सामायिक अनुभव- शेअर्ड एक्स्पीरियन्स. दोन व्यक्ती जेव्हा कोणताही अनुभव एकत्र निर्माण करतात तेव्हा त्यांच्यात चांगलं/वाईट नातं निर्माण होतं. पण जेव्हा दोन व्यक्ती स्वतंत्रपणे वेगळे अनुभव घेत असतात तेव्हा, त्यांना त्यांच्यात सामायिक अनुभव निर्माण करण्याची संधी संवादामुळे मिळते. एकमेकांना एकमेकांचे अनुभव सांगितले की, या संवादामुळे सामायिक अनुभव तयार होऊन नातं निर्माण होतं. त्यामुळे अर्थातच, अधिकाधिक संवाद असणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात, किंवा एकमेकांच्या जवळ आलेल्या व्यक्तींना नातं मजबूत ठेवण्यासाठी, अधिक फुलवण्यासाठी संवादाची गरज भासते. ‘संवाद’ हे नात्याचं चलन बनू लागलं की ते चलन अधिकाधिक ‘खरं’ असलं पाहिजे हा आग्रह अवाजवी ठरत नाही. चलनावरचा विश्वास डळमळीत झाला तर नात्याचा पायाही डळमळीत होईल हे उघड आहे. याचमुळे ‘नात्यात पारदर्शकता हवी’ असं आग्रहाने मांडलं जातं.

अपारदर्शकता अविश्वासाला खतपाणी कशी घालते ते बघूया. जेव्हा अपारदर्शकता असते आणि हे समोरच्यालाही जाणवतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेंदू आपल्या क्षमतेनुसार त्या न दिसणाऱ्या, अपारदर्शक जागा भरू लागतो. गेल्या वेळच्या लेखात आपण  माहित नसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या जागा भरून काढण्याच्या मेंदूच्या करामतीविषयी थोडी चर्चा केली होती. एक उदाहरण देतो. एका मुलाच्या, त्याला आपण रोहन म्हणूया, विवाहसंस्थेत भरलेल्या फॉर्ममध्ये ‘ड्रिंकिंग’ या सवयीपुढे ‘कधीच नाही’ असं लिहिलं होतं. त्याचा तो फॉर्म बघणाऱ्या एका मुलीने, तिला आपण सानिका म्हणूया, रोहनचं फेसबुकवरचं प्रोफाईल बघितलं. तिला असं दिसलं की, फेसबुकवरच्या काही फोटोंमध्ये रोहनच्या हातात ग्लास दिसतोय. त्यातलं पेय दारूसारखं दिसतंय. आता या परिस्थितीत सानिकाच्या डोक्यात अनेक शक्यता येत जातात. रोहनने मुद्दाम खोटं लिहिलं असेल का? की त्याच्या पालकांनी खोटं लिहिलं असेल? की त्याने आणि त्याच्या पालकांनी एकत्र ठरवून हे खोटं विवाहसंस्थेच्या प्रोफाईलवर लिहिलं असेल? की त्याच्या पालकांना तो दारू पितो याचा पत्ताच नसेल? की त्याच्या हातातल्या ग्लासात व्हिस्की नसून अॅपल ज्यूस असेल? पुरेशी पारदर्शकता नसल्याने सानिकाच्या मेंदूने गाळलेल्या जागा भरताना असंख्य वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेतला. या डोक्यात येणाऱ्या शक्यतांना प्रतिसाद कसा द्यायचा हे माणसा-माणसाप्रमाणे बदलेल. पण मुद्दा हा की, डोक्यातल्या ‘शक्यतांच्या’ आधारे माणूस स्वतःचा प्रतिसाद ठरवू लागतो आणि प्रत्यक्ष काय आहे किंवा नाही, याची शहानिशा न झाल्याने कल्पनेतल्या शक्यतांनाच वास्तव मानून वागू लागतो. त्या व्यक्तीसाठी तेच काल्पनिक वास्तव बनतं. पण इथे कदाचित रोहन आणि सानिका या दोघांचं वास्तव वेगळं असल्याने अविश्वास आणि बेबनाव निर्माण होतो. अशावेळी नातं निर्माण होणं आणि पुढे टिकणंही कठीणच.

यावर उपाय काय? अर्थातच, नात्यांत जितकी जास्त पारदर्शकता ठेवता येईल तितकी ठेवावी, हे तर आहेच. पण तत्पूर्वी, पारदर्शकता ठेवण्यासाठी योग्य असं वातावरणही दोन्ही बाजूंनी निर्माण करावं लागेल. यासाठी मला एक त्रिसूत्री डोक्यात येते आहे- खोटं बोलण्याच्या अनेक कारणांमध्ये, समोरची व्यक्ती मला नीट समजून घेणार नाही या कारणाचा मोठा पगडा असतो. आधीचे अनुभव, ऐकीव गोष्टी यावर आधारित हा ‘समजून घेणार नाही’ हा निष्कर्ष काढलेला असतो. मला वाटतं, समोरच्याचा एम्पथी म्हणजे समानुभूतीने विचार करणं, त्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं, लगेच निष्कर्ष काढून लेबलं चिकटवून मोकळं न होणं ही पहिली पायरी असू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे मतभिन्नतेचा स्वीकार. ‘‘अ’ आणि ‘ब यांच्यात मतभिन्नता असू शकते’ या शक्यतेचा त्या दोन्ही व्यक्तींनी केलेला स्वीकार. मतभिन्नता असली म्हणजे थेट संघर्षाचा पवित्रा घेण्याची गरज नसते. दोन व्यक्ती मतभिन्नतेतूनही मार्ग काढू शकतात. किंबहुना दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा हे करतही असतो. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने अनेक मतं आणि विचार अस्तित्वात असूनही सौहार्दाने राहण्याची कला मानवप्राणी गेल्या हजारो वर्षात शिकला आहे. सामाजिक पातळीवर जे जमलं, ते व्यक्तिगत पातळीवरही अधिक प्रभावीपणे अंमलात आणणं शक्य आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, समोरच्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार. हा स्वीकार नसेल तर पारदर्शकता न ठेवणं, आणि स्वीकारली जाईल अशी प्रतिमा उभी करत राहणं हेच आकर्षक वाटेल. यातून नात्यांत दांभिकता तेवढी निर्माण होईल. असं नातं टिकेल का? आणि टिकलं तरी फुलेल, बहरेल का?!

