Saturday, September 25, 2010

परिवर्तन बद्दल थोडेसे....

२६/११/२००८ ला मुंबई वर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले होते... एक प्रकारचा विलक्षण अस्वस्थपणा सगळीकडे पसरला होता... तशाच अस्वस्थ मनस्थितीत मी असताना मला इंद्रनील चा फोन आला-"भेटूया".
दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. "आपण काहीतरी केला पाहिजे..." इंद्रनील बोलू लागला.
"अरे पण काय करणार?? दहशतवादावर आपण काय करणार??" -मी.
"दहशतवादावर नाही.. पण देशासाठी काहीतरी करायला सुरुवात तर करू, नुसते बसून तर राहू शकत नाही...."- इंद्रनीलला माझ्या शंका आणि नकारात्मक प्रश्न मुळीच आवडले नव्हते.
"ठीक आहे, पण काय करायचं आहे? झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण??"- मी काहीशा चेष्टेच्या सुरात त्याला विचारले.
"माहित नाही... त्याचा विचार आपण नंतर करू. काहीतरी करायचा विचार तर सुरु करू. त्यासाठी लोकांना गोळा करायला पाहिजे. यापुढे नुसतं बसून राहणं शक्य नाही. तू आहेस ना? "- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी!' असे काहीसे विचार करत मी त्याला होकार दिला. मग सलग दोन तीन वेळा आम्ही भेटलो. दरम्यान विक्रांत नावाचा एक मुलगाही आम्हाला भेटला. त्याच्याही डोक्यात असेच काहीसे विचार घोळत होते. 'मग एकत्रच काम करू' असे ठरले. आपल्या ओळखीच्या आणि काहीतरी करायची इच्छा असलेल्या सगळ्या मुलांची आपण एक मिटिंग घेऊ असे आमचे ठरले. मिटिंग साठी जागा हवी होती. मी आणि इंद्रनील बीएमसीसी चे त्या वेळचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे सरांकडे गेलो. त्यांना आमच्या डोक्यातले विचार सांगितले. आणि मिटिंग साठी एक वर्ग द्यावा अशी विनंती केली. सरांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले...! 
८ डिसेंबर २००८ ला आम्ही मिटिंग घेणार असल्याचे आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना कळवले. जे इच्छुक असतील त्यांनी यावे असेही कळवले.
दुसऱ्या बाजूला २६/११ मुळेच अतिशय अस्वस्थ मनस्थितीत "आता स्वस्थ बसायचं नाही. आपण काही ना काहीतरी करायचंच" असं म्हणत हृषीकेश आणि त्याचे मित्र विचार करत होते. त्यांना होणाऱ्या मिटिंग बद्दल कळले. आपल्यासारखेच काही विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवत आहेत हे कळल्यावर ते सगळे आपण होऊन मिटिंग ला उपस्थित राहिले.
पहिल्याच मिटिंग ला किती लोक येणार आम्हाला शंका होती. पण सुमारे ३५-४० लोक उपस्थित होते. सुमारे दोन एक तासांच्या वादविवाद आणि चर्चेनंतर एक स्वतंत्र अशी संस्था आपण सुरु करावी आणि कामाला सुरुवात करावी असे ठरले. कामाचे स्वरूप काय असावे कसे असावे हे ठरवण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरले. पुढचे २ दिवस काम विचार करण्यात गेले. स्वतंत्र संस्थेची आवश्यकता का आहे याबद्दल सर्वांना कळणे आवश्यक होते. शिवाय कामाचे स्वरूप हे इतर असंख्य संस्थांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाचे असावे यावर आम्ही अनेकदा चर्चा केली.
Be the change you want to see...!!!

