Saturday, November 19, 2011

दिवाळी फराळ...

मच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. त्यामुळे दिवाळी फराळ हा प्रकार जोरदार असतो..! त्यातही आजीकडे एक दिवस फराळ कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी फराळ हा एकदम जिव्हाळ्याचा विषय... पण चकली-लाडू यापलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रकारच्या फराळाची आमच्याकडे पद्धत आहे... अगदी वर्षानुवर्षे चालू असा वैचारिक फराळ...! 

आमच्याकडे दर वर्षी दिवाळी अंकांची मेजवानीच असते... दिवाळी अंक बाजारात आले की कपड्यांच्या दुकानात सेल लागल्यावर बायकांची जी अवस्था होते तीच माझी होते.. 
लहानपणी शाळेत असताना मी मला जे दिवाळी अंक हवे असायचे (उदा. छात्र प्रबोधन, किशोर, ठकठक, कुमार इ.) ते मी 'कमवायचो'..! 
शाळेला दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत सगळेच दिवाळी अंक बाजारात यायचे. त्याची किमतीसह यादी बाबा आणून ठेवायचे. आणि मी घरोघर फिरून दिवाळी अंकांची ऑर्डर घ्यायचो. सुरुवात अर्थातच नातेवाईक-मित्र अशी व्हायची. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळाल्या की मग आईच्या मैत्रिणी, त्यांच्या सोसायट्या, मग दिसेल त्या बिल्डींग मध्ये घुसून सेल्समनगिरी करायचो. सहावी सातवीतला मुलगा घरपोच दिवाळी अंक विक्री करतोय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. माझा मित्र सोहम हा ज्ञान प्रबोधिनीत होता. त्यांना त्यांच्या शाळेने फटाके विक्री करायला सांगितलेली असे. त्यामुळे एक दोन वर्ष आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. फटाके आणि दिवाळी अंक, घरपोच विक्री! दोघांच्याही हातात आपापल्या याद्या आणि एक ऑर्डर घ्यायची वही. 
ऑर्डर्स घेतल्या की मग अप्पा बळवंत चौकात जायचे, तिथल्या 'संदेश एजन्सी' मधून सगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि मग सगळ्या घरांमध्ये ते पोचते करायचे हा उद्योग दिवाळीचे आधी २ दिवस चालायचा... 'संदेश' मधून मला सवलतीच्या दरात अंक मिळायचे. प्रत्येक अंकामागे २०% सुटायचे. मग हे पैसे वापरून मी माझी दिवाळी अंकांची खरेदी करायचो...! जास्तीत जास्त दिवाळी अंक खरेदी करता यावेत म्हणून मी अक्षरशः दिवसभर ऑर्डर्स घेत भटकायचो. सतत हिशोब करून किती ऑर्डर्स अजून घ्यायला लागतील ते बघायचो. पण एकदा का माझे दिवाळी अंक हातात आले की मग पुढची सुट्टी जी जायची त्याला तोड नाही...!!! दिवसभर तंगड्या पसरून वाचत पडायचे...!!! तेव्हा लागलेली ही सवय आता आयुष्यात कधी सुटेल असं वाटत नाही... 
नेहमीप्रमाणेच याही वर्षी भरपूर दिवाळी फराळ झाला...! अंतर्नाद, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अनुभव, साप्ताहिक सकाळ, जत्रा, माहेर, मानिनी, प्रपंच, आवाज, अनुवाद, चिन्ह अशा एकसे एक अंकांनी यावेळची दिवाळी भन्नाट गेली...!
त्यातले काही खास लेख प्रत्येकाने वाचावेत असेच आहेत. साप्ताहिक सकाळ मध्ये असलेला पुण्याच्या नदीवरचा लेख तुफान आहे. अतिशय अभ्यासपूर्ण...! पुण्यातली नदी, नदीचे प्रदूषण आणि सरकारची भूमिका अशा विविध गोष्टी या लेखात आहेत. 
महाराष्ट्र टाईम्स तर विलक्षण आहे... गेल्या ५० वर्षातले मटा मध्ये छापून आलेले उत्तमोत्तम लेख एकत्र करून छापले आहेत. गोविंदराव तळवलकरांच्या चीन हल्ल्यावारच्या एखाने या अंकाची सुरुवात होते... मग पु. ल., तेंडूलकर, हृदयनाथ मंगेशकर, इरावती कर्वे, आर के लक्ष्मण, नरहर कुरुंदकर, गदिमा, सुहास पळशीकर, कुमार केतकर, कुसुमाग्रज, सुनीताबाई देशपांडे, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गजांचे लेख एकाच अंकात मिळणे ही फारच मोठी मेजवानी होती...! यापैकी पुलंनी लिहिलेला बालगंधर्व यांच्यावरचा लेख, गदिमांचा आचार्य अत्रेंवरचा लेख, विजय तेंडूलकर, नारळीकर आणि नानाचा लेख तर फारच सुंदर. गोविंद तळवलकर यांचे सर्वच लेख अफाट..! महाराष्ट्र टाईम्स चा अंक हा नुसता वाचायचा अंक नसून संग्रही ठेवायचा अंक आहे. 
इतरही सगळ्याच दिवाळी अंकात खजिनाच आहे. अक्षर मधला मटा च्या ५० वर्षातल्या ३ प्रमुख संपादकांवर लिहिलेला प्रकाश अकोलकरांचा लेख, किंवा अक्षर मधला सोशल मिडिया वरचा स्वतंत्र विभाग, प्रपंच मधला "जगण्यावर शतदा प्रेम करावे" या विभागातले आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे लेख, अंतर्नाद मधले लेख, चिन्ह मधले नाडकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांचे लेख, माहेर मधला डॉ अभय बंग यांच्या मुलाचा लेख, लोकसत्ता मधला गिरीश कुबेर यांचा लेख हे सर्वच फार वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे. 