पारदर्शक नात्याची निर्मिती ही अशी दोन्ही बाजूंनी करावी लागते.  रानटी अवस्थेत जगताना फसवेगिरी (इंग्रजीत ज्याला ‘डिसेप्शन’ म्हणतात) हा इतर प्राण्यांप्रमाणेच मानवप्राण्याच्याही अस्तित्वासाठी महत्त्वाचा भाग असेलही, पण एकविसाव्या शतकात मात्र नेमकी उलटी परिस्थिती आहे. मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत अधिकाधिक गुंतागुंतीच्या, डीसेप्टिव्ह म्हणजे फसव्या आणि क्लिष्ट रचनांनी बनलेल्या समाजात आपण राहत असताना, पारदर्शकता आणि माणसांतला परस्पर विश्वास ही आपल्या अस्तित्वासाठीच गरजेची गोष्ट आहे. अगदी ‘आर या पार’चीच लढाई आहे ही. पण समानुभूती (एम्पथी), मतभिन्नतेचा स्वीकार आणि प्रत्येकाचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर; या त्रिसूत्रीच्या सहाय्याने अधिक पारदर्शक, सौहार्दाचं आणि प्रगल्भ असं आयुष्य आपण जगू शकू असा माझा विश्वास आहे.

(दि. ८ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, November 17, 2018

क्लिकक्लिकाट


कित्येकदा डोळ्यांना एखादं दृश्य सुंदर दिसत असतं आणि ते आपण कॅमेऱ्यात पकडायला जातो. पण प्रत्यक्ष फोटो आणि आपण बघितलेली प्रतिमा यात फारच अंतर आहे असं वाटतं. एखादा सुंदर सूर्यास्त असतो. पण फोटो काढल्यावर त्या फोटोत इतर अनेक बिल्डींग्स, दिव्यांचे खांब, खांबांवरच्या तारा, पुढ्यात असणाऱ्या माणसांची डोकी असं सगळं सगळं त्या फोटोत दिसत असतं. आणि मग तो सुंदर सूर्यास्त अजिबात सुंदर नाही असं वाटू लागतं. खरंतर आपण आपल्या डोळ्यांना दिसतंय तशीच्या तशी प्रतिमा पकडत असतो. पण तरीही हा फरक राहतो. का बरं होतं असं? याचं कारण आहे आपला मेंदू! डोळ्यांच्या मागे पडद्यावर उमटलेली प्रतिमा आपल्या मेंदूकडे पाठवली जाते आणि आपला मेंदू त्यावर प्रक्रिया करतो. मेंदूत असणारं फोटोशॉपच असतं हे जणू. आपला मेंदू डोळ्याकडून आलेल्या प्रतिमेमधल्या अडचणीच्या गोष्टी सरळ डिलीट करून टाकतो. आणि फोकस करतो सूर्यास्तावर. आपला मेंदू कसा गंमतीदार काम करतो याचं हे एक छोटंसं उदाहरण. पण हे फक्त फोटोबाबत घडतं असं नव्हे तर आपल्या सर्वच अनुभवांच्या बाबतीत मेंदू हे करतो. एखाद्या हॉटेलचं जेवण आपल्याला कधीतरी आवडलेलं असतं. आणि पुढच्या वेळी अगदी तीच चव असली तरी आपल्याला आधीइतका आनंद येतोच असं नाही. याचं कारण, चव आणि चवीचा अनुभव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आपल्या प्राधान्याने लक्षात राहतो चवीचा अनुभव. सिंहगड चढून जाऊन मग केलेलं झुणका भाकरीचं जेवण आणि गाडीने थेट वर जाऊन केलेलं तेच जेवण यातल्या अनुभवात आणि अनुभवाच्या आठवणीत कसा फरक पडतो ते अनेकांनी अनुभवलं असेल.

आणि हे सगळं मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा लागू होतंच होतं. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत
असणाऱ्या मंडळींकडे बघून तर मला हे नेहमी जाणवतं. आमच्याकडे अनेक पालक येऊन आम्हाला सांगतात की, ‘माझ्या मुलाचं/मुलीचं मला काही कळत नाही. सगळ्यांना नकार देतो/देते. म्हणते/म्हणतो- ‘क्लिक होत नाही. आता हे क्लिक होण्याचं गौडबंगाल नेमकं आहे काय?’. खरंतर क्लिक होण्याचा अगदी सोपा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्याला भावलेल्या गोष्टींवर अधिक ‘फोकस करतो. आपला  मेंदू इतर अनेक गोष्टी कदाचित अडचणीच्या, कदाचित नापसंतीच्या; थेट डिलीट करतो आणि चांगल्या गोष्टींवर फोकस ठेवत मनात फोटो क्लिक करून टाकतो! अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत अनेकदा घडतं असं की आपल्याला ‘भावलेल्या’ किंवा आवडतील अशा गोष्टींवर आपण पुरेसा फोकसच देत नाही. आणि मग तुलनेने नगण्य असणाऱ्या अडचणीच्या, किंवा कधीकधी तर अडचणीच्या नसणाऱ्याही, गोष्टींचा मोठा बागुलबुवा उभा राहतो. आणि मग ‘क्लिक’ काही होत नाही. खरंतर आपण आपल्या मनाला क्लिक होण्याची मुभा देत नाही. याचा अर्थ दिसेल ते सगळं आणि असेल तसं स्वीकारावं आणि पुढे व्हावं असा बिलकुल नाही. आपली म्हणून काही एक आवड, पसंती, प्राधान्य असं सगळं असतंच की. आंधळेपणाने जोडीदार निवडावा असं कोणीच सुचवणार नाही, सुचवूही नये.  पेला अर्धा भरला आहे एवढ्यावरच केवळ लक्ष द्यावं इतकं साधं आणि उथळही हे नाही. पण पेला अर्धा भरला असेल तर तो कोणत्या पदार्थाने भरला आहे, जो पदार्थ आहे तो आपल्या आवडीचा आहे का, आपल्या ‘डाएट’ मध्ये तो पदार्थ बसतोय का, आपली आत्ता भूक/तहान किती आहे, उर्वरित पेला आज ना उद्या भरला जाण्याची शक्यता आहे का अशा शेकडो शक्यता आणि विचार आहेत जे करायला हवेत. आणि हे सगळं करण्यासाठी मनाची दारं खुली हवीत.

जोडीदार निवडीची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आनंददायी करायची तर आपल्याला आपल्या मेंदूला काही प्रमाणात मोकळं सोडावं लागेल. एक मुलगी मला भेटली होती मागे. आकांक्षा म्हणूया तिला. तर या आकांक्षाला काहीही झालं तरी ‘आयटी मध्ये काम करणारा नवरा नको होता. गंमतीचा भाग असा की तिला अखेर पसंत पडला तो मुलगा आयटी क्षेत्रात काम करणाराच निघाला! असं कसं काय घडलं हे विचारल्यावर ती म्हणाली, “हाच मुलगा ‘क्लिक झाला!”. सुदैवाने तिने अपेक्षा अगदी पक्की ठरवून ठेवली असली तरी मनाचे दरवाजे उघडे ठेवले होते. समोर येणाऱ्या प्रोफाइल्स कडे तिने खुल्या मनाने बघितल्यामुळे, आय टी क्षेत्रात काम करणारा मुलगा ही नगण्य अडचण तिच्याच मेंदूने आपोआप डिलीट केली. आणि इतर गोष्टींवर फोकस केला. इतर गोष्टींमध्ये काही गोष्टी मनाने टिपल्या आणि त्याच प्रतिमेला क्लिक करत फोटो निघाला!