दुसऱ्या मिटिंग ला सुमारे ७०-८० लोक हजर होते. सर्वांमध्येच जोश होता. काहीतरी करायचा उत्साह होता. याचवेळी "परिवर्तन" हे आपल्या संस्थेचे नाव ठेवायचे ठरले. देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास व्यक्त करून संपूर्ण कायदेशीर मार्गाने आपण काम करायचे असेही नक्की झाले. बऱ्याच चर्चेनंतर "भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासन" हेच देशाच्या प्रगतीच्या मार्गात असलेला एक मोठा अडसर असल्याचे एकमताने मान्य झाले. मग आपण काय करायचे? आपण ही शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करायचा. "Governance" सुधारण्यासाठी प्रयत्ने करायचे. जिथे सरकारला, शासनव्यवस्थेला मदत लागेल तिथे मदत करणे.. आणि शासन चुकते आहे, अन्यायी आहे असे वाटते तिथे विरोध करणे अशी स्थूलमानाने दिशा आम्ही त्या दिवशी ठरवली. इतकेच नव्हे, तर आपण संस्था स्थापून प्रयत्न करत असतानाच ज्या काही इतर संस्था आणि संघटना या सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे यावर एकमत होऊन, " सेतू " या स्वतंत्र मंचाची सुरुवात करण्याचेही ठरले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अशा स्वरूपाचा आईसब्रेकर नावाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्यानंतर  "मतदान जागृती" चे काम करायला सुरुवात केली. मतदान करा असे सांगत असतानाच कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास तसे मत देण्याचीही सोय असते हे आम्ही लोकांना सांगू लागलो. फर्ग्युसन, बीएमसीसी, शामराव कलमाडी कोलेज, अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी आणि मतदान जागृती असे अभियान आम्ही राबवले. २००९ मध्ये असलेल्या दोन निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सगळ्याची आखणी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे दिवस आम्ही रस्त्यात उभे राहून मतदान जागृतीचे काम करत होतो. एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होती. त्याही वेळी अशाचप्रकारचे काम आम्ही केले. परिवर्तन ची सुरुवात अशी एकदम मोठ्या संख्येने झाली तरी हळू हळू जसजसा २६/११ चा प्रभाव ओसरू लागला, तसतशी लोकांची संख्या रोडावू लागली. २६/११ चा सगळाच प्रभाव ओसरल्यामुळे आता एकूण सदस्यांची संख्या फारच थोडी होती. साप्ताहिक मिटिंग घेण्याची पद्धत पडून गेली होती. त्या मिटिंगना कधी कधी ४ कधी ८ तर कधी २ अशी उपस्थिती असायची. पण काम सुरु राहिले...कारण आता ज्यांना खरोखरच काम करायचे होते तेवढेच शिल्लक राहिले होते...!!
त्यानंतर सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समिती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न, माहिती अधिकाराचा वापर, निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली "जन विधानसभा" हा कार्यक्रम अशी विविध कामे परिवर्तन ने हातात घेतली.

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात जर्मन बेकरी मध्ये झालेल्या स्फोटानंतर परिवर्तन सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथल्या कर्मचार्यांना मदत करायचे काम केले. त्यावर एक लेख 'सकाळ' च्या 'मुक्तपीठ' मध्ये प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी परिवर्तनचे सदस्य होण्याची तयारी दर्शवली. साहजिकच २६/११ प्रमाणे अचानक उत्साह निर्माण झालेल्यांची संख्या त्यात खूप होती. तरीही काही खूप चांगले सदस्य परिवर्तन ला मिळाले. 'बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या' गरजेनुसार त्यांना हव्या त्या पद्धतीची उपकरणे बनवण्याच्या कामात परिवर्तन ने हात घातला. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या जनवाणी संस्थेच्या मदतीने सध्या हा उपक्रम सुरु आहे. इतर काही संस्थांच्या मदतीने पुण्यातल्या टेकड्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यावर बांधकामांना परवानगी द्यायच्या सरकारच्या योजनेला परिवर्तनचा विरोध आहे.

आज परिवर्तन ची सदस्य संख्या 'कागदावर' पहिली तर २५० च्या घरात आहे... पण प्रत्यक्षात पहिली तर साधारणपणे २५ च्या आसपास आहे..!!! कोणत्याही सामाजिक संस्थेला भासणारी चांगल्या (आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नियमित) कार्यकर्त्यांची उणीव परिवर्तनलाही भासते... कोणत्याही इतर सामाजिक संस्थेला जाणवणारी पैशाची चणचण परिवर्तनलाही जाणवते. परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे ही गोष्ट आमच्या मनाशी नक्की आहे. आज परिवर्तन एक छोटासा गट आहे... फारसे संख्याबळ, आर्थिक ताकद आमच्यापाशी नाही.. पण जे सदस्य शिल्लक आहेत ते मनापासून केवळ आणि केवळ समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आहेत. आणि म्हणूनच परिवर्तन पावणेदोन वर्षानंतरही कार्यरत आहे...आणि तसेच ते कार्यरत राहील. आजचे छोटे परिवर्तन उद्या एक मोठी विधायक शक्ती बनलेली असेल याबद्दल मला काडीमात्रही शंका नाही.

