Saturday, May 19, 2018

माझ्या हातातल्या गोष्टी


शिप ऑफ थिसिअसया नितांत सुंदर सिनेमात एक प्रसंग होता. शेअर ब्रोकर असणारा नवीन नावाचा एक तिशीच्या आसपासचा मुलगा एका गरीब माणसाला न्याय देण्यासाठी प्रचंड झटतो. त्याच्या परीने त्याला शक्य ते सारं करतो. पण सगळं शक्य होत नाही. शेवटी थकून, काहीसा निराश होत तो त्याच्या आजीशेजारी बसतो. आजीने अनेक वर्ष सामाजिक काम केलंय. तिला हे सगळे अनुभव, त्यावेळची निराशेची भावना हे अगदी नीट माहित्ये. ती त्याला फक्त एवढंच म्हणते- इतना ही होता है|” बस्स. त्यापुढे काही संवाद नाही. पण त्या वाक्यात सगळं काही आलं.

माझ्या हातात असणाऱ्या गोष्टी मी केल्या आणि माझ्या हातात नसणाऱ्या गोष्टी मी स्वीकारल्या यात समाधान आहे हेच एक प्रकारे ती आजी आपल्या नातवाला सांगते. एका अमेरिकन विचारवंताने बनवलेली एक प्रार्थना आहे. सेरेनिटी प्रेयर- मनःशांतीची प्रार्थना. त्या प्रार्थनेचं मराठी रूप मी प्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट यांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं होतं-

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया. 
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय,
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया

मला ही प्रार्थना विलक्षण आवडते. माझ्या हातातल्या आणि हातात नसणाऱ्या गोष्टी अशी विभागणी यात आहे. हातात नसणाऱ्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत. ते महत्त्वाचं आहेच पण एवढंच स्वतःला सांगून ही प्रार्थना संपत नाही तर हातात असणाऱ्या गोष्टी मी निर्धाराने करायच्या आहेत हेही यामध्ये आहे. पुढे जाऊन कोणत्या गोष्टी माझ्या हातातल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे माझं मलाच समजायला हवं असंही या प्रार्थनेत आपण स्वतःला सांगतो. दुसरं-तिसरं कोणी येऊन सांगणार नाही, माझं मलाच ते शोधायचं आहे.


 मागे एका मित्राशी मी हे बोलत असताना तो म्हणाला “एखादी गोष्ट आपल्या हातात नाही हा विचार करून डोकं शांत कसं राहील? उलट आपल्याला त्रास होणारी गोष्ट आपल्या हातात नाही हे जाणवून जास्तच त्रास होतो आपल्याला”. एक क्षण विचार करता मला पटलं त्याचं. पण दुसऱ्याच क्षणी जाणवलं की ज्या गृहितकावर/ समजुतीवर आधारित तो हे बोलतोय तिथेच बहुधा गडबड आहे. इतरांचं वागणं, बोलणं हे मला त्रास होण्यामागचं कारण आहे असं त्याचं गृहीतक होतं. “हे असं घडलं म्हणून मी चिडलो”, “तमुक व्यक्ती अशी वागली म्हणून मी असा वागलो”, “अमका असं काहीतरी वागला जे त्याने वागायला नको होतं म्हणून मी निराश झालो.” “तमक्या तमक्याने या या विषयावर सिनेमा बनवला म्हणून मला राग आला”, “अमकं पद्धतीचं चित्र काढलं म्हणून मला चित्रकाराबाबत तिरस्कार वाटू लागला”, अशा पद्धतीची वाक्य अनेकदा आपण बोलतो. आपल्या आजूबाजूच्या मंडळींना बोलताना ऐकतो. किती सोपं आणि साधं आहे ना! माझ्या भावनांची जबाबदारी मी सहजपणे झटकून मोकळा. जे काही घडलं ते दुसऱ्या माणसामुळे, त्याच्या वागण्यामुळे, निर्माण झालेल्या प्रसंगामुळे.’, असं ठरवून मोकळा!

