Saturday, March 26, 2011

संधी चालून आली आहे... तुटून पडा....


फेब्रुवारी २०१२ मधल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकांसमोर येण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी राजकारणी मंडळी फेसबुक वर येऊ लागली आहेत... असंख्य नगरसेवक नुकतेच फेसबुक वर आले आहेत. 'मनसे' त्यामानाने खूप आधीपासून इथे आहे. अगदी ऑर्कुट जेव्हा जोशात होते तेव्हाही मनसे बर्यापैकी नजरेसमोर असायचे. पण आता सगळ्याच पक्षाची मंडळी फेसबुक सारख्या खुल्या जागेवर येऊ लागली आहेत. यातले धोके अजून त्यांच्या लक्षात आले नाहीएत. आणि हे लोकांसमोर येणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्यावर ही मंडळी इथून गायब होतील याबद्दल मला जराही शंका नाही.  
फेसबुक सारख्या खुल्या व्यासपीठावर येणाऱ्या या राजकारण्यांना आता आपल्या मनातले प्रश्न विचारून भंडावून सोडूयात... त्यांना जाब विचारूया... असंख्य गोष्टींचा... पुण्यात गेल्या पाच वर्षात न झालेल्या विकासाबद्दलचा जाब... पुतळा वगैरे सारख्या भावनिक गोष्टींचा मुद्दा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना जाब विचारूया... पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का सुधारू शकले नाहीत?? वाट्टेल तेव्हा सत्तेसाठी वाट्टेल त्या पक्षाबरोबर युत्या करत पॅटर्न बनवणाऱ्या लोकांना आपण जाब विचारायला नको? गल्ली बोळांमध्ये नगरसेवक निधी वाट्टेल तसा वापरत सिमेंटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांना पुणेकरांचे पैसे वर आलेत का हा प्रश्न आपण विचारायला नको? निरुद्योगी लोकांना फुटपाथ वरची जागा अडवून बसायला बाकडी टाकण्यात आणि आधीच चालू अवस्थेत असलेले रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब उखडून तिथेच परत नवीन खांब लावण्यात आपल्या नगरसेवकांनी किती पैसा पाण्यात घातला हे आपण विचारायला नको? आपले नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर सखोल आणि अभ्यासपूर्ण भूमिका का मांडत नाहीत??? आपल्या नगरसेवकांची ऑफिसेस / संपर्क कार्यालये फुटपाथवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेली का असतात??? आणि ज्यांची नसतात ते अशा लोकांविरुद्ध आवाज का नाही उठवत??? गावागावांमध्ये महिला एकत्र येऊन दारूचे गुत्ते बंद करत असताना एकाही नगरसेवकाला आपला वॉर्ड व्यसनमुक्त असावा असे वाटत नाही?? आपल्या वॉर्ड मधला कचरा उरुळीला कचरा डेपो मध्ये जाणार नाही तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही असा निश्चय गेल्या पाच वर्षात किती नगरसेवकांनी केला? आणि किती नगरसेवकांनी त्यासाठी यशस्वी प्रयत्न केला? आपल्या वॉर्ड मध्ये आपण होऊन वॉर्ड सभा घेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न किती नगरसेवकांनी केला? आपल्या वॉर्ड मध्ये एकही अनधिकृत हातगाडी/टपरी असणार नाही असे ठरवून तसे कर्तृत्व कोणत्या नगरसेवकाने घडवले आहे??? आपल्या वॉर्ड मध्ये एखादे रस्त्याचे वगैरे काम सुरु झाल्यावर किती नगरसेवकांनी माहिती अधिकार कायद्यानुसार कामाच्या सर्व माहितीचे तपशील कामाच्या जागी दर्शनी भागात लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत??? आपल्या नगरसेवकांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थिती किती...??? 

प्रश्न विचारून भंडावून सोड्यात...!!! 
असे कितीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत... ते विचारूया इथेच खुले आम.... त्यावर त्यांना जाब विचारुयात... एक नागरिक म्हणून या मंडळींना जाब विचारणे आपले कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला फेसबुक वर बसल्या बसल्या काही मिनिटांचा वेळ द्यावा लागणार आहे.. एवढेही करायची ज्याची तयारी नाही, तो या समाजव्यवस्थेचा, लोकशाहीचा आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू असेल.. स्वतःच्या आयुष्यात गुरफटून जाण्यात काहीही भूषण नाही... आज तुम्हाला आम्हाला फेसबुक मुळे या राजकारण्यांना जाब विचारायची संधी मिळाली आहे... ठरवले तर या संधीचे सोने करायची ताकद आपल्यामध्ये...सामान्य जनतेमध्ये आहे... प्रश्न हाच आहे की तुम्ही आम्ही ही संधी वाया घालवणार की या संधीचे सोने करणार...??? 