जुलै मध्ये ‘प्रतिमेची चौकट’ या लेखात आपण प्रतिमेच्या चौकटीत न अडकण्यासाठी मनाला मोकळीक देण्याविषयी चर्चा केली होती. आता समोरची व्यक्ती ‘क्लिक’ व्हावी असं वाटत असेल तर अपेक्षांच्या चौकटीत देखील न अडकता मनाला मोकळं सोडायला हवं. छोट्या छोट्या गोष्टींवर अनावश्यक फोकस टाळायला हवा. कसं करायचं हे? खरंतर याचं उत्तरही सोपं आहे. अपेक्षांची चौकट न ठेवता, कोणत्या गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात चालणार नाहीत अशांची यादी करायची. अर्थातच त्याची सुस्पष्ट, नेमकी आणि तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल अशी कारणमीमांसा हवी. इंग्रजीत ज्याला ‘मेक ऑर ब्रेक’ म्हणतात अशी ही यादी. नीट विचार केला तर अशी यादी अगदी छोटी असते. आपण जसजसा यावर अधिकाधिक विचार करत जातो तसतसं ही यादी उथळ आवडी निवडी, ऐकीव गोष्टी आणि कल्पनेतल्या प्रतिमांमधून बाहेर पडून मूलभूत अशा जीवनमूल्यांकडे म्हणजे लाईफ व्हॅल्यूज् कडे जाते. आदर, तदानुभूती किंवा समानुभूती (एम्पथी), विश्वास, पारदर्शकता अशा स्वाभाविक गोष्टींकडे आपला ‘फोकस’ जाऊ लागतो. आणि या फोकस मधल्या गोष्टींची झलक समोरच्या व्यक्तीत दिसली की ती व्यक्ती आपल्याहीनकळत आपल्याला ‘क्लिक’ होते! एक उदाहरण देतो. आमच्या एका कार्यक्रमात एकदा सगळ्या उपस्थित मुला-मुलींना आम्ही चहा ठेवला होता. केटरिंग करणाऱ्यांचा नेहमीचा कर्मचारीवर्ग त्या दिवशी नसल्याने तो चहा आम्ही आयोजक मंडळीच सगळ्यांना जागेवर नेऊन देत होतो. तेव्हा एक मुलगा पटकन मदत करायला पुढे सरसावला. इतर सव्वाशे लोकांमध्ये एकट्या त्याचं हे पटकन मदतीला पुढे येणं नजरेतून सुटणं कठीण होतं. नंतर आम्हाला समजलं, एका मुलीने या त्याच्या स्वभावाची मनात नोंद केली होती. त्या मुलाच्या इतर कमी महत्त्वाच्या किंवा बिनमहत्त्वाच्या गोष्टी मनात डिलीट करत तो मुलगा तिला ‘क्लिक झाला होता!

सौंदर्य, पगार, खानदान, नोकरी-व्यवसायाचं क्षेत्र, जात, पत्रिका अशा सगळ्या गोष्टी जोडीदार निवडताना बघितल्या जातात हे खरंच. पण आमचा अनुभव आहे की, अंतिमतः या गोष्टी कधीच निर्णायक ठरत नाहीत. विवाहसंस्थेच्या फॉर्ममध्ये भरलेल्या अपेक्षांच्या चौकटीच्या बाहेरच ‘क्लिक होणं’ असं ज्याला म्हणतात ती गंमत घडते. त्याची एक मजा आहे आणि ती मजा अनुभवायची तर वर म्हणल्याप्रमाणे मनाला तुलनेने बिनमहत्त्वाच्या गोष्टी डिलीट करण्याची मुभा दिली पाहिजे. तेवढी दिली की जोडीदार निवड ही प्रक्रिया आनंदाची होईल आणि मग ‘क्लिकक्लिकाट’ होणार हे नक्की!



(दि. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल’ या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, November 3, 2018

तुलनांचा चक्रव्यूह

‘तुलना’ हा आपल्या रोजच्या जगण्यातला अक्षरशः अविभाज्य भाग आहे. इतरांशी तुलना करून आपण आपल्याला मिळणाऱ्या गोष्टींचं मूल्य ठरवतो. या तुलनेचं मूळ ‘आपली समाज रचना, जीवघेणी स्पर्धा, जागतिकीकरण’ वगैरे वगैरे गोष्टींमध्ये आहे असं म्हणायचा पटकन मोह होईल. पण तुलना ही बहुतेक आपल्यात निसर्गतःच असते. या निष्कर्षाकडे जाणारा एक रंजक प्रयोग अमेरिकन अभ्यासक सारा ब्रॉस्नन आणि डच तज्ज्ञ फ्रान्स द वाल या दोघांनी केला होता. त्यांनी दोन माकडं शेजार शेजारच्या पिंजऱ्यात ठेवली. पिंजऱ्यात एका बाजूने टाकलेली गोष्ट दुसऱ्या बाजूने त्यांनी ती बाहेर परत द्यायची असं एक काम त्यांना शिकवलं होतं आणि याचा मोबदला म्हणून काकडीचा एक तुकडा दिला जात होता. दिलेलं हे काम आणि मोबदला, हे अगदी सुरळीत चालू होतं. पण तेवढ्यात प्रयोग करणाऱ्या या मंडळींनी एका माकडाला मोबदला म्हणून काकडीऐवजी द्राक्ष द्यायला सुरुवात केली. अर्थातच हे दुसऱ्या माकडाला दिसलं. आणि पुढच्यावेळी त्याला काकडी दिल्यावर ते माकड इतकं नाराज झालं की त्याने तो काकडीचा तुकडा सरळ भिरकावून दिला. त्याने मोठमोठ्याने आवाज केला, अस्वस्थपणे पिंजऱ्यात उड्या मारल्या आणि आपली नाराजी व्यक्त केली. काकडीवर अगदी समाधानी असणारं माकड आपल्या शेजारच्या माकडाला काकडीपेक्षा अधिक चांगलं असणारं द्राक्ष मिळालं या गोष्टीवरून नाराज झालं!