मला वाटतं तीन टप्प्यात ही सगळी प्रक्रिया घडते. पहिला टप्पा म्हणजे प्रत्यक्ष एखादा प्रसंग घडणे. मग समोरच्या व्यक्तीचं एखादं वागणं किंवा बोलणं असेल. दुसरा टप्पा येतो त्या प्रसंगाचा मी माझ्या परीने अर्थ लावणे. आणि तिसरा भाग म्हणजे त्या अर्थ लावण्यानुसार काढलेल्या निष्कर्षाला मी माझी शा‍ब्दिक किंवा कृतीतून प्रतिक्रिया देणे.

प्रसंग à अर्थ लावत निष्कर्ष काढणे à त्या निष्कर्षांना प्रतिक्रिया देणे.

आता यात जर कोणी प्रश्न केला की तू अमुक अमुक पद्धतीनेच का बरं प्रतिक्रिया दिलीस तर सहजपणे आपण म्हणतो की मूळापाशी गेलो तर लक्षात येईल की टप्पा क्र १ मध्ये जो काही प्रसंग घडला आहे त्यामुळे असं झालं. वरवर बघता ते योग्यही वाटतं. तिथून तर खरी सुरुवात झाली की असं म्हणत आपण स्वतःला पटवतो की खरा दोष त्या प्रसंगाचाच किंवा त्यात असणाऱ्या व्यक्तीचा आहे. पण खरी गंमत अशी की, सगळी गडबड दुसऱ्या टप्प्यावर आहे, एखाद्या प्रसंगाचा अर्थ लावत निष्कर्ष काढण्यामध्ये आहे. आपण आपली प्रतिक्रिया प्रसंगाला देत नसतोच मुळी. आपण ती निष्कर्षाला देत असतो, जो निष्कर्ष आपण आपल्या पद्धतीने अर्थ लावून काढलेला असतो.

निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव, ज्ञान आणि समजुती यांचा आधार घेतो. पण इथेच थोडीशी गडबड असेल तर? जसं कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी उपलब्ध असणारी माहिती आणि ज्ञान तपासून बघतो आणि मग निर्णय घेतो, तसं व्यक्तिगत पातळीवर एखादा निष्कर्ष काढताना आपण आपली माहिती, ज्ञान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या समजुती आपल्याला वारंवार तपासून बघायला हव्यात. आपल्याच समजुतींना प्रश्न केले पाहिजेत. माझ्या काही समजुती तर्कविसंगत (Irrational) असतील तर त्या मला बदलायलाही हव्यात. जसं इतरांबद्दलच्या तर्कविसंगत समजुती असू शकतात तशा त्या माझ्या स्वतःबद्दलच्या देखील असू शकतात. माझ्या समजुतींमध्ये मी आवश्यक ते बदल केले तर आपोआप अंतिम निष्कर्षही बदलेल- आणि तेसुद्धा पहिल्या टप्प्यातला प्रत्यक्ष प्रसंग न बदलता! अरेच्चा, किती सोपं झालं ना सगळं!? पहिल्या टप्प्यामध्ये असणारा प्रसंग माझ्या हातातला नाही. पण तरीही मला मानसिक त्रास होत असेल तर दुसऱ्या टप्प्यावर मला तर्कशुद्ध समजुती बाळगल्या पाहिजेत. म्हणजे मग तिसऱ्या टप्प्यावर माझा मलाच होणारा त्रास मला टाळता येतो.