Thursday, March 17, 2011

हे चालणार नाही...!!!

परवाच पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो. तिथे फॉर्म सबमिशन ची एक भली मोठी रांग होती.. लोक सकाळपासून येऊन त्या वाढत्या उन्हात उभे होते. त्या लोकांमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न स्तरातले लोक सुद्धा होते. एखाद दुसरे उच्च आर्थिक स्तरातले कुटुंब गॉगल लावून उभे होते... एकूणच रांगेची शिस्त सगळ्यांना पाळावी लागत होती. आणि सगळेच 'समान' होऊन गपचूप रांगेत उभे होते. फरक असला तर फक्त कपड्यांमध्ये होता. उन्हाचा त्रास, सरकारी कामामुळे आलेली असहायता, फुकट जाणारा वेळ यामुळे सगळेच त्रस्त झाले होते.. 
तेवढ्यात एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत रांगेच्या बाजूने पुढे आला. तिथे पोचताच त्याने फोन बंद केला आणि तिथे उभ्या सिक्युरिटी गार्डला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि अमुक अमुक अधिकाऱ्याला दाखव असे फर्मावले. एकूणच त्या माणसाचा अविर्भाव, उच्चभ्रू कपडे यामुळे सिक्युरिटी गार्ड निमुटपणे आत गेला. पाचच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला थेट आत सोडले. सगळ्यांच्या समोरच हे घडले.. आपण इथे तासन तास उभं राहायचं आणि हे लोक मात्र वशिला लावून पुढे जाणार याला काय अर्थ आहे असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले. 
मध्ये थोडा वेळ गेला. एक पन्नाशीच्या बाई, पांढरे केस, बॉब कट केलेला, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि एका कानाला लावलेला Black Berry!! भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. "सिक्युरिटी,सिक्युरिटी, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो.." असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो..!! त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. "ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली? ही लोकशाही आहे..." "वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे??" "हे चालणार नाही...!" या २-३ लोकांना ताबडतोब रांगेतल्या सगळ्यांचाच पाठींबा मिळाला. त्यांच्या मनातलेच तर बोलले जात होते. आपल्यावर काहीसा अन्याय झाल्याची भावना सगळ्यांचीच होती... "हे चालणार नाही..." असं म्हणत एक काका पुढे झाले. आणि सिक्युरिटी गार्ड वर नजर ठेवू लागले, अजून एक दोन जण पण त्यांच्याबरोबर नजर ठेवायला उभे राहिले.. पुढच्या तासा दोन तासात काही लोक ओळख सांगून वगैरे आत जायचा प्रयत्न करू लागले. पण गार्ड ने त्यांना आत सोडले नाही. आपल्यावर नजर ठेवणाऱ्या लोकांची त्या गार्डला भीती वाटली.. आणि बघता बघता सगळे सुरळीत होत लोक रांगेने एक एक करत आत गेले कोणीही मध्ये घुसले नाही कोणाला घुसू दिले गेले नाही...!!!!

असे शेकडो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. अगदी कॉलेज ची फी भरतानाही कोणी मध्ये घुसला तर मागचे लोक आरडा ओरडा करतात. हीच गोष्ट सगळीकडे घडते. "हे चालणार नाही" असं म्हणत जेव्हा लोक जागरूक होतात तेव्हा राज्यकर्त्यांना झुकावेच लागते... आज खरोखरच सरकार वर नजर ठेवायची गरज आहे. त्या काकांप्रमाणे प्रत्येक जागरूक नागरिकाने हे काम करायला हवं. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शास्त्र आपल्याकडे आहे. एकदा का नागरिकांची सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर आहे हे सरकारला जाणवू लागले की अपप्रवृत्ती, अकार्यक्षमता, गैरकारभार, भ्रष्टाचार या सगळ्याला आळा बसेल... वरच्या उदाहरणात जसे मी तासन तास उभा आहे आणि कोणीतरी पुढे येऊन घुसतो आहे आणि सरळ आत जातो आहे या मुळे जी अन्यायाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तीच भावना आपलाच कर रूपाने दिलेला पैसा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी खिशात घालताना पाहून निर्माण व्हायला हवी. किंबहुना ती अधिक गंभीर आणि अधिक आक्रमक असली पाहिजे. कारण प्रश्न केवळ अन्यायाचा नसून कष्ट करून घाम गाळून आपण कमावलेल्या पैशाचा आहे...
ज्या दिवशी "हे चालणार नाही" असं म्हणत सरकारवर नजर ठेवायला पुढे येतील त्या दिवशी प्रशासन पातळीवरच्या व्यापक परिवर्तनाची सुरुवात होईल... माहिती अधिकाराबाबत जागरूकता,प्रसार आणि परिणामकारक वापर या तीन गोष्टींनी हे साध्य करणे शक्य आहे...