आपल्यातल्या या तुलना करण्याच्या स्वाभाविक वृत्तीचा परिणाम आपल्या जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. जी मुलं मुली आणि त्यांचे पालक मला भेटतात त्यांच्या जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेत मला या चार प्रकारच्या तुलना दिसतात. कोणत्या ते पाहूया.

अमक्याला जशी जोडीदार मिळाली तशीच व्यक्ती मलाही मिळाली पाहिजे- या प्रकारच्या तुलनेत मुलं-मुली आणि त्यांचे पालक दोघेही रमतात. ‘माझ्या ताईचा नवरा आहे ना, अगदी तसाच मला हवा.’  किंवा ‘मोठ्या सुनेसारखीच दुसरीही सून मिळाली म्हणजे फारच छान!’ अशा प्रकारची वाक्य अनेकदा कानावर येतात. डोळ्यासमोर एखादं उदाहरण असेल, आणि ते चांगलं असेल, तर तोच का बरं निकष ठेवू नये असा विचार डोक्यात येणं स्वाभाविक आहे. ‘सेटिंग द बार हाय’ असं जे इंग्रजीत म्हणलं जातं त्यातलाच हा प्रकार. पण गडबड अशी होते की माणूसप्राणी हा अशा एखाद्या सरसकटीकरणात बसणारा नव्हे. आपण ज्या व्यक्तीच्या जोडीदाराशी तुलना करू बघतो त्या व्यक्तीसारखे तरी आपण कुठे असतो? ‘माझ्या ताईसारखी मी नाही तर तिच्या नवऱ्यासारखाच नवरा मला मिळाला तर कसं काय बरं चालेल?’ हा मुद्दा नको का विचारांत घ्यायला? किंबहुना आपण सगळेच एवढे वेगळे आहोत, क्लिष्ट आहोत, की दुसऱ्याच्या बाबतीत अगदी ‘परफेक्ट वाटणारी गोष्ट तुमच्या बाबतीत तशीच ठरेल ही शक्यता तशी कमीच आहे.

कल्पनेतल्या प्रतिमेशी तुलना- अनेकांच्या मनात जोडीदाराबद्दल एक काल्पनिक प्रतिमा असते. ‘मेरे ख्वाबों में जो आये’, नाहीतर ‘मेरे सपनों की रानी’ म्हणत, ही प्रतिमा गोंजारून जपून ठेवलेली असते. भेटणारी व्यक्ती आणि ही प्रतिमा यांची तुलना होतेच होते. या प्रतीमेच्याच प्रेमात आपण एवढे असतो, की त्यापेक्षा एक कणही वेगळा सहन करणार नाही अशी जणू प्रतिज्ञाच केलेली असते. जुलैमधल्या याच ठिकाणच्या लेखात आपण ‘प्रतिमेच्या चौकटी’विषयी सविस्तर चर्चा केली होती. मला वाटतं, प्रतिमेच्या चौकटीत न रमता, प्रतिमेशी तुलना न करता समोर असणाऱ्या व्यक्तीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान देत बघणं आणि जाणून घेणं हा मार्ग अधिक योग्य.  

उपलब्ध असणाऱ्या दोन पर्यायांमध्ये तुलना- एखाद्या विवाहसंस्थेच्या वेबसाईटवर नांव नोंदवल्यावर अनेक पर्याय दिसू लागतात. फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन सारख्या वेबसाईटवर जसा दोन वस्तूंमध्ये तुलना करण्याची सोय असते, तसं काहीसं आपल्या डोक्यात सुरु होतं. जो सर्वोत्तम असेल तो जिंकेल अशा अविर्भावात जणू, पर्यायांची तुलना सुरु होते. विशेषतः आपल्याला आलेल्या इंटरेस्ट रिक्वेस्ट्स बाबत तर हे अधिकच होतं. या प्रकारातला सगळ्यात मोठा तोटा असा की, मला नेमकं काय हवंय, माझ्यासाठी अनुरूप काय असणार आहे या मूलभूत विचारांपेक्षा तुलनेत वरचढ ठरणाऱ्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं जातं. आणि एकदा का आपल्याही नकळत आपण या तुलनेच्या मार्गावर जाऊ लागलो की शॉपिंग करताना अनेकांचं होतं तसं- “अजून थोडं थांबलं तर अजून चांगलं काहीतरी मिळेल” सारखे विचार बळावतात. हे काही फार बरं लक्षण नव्हे.
 
दुसऱ्याची स्वतःशी तुलना- जोडीदार शोधताना ही चौथ्या प्रकारची तुलना अगदी प्रत्येक टप्प्यावर असते. ‘आपल्या तोलामोलाचं खानदान असावं’ असं म्हणतच जोडीदाराचा शोध सुरु होतो. आता हे तोलामोलाचं बघताना, जात-पैसा-मालमत्ता-समाजातला मानसन्मान अशा गोष्टी प्राधान्याने पुढे येतात. तिथे तुलना झाली की ‘दिसणं’ महत्त्वाचं ठरतं. जोडीदाराच्या उंचीबाबत अगदी कट्टर अपेक्षा ठेवणारे भेटतात. “अहो, जोडीदाराबाबत किमान ५ फूट ४ इंच अशी अपेक्षा आमची असताना तुम्ही ५ फूट साडेतीन इंच उंची असणाऱ्या मुलाचं प्रोफाईल कसं काय सुचवलंत?”, असं म्हणणाऱ्या मंडळींकडे बघून माझी आई तर म्हणते – “अगदी इंच इंच लढवतायत!”. त्यातही समोरच्या व्यक्तीची आपल्याशी तुलना करताना पडद्यामागे असणारा ‘लोक काय म्हणतील’ हा विचार डोकावत नाही असं खात्रीशीरपणे सांगता येत नाही. लोकांसमोर दोघे नवरा बायको म्हणजे ‘अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा’ दिसले पाहिजेत, असा अट्टाहास येऊ लागला म्हणजे मग हे इंच इंच लढवणं सुरु होतं. माझा जोडीदार हा मला तुल्यबळ असण्यापेक्षा मला अनुरूप असावा यासाठी प्रयत्न करण्यात प्रगल्भता आहे.