अरेंज्ड मॅरेजबाबत तर चांगलाच गोंधळ मनात असतो अनेकांच्या. मध्ये आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमाच्या वेळी एक मुलगी म्हणाली, “केवढी भयानक आहे ही प्रक्रिया. मला तर वेबसाईट उघडावी असंच वाटत नाही. आणि आई-बाबा तर सतत मागे लागलेत मुलं बघ, मुलं बघ म्हणत.”, त्यावर मी म्हणलं की मुलांना भेट तरी. बघ भेटून काय वाटतंय. आताच्या काळात एकदा भेट झाली की लगेच लग्न, असं नसतं. तुम्ही अनेकदा भेटू शकता, एकमेकांना थोडं जाणून घेण्याची संधी घेऊ शकता. त्यावेळी ती हो म्हणाली खरी, पण मनातून काय तिला पटलं नव्हतं. आणि मग जरा वेळाने म्हणाली, “सगळा दोष आपल्या सिस्टीमचा आहे. आपल्याकडेपण डेटिंग कल्चर वगैरे असतं तर या फंदातच पडावं लागलं नसतं मला”. पुढे जाऊन ही आता पंतप्रधानांनापण दोषी ठरवणार की काय असा गंमतीदार विचार माझ्या मनात येऊन गेला! विनोदाचा भाग जाऊ द्या, पण काय घडलं इथे? ‘अरेंज्ड मॅरेज ही पद्धत भयानक आहे, डेटिंग वगैरे पद्धतच खरी योग्य या आशयाचं गृहीतक तिच्या मनात होतं.  या भयानक अवस्थेतून जावं लागतंय मला, कारण म्हणजे ही सिस्टीम, असा निष्कर्ष तिने काढला देखील! लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणारे पालक आणि त्यांची मुलं-मुली यांच्याशी बोलताना मला जाणवतं की ते सतत खूप साऱ्या भावनिक आंदोलनांमधून जात असतात. रोलर कोस्टर राईडच असते ती एक. नकार न येणे, उत्तरं न मिळणे, हवा तसा प्रतिसाद न मिळणे, लग्न ठरण्याच्या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणे वगैरे वगैरे. परंतु अशा प्रसंगांमध्ये आपल्याच मनातल्या समजुतींच्या आधारे भलतेच निष्कर्ष काढून घेऊन स्वतःची मनःशांती ढळेल, असं वागणं काय शहाणपणाचं नाही म्हणता येणार. माझ्या भावना, माझा आनंद, माझी मनःशांती ही माझ्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही नाही, हे समजून घेत सुरुवात केली तर गोष्टी बऱ्याच सोप्या आणि आनंददायी होतील. मग, करूयात प्रयत्न?!

(दि. १९ मे २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध) 

Saturday, May 5, 2018

अहंगंडाचं करायचं तरी काय?



मध्यंतरी एका लग्नाला उभ्या असणाऱ्या मुलीचे वडील मला भेटायला आले होते. मला म्हणाले, “कानिटकर, तुम्हाला सांगतो, एकदम भुक्कड लोक आम्हाला अप्रोच करतात. म्हणजे ज्यांच्याकडे माझी मुलगी ढुंकूनही बघणार नाही अशी मुलं इंटरेस्ट रिक्वेस्ट पाठवतात.”, त्यांच्या बोलण्याच्या स्वरांतून,चेहऱ्यावरच्याहावभावातून,देहबोलीतून इतरांबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलची, विशेषतः आपल्या मुलीबद्दलची, श्रेष्ठ असण्याची भावना ओसंडून वाहात होती. लग्नासाठी जोडीदार निवडीच्या प्रवासात आपल्याला अनुरूप असा जोडीदार निवडण्याचा विचार करणं यात काहीच गैर नाही. माझ्या अपेक्षा अमुक अमुक आहेत, आणि त्यात न बसणारीस्थळं मला येत आहेत अशा आशयाचं बोललं गेलं असतं तर ते समजण्यासारखं होतं. कारण ते झालं परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार केलं गेलेलं विश्लेषण (analysis). पण आम्ही काही निकष आम्ही ठरवले आहेत आणि त्यात न बसणारी सगळी मंडळी भुक्कड आहेत या न्यायाधीश बनून निवाडा द्यायच्या (judgemental) मानसिकतेचं करायचं काय? एवढा पराकोटीचा अहंगंड नेमका येतो कुठून?