लोकांनी दिवाळी अंकाचे वाचन केले तरी दिवाळीच्या महिन्याभरात लोकांची प्रगल्भता कित्येक पटींनी वाढेल. दिवाळीच्या निमित्ताने विचारवंत, तज्ञ, पत्रकार, जाणकार लोक आपण होऊन माहितीचा, विचारांचा खजिना उघड करत असतात. तो भरभरून घेणे आणि स्वतःला प्रगल्भ करणे आपल्याच हातात आहे. 
वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कालच एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. बोलता बोलता तो म्हणाला ते एकदम पटलं. तो म्हणाला, आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात. एक फोटो कोणीतरी 'शेअर' करतो त्यावर कोणाचीतरी बदनामी असते. आणि कसलीही शहानिशा न करता असंख्य लोक त्याचा प्रसार करतात. आणि बेधुंदपणे या गोष्टी पसरतात लोक त्यावर विश्वासही ठेवतात. हे सगळं मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे. सर्वांगाने विचार करून, माहिती घेऊन, खोलवर वाचन केले गेले पाहिजे. समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. 

Tuesday, November 1, 2011

चारित्र्य, कर्तृत्व वगैरे वगैरे...


मागे एकदा एक अप्रतिम ई मेल वाचला होता:
पुढील पैकी कोणता मनुष्य तुम्हाला नेता म्हणून आवडेल?
१) हा माणूस रोज दारू, प्रचंड सिगारेट. रात्र रात्र जागरणं तर रोजचीच.
२) हा माणूस दारू पितो शिवाय अनेक बायकांशी याची लफडी असल्याची सातत्याने चर्चा. शिवाय सत्ता जाऊ नये यासाठी धडपड.
३) हा माणूस कधीच दारू पीत नाही. सिगारेटला तर शिवतही नाही. एकच प्रेयसी, जिच्याशी लग्न. 

सर विन्स्टन चर्चिल  
यापैकी पहिली व्यक्ती आहे ग्रेट ब्रिटीश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, दुसऱ्याचे नाव आहे महान अमेरिकन अध्यक्ष फ्रांक्लीन डी रूझवेल्ट आणि तिसऱ्याचे नाव आहे एक भयानक हुकुमशहा अडोल्फ हिटलर!! 