मानवाच्या इतिहासात तुलनेचा नेहमीच तोटा झालाय असं नाही. जोडीदार निवडीच्या प्रक्रीयेबाबतीत मात्र या चारही प्रकारच्या तुलनेचे तोटेच अधिक आहेत. ‘तुलना करणे’ हे आपल्या नैसर्गिक स्वभावातच आहे कदाचित. त्यामुळे तुलनांच्या या चक्रव्युहात आपण अगदी अलगद अडकत जातो. आणि अभिमन्यूसारखी अवस्था होऊन त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं. अर्थातच थोड्याश्या प्रयत्नांनी आणि सजग राहून, हे टाळता येणं शक्य आहे. तुलनेचा काही प्रमाणात दिशादर्शक म्हणून उपयोग होऊ शकतो, हे अनेकांचं असणारं म्हणणं मला मान्य आहे. पण म्हणून त्यावर विसंबून राहणं मात्र शुद्ध वेडेपणाचं वाटतं मला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या ‘लिंकन’ सिनेमात एक अप्रतिम संवाद आहे. त्यात अब्राहम लिंकन म्हणतो, ‘दिशा दाखवणारा कंपास हा तुम्हाला बरोब्बर दिशा दाखवेल पण त्या दिशेला असणारे खाचखळगे तो सांगत नाही!’. आणि म्हणूनच सगळ्या प्रकारच्या तुलनेला जरा किनाऱ्यावर ठेवून, मगच जोडीदार शोधण्यासाठी मुशाफिरी करण्यात शहाणपण आहे, नाही का?!

(दि. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, October 20, 2018

पर्यायांचा महापूर


 “जेवता जेवता काहीतरी बघावं म्हणून मी ‘नेटफ्लिक्स’ लावलं. पण जेवण संपलं तरी नेमकं काय बघावं ते ठरलंच नव्हतं माझं.”, मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता. मला ते ऐकून गंमत वाटली होती. नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राईम अशा ऑनलाईन सिनेमा, सिरीज बघण्याची सोय देणाऱ्या सेवांमुळे बघायला अक्षरशः हजारो गोष्टी असतात आपल्यासमोर. आपल्याला हव्या त्या पद्धतीचे, वेगवेगळ्या भाषांतल्या फिल्म्स आणि सिरीज इथे बघता येतात, असं असताना तपटकन एखादी निवडणं का बरं कठीण गेलं असेल? पण नुकताच अगदी असाच अनुभव मलाही आला. अमेरिकेच्या प्रवासाला निघालो तेव्हा विमानात समोर असणाऱ्या स्क्रीनवर ६५० वेगवेगळ्या फिल्म्स बघायला उपलब्ध आहेत असं दिसत होतं. मी खुश झालो. पण माझ्या त्या मित्राप्रमाणेच बराच वेळ मीदेखील नुसतेच कोणकोणत्या फिल्म्स आहेत ते बघत बसलो होतो. ‘ब्राउझ’ करत होतो. त्यात मला आवडणाऱ्या कित्येक फिल्म्स होत्या. कित्येक अशाही होत्या ज्या मला ‘एकदा बघायची आहे हं ही फिल्म’ या वर्गात मोडणाऱ्या होत्या. पण तरीही एका कोणत्या तरी फिल्मपाशी थांबून ती मी बघायला लागायला भरपूर वेळ गेला. समोरच्या असंख्य पर्यायांमध्ये मी अगदी वाहवत गेलो होतो. नेमक्या निर्णयापाशी मला येताच येत नव्हतं. या अनुभवाने जरा डोक्यातल्या विचारचक्राला गती आली. टीव्ही चॅनेल्सचं उदाहरण आहे. पूर्वी टीव्हीवर एक दूरदर्शन हाच चॅनेल दिसायचा. नंतर एकेक करत वाढत गेले. आज तर एकूण किती भाषांमधले किती चॅनेल्स आहेत काय माहित! त्यात रोज भर पडते आहेच. त्यातून टीव्ही चॅनेल्स ‘सर्फिंग’ असा एक प्रकार निर्माण झाला. ‘ब्राउझिंग’ हा जणू आपल्या सगळ्याच जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे की काय?

बहुसंख्य पर्याय उपलब्ध असणं हे आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि एकूणच चांगलं राहण्यासाठी आवश्यक मानलं जातं. एका हॉटेलमधला इडली-डोसा नाही आवडला तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा पर्याय आणि स्वातंत्र्य उपलब्ध असेल तर आपण अधिक आनंदी राहू. या उलट तुम्हाला आवडो किंवा न आवडो, अमुक हॉटेल मध्येच तुम्हाला इडली-डोसा खावा लागेल असं बंधन कोणी घातलं तर ते मनाला रुचणार नाही. माणूस स्वतःच्या आनंदासाठी, सुख-सोयींसाठी अधिक पर्याय उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थेत राहू बघतो. पण ‘जेवढे पर्याय अधिक तेवढं अधिक आनंदाच्या आणि सुख-सोयीच्या दिशेने जाणं, हे ‘थिअरी’ मध्ये पटलं, तरी प्रत्यक्षात असं घडतं का?’, यावर जगभर अनेक मंडळी अभ्यास करत आहेत. अमेरिकन मानसशास्त्रज्ज्ञ बॅरी श्वार्ट्झ याने या विषयावर एक पुस्तकच लिहिलं आहे ज्याचं नाव आहे- ‘द पॅरॅडॉक्स ऑफ चॉईस’- पर्यायांचा विरोधाभास! यावरचा त्याचा टेड टॉकदेखील फार रंजक आहे. हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात बॅरी श्वार्ट्झ म्हणतो, मुबलक पर्यायांमुळे निवड क्षमता तर कमी होतेच, पण त्याबरोबर आपण निवडलेल्या पर्यायाबाबत वाटणारं समाधान देखील कमी होताना दिसतं- पर्याय योग्य निवडला असला तरीही. पर्याय निवडीच्या प्रक्रियेत येणारा मानसिक थकवा वेगळाच. अनेक पर्यायांमुळे चिंता, हळहळ, अपेक्षा अवास्तव वाढवून ठेवणे आणि स्वतःला दोष देणे अशा गोष्टींना आपण आपल्या मनात जागा देतो.

हे आज लेखात मांडायचा हेतू असा की, जोडीदार निवड, लग्न आणि त्यातही विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या दुनियेत या सगळ्या अभ्यासाला विचारात घेणं भाग आहे. गेल्या पिढीपर्यंत लग्नाच्या क्षेत्रात पर्यायांची उपलब्धता ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती जणू. ‘पहिलीच मुलगी बघितली आणि लग्न करून टाकलं’ अशा कित्येक कथा, आत्ता माझ्या आजी-आजोबांच्या पिढीत असलेली मंडळी सांगतात. पण आता जमीन अस्मानाचा फरक पडलाय. शेकडो विवाहसंस्था आहेत. रोज नव्याने भर पडणाऱ्या वेबसाईट्स आणि या सगळ्यावर लग्नाला उभ्या मुला-मुलींची हजारो-लाखोंच्या संख्येने प्रोफाइल्स आहेत. “मी चारशे मुलांची प्रोफाइल्स बघितली. त्यात आवडलीही बरीच. पण एकच मुलगा निवडायचा, तर ते काही जमत नाहीये.”, मध्यंतरी नम्रता आमच्या एका कार्यक्रमात सांगत होती. हे केवळ तिच्याच बाबतीत घडतं असं नव्हे तर शेकडो स्थळं बघितली पण अजून अंतिम निर्णय घेता येत नाहीए असं म्हणणारी कित्येक मुलं-मुली मला भेटतात. का घडतं असं?