लग्नासाठी जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत स्थळ/घराणं तोलामोलाचं असावं असं म्हणण्याची एक मध्ययुगीन पद्धत आहे. मध्ययुगात उत्पन्नमानमरातब, घराणं (म्हणजे बहुतांशवेळा जातीनुसार असणारी उच्चनीचता), जमीनजुमला एवढ्या काही मोजक्या गोष्टी बघितल्या म्हणजे एखादं स्थळ तोलामोलाचं आहे किंवा नाही याचा फैसला होत असे.  गंमतीचा भाग असा की यात फार फरक पडलाय असं मला वाटत नाही. काळानुसार त्यात शिक्षणासारख्या गोष्टीची भर पडली आहे, पण मूलभूत मानसिकता बदललेली नाही. ठरलेल्या निकषांमध्ये न बसणारी मंडळी ही हीन दर्जाची आहेत,तुच्छ आहेत, आणि मी या निकषांमध्ये बसणारी व्यक्ती असल्याने अर्थातच श्रेष्ठ आहे, जगातल्या सर्वोत्तम गोष्टी मिळण्यासाठी पात्र आहे (I deserve the best) आणि म्हणूनच इतर तुच्छ जगाने माझं ऐकावं- त्यातच जगाचं भलं आहे’, अशी सगळी विचारांची साखळी निर्माण होते. आणि अशी सगळी विचारधारा असेल तर जोडीदार मिळणं तर कठीण आहेच, पण मिळाल्यावर ते नातं टिकवणं आणि फुलवणं अजूनच कठीण आहे. कारण अशावेळी,नात्यांत गरजेची असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट हरवलेली असू शकते आणि ती म्हणजे परस्परांबद्दलचा आदर.

अमिताभ बच्चन किंवा सचिन तेंडूलकर या मंडळींबद्दल आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं की, हे आपापल्या क्षेत्रात इतके महान असले तरी, एखाद्या नवख्या अभिनेत्याला किंवा खेळाडूला अतिशय आदराने आणि आपुलकीने वागवतात. समाजाच्या दृष्टीने ठरलेल्या निकषांनुसार अतिशय श्रेष्ठ असणाऱ्या अशा मंडळींकडूनही प्रत्येक माणसाला माणूस म्हणून आदराने वागवण्याची उदाहरणं दिसतात तेव्हा इतरांकडून असं का बरं होत नाही हा प्रश्न पडतोच पडतो.मला वाटतं या सगळ्यामागे कदाचित, एक फार महत्त्वाचा स्वभावगुण कुठेतरी मागे पडलेला असणं हे कारण असावं. आणि तो स्वभावगुण म्हणजे कुतूहल. या कुतूहल नावाच्या किड्याला आपण आपल्या मनात विकसितच होऊ देत नाही की काय असा मला प्रश्न पडतो. पु.लं.च्या एका लेखनात त्यांनी याला गप्प बसा संस्कृती म्हणलंय. इतर माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या भावनांबद्दल, त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल जाणून घ्यावं हे कुतूहल असलं पाहिजे. जगाच्या एका कोपऱ्यात आयुष्यातला बहुतांश काळ काढत, अगदी मोजक्या मंडळींशी नेमाने संवाद साधत, ठराविक परिघातल्या प्रसिद्धी माध्यमांचा आस्वाद घेत आपल्या इंद्रियांच्या क्षमतेनुसार आपण अनंत प्रकारची माहिती गोळा करत असतो. आणि आपल्या मेंदूच्या क्षमतेनुसार त्याचा अर्थ लावत असतो. आणि हे जे काही आपण आपलं मत तयार करायला वापरतो, ते जगातल्या एकूण माहिती, अनुभव, घटना, ज्ञान या सगळ्याच्या समुद्रातला एखादा थेंब आहे फक्त. अशावेळी कोणतीही आवश्यकता नसताना, हातात न्यायाधीशाचा हातोडा घेऊन समोर येणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा निवाडा करण्याचं ओझं आपण स्वतःहूनच कशासाठी घेतो? एकदा ते ओझं घेतलं की मी श्रेष्ठ आहे ही भावना फुलू लागते, एखाद्या अधिकाराच्या पदाच्या खुर्चीत बसलेल्या माणसाचा अहंभाव फुलावा तशी. न्यायाधीशाच्या भूमिकेत गेल्यावर कशाला चूक-बरोबर म्हणायचं याचे नेमके निकष ठरवणं गरजेचं असतं. आणि मग आपण ज्या निकषांवर सर्वोत्तम ठरू असे निकष तेवढे योग्य असं म्हणत आपण निवाडे द्यायला सुरुवात करतो. आणि त्यातून भुक्कड माणसं आम्हाला अप्रोच करतात यासारखी वक्तव्य बाहेर येतात.

