Tuesday, September 6, 2016

विजयी मी, पराभूत मी

समजले जणू आपल्याला विश्वाचे सूत्र
सत्य हे की, निसर्गासमोर मानव एक क्षुद्र

निसर्गात जावे ते भावतालाशी एकरूप होण्यासाठी
शांतता ऐकावी कधीतरी
शांततेच्या सूरांत तल्लीन होण्यासाठी

आम्ही मात्र चंद्राचा स्पॉट लाईट सोडून
इलेक्ट्रिक बल्बसाठी झुरणार.
शांततेचं संगीत सोडून
इलेक्ट्रॉनिक म्युझिकवर थिरकणार

हा पर्वत, हा तलाव, हे ढग आपल्याला काहीतरी सांगतायत
आपण ऐकायला कधी शिकणार?
जनरेटरच्या या कृत्रिम धडधड आवाजात
वाऱ्याने सांगितलेल्या कानगोष्टी कशा बरं ऐकणार!?

गणितं मानवाची चुकलीएत बरीच
भवतालापासून दूर नेलंय ज्यांनी.
प्रगती प्रगती ओरडत स्वतःचीच
वाट चुकायला हातभार लावलाय यांनी.

या विश्वातला एक कण आपण
भवती अथांग सिंधू
कुठेतरी काठावर तरंगतोय
बनून अवघा एक बिंदू

खोल तळाशी काहीतरी आहे,
ज्याचा शोध घ्यायला हवा.
समुद्रात नाही वेड्या, मनात बुडी मार
तिथे खरा शोध घ्यायला हवा.

पण त्यासाठी आपल्याच उथळ प्रगतीच्या
अहंकारातून बाहेर यावं लागतं
आकलनापलीकडे आपल्या असणाऱ्या उर्जेचं
लक्ष देऊन ऐकावं लागतं.

या ऊर्जेला नावं दिली अनेक
कोणी ईश्वर म्हणे कोणी अल्लाह.
निसर्ग हेच त्याचं सत्य रूप,
त्याचं ऐकूया, एवढा माझा सल्ला.

'कसला बुढ्ढा झालाय हा'
थट्टेने म्हणेल कोणी
उत्साहाने म्हणेल नाचूया,
लावूया गाणी

हरकत नाही,
पण साला सूर हवा निसर्गाचा, मानवी गळ्याच्या स्वरयंत्रातला.
नको कलकलाट स्पीकरचा
नको स्वतःच्याच क्षुद्र धुंदीतला

प्रश्न मनात अनेक-
कोण मी, कुठून आलो मी?
अमूर्त अशा या ऊर्जेचा
एक अंशच नव्हे का मी!?

मी पर्वत, मी चंद्र
मीच निसर्ग, मीच सर्वत्र

मानव अन् निसर्ग हा झगडा
कधी थांबणार?
दोन्ही वेगळे नाहीतच स्वतःशीच
किती लढणार?

निळ्याशार तलावाकाठी बसून सुचणारी अक्कल ही,
खरंतर,
शहरी अपराधी भावनेला दूर ठेवण्याची
शक्कल ही.

पहाडांमधून शहरात परत गेलो की,
सगळी नेहमीची चक्र सुरु होतात
निष्फळ धावाधाव, लोभ, मत्सर
अन् विध्वंसाची चक्र सुरु होतात

आपल्याच अहंकाराच्या धुरात घुसमटतो जीव माझा
'स्व'च्या पलीकडे जाऊन मोकळ्या श्वासासाठी झुरतो जीव माझा

दुसऱ्यांना मी दोष का द्यावा?
माझ्यात तरी कुठे हिम्मत आहे?
सरळ वेगळा मार्ग निवडावा एवढी
माझ्याच विचारांना कुठे किंमत आहे?

न लढताच पराभूत झालो मी
जमत नाहीए म्हणून नव्हे
तर प्रयत्नच न केल्याने
साफ साफ पराभूत झालो मी

पराभवाची ही जाणीव
पहाडांत आल्यावर होते
पहिल्यांदाच झालीये असं नव्हे
दर वेळी आलो की होते

परत जाताना परिवर्तनाचा निश्चय घेऊन जातो
जसजसा वेळ जातो तसतसा निश्चय क्षीण होत जातो

मग पुन्हा पहाड, पुन्हा निश्चय, पुन्हा पराभव या चक्रात अडकलोय मी
पण खरं सांगू? आताशा हे सगळं चक्र एन्जॉय करू लागलोय मी

पुन्हा पुन्हा निश्चय करायची ऊर्जा आहे हे काय कमी आहे?!
पराभवाने खचून जात नाहीए मी
हे काय कमी आहे?!

पहाड मला आशावाद देतात
प्रेमाने मला कुशीत घेतात
बर्फाळ थंडीतही वेगळीच ऊब देतात
पराभवाची जळमटं शोषून घेतात

जोवर हे चक्र चालू आहे तोवर
पराभूत असूनही विजयी मी
आणि मार्ग नवीन सापडेपर्यंत

विजयी असूनही पराभूत मी.