मला वाटतं, असं घडण्यामागे दोन गोष्टी आहेत- पहिली म्हणजे चुकण्याची भीती. यातही गंमत अशी आहे की, एकही पर्याय नसताना निवड चुकल्यावर तेवढं वाईट वाटत नाही, जेवढं पर्याय असताना चुकीचा पर्याय निवडला या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतं. एक प्रकारे आपण ‘आपला निर्णय चुकणं’ हे आपल्या व्यक्ती म्हणून असणाऱ्या योग्यतेशी जोडायला जातो. आपल्या चुकीच्या किंवा बरोबर निर्णयाला आपण आपल्या आत्मसन्मानाशी जोडतो. साहजिकच चुकीचा पर्याय निवडण्याच्या शक्यतेची एक जबरदस्त भीती मनात बसते. आणि ही भीती, निर्णय घेणं लांबणीवर टाकायला भाग पाडते. चुकण्याची भीती या पहिल्या गोष्टीनंतर येणारी दुसरी गोष्ट आपल्याला या भीतीच्याही एक पाउल पुढे नेतो. आणि ती म्हणजे, ‘अजून चांगला पर्याय मिळू शकला असता’ हा विचार. या विचारामुळे आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा ‘ठरवला’ जाण्याची शक्यता वाढते. आपण घेतलेला निर्णय योग्य असला तरीही, ‘अजून चांगला पर्याय निवडता आला असता का’ या विचारामुळे घेतलेला निर्णय चुकीचाच आहे असं ठरवलं जाऊ शकतं. अर्थातच, एखादी वस्तू घेण्याच्या निर्णयापेक्षा जोडीदार निवडण्याच्या निर्णयात या विचारांची तीव्रता कित्येक पटींनी वाढते. साहजिकच या सगळ्याचा परिणाम आपल्या आपल्या आनंदी राहण्यावर नसता झाला तरच नवल.

मग या परिस्थितीत काय बरं करावं? उपाय म्हणून एक त्रिसूत्री डोक्यात आली-
१.      मला काय हवंय, याची स्पष्टता आणि नेमकेपणा. एक उदाहरण बघा. समजा, पुण्याहून मुंबईला जाणे हे हवं असेल, तर बस, रेल्वे, विमान, स्वतःची गाडी, कॅब असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यातला कोणता निवडायचा याने गोंधळात पडायला होईल. पण “दुपारी पुण्यातून निघून, आरामदायी पद्धतीने ए.सी. मध्ये बसून पण पाचशे रुपयांपेक्षा जास्त महाग पडणार नाही, तरी चार तासाच्या आत पोचवेल असा पर्याय हवाय” असा नेमकेपणा आणला की, बाकी पर्याय आपोआप कमी होत होत शिवनेरी बसने जाण्याचा पर्याय समोर येतो. नेमकेपणा असा उपयोगी पडतो.

२.     इतर पर्याय? छोड दिया जाये! आता या वरच्या उदाहरणात इतर जे पर्याय होते, त्यांना धरून ठेवलं आणि मोकळं सोडून दिलं नाही तर, ते मला ‘हळहळ वाटण्याच्या’ भावनेकडे खेचत राहतील. “अर्रर... यापेक्षा रेल्वे स्वस्त पडली असती...” या सारखे नंतर येणारे विचार आपण निवडलेला पर्याय चुकीचा ‘ठरवायला’ हातभार लावतात. एकदा निर्णय झाल्यावर इतर पर्यायांना सोडून देणं हा यावरचा मार्ग आहे. इंग्रजीत याला ‘लेट गो म्हणतात. यासाठी डॉ. अनिल अवचट यांनी बोलताना एकदा वापरलेले शब्द होते - “छोड दिया जाये!”. मंत्रच आहे हा एक!

३.      कुछ तो लोग कहेंगे. चुकण्याच्या भीतीमागे अनेकदा लोक काय म्हणतील आणि मी निवडलेल्या पर्यायाला चूक ठरवलं जाईल का, या विचारांचा पगडा असतो. काहीही केले तरी नावं ठेवणारे लोक सापडतीलच. शेवटी, मला काय वाटतंय आणि माझ्या आनंदात, समाधानात कशाने भर पडते आहे यावर अधिक लक्ष देणं आणि आत्मविश्वासाने निर्णय घेऊन ते निभावणं याला पर्याय नाहीच!

थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, अनेक पर्याय उपलब्ध असणं, हे आजच्या आपल्या जगाचं वास्तव असलं तरी, ते आपल्याला मदत करणारं ठरायला हवं, निर्णय घेण्याच्या दृष्टीने पंगू करणारं नव्हे. अनंत पर्यायांच्या महापुरात वाहवत न जाता, जोडीदार निवडायच्या दिशेने निर्णायक पाउल उचलणं शहाणपणाचं आहे, नाही का?   

(दि. २० ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

Monday, September 24, 2018

तडजोडीच्या पुढे जाताना

“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो, काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या मुलीचा पगार अमुक अमुक आहे, पण त्यापेक्षा जास्त पगार असणाराच नवरा असावा कारण शेवटी घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे.” अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांबद्दलही मला असंच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन मला आपल्या पालकांना दुजोरा देणाऱ्या मुला-मुलींचं जास्त आश्चर्य वाटतं. शिवाय अशा मंडळींची संख्याही कमी नाही, हे बघून काही प्रमाणात चिंताही वाटते. 

मला कायमच प्रश्न पडत आला आहे की स्त्री-पुरुष समता हे एक जीवनमूल्य म्हणून आपण खरंच स्वीकारलं आहे का? की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे? असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं? त्या निमित्ताने निदान ही स्त्री-पुरुष समता अंमलात तरी येते आहे की..’ असा प्रश्न पडू शकतो. तडजोड असली म्हणजे आपण सतत यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याही नकळत शोधत राहतो. तडजोड म्हणजे जणू तात्पुरता उपाय. तात्पुरती मलमपट्टी. तडजोड ही भावना मुळातच नकारात्मक आहे. तडजोडीकडून आपल्याला स्वीकाराकडे (Acceptance) जायला हवं. स्वीकाराच्या पुढे येतं ते म्हणजे अनुकूल होणं (Adaptation). आणि अनुकूलनाकडून आपण जातो आत्मसात (Internalization) करण्याकडे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ असं एक वाक्य नेहमी बोललं जातं. मला ते बिलकुल पटत नाही. सुरुवात तडजोडीने होतही असेल. पण तडजोडीकडून आत्मसात करण्याकडे जाण्याचा हा चार टप्प्यांचा प्रवास हा, केवळ लग्नच नव्हे, तर कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया आहे. म्हणूनच एखादी गोष्ट आपण तडजोड म्हणून अंमलात आणली आहे की एक जीवनमूल्य म्हणून आपण हे स्वीकारून पुढे जात आत्मसात केलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.