लग्नाकडे, जोडीदार निवडण्याकडे खरंतर खूप वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे. लग्न ही गोष्ट दोन्ही व्यक्तींनी, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना विचार आणि अनुभव यांनी समृद्ध करणारी बनायला हवी. आणि त्यासाठी किमान कुतूहलाने एकमेकांकडे बघण्याची गरज आहे. मी माझ्या क्षमतेनुसार जे श्रेष्ठत्वाचे निकष ठरवले आहेत त्या पलीकडे जाऊनही समोरच्या मंडळींमध्ये देण्यासारखं बरंच काही असू शकतं याची जाणीव ठेवून तसा शोध घेतला पाहिजे. जगात सातशे कोटीपेक्षा जास्त लोक आहेत. या प्रत्येकाचे अनुभव, विचार, त्यांना बघायला-ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी (exposure), आणि या सगळ्यावरचं त्यांचं स्वतःचं अर्थ लावणं (interpretation), विश्लेषण (analysis) हे केवढं वेगवेगळं आणि अक्षरशः अद्भुत असू शकतं. प्रत्येकाचं म्हणणं आपल्याला पटेलच असं नाही, आवडेल असंही नाही. पण किमान; ते अस्तित्वात आहे, त्यामागे एक विचार आणि अनुभवांची साखळी आहे, या गोष्टी विचारांत घेत त्या व्यक्तींना आदर तर देऊ शकतो ना आपण? आणि आदर द्यायचा म्हणजे सांष्टांग नमस्कार घाला असं नव्हे. तशा दिखाव्याची गरजही नाही. पण संवादात आणि वागणुकीत किमान आवश्यक सौजन्य देखील आपल्या वागण्यात का असू नयेसुसंस्कृत समाजात सौजन्य ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती नसेल तर मध्ययुगीन जगातच आपण अडकलो आहोत हे समजून घ्यायला हरकत नाही.

या अहंगंडाचा एक भयानक दुष्परिणाम दिसतो जेव्हा नकार स्वीकारावे लागतात. आपण एवढे श्रेष्ठ, आपण एवढे महान आणि समोरची यःकश्चित व्यक्ती मला नाकारते म्हणजे काय?’ असा विचार करत आधी राग, मग दुसऱ्याला कमी लेखणं आणि मग नैराश्य असा प्रवास होतो. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत नकार पचवता न आल्याने नैराश्य आलेली उदाहरणं कमी नाहीत. उलट दिवसागणिक वाढतच चालली आहेत. आपल्याला हे हवंय का याचा एक समाज म्हणून विचार करायला हवा. न्यायाधीशाच्या भूमिकेत न जाता स्वच्छ मनाने, खुल्या मेंदूने व्यक्तींकडे बघायला हवं. कोणत्याही निर्णयप्रक्रियेत घ्यावी लागणारी विश्लेषक ही भूमिका आणि निवाडा देणाऱ्या न्यायाधीशाची भूमिका यातली पुसट रेषा समजून घ्यायला हवी. एका सौजन्यपूर्ण समाजासाठी हे आवश्यक आहे. जमेल ना आपल्याला?!

या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने गॉडफादरमधलं एक वाक्य आठवलं-कॉन्फिडन्स इज सायलेंटइन्सिक्युरीटी इज लाऊड. माझ्या अहंगडाच्या मागे कुठेतरी मनात असणारी असुरक्षितता आहे का?

(दि. ५ मे २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)