Saturday, September 11, 2010

लोकशाहीच्या गप्पा....

आपल्या देशात साधारण १९३५ साली म्हणजे सुमारे ७५ वर्षांपूर्वी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. १९३५ साली ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांमुळे भारतीयांना खुल्या निवडणुका हा प्रकार प्रथमच अनुभवता आला. काँग्रेस, मुस्लीम लीग सह सर्व प्रमुख पक्षांनी या १९३५ च्या सुधारणेप्रमाणे या निवडणुकीत भाग घेतला. आणि काँग्रेसने बहुतांश प्रमुख प्रांतांमध्ये सत्ता हस्तगत केली. अशीच अजून एक निवडणूक महायुद्धानंतर झाली. ज्यामध्ये काँग्रेस ने आधीप्रमाणेच वर्चस्व मिळवले. परंतु मुस्लीम बहुल प्रांतांमध्ये मात्र मुस्लीम लीग ने निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तान चे जाऊ द्या. पण भारतात मात्र लोकशाही शासनव्यवस्थेला सुरुवात झाली. १९५० साली बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जगातले सर्वोत्तम गणले गेलेले संविधान भारताला मिळाले. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली लोकशाही फुलत गेली. त्यांच्याच मुलीने, इंदिरा गांधी ने लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न केला, मात्र संविधान आणि लोकशाहीच श्रेष्ठ ठरून इंदिरेला नतमस्तक व्हावे लागले. अशा प्रकारे तावून सुलाखून भारतातील लोकशाही शासनव्यवस्था मजबूत झाली असे म्हणतात. ६० वर्षांमध्ये भारतातील लोकशाही एक आदर्श आहे असं कित्येकांचा दावा आहे.
छान...! तसे असेल तर खरच छान...!!
पण हा सगळा दावा वगैरे लोकशाही शासनव्यवस्थेबद्दलचा आहे. लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. अनेकांना असे वाटते की जी अनेक वर्षांपासून चालू असते ती संस्कृती. परंतु तसे नसते. संस्कृती ही काही वर्षातच निर्माण होऊन काही वर्षातच संपूही शकते. (तसे नसते, नाहीतर नुकत्याच टीकेच्या झोतात आलेल्या चंगळवादी संस्कृतीला "संस्कृती" म्हणले गेले नसते..!). लोकशाही संस्कृती भारतीय भूमीत ६० वर्षात अद्यापही रुजली नाही हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. शासनव्यवस्था रुजली... संस्कृती नाही....

लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती यातला फरक काहीसा टिळक आगरकर यांच्या वादासारखा आहे. आणि खरे तर काहीसा नव्हे तर त्यांच्यातला वाद हाच होता असे लक्षात येते. आधी लोकशाही संस्कृती की आधी लोकशाही शासनव्यवस्था हा तो वाद होय. महात्मा गांधी आणि सावरकर या दोन भिन्न वृत्तींच्या किंबहुना अगदी विरुद्ध वृत्तींच्या दोन महान नेत्यांनी आपापल्या परीने संस्कृती आणि शासनव्यवस्था एकाचवेळी पाहिजे असा प्रयत्न केला. दोघांनीही अन्यायी ब्रिटीशांवर हल्ले चढवले. दोघांनीही अस्पृश्यते विरोधात कार्य केले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे असे गांधींनी म्हणताच असंख्य स्त्रिया पारंपारिक बंधनं सोडून इंग्रजांविरुद्ध रस्त्यावर उतरल्या! सावरकरांच्या "गाय हा केवळ एक उपयुक्त पशू आहे. गायीचे मांस खाल्ल्याने काही होत नाही" अशा लिखाणाने समाज ढवळून निघाला. एकूणच समाजात आपापल्या परीने प्रगल्भता आणायचे आणि लोकशाही संस्कृती आणायचे प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर "लोकशाही संस्कृतीच्या" पाश्चात्त्य कल्पनांना दोघांनीही नाकारले. या देशातली लोकशाही या देशाच्या मातीशी निगडीत पाहिजे, इंगलंडची कॉपी नको असे दोघांनीही आग्रहाने मत मांडले. गांधी सावरकरांनंतर 'लोकशाही संस्कृती' साठी फार थोड्या प्रमाणात प्रयत्न झाले.