हे आठवण्याचं एक कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत लग्नाला उभे मुलगे, मुली आणि त्यांचे पालक, यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत जेव्हा एखाद्या विवाहसंस्थेत किंवा वेबसाईटवर नांव नोंदवलं जातं तेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांत ‘जोडीदार कमावता असावा का’ हा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये मुलींकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये ‘असलाच पाहिजे’ हाच पर्यायच निवडलेला असतो. मुलांकडून मात्र ‘काहीही चालेल हा पर्याय निवडला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. ‘आर्थिकदृष्ट्या घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पुरुषाची आहे, आणि स्त्रीने देखील कमावलं तर अधिक बरे पडेल, हे खरं असलं तरीही ते काय बंधनकारक नाही’ ही विचारधारा अगदी पक्की झाली आहे. मध्यंतरी एक मुलगी मला सांगत होती, “लग्नानंतर काही वर्ष मला आवडतंय तोवर मी जॉब करीन. पण नंतर करीनच असं नाही. मला माझे पेंटिंग वगैरे छंद जोपासायला आवडेल. त्यामुळे मला नवराही असा हवाय जो आत्ताची माझी लाईफस्टाईल तरी निदान टिकवू शकेल एवढे कमावत असेल.” या मुलीचं लग्न जमायला काहीच अडचण नाही आली. पण विचार करा असं एखाद्या मुलाने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असतं तर? मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं? बरं, हा सगळा पुरुषानेच घर चालवण्याचा आग्रह केवळ मुलींकडून येतो असं नव्हे तर ते आपलंच मुख्य काम आहे अशी बहुसंख्य पुरुषांचीही समजूत आहे. एकुणात मध्ययुगीन मानसिकतेला बढावा देण्याचं काम दोघं मिळून करतात अगदी! 

या सगळ्याचा अर्थ, आता उलट परिस्थिती आणावी असा नव्हे. आता स्त्रियांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी आणि पुरुषांनी मुख्यतः आपले छंद जोपासावेत, घर-मुलं याकडे बघावं असंही मी सुचवत नाहीये. लग्नाच्या नात्यामध्ये, अरेंज्ड मॅरेज असेल नाहीतर लव्ह मॅरेज, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं असो किंवा घरकाम-मुलं या दृष्टीने घर चालवणं असो, ती दोघांचीही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. म्हणून आपण इथे समता हा शब्द ‘समन्यायी या अर्थी वापरत आहोत. समन्यायी व्हायचं, याचा अर्थ असा की, ‘स्त्री आहेस म्हणून तुझं काम हे आणि ‘पुरुष आहेस म्हणून तुझं काम ते ही विचारधाराच मूळातून काढून टाकावी लागेल. हे होणार नाही तोवर आपल्या समाजाची मानसिकता विषम न्यायाचीच राहिल. का कुणास ठाऊक, अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात असा माझा अनुभव आहे. आपल्या समाजात मुक्त विचार आणि उदारमतवाद हा तडजोडीकडून स्वीकार आणि अनुकूलन यासह आत्मसात करण्याकडे जायला हवा. त्याचं प्रतिबिंब जोडीदार निवडीच्या प्रक्रियेतही दिसायला हवं. जमेल आपल्याला हे?

(दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, September 15, 2018

‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा


ज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे, ती व्यक्ती मुळात कशी आहे, ही एक गोष्ट जोडीदार निवडताना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष!) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का? तुमच्यासाठी जोडीदार निवडण्यासाठी तुम्हाला अगदी नेमकेपणाने कोण ओळखतं?

आधीच्या पिढीपर्यंत पालकवर्गाची या क्षेत्रात पूर्ण सत्ता होती जणू. पण यात बदल झाला. विसाव्या शतकात बदलणाऱ्या अर्थकारण-समाजकारणाने व्यक्ती कुटुंबापासून काहीशी स्वायत्त होत गेली. मी स्वतःला कोणाहीपेक्षा जास्त ओळखतो/ते, आणि म्हणून माझ्या जोडीदाराबद्दलचा अंतिम निर्णय घ्यायला मीच सर्वाधिक लायक आहे’, असा सूर उमटू लागला. अर्थात आजही आमच्याकडे येणारे काही पालक दावा करतात की, ‘आम्हाला आमच्या मुला/मुलीच्या आवडी-निवडी, अपेक्षा असं सगळं नीट माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्याची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेण्यात काही गैर नाही. क्वचित प्रसंगी मुलं-मुलीही या म्हणण्याला दुजोरा देतात. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात काही काळ घालवला आहे अशा कोणत्याही पालक-मुलामुलींशी बोलल्यावर जाणवतं की, हे वाटतं तितकं सोपं नसतं! “आम्ही सुचवतो त्यातलं एकही स्थळ आमच्या मुलाला/मुलीला आवडत नाही” असं म्हणणारे पालक, आणि “आई-बाबांना नेमकं कळतच नाहीये, मला जोडीदार म्हणून कशी व्यक्ती हवीये.”, असं म्हणणारी मुलंमुली, आम्हाला अगदी रोज भेटत असतात. स्वतःच्या नेमक्या ओळखीचा हा गंमतीशीर घोळ झाला की लग्नाची इच्छा असतानाही लग्न लांबणीवर पडू लागतं.