किती लवकर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवून टाकतो ना?? विशेषतः व्यसन आणि लैंगिक चारित्र्य या बाबतीत तर भारतीय लोक ताबडतोब आपले मत बनवून टाकतात. त्यातही राजकारणाच्या बाबतीत एकदम हळवे होतात. सिनेमातल्या नट्या आणि नट यांची कितीही लफडी वगैरे असली तरी त्याविषयी फारसे वाईट कधीच वाटत नाही उलट त्या बातम्यांमध्ये जरा जास्तच रस असतो. पण एखाद्या राजकीय व्यक्तीचे कोणाशीही संबंध असतील तर मात्र आपल्या डोक्यातून ती व्यक्ती पार बादच होऊन जाते. अर्थात अमिताभ बच्चन चे अनेक नट्यांबरोबर संबंध होते (अशी चर्चा तरी होती, खरेखोटे अमिताभ, रेखा, जया यांनाच ठाऊक) तरीही निवडणुकीच्या रिंगणात त्याला मात्र या तराजूवर तोलले गेले नाही...! 
मस्तानी
सध्या फेसबुक वर राहुल गांधी च्या कोलंबियन मैत्रिणी वरून जोरदार चर्चा वगैरे चालू आहेत. किंवा उठ सूट नेहरूंच्या आणि लेडी माउंटबैटन यांच्या संबंधावरून टीका होत असते. असल्या भंपक भपकेबाज प्रचाराला आपले लोक बळी पडतात हे आपले खरोखरच दुर्दैव आहे. राहुल गांधी किंवा नेहरूंवर टीका करायची तर त्यांच्या कार्यावर करा, विचारधारेवर करा. या दोघांच्या किंवा इतर कोणाच्याही बाजूने बोलायचा माझा उद्देश नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की कोणाचेही काही का संबंध असेनात कोणाशीही, त्याने त्याच्या कर्तृत्वावर फरक पडत नाही ना हे महत्वाचे. त्यामुळे मूल्यमापन करायचे तर कर्तृत्वाचे करा, विचारांचे करा... त्यांचे लैंगिक चारित्र्य वगैरे कसे होते असल्या भंपक आणि फुटकळ गोष्टींचा बाऊ करणे थांबायला हवे. पण आपल्या इथल्या परंपरावादी बिनडोक लोकांना याबाबत अक्कल नाही आणि हे समजून घेण्याची प्रगल्भताही नाही.
आमच्या पुराणात-इतिहासात द्रौपदी पाच पांडवांची बायको होती. शिवाय प्रत्येक पांडवाच्या स्वतंत्र बायकाही होत्या. विवाहबाह्य संबंध होते, विवाह पूर्व संबंध होते. अर्जुनाने द्रौपदी असताना कृष्णाच्या बहिणीचे हरण केले म्हणून कोणी त्याच्या  कर्तृत्वावर आक्षेप घेत नाही. किंवा पाच पती असूनही द्रौपदीच्या धैर्याची आणि महानतेची स्तुतीच ऐकायला मिळते. कोणी शिवाजीचे मूल्यमापन शिवाजीच्या आठ पत्नी होत्या या गोष्टीवरून करू लागले तर त्या व्यक्तीला आपण वेड्यातच काढू...! मस्तानी होती म्हणून बाजीरावाचे शौर्य कमी होत नाही.

एखाद्या व्यक्तीची भरपूर लफडी असतील पण ती प्रचंड काम करणारी असेल, भ्रष्टाचार वगैरे दृष्टीने स्वच्छ असेल तरी आपल्या इथे एखादा एकपत्नीवाला भ्रष्ट गुंड मनुष्य विक्रमी मताधिक्क्याने निवडून येईल. असले बुरसटलेले मतदार असतील तर या देशात राजकीय प्रगती कधी होणारच नाही. विचार करण्याची पद्धती बदलल्याशिवाय राजकीय परिवर्तन टिकाऊ होणार नाही. अर्थात हे फक्त आपल्या इथे आहे अशातला भाग नाही. अमेरिकेतही एखाद्या राजकीय व्यक्तीचे विवाह बाह्य वगैरे संबंध असणे तिथल्या लोकांना पचत नाही. पण फ्रान्स चे उदाहरण आवर्जून द्यावे वाटते. फ्रान्सच्या अध्यक्षांनी सार्कोझी यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेऊन इटालियन गायिका असलेल्या कार्ला ब्रुनी या आपल्या प्रेयसीबरोबर विवाह केला. तिथल्या मिडीयाने या गोष्टीवर भरपूर टीका टिप्पणी केली. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दाच बनवला. देशाचा अध्यक्ष असे कृत्य करूच कसे शकतो असे म्हणत सार्कोझी यांच्यावर तोफ डागली. पण फ्रेंच जनता तिथल्या राजकारण्यांपेक्षा प्रगल्भ निघाली. त्यांनी विरोधी पक्षीयांना मुळीच भिक घातली नाही. आपल्याकडे हे होऊ शकते? 
सार्कोझी आणि कार्ला ब्रुनी
मुळात विवाह, लैंगिक संबंध वगैरे गोष्टी एखाद्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्याबाबत इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही हे आपल्या लोकांना कळतच नाही. याचा अर्थ या सगळ्यावर कोणी टीका करूच नये असा माझा बिलकुल आग्रह नाही. ते स्वातंत्र्य नसेल तर लोकशाहीला काय अर्थ? फक्त टीका करायची तर तेवढ्या मुद्द्यापुरती करा. त्याचा संबंध उगीचच कुठेतरी जोडत बसायची गरज नसते. राहुल गांधीला कोलंबियन मैत्रीण आहे, किंवा प्रमोद महाजन यांची अनेक लफडी होती अशी चर्चा असते हि बाब मला पटत नाही किंवा आवडत नाही असे कोणाला म्हणायचे असेल तर त्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. आणि कोणाचाही असूही नये. पण कोणी जर म्हणायला लागले की राहुल गांधी राजकीय नेता म्हणून भुक्कड आहे कारण त्याला कोलंबियन मैत्रीण आहे तर माझा आक्षेप आहे. कारण या वाक्यात ना प्रगल्भता दिसते ना बौद्धिक कुवत दिसते. 