आपल्या इथल्या जवळपास ९० % लोकांना आता लोकशाही आणि निवडणूक हा प्रकार माहित आहे. संपूर्ण शासनव्यवस्था माहित नसेल कदाचित. पण आपण मत दिलं की सरपंच निवडून येतो हे गावच्या अडाण्यालाही आता माहित आहे. थोडक्यात आपला नेता आपण निवडायचा ही गोष्ट नवीन नाही. म्हणूनच लोकशाही शासनव्यवस्था रुजली आहे असे आपण म्हणू शकतो.
परंतु घराघरात असणाऱ्या हुकुमशाहीबद्दल काय म्हणावे?? धार्मिक हुकुमशाही बद्दल काय म्हणावे? खाप पंचायत बद्दल लिहिलेल्या लेखामध्ये मी धार्मिक हुकुमशाहीबद्दल लिहिले आहे. माझ्या आजच्या लेखाचा विषय हा घरात नसलेली लोकशाही हा आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही आजच्या कुटुंबातील हुकुमशाहीला कारणीभूत आहे.
मध्यमवर्गीय, अतिशय आधुनिक सुख सोयींनी युक्त घरांमध्ये राहणाऱ्या, मक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर खाणाऱ्या तरुण मुलाला साधे आपले करिअर निवडायचे स्वातंत्र्य कित्येकांच्या घरांमध्ये नसते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या बापाने हुकुमत गाजवावी त्याच्या खालोखाल आई, मग मोठी ताई किंवा दादा आणि मग आपण. एक प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था मध्यमवर्गीय घरांमध्ये आहे असे वाटते मला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे टिळकांचे वाक्य पालकच आपल्या मुलांना सांगत असतात. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार मधला फरक कोण ठरवणार??? देशाचे कायदे जसे लोक ठरवतात. (किंवा लोकसंख्या ज्या देशात प्रचंड असते तिथे लोकांचे प्रतिनिधी!), तसेच घरातले कायदे-नियम हे लोकांनीच म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरवावेत याला मी म्हणीन लोकशाही संस्कृती...!!!

मला आठवतंय, मी लहान असताना माझ्यात माझ्या मोठ्या भावात आणि आई बाबांमध्ये जोरदार भांडणे व्हायची. "करायला सांगितलं की गपचूप करायचं" असला हुकुमशाही प्रकार आमच्या घरात नव्हता.त्यामुळेच वादविवाद खूप व्हायचे. घरातल्या मतस्वातंत्र्याचा मी (वय साधारण १२) आणि माझा भाऊ (वय साधारण १७) पुरेपूर वापर करायचो. शेवटी अनेक बाबतीत आम्ही मतदान घ्यायचो. शेवटी बहुमताने जो निर्णय होईल तो घेतला जायचा. घरातली कामे हा एक मोठा प्रश्न प्रत्येक घरात असतो. तसाच तो आमच्याही घरात होता. स्वच्छता, भाज्या आणणे, अंथरूण-गाद्या आवरणे, इस्त्री करणे/ इस्त्रीला टाकलेले कपडे आणणे भाजी चिरणे, बिलं भरणे अशी एक ना असंख्य कामे.... यावरून होणाऱ्या भांडणांनी कंटाळून शेवटी  बाबांनी एखाद्या कॉन्फरन्स (संसदच म्हणा एक प्रकारची) सारखे आम्हाला बसवले. आम्ही चौघे गोल बसलो. एकत्र बसून कामांची यादी केली. आणि सगळ्यांनी मिळून कामे ठरवून घेतली. त्याही वेळी वादविवाद झाले. पण समजूतदारपणे समोरच्याच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही सर्व कामे विभागली. पुढे कित्येक महिने त्यावेळी ठरलेली पद्धत अमलात येत होती. माझे ठरलेले काम मी जर केले नाही तर सर्वानुमते मला शिक्षाही होत असे. पण माझे काम न करण्यामागे एखादे कारण असेल तर मात्र सर्वानुमतेच सूटही मिळायची.  यालाच मी म्हणीन लोकशाही संस्कृती.

