Saturday, June 30, 2018

एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत


मा‍झ्या मित्रमंडळींत गप्पांमध्ये नुकताच एक विषय चर्चेला आला. नवरा-बायको/ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे एकमेकांसोबत जगण्याला प्राधान्य देतात की एकमेकांसाठी? मला आमच्या लग्नाला उभ्या मुला मुलींच्या घेतल्या जाणाऱ्या गट चर्चा आठवल्या. त्यात कधीकधी आम्ही एक अर्धवट वाक्य देतो. “मला लग्न करायचंय, कारण की.....” हे ते वाक्य सहभागी मुला-मुलींनी पूर्ण करायचं असतं. आणि मग याच्या उत्तरांमध्ये अनेक वेगवेगळी उत्तरं येतात. “साथ देणारं कोणी तरी हवं”, “आयुष्यभराची मैत्री मिळावी म्हणून”,शेअरिंगसाठी, हक्काचा माणूस हवा म्हणून” वगैरे वगैरे. “माझ्यासाठी जगणारी व्यक्ती असावी म्हणून” किंवा “मला कोणासाठी तरी जगायचंय म्हणून” असं उत्तर काय आजवर कोणीही दिलं नाही. मग मला प्रश्न पडला, अरेंज्ड मॅरेज असो नाही तर लव्ह मॅरेज , अमुक अमुक व्यक्ती माझ्यासाठी काय करेल आणि मी त्या व्यक्तीसाठी काय करू शकेन या प्राथमिक आधारावर जोडीदार निवडला जातो का?

या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराकडे जाताना आपली कुटुंब व्यवस्था बदलली आहे काय? आणि असल्यास कशी आणि का बदलली आहे या प्रश्नाकडे जाऊया. मार्च मध्येमैफल पुरवणीत लिहिलेल्या लिव्ह इन विषयीच्या लेखात आपण लग्न व्यवस्था निर्माण कशी झाली याबद्दल चर्चा केली होती. लग्न व्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी कुटुंब व्यवस्था या तयार झाल्या त्या काळाच्या गरजांमुळे. टोळ्यांनी राहणारा माणूस शेती करत स्थिरावल्या वर; वारसा हक्क, शेती उद्योगासाठी हक्काचं मनुष्यबळ, सुरक्षितता या आवश्यकता निर्माण झाल्या होत्या. लग्न व्यवस्थेने वारसा हक्काचा प्रश्न निकाली लागत होता. कुटुंब नावाची चीज तयार होऊन, कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकांसाठी काही गोष्टी करण्याच्या प्रथा पडत गेल्या असणार ज्याचं प्रतिबिंब आजही जगभरच्या संस्कृतींमध्ये अनेक सणवार यामधून दिसतं. कुटुंब व्यवस्था तयार होत गेली आणि ती अधिकाधिक घट्ट होत गेली ती या परस्परावलंबित्वामुळे. गेल्या तीस एक वर्षात या सगळ्या गोष्टीला चांगलाच धक्का पोचला तोच मुळी हे परस्परावलंबित्व जवळ जवळ संपल्यामुळे!

माणसाला माणसाची गरज वेगवेगळ्या गोष्टींसाठी आजही आहे. पण एकोणिस आणि विसाव्या शतकातल्या यंत्र युगाची आणि त्या पाठोपाठ आलेल्या बाजारपेठ युगाची देणगी अशी की, व्यावहारिक दैनंदिन गोष्टींसाठी असणारी इतर माणसांची गरज तुलनेने कमी झाली आहे. अवलंबून असणं कमी झालं आहे. आणि दुसरं म्हणजे पूर्वी जन्मामुळे तयार झालेल्या नातेवाईक मंडळींवरच अवलंबून राहण्याची गरज आता शहरीकरण, जागतिकीकरण आणि संपर्क क्रांतीच्या पार्श्वभूमीवर उरलेली नाही. याचा अर्थ असा की पारंपारिक कुटुंब व्यवस्था आता गरजेचा पाया नसल्याने जवळ जवळ मोडीत निघाली आहे. आणि हे आपल्याला विभक्त कुटुंब पद्धतीत दिसतंच की. आता सामान्यत:, एकत्र कुटुंबामध्येही नवरा-बायको, त्यांची मुले यांच्यासह केवळ मुलाचे आई-वडील धरले जातात. अशी उदाहरणे फारच कमी आहेत जिथे सगळी भावंडे, त्यांची मुले, नातवंडे असे आगळेच एकत्र एका मोठ्या घरात राहतात. हे घडत गेलं कारण व्यावहारिक पातळीवर एकमेकांसोबत असण्याची गरज कमी होत गेली. व्यक्ती स्वतंत्र होत गेल्या, स्वावलंबी होत गेल्या. आजच्या माझ्या पिढीच्या आधीच्या पिढीनेच हे बदल अनुभवले आहेत. पण नवरा-बायको नात्यांत असणारं परस्परावलंबित्व काही गेलं नव्हतं. पण आत्ताची आमच्या पिढीतल्या व्यक्ती, स्त्री-पुरुष दोन्हीही, या अधिकच स्वतंत्र आणि स्वावलंबी होत गेल्या. आणि म्हणूनच माझ्या मते आमच्या पिढीला लग्न व्यवस्थेची पारंपारिक दृष्ट्‍या वाटणारी गरज आता फारशी उरलेली नाही. 

पारंपारिक लग्न व्यवस्थेत नवरा-बायको यांच्यात परस्परावलंबित्व अपेक्षित असतं. त्यासाठी दोन्ही व्यक्तींसाठी समाजाने/ व्यवस्थेने/ परंपरेने काही एक भूमिका आखून दिलेल्या आहेत. आणि यात एक व्यक्ती आपली भूमिका वठवण्यात कमी पडली तर संसाराचा, सहजीवनाचा गाडा रूतून बसण्याची शक्यता खूपच अधिक असे. या परिस्थितीत गेल्या तीस वर्षात बदल झाला आहे. आणि तो अजून होणार आहेच. लग्नाच्या नात्यांत परंपरेने ठरवून दिलेल्या भूमिकाच वठवण्याची तयारी आता निदान शहरी मध्यमवर्गातल्या मिलेनियल जनरेशन मध्ये नाही. (साधारण ऐंशीचे दशक आणि नव्वद च्या दशकातली सुरुवातीची काही वर्षे या काळात जन्माला आलेल्या मंडळींना इंग्रजीत मिलेनियल जनरेशन असा शब्द आहे.) यातूनच घडतं असं की एका बाजूला पालक आणि एकूण समाज यांचा लग्न करण्यासाठी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष दबाव येत असला तरी लग्न पुढे पुढे ढकललं जातं. शहरी मध्यमवर्गीय मिलेनियल जनरेशन स्वतंत्र स्वावलंबी आयुष्य जगताना अत्यंत खुशीत आणि आनंदात आहे- कम्फर्टेबल आहे. अशावेळी पारंपारिक लग्न व्यवस्थेपासून आणि त्यासह येणार्‍या आखून दिलेल्या भूमिकांपासून ही मंडळी दूर पळणं साहजिक आहे.

बापरे! फारच गंभीर वक्तव्य झालं का हे? म्हणजे आता पुढची पिढी लग्न करणारच नाही की काय, अशी शंका मनात तरळून गेली? शंका रास्त आहे. पण, लग्न व्यवस्थेची गरज संपली असं मला तरी वाटत नाही. याची दोन महत्त्वपूर्ण कारणं आहेत. एक म्हणजे नवीन पिढीला जन्म देणे आणि दुसरं म्हणजे शेअरिंगची, एकत्र अनुभव घेण्याची माणसाची मानसिक-भावनिक इच्छा आणि गरज अजून संपलेली नाही. यातला पहिला मुद्दा अगदी सोपा आहे. नवीन पिढीला वाढवण्यासाठी लग्न आणि लग्नासह येणारं कुटुंब, याच्या इतकी सुरक्षित पर्यायी व्यवस्था आज तरी उपलब्ध नाही. पण दुसर्‍या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं लग्नाच्या बाबतीत, सहजीवनाच्या बाबतीत, असणार्‍या पारंपारिक भूमिका या एकमेकांसाठी काहीतरी करण्याच्या पारंपारिक गरजेतून आलेल्या आहेत. ज्याची आता गरज उरली नसली तरी एकमेकांसोबत काही गोष्टी करायची इच्छा आहे आणि त्यावर अधिक भर देत लग्नाची पारंपारिक व्याख्या थोडीफार बदलली तर सहजीवन तर सोपं होईलच पण लग्न ठरवण्याची प्रक्रिया देखील सोपी होईल. मला लग्न करायचंय कारण की, मला जोडीदार हवाय’, सोबती हवाय’, पार्टनर हवाय या उत्तरांमध्ये ज्या व्यक्ती सोबत नवनवीन अनुभव घेणे, मनातले बोलता येणे, हे शक्य होईल आणि आवडेल अशी व्यक्ती हवी आहे हे प्रतिध्वनित होतं. पण गंमतीचा एक भाग हा की अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत पुढाकार हा पालक वर्गाकडून घेतला जातो. आणि साहजिकच त्यांच्याकडून आपल्या मुला/मुलीसाठी जोडीदार शोधताना एकमेकांसाठी हा मुद्दा प्राधान्याने पुढे येतो. इथे दोन पिढ्यांमध्ये वाद होतात. नव्या पिढीच्या मानसिकतेमधे आणि गरजांमध्ये झालेला फरक समजून घेतला गेला तर हे वाद टाळता येणे शक्य आहे.

अर्थातच, नातं खुलवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी, फुलवण्यासाठी दोघांनी एकमेकांसाठी काही गोष्टी करणे आवश्यकच आहे. पण तो रोमँटिक भाग झाला, व्यक्ती व्यक्तीनुसार खूपच बदलणारा! मात्र मला वाटतं, मूलभूत गरजांच्या बाबतीत अत्यंत स्वयंपूर्ण असणार्‍या आमच्या पिढीच्या सहजीवनाच्या बाबतीतल्या प्राथमिक अपेक्षांचा तराजू हलकेच एकमेकांसाठी कडून एकमेकांसोबतकडे झुकलाय, हे नक्की.

(दि. ३० जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

Saturday, June 16, 2018

थांबा, पहा आणि मग पुढे जा!

मध्यंतरी एक मुलगा मला भेटला. सोयीपुरतं त्याला रोहन म्हणूया. तर हा रोहन सांगत होता की त्याने एका विवाहसंस्थेच्या वेबसाईटवरच्या तब्बल दोनशे मुलींच्या प्रोफाईल्स बघून त्यांना नापसंत केलंय. तो मोठा चिंतेत दिसत होता. अजून थोडी चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की खरंतर त्याने ज्या अपेक्षा लिहिल्या होत्या त्यानुसारच शोधलेल्या या सगळ्या मुली होत्या. आणि हा सगळा नापसंतीचा पराक्रम त्याने जेमतेम आठवड्याभरातच केला होता. एकुणात माझ्या लक्षात आलं की, सोशल मिडियावर न्यायाधीशाचा हातोडा घेऊन निवाडे देण्याचा जो आजार फोफावलाय त्याचीच लागण आता विवाहसंस्थेच्या वेबसाईटपर्यंत झाली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात झालेल्या सोशल मिडियाच्या उदयाने माहितीची मुक्त देवाणघेवाण व्हायला लागली, अनेक जण व्यक्त होऊ लागले, चर्चा होऊ लागली वगैरे वगैरे गोष्टी घडल्याच. या सगळ्या छान छान गोष्टींबरोबर अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे सोशल मिडिया हे एक न्यायाधीश बनवण्याचा कारखानाच बनला जणू. आपली मतं किती पटकन तयार होऊ लागली. एखाद्या व्यक्तीला, किंवा घटनेलाही पटकन काहीतरी लेबल चिकटवून मोकळं होऊ लागलो. याचा वेग दिवसेंदिवस वाढवतच गेलोय आपण. काय घडतंय नेमकं?

काही उदाहरणं देतो. 
(१) बऱ्याच वर्षांपूर्वी फेसबुकवर नोट्स नावाचा एक प्रकार आला होता. सुरुवातीला वापरलाही अनेकांनी. पण तो कधीच फार प्रसिद्ध झाला नाही. हळूहळू त्याचं अस्तित्व जवळजवळ संपलंच. असं का झालं? कारण नोट्स मध्ये लिहिला जाणारा मजकूर हा बहुतेक वेळा बराच जास्त असायचा. (कमी मजकूर लिहायला स्वतःची वॉल होतीच की!) आणि मोठ्या मजकुराचा खप कमी झाला आणि त्याबरोबर नोट्सचा सुद्धा! 
(२) फेसबुकवरच एखाद्या फोटोला मिळणारा प्रतिसाद आणि एखाद्या लिखित गोष्टीला मिळणारा प्रतिसाद याची तुलना करून बघितलं तर लक्षात येतं की फोटोला तुडुंब प्रतिसाद मिळतो. वाचत बसण्यापेक्षा फोटो बघणं सोपं आणि पटकन होणारं आहे ना! 
(३) इन शॉर्ट्स नावाचं एक मोबाईल अॅप आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या बातम्यांचा अगदी थोडक्यात सारांश दिला जातो. या अॅपची लोकप्रियता जबरदस्त आहे. कारण पूर्ण बातमी वाचायला वेळ आहेच कोणाकडे? हेडलाईन आणि त्या अनुषंगाने दोन-तीन शब्द, संज्ञा कळल्या म्हणजे झालं.

या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे, आपला लक्ष देण्याचा कालावधी म्हणजेच ज्याला इंग्रजीत अटेन्शन स्पॅन म्हणलं जातं तो कमी झाला आहे. आणि त्याचवेळी अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे मला शक्यतो प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त केलं पाहिजे, नाहीतर मी मागे पडेन ही भीती. इंग्रजीत ज्याला फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा फोमो (FoMO) असं म्हणतात, तशातलाच हा प्रकार. सगळेजण काही ना काही व्यक्त होत आहेत तेव्हा, ‘आपणही व्यक्त व्हायलाच पाहिजे, निकाल द्यायला पाहिजे ही स्वतःकडून असणारी मागणी आणि व्यक्त होण्यासाठी, निकाल देण्यासाठी जो विचार करावा लागेल, जो अभ्यास करावा लागेल त्यासाठी आवश्यक कालावधी देण्याची मात्र तयारी नाही अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने फारच गंमत झालीये आपली सगळ्यांची. मी याला झटपट निकाल वागणूक म्हणतो. अगदी सुरुवातीला दिलेल्या प्रसंगातल्या रोहनचं हेच झालं होतं. आपण काहीतरी निकाल द्यायचाच आहे आणि तोही तत्काळ अशी त्याची स्वतःकडून मागणी आहे. त्यामुळे त्याने बघितलेल्या दोनशे प्रोफाईल्सपैकी बहुतांश प्रोफाईल्स त्याने नीट न वाचता, नीट विचार न करता थेट नापसंत करून टाकल्या होत्या. काहीतरी निकाल द्यायचाच आहे तर केवळ नापसंती कशी काय व्यक्त केली असा प्रश्न कदाचित मनात येऊ शकतो. तत्काळ निकाल द्यायचा तर एखादीला होकार देऊन मोकळा का बरं नाही झाला? याचं उत्तर आहे ते म्हणजे या प्रसंगात होकार किंवा पसंती यापेक्षा नापसंती अधिक सोयीस्कर आहे. नापसंती व्यक्त केली की विषय संपतो. होकार मात्र विषय वाढवतो. आणि विषय वाढला म्हणजे प्रत्येक टप्प्यावर स्वतःकडून आपण तत्काळ निकालाची अपेक्षा करणार याची कुठेतरी आपल्याला जाणीव असते. त्यापेक्षा नापसंत करा आणि पुढे व्हा असा सोपा विचार आपण करतो.

या आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर पटकन “ही आजकालची पिढी...”, असं म्हणत, लेबल चिकटवण्याच्या मोहाने सरसावू बघाल पण थोडे थांबा. याचं कारण असं की हा जो गोंधळ चालू आहे तो फक्त आमच्या पिढीचा आहे असं नाही. आमच्या पालकांची पिढीसुद्धा ज्या पद्धतीने सोशल मिडिया आणि त्यातही विशेषतः व्हॉट्सअॅप मध्ये अडकली आहे ते बघता, हा अगदी सार्वत्रिक गोंधळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आमच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एका पालकांनी प्रश्न केला की, मुलंमुली सतत मोबाईलमध्ये असतात त्यांच्याशी संवाद कसा होणार?’ त्यावर वक्ते म्हणून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी सभागृहातल्या सगळ्याच पालकांना प्रश्न केला, “किती पालक इथे आहेत जे व्हॉट्सअॅप वापरत नाहीत?”. एकही हात वर आला नाही. एक हशा तेवढा पिकला! कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कसलीही शहानिशा न करता आलेले मेसेजेस पुढे धाडून देण्याचं प्रमाण सर्वच वयोगटातल्या मंडळींमध्ये प्रचंड आहे. आणि म्हणूनच ते लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या पालकांमध्ये देखील दिसतं. अर्थातच या प्रक्रियेत पालकांची ही झटपट निकाल वागणूकथोडी कमी प्रमाणात दिसते हे खरं आहे कारण तिथे काळजीचं प्राबल्य आहे अजून. पण ते मुला-मुलींपेक्षा फार कमी नाही, हेही वास्तव आहे. 

मग यावर उपाय काय? सोशल मिडिया आणि आजूबाजूला एकुणात होत जाणारे बदल ही काय आपल्या हातातली गोष्ट नाही. आपण करू शकतो अशी गोष्ट म्हणजे एक पॉझ म्हणजेच स्वल्पविराम घेण्याची. समोर येणाऱ्या गोष्टी बघणे, निरखणे, त्यावर सर्वांगाने विचार करणे, त्यावर आपले विवेकनिष्ठ, तर्कशुद्ध मत बनवणे आणि या सगळ्यासाठी काही काळ थांबत स्वतःला वेळ देऊन मगच पुढे जाणे, म्हणजे हा स्वल्पविराम. एवढी सवलत आपण स्वतःला द्यायला शिकलं पाहिजे. आपण यातून अनावश्यक घाई गडबडीने चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता कमी करू शकतो. कधीकधी चौकात सिग्नल नसेल तर एक फलक लावलेला असतो- थांबा, पहा आणि मग पुढे जा. सामान्यतः प्रगत देशांत फार जास्त काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या या पाटीला आपल्या देशात खुद्द वाहतूक पोलीसही गांभीर्याने घेत नाहीत आणि मग टाळता येण्यासारखेही असंख्य अपघात घडतात. नातेसंबंध, लग्न, जोडीदार निवड हे आणि यासारखे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय घेताना थांबा, पहा आणि मग पुढे जा अशी एक अदृश्य पाटी लावलेली आहे हे लक्षात ठेवलं तर बरेच अपघात टाळता येईल हे नक्की.


(दि. १६ जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)