एखाद्याची गर्लफ्रेंड आहे यात "लो मोराल्स" (Low morals) कसे काय झाले??? त्याच्या भावना, त्याचे प्रेम हे कोणावर असावे, कोणावर नसावे, कितीवेळा असावे, किती जणींवर/ जणांवर असावे याचा आणि इतरांचा काय संबंध?? यामध्ये लो मोराल्स म्हणजे कमी दर्जाची तत्वे काय आहेत?? ज्यामध्ये दोन्ही बाजूंची परस्पर संमती आहे, अशा कोणत्याही (लैंगिक, भावनिक, बौद्धिक, अध्यात्मिक इ.) प्रकारच्या नात्याला आक्षेप घेणारे इतर लोक कोण?? ती गोष्ट आवडली नाही असे असू शकते. पण त्याचा आणि राजकीय मुल्यमापनाचा काय संबंध? शिवाय काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलीने इतर मुलांशी बोलणे या गोष्टीलाही लो मोराल्स चे काम म्हणले जायचे. पुढे काळ बदलला. नंतर मुलामुलींमध्ये स्पर्श होण्याला समाजात आक्षेप असायचा. पण आजकाल सहज मिठी मारणं ही काय फार मोठीशी गोष्ट राहिली नाहीये. एकूणच काय तर आपण हळू हळू प्रगल्भ होतोय. या गोष्टी नगण्य आहेत हे समजून घेतोय. त्यामुळे लो मोराल्स वगैरे गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. तारतम्याने त्या बदलल्या जातात, बदलायच्या असतात नाहीतर आपल्यात आणि श्री राम सेने सारख्या भुक्कड लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. "माझ्या राजकीय नेत्याने कसे जगावे याचा आदर्श घालून द्यावा" अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर मला त्याच्या बुद्धीची कीव करावी वाटेल. राजकीय नेत्याचे काम आहे राजकीय नेतृत्व करणे. लैंगिक नैतिकतेचे आदर्श घालून देणे हे राजकीय नेत्याचे कामच नाही. 

कोणतीही गोष्ट Black किंवा white असू शकत नाही. What about Grey shades? माणूस जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्याला असंख्य पैलू असतात. जे पैलू अनेकदा इतरांच्या समजुतीच्या कुवतीबाहेर असतात. दूरवरून एखादी गोष्ट judge करणे तितकेसे योग्य होत नाही ते त्यामुळे! एखाद्याचे असतील विवाहबाह्य संबंध किंवा एखाद्याच्या असतील एका मागोमाग एक १० गर्लफ्रेंड्स... यामध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे कोण चूक कोण बरोबर याबाबत शंभर टक्के माहिती आपल्याला असू शकत नाही आणि असण्याची गरजही नाही. त्यामुळे कोणावरही वर वर पाहून ठप्पा मारण्याची चूक आपण करू नये. आणि हो सामाजिक नैतिकतेला मान द्यावा लागतो म्हणून तर आपल्या नेत्यांचे कोणाशीही कसेही संबंध असले तरी ते गुप्त ठेवावे लागतात. म्हणूनच सगळ्या बाबतीत दांभिकता आणि अप्रामाणिकपणा दिसून येतो. मी इथे लोकांवरच टीका करतो आहे जे आपल्या नैतिकतेच्या कालबाह्य संकल्पना सोडायला तयार नाहीत. शिवाय नैतिकतेचा आदर्श घालून घ्यावा ही झाली 'आदर्शवादी' संकल्पना. पण प्रत्यक्षात तसे नसेल तरी बिघडले नाही पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही कामावर घेत असाल तर त्याची काम करायची क्षमता बघता की त्याची किती लफडी होती/आहेत हे बघता? CV मध्ये आजपर्यंतच्या गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड्सची संख्या लिहितात का??? मग आपला सेवक (By the way, लोकप्रतिनिधी आपला सेवक असतो बर का!) निवडताना निवडणुकीतच आपण असल्या भुक्कड आणि उथळ विचारांच्या आहारी का जातो? 
एकूणच लैंगिक चारित्र्य आणि कर्तृत्व याचा काडीमात्र संबंध नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना केवळ प्रचारी आणि भंपक गोष्टींना एवढे महत्व का देतो? 
सुशिक्षित झालो तरी सुसंस्कृत आणि प्रगल्भ कधी होणार?? काहींना वाटेल लैंगिक चारित्र्य जर योग्य नसेल तर कसली आली आहे सुसंस्कृतता... पण सुसंस्कृतता लैंगिक चारित्र्यात नसून माणसाला माणसासारखे वागवणे, समोरच्याला आवश्यक स्वातंत्र्य देणे आणि त्याच्या स्वातंत्र्याचा, वैयक्तिक 'स्पेस'चा आदर करणे यामध्ये असते.