माझ्या ओळखीत कित्येक घरं आहेत जिथे लोकशाहीचा मागमूसही नाही. हुकुमांवर हुकुम तेवढे निघत असतात. (मग फतवा काढणाऱ्यांना शिव्या का देतात देव जाणे..!). माझ्या एका मित्राच्या घरी अगदी मोकळं वातावरण आहे. खुलेपणाने चर्चा आहे. पण काही बाबतीत, काही मुद्दे निघाले की तर्कशुद्ध चर्चा हा प्रकार लोप पावतो. त्याचा पूजा अर्चा करण्यावर विश्वास नाही. तो देवाला मानत नाही. परंतु त्याचे हे मत असू शकते आणि त्याच्या मतानुसार वागायचा त्याला हक्क आहे ही गोष्ट त्याचे पालक समजून घेत नाहीत. त्यामुळे त्याला घरात सत्यनारायण पूजेपासून गणपतीपर्यंत सारे करावे लागते. तसा स्पष्ट 'आदेशच' असतो त्याच्या वडिलांचा..!!!
एका मैत्रिणीच्या घरी तिच्या आईला तिनी घराबाहेर राहिलेलं आवडत नाही. म्हणजे दिवसभर मुलगी घराबाहेर असली तर आई बेचैन होऊन जाते. यातला काळजीचा भाग वगळूया. कारण ही माझी मैत्रीण तिच्या आजीच्या/मामाच्या घरी जरी गेली असेल तरी तिच्या आईला अस्वस्थपणा येतो. शेवटी तिची आई फर्मान काढते की आता घरातून बाहेर पडायचं नाही. घरात बस. घरात बसून काहीपण कर. काळजीमुळे एखादे बंधन घातले जाणे मी समजू शकतो, परंतु तशी काळजी वाटली म्हणून बंधन घातले आहे हे आपल्या पाल्याला सांगणे गरजेचे आहे. तसा संवाद आवश्यक आहे. माहिती अधिकार नावाचा एक उत्कृष्ठ कायदा आपल्या देशात आला आहे. त्याच्या नुसार सरकारने एखादा निर्णय घेतला की त्याचे कारण, पार्श्वभूमी या सर्व गोष्टी आपण होऊन सांगणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या घरातल्या लोकशाहीतही घडले पाहिजे. वरील उदाहरणामध्ये आईने मुलीला घराबाहेर न जाऊ देण्याची कारणे सांगितली पाहिजेत. त्यावर शुद्ध तर्कावर आधारित चर्चा व्हायला पाहिजे. कित्येकदा मला असं वाटतं की याच तर्कशुद्ध चर्चेमध्ये आपला पराभव होईल की काय या भीतीपोटी पालक "चर्चा नकोय" असा सूर लावतात.
माझ्या अजून एका मित्राच्या घरातील गम्मत म्हणजे त्याचं सगळं घराणं लोकशाहीवादी, गांधींचे अनुयायी, शिवाय आणीबाणीच्या वेळी आजी आजोबा जेल मध्ये वगैरे गेलेले. अशा घरात काहीवेळा माझ्या त्या बिचाऱ्या मित्राला अजिबात स्वातंत्र्य नसते... रात्र रात्र मित्रांबरोबर तात्त्विक चर्चा करण्याची या मुलाला मोठी हौस. एखाद्या मित्राबरोबर कट्ट्यावर चर्चा सुरु झाल्यावर २-३ वाजता पोलिसांनी हटकल्यावर ती चर्चा संपते. या गोष्टीवरून त्याचे त्याच्या पालकांशी रोज खटके उडतात. अखेर त्याच्या वडिलांनी हुकुम काढला की घराचा असा नियम आहे की या घरात परत यायचं असेल तर ११ च्या आत यायचं नाहीतर घराबाहेर जायचं. आता हा नियम कोणी निर्माण केला?? हा नियम बनवताना कोणत्या लोकशाही मार्गाने याची चर्चा झाली होती?
पैसे कमावणारे ते पालक उच्च वर्णीय असतात... नव्याने कमवायला लागल्यावर मोठ्या भावाला किंवा बहिणीला अचानक मिळणारा मान तुम्हाला जाणवला नाही का?? तुम्हालाच लहान भाऊ/ बहिण असेल तर त्यांना एकदा विचारून बघा.... घरात असणाऱ्या वर्णव्यवस्थेची नीट कल्पना येईल तुम्हाला. रोटीच्या तुकड्यासाठी गावच्या पाटलापुढे गयावया करणारे शेतमजूर आणि पालक कमावून खायला घालतात म्हणून निमूटपणे त्यांचे ऐकणारे पाल्य यात मला तरी काहीच फरक दिसत नाही.
आता कोणी म्हणेल "काय राव पालकांना तुम्ही गावच्या क्रूर पाटलाची किंवा हुकुमशहा ची उपमा देत आहात... असे कसे चालेल... शेवटी आई वडील असतात ते आपले..".
कबूल... सगळे कबूल...! भाव भावना प्रेम इत्यादी गोष्टी आल्याने काहीच नियमांमध्ये कायद्यांमध्ये शिथिलता येते, आणि ती आलीच पाहिजे. पण माझा मुद्दा एवढाच आहे की ही शिथिलता, हा समजूतदारपणा दोन्ही बाजूंकडून असायला हवा. आणि पालकांकडून तर जास्त, कारण ते वयाने मोठे असतात, परिपक्व असतात..(असतातच असे नाही पण निदान तसे मानले तरी जाते..!!). घराच्या नियमांना अपवाद फक्त वडिलांसाठी आणि माझ्यासाठी नाही याला समानता म्हणत नाहीत. जसे देशाचे तसेच घराचे...समानतेशिवाय लोकशाही नाही. घरातूनच लोकशाही संस्कृती निर्माण करायची असेल तर घरात प्रथम समानता हवी. गावचा पाटील किंवा हुकुमशहांशी मी तुलना करत नसून माझे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून हे उदाहरण दिले.