आनंदी सहजीवनासाठी जोडीदार निवडीच्या अपेक्षा ठरवण्याआधी स्वची नीट ओळख करून घ्या हा झाला सिद्धांत- थिअरी. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवायचा कसा? गेल्या शतकात यावर एक उत्तर शोधलं गेलं ते मानसशास्त्रातून. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून व्यक्तिमत्व कसं आहे, स्वभाव कसा आहे, नात्याच्या दृष्टीने स्वभावातल्या धोक्याच्या जागा कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या अशा प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर देणारी यंत्रणा मानसशास्त्राने दिली. अजूनही त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आज या चाचण्या आणि त्याबरोबर केलं जाणारं समुपदेशन हे या स्व च्या ओळखीसाठी उपयोगी पडतं आहे. त्या आधारे जोडीदार निवडीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढतंय. कोणत्याही व्यक्तीला ओळखणं यात दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात- एक म्हणजे नेमक्या आणि उपयुक्त माहितीचं संकलन, जे या मानसशास्त्रीय चाचण्यांमधून केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण- जे या चाचणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि समुपदेशनातून केलं जातं. मानसशास्त्रातली वेगवेगळी साधनं हेच काम करतात. पण या जोडीला एकविसाव्या शतकात एका नव्या गोष्टीने जन्म घेतलाय. आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

द वॉल स्ट्रीट जर्नलचा २०१२ मधला एक लेख मी वाचला होता. त्याचं शीर्षक होतं- तुमचं पुस्तक तुम्हाला वाचतंय!मोबाईल, आय-पॅड किंवा किंडल अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं हातात घेऊन त्यावर ई-पुस्तक वाचणं ही गोष्ट आता भारतात देखील नवीन राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता आपल्या हातात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गंमत अशी आहे की तुम्ही त्या उपकरणातून एखादी सोय-सेवा मिळवत असता तेव्हा ते उपकरणही तुमची माहिती गोळा करत असतं. जेव्हा वाचक एखादं ई-पुस्तक वाचत असतो, तेव्हा ते उपकरणही एक प्रकारे तुम्हाला वाचत असतं. आणि त्यातून तुमच्याविषयीची माहिती मिळवत असतं. पुस्तकाच्या कोणत्या पानावर तुम्ही किती वेळ घालवलात, कुठे तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायची गरज पडली, कुठली पानं तुम्ही न वाचताच पुढे गेलात अशी सगळी माहिती गोळा केली जात असते. या माहितीचं नेमकं विश्लेषण करण्यासाठी क्लिष्ट स्वरुपाची गणिती प्रक्रिया उभारली जाते, म्हणजेच अल्गोरीदम्स बनवले जातात. हे अल्गोरीदम्स अधिकाधिक ताकदवान बनवता येतात जेव्हा विश्लेषण करण्यासाठी विस्तृत माहिती त्यांना मिळू लागते. फेस रेकग्निशन सारख्या गोष्टी या आपल्या हातातल्या मोबाईलवर आल्या आहेत. त्या या पुस्तक वाचण्याच्या उपकरणाबरोबर जोडल्यावर तुमचा चेहरा बघून कोणता मजकूर वाचताना तुम्हाला हसू आलं, कधी वाईट वाटलं अशा गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. अनेक जण आता हातात स्मार्टवॉच किंवा फिटबीट सारखी उपकरणं घालतात. यातून तुमच्या शरीराची इत्थंभूत माहितीही मिळू शकते. हे सगळं समजा, ई-पुस्तकाच्या उपकरणासह, एका यंत्रणेला जोडलं असेल तर पुस्तकाचा कोणता भाग वाचताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढले हेही नोंदवलं जाईल. या यंत्रणेच्या अल्गोरिदमला तुमच्याबद्दलची अधिक माहिती मिळेल. या माहितीचं सविस्तर विश्लेषण करून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात याचे आडाखे बांधले जातात. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही, हे तुमच्या या सगळ्या माहितीच्या विश्लेषणावरून अल्गोरिदमच सांगू शकेल!

हे फक्त ई-पुस्तकाच्या बाबत लागू नाही. सगळीकडेच आहे. मोबाईल आणि इंटरनेट मार्फत या अल्गोरीदम्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टींची सातत्याने नोंद ठेवली जाते. आपल्या आवडी-निवडी, मित्रपरिवार, आपण कुठे जातो फिरतो, सवयी, आनंदाचे क्षण, रागाचे क्षण या सगळ्याची माहिती सातत्याने बघू शकता येईल, तपासता येईल असे अल्गोरिदम तयार करून, त्यातून तुम्ही नेमके कसे आहात याची एक प्रतिमा निर्माण होत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा, जी या सगळ्या माहिती आणि विश्लेषणानंतर तुम्हाला योग्य ते सल्ले देते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च केली असेल आणि त्यानंतर फेसबुक उघडलं तर त्या सर्च केलेल्या गोष्टीशी निगडीत जाहिराती तुम्हाला दिसू लागतात. ही या अल्गोरिदम्सची कमाल आहे. जसजसं जास्त क्लिष्ट अल्गोरीदम्स आणि सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या क्षमतांपेक्षा अधिक दर्जेदार काम करू लागतात, तसतसं आपण त्यावर अवलंबून राहू लागतो. हे आत्ताही घडतंच आहे. लेखक युवाल नोआह हरारी आपल्या एका भाषणात याविषयी बोलताना गुगल मॅपचं उदाहरण देतो. अपरिचित शहरात गेल्यावर तिथले रस्ते माहित नसताना गुगल मॅपला एखाद्या ठिकाणी जायचं कसं ते आपण विचारतो. आणि त्यानंतर ते अॅप्लिकेशन जे सांगतं ते बिनबोभाट पाळतो. का बरं? कारण आपल्याला विश्वास असतो, की या परिस्थितीत हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षाही अधिक योग्य काहीतरी सांगणार आहे.

नेटफ्लिक्स वरच्या ब्लॅक मिरर नावाच्या भन्नाट मालिकेत एक भाग या विषयावर आहे. त्यातल्या एक अशी व्यवस्था दाखवली आहे, जिथे अल्गोरीदम्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तुमच्यासाठीचा अनुरूप जोडीदार निवडला जातो. अर्थात ती एक काल्पनिक कथा आहे. पण या प्रकारच्या गोष्टी भविष्यात फार लांब नाहीत. आजही तुमच्या फेसबुकवरच्या वावराच्या आधारे, तुमच्या मित्रपरिवाराच्या आधारे तुम्हाला फेसबुक हे काही लोक तुम्हाला माहित असतील(पीपल यू मे नो) असं म्हणत सुचवतं. लग्नासाठी जोडीदार निवडण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स, डेटिंग साईट्स या अशा गोष्टींचा प्राथमिक पातळीवर वापर करू लागल्या देखील आहेत. अर्थातच अधिकाधिक सुधारणा होत त्याही भविष्यात त्यावर विसंबून राहता येईल एवढ्या जास्त विश्वासार्ह बनतील. मानसशास्त्रातल्या साधनांसह, ‘स्व च्या ओळखीसाठी एका नव्या वाटेवर आपला आता प्रवास चालू आहे. नजीकच्या भविष्यात, तुम्हाला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त नीट ओळखणाऱ्या अल्गोरिदमच्या आधारे तुमच्यासाठी अनुरूप जोडीदार कोण असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू लागला तर आश्चर्य वाटायला नको! त्यावेळी आपण गुगल मॅप सारख्या गोष्टीवर आज ठेवतो तसा पूर्ण विश्वास ठेवू का, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे!

(दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)