अजून एक उदाहरण माझ्या एका मैत्रिणीचं, तिच्या घरात अतिशय मोकळं वातावरण. आई वडील डॉक्टर, एकुलती एक मुलगी, सर्वजण हुशार, छोटं सुखी कुटुंब..! पहिल्यापासून असलेल्या मोकळ्या वातावरणात मुलगी वाढलेली असल्यामुळे साहजिकच सर्व गोष्टी आईशी बाबांशी बोलायची सवय, परंतु आपल्या तरुण मुलीला बॉयफ्रेंड असू शकतो, ही सामान्य गोष्ट पचवायला त्यांना आता जड जाते आहे. त्यावरून घरात वाद सुरु झाले. वादांमधून मग तिनी घरी खोटे सांगणे सुरु झाले. अशा या परिस्थितून मुलीचे पालक बिथरले आणि ते हुकुमशाही पद्धतीने वागू लागले. परत ते आव तर असं आणतात की माझ्या मुलीला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
"आम्ही सांगितलं की गपचूप करायचं, आम्ही तुझ्या भल्याचंच सांगतोय" , अशा अविर्भावात पालक वागू लागले. इथे नेमके काय घडले? तर, पालक आणि पाल्यात्ला संवाद संपला, अविश्वास निर्माण झाला, आणि तो का संपला कारण पालकांनी आपल्या मुलीचा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी लोकशाही कशी काय टिकावी? जिथे संवादाच होऊ शकत नाही, जिथे संवाद हा भीती, संशय आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर होतो, तिथे लोकशाहीचे स्वतंत्र वारे कसे खेळणार...??????
स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्या मुलाला/मुलीला, त्यांच्या मतांना मान देणं ही घरातील लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि जोवर घरापासूनच लोकशाही संस्कृती निर्माण होत नाही. तोवर लोकशाही शासनव्यवस्था किती का रुजेना, लोकशाही संस्कृती मात्र मूळ धरणार नाही.
लोकशाहीची संस्कृतीचा विकास स्वतःपासून होत जाऊन नंतर कुटुंब, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, सोसायटी, मोहल्ला, शहर, राज्य, देश अशा प्रकारेच होऊ शकतो....
लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही संस्कृती निर्माण करणे आपल्याच हातात आहे...!!!
आणि लोकशाही संस्कृती शिवाय शासनव्यवस्थेला अर्थ नाही... आधी काय हवे हा टिळक आगरकर वाद असला तरी कधी ना कधी तरी दोन्ही हवे आहे ही गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही....