Friday, June 18, 2010

बेस्ट ऑफ फाईव्ह!!!!

११ वी मध्ये प्रवेश देताना दहावीतल्या एकूण ७ विषयांपैकी सर्वात जास्त गुण असलेले ५ विषयच विचारात घ्यावे असा निर्णय सरकारने घेतला आहे.
बेस्ट ऑफ फाईव्ह चा निर्णय क्रांतिकारी आहे असे माझे मत आहे. आजपर्यंतच्या पद्धतीमुळे एखाद्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा विद्यार्थी दुसऱ्या एखाद्या विषयात मागे राहिल्यास त्याची एकूण टक्केवारी खालावत असे. एकूणच सरकारनेच विषय ठरवून द्यायचे आणि विद्यार्थ्यांवर त्याचा बोजा टाकायचा अशा प्रकारचे ही पद्धत होती. परंतु आता विद्यार्थ्यांवर कमी दबाव असेल. एखाद्या विषयात गुण कमी पडले तरी त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही ही भीती कमी होईल.  अर्थात या योजनेचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होणार असल्यामुळे महाविद्यालयांचे 'कट ऑफ' सुद्धा अजूनच वरती जातील यात शंका नाही आणि 'बेस्ट ऑफ फाईव्हचा प्रत्यक्ष फायदा फारसा मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र या योजनेमुळे मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना आधार मिळेल त्याचं काय? आज एखाद दुसऱ्या विषयामुळे टक्केवारीवर होणारा परिणाम, एकूणच 'प्रोफाईल' वर होणारा परिणाम या विचाराने विद्यार्थी आणि त्याहून जास्त विद्यार्थ्यांचे पालक हताश होताना दिसतात... स्पर्धेच्या या दुनियेत आता आपले/ आपल्या पाल्याचे कसे होणार या विचाराने हतबल होताना दिसतात. त्यांना या योजनेमुळे मानसिक आधार मिळेल. आणि तो सध्याच्या परिस्थितीत महत्वाचा आहे.

सध्या जो महत्वाचा आक्षेप या योजनेवर घेण्यात येत आहे तो म्हणजे ज्या क्षेत्रात विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितो त्या क्षेत्रातले त्याला पुरेसे ज्ञान नसेल तर गुणवत्ता खालावेल... म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये सायन्स विषय नसलेल्या विद्यार्थ्यालाही एकूण टक्केवारीच्या जोरावर सायन्स साईड ला प्रवेश का द्यावा? प्रश्न अतिशय योग्य आहे, हे कोणीच अमान्य करणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत तरी हे कुठे लागू होते आहे?
उदा.  "अ" या विद्यार्थ्याला सायन्स मध्ये ६० गुण आहेत पण त्याची टक्केवारी संस्कृत या विषयातील पैकीच्या पैकी गुणांमुळे झाली आहे ८०. दुसऱ्या बाजूला "ब" या विद्यार्थ्याला सायन्स मध्ये गुण आहेत ९० पण त्याची टक्केवारी इतिहास या विषयातील कमी गुणांमुळे आहे ७९. अशा परिस्थितीत सध्या ८० टक्के असलेल्या "अ" मुलाला सायन्स ला प्रवेश दिला जातो.  याच जागी "ब" हा विद्यार्थी सायन्स साईड साठी अधिक योग्य असूनही असे घडते...

सध्याच्या योजनेमुळे यामध्ये काही फार फरक पडणार नाही. पण तोटाही होणार नाहीये. लगेच काही क्रांतिकारी बदल घडून येईल अशी अपेक्षाच करणं चूक आहे. पण क्रांतिकारी बदलाची ही योजना म्हणजे पहिली पायरी आहे. १४ लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतात, त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्ह करून प्रवेश प्रक्रिया नीट होत आहेना हे पाहणे आवश्यक असल्यामुळे पुढची पायरी याच वर्षी घेणे इष्ट नाही. या वर्षी सर्व काही सुरळीत झाले की पुढच्या वर्षी या वर्षीच्या चुका टाळून पुढची पायरी घेता येऊ शकते. 
आणि याच्या पुढची पायरी असेल ज्या साईड ला विद्यार्थ्याला जायचे आहे त्या साईडचे काही विषय सक्तीचे करणे आणि 'बेस्ट ऑफ फाईव्ह' विषय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जावर ठरवण्याचा अधिकार!
सायन्स साईड ला जाण्यासाठी बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये सायन्स आणि गणित हे विषय असलेच पाहिजेत अशाप्रकारचे नियम. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थी आपले ५ बेस्ट विषय अर्जात लिहून देतील. यामुळे एकूणच विद्यार्थ्यांसाठी लवचिकता राहील आणि तरीही गुणवत्ता मात्र खालावणार नाही.

उदा. "अ" या विद्यार्थ्याला सायन्ससाठी प्रवेश हवा आहे. त्यासाठी त्याने अर्ज भरून दिला. अर्ज देताना सक्तीच्या सायन्स आणि गणित या विषयांचे गुण त्याने अर्जात भरावे, उरलेले ३ विषय कोणते लिहावेत हे मात्र त्याचे त्याने ठरवावे. अर्थातच ज्या विषयात सर्वात जास्त गुण आहेत तेच विषय तो लिहील यात शंका नाही. मात्र साईड प्रमाणे बदल करायचे असल्यास एकूण प्रक्रियेत लवचिकता राहील. म्हणजे याच "अ" विद्यार्थ्याला वाणिज्य शाखेसाठीही अर्ज करायचा आहे, तर समजा गणित हा विषय त्यासाठी सक्तीचा असेल तर तो प्रवेश अर्जात भरल्यावर उरलेले ४ विषय कोणते निवडावे हे स्वातंत्र्य राहील. कदाचित त्यामध्ये तो सायन्स घेणारही नाही. त्यामुळे त्याचे 'बेस्ट ऑफ फाईव्ह' चे विषय सायन्स अर्जासाठी आणि वाणिज्य अर्जासाठी वेगळे असतील. आणि हीच लवचिकता अपेक्षित आहे.

अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे आज जे सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याचे काम प्रवेश प्रक्रियेद्वारे होते आहे ते बंद होईल आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सरसकट न होता त्यांच्या त्यांच्या साईडच्या निवडीनुसार होईल जे विद्यार्थ्यांसाठी खूपच सुसह्य असेल. कारण पालक, समाज आणि एकूणच व्यवस्थेकडून होणारी त्यांची तुलना सगळ्या विद्यार्थ्यांशी न होता, एकूण विद्यार्थी संख्येच्या १/३च विद्यार्थ्यांशी होईल....!!!

निश्चितच ही योजना आशादायी आहे. आता या सर्व योजनेची कार्यवाही कशी होते आहे हे पहायला हवे... ....

Tuesday, June 15, 2010

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे....

रोज सकाळी हजारो घरांमध्ये हे ऐकू येतं... हजारो गृहिणी सकाळी स्वयंपाकात फोडणी देता देता हे वाक्य ऐकतात.... पुण्यात हे वाक्य ऐकला नाही असा मराठी मनोस शोधणे फार अवघड आहे. तर अशा या पुणे आकाशवाणी केंद्रातून एकदा एका सामाजिक संस्थेच्या संस्थापक सदस्यांना फोन आला... त्यांना मुलाखत हवी होती... सामाजिक संस्था तशी नवी होती, संस्थापक सदस्य तरुण होते... "आकाशवाणी पुणे केंद्र" आपली दाखल घेते म्हणजे काय...!!! वाहवा!!! सद्या, कान्या आणि हृष्या अशी या तिघा संस्थापक सदस्यांची नावे....
तिघेही ठरल्या दिवशी ठरल्या वेळेला, बरोबर ११ वाजता आकाशवाणी, पुणे इथे पोचले. आपल्या नेहमीच्या सवयीने, संस्थेचे नेहमीचे काम म्हणून त्यांनी माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ प्रमाणे सर्व माहिती दिसेल अशा ठिकाणी ठसठशीत पद्धतीनी लावली आहे ना हे पहिले आणि समाधानाचा एक सुस्कारा सोडला.

तेवढ्यात एक मुलगी (साधारण वय ३०, यावरून बाई म्हणावे की मुलगी ते तुम्ही ठरवा. मी तरी स्त्रियांचा आणि त्यांच्या भावनांचा आदर करत सध्या 'मुलगी' असेच म्हणतो! ) त्यांच्याकडे चालत आली, " पु.प.स. उर्फ पुणे परिवर्तन समिती या संस्थेतून आलेले तुम्हीच का?", तिने प्रश्न केला. आपल्याला आजकाल लोक ओळखायला लागलेत या विचाराने सद्या एकदम सुखावला. त्यावर 'आपण येणारच होतो आत्ता म्हणून तिनी ओळखले' अशा प्रकारची नजरानजर कान्या आणि हृष्या मध्ये झाली. तिघे त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागले. लवकरच "चर्चा स्टुडीओ" अशी पाटी असलेल्या दरवाजातून चौघे आत गेले.

" युववाणी मध्ये आपले स्वागत, आज आपला विषय आहे तरुण आणि सामाजिक कार्य...", रेकॉर्डिंगला सुरुवात झाली...
सुमारे ४० मिनिटांनंतर सद्या, हृष्या आणि कान्या खुश होऊन बाहेर पडले. रेकॉर्डिंग झाले होते. "पुपस" च्या कार्याविषयी, एकूण उद्दिष्टांविषयी, पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर "पुपस" च्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत इत्यादी चर्चा हसत खेळत करून तिघे समाधानाने बाहेर पडले.
" कार्यक्रम कधी ऐकायला मिळेल??", तिघांच्याही मनात असलेला प्रश्न कान्याने विचारला.. (तसेही प्रश्नांना वाचा फोडणे हेच आपले काम असे कान्या मनापासून मानतो!!!)
" येत्या शनिवारी सकाळी ९.१० मिनिटांनी, युववाणी या कार्यक्रमात...", ती मुलगी उत्तरली...

तिघे खुश होऊन मोठ्या आदराने आकाशवाणी पुणे केंद्राकडे बघत केंद्रातून बाहेर पडले....

कान्या तर विशेषच खुशीत होता... आपल्या "पुपस"ची आकाशवाणीने घेतलेली दखल आपल्या सर्व आप्तेष्टांना कळावी, आणि जरा आपले कौतुकही व्हावे अशा दुहेरी हेतूने, आपल्या फुकट एसएमएस योजनेचा वापर करून कान्याने चौफेर एस एम एस ची उधळण केली... कधीही आयुष्यात ज्याला मेसेज करायचे कष्ट त्याने घेतले नव्हते त्या व्यक्तीलाही एस एम एस करून कान्याने शनिवारी सकाळी रेडीओ ऐकण्याबद्दल बजावले...
सर्वांनी त्याला "नक्की ऐकतो" असे कळवले देखील...!!! कान्या अजूनच खुश...!!! 

अखेर शनिवारची ती सकाळ उजाडली... सद्या कान्या आणि हृष्या तिघेही कान्याच्या घरी आकाशवाणीचे पुणे केंद्र ऐकण्यासाठी जमले. ९.१० मिनिटे उलटताच 'युववाणी' कार्यक्रमाला सुरुवात झाली. तिघे मन लावून ऐकू लागले...
" आज आपला विषय आहे 'आय टी मधले ताणताणाव', आपण काही तरुणांशी या विषयावर गप्पा मारणार आहोत..."
पुढचा अर्धा तास तिघे 'आय टी मधले ताणताणाव' याबद्दल ऐकत बसले.... पण चुकूनही "पुपस" आणि पुपस च्या संस्थापक सदस्यांबद्दल कोणी काहीच बोलले नाही...
"याला काहीच अर्थ नाही..." हृष्या उद्गारला... "थांब मी त्या मुलीला फोन लावतो", सद्याने लगेच नक्की काय झाले या प्रश्नाचा छडा लावायचे ठरवले.
"अहो, तुमचा कार्यक्रम कालच झाला....", त्या मुलीचे हे उत्तर ऐकून सद्याची शीरच तडकली...
"अहो पण याला काही अर्थ आहे का? शनिवारी लागेल असा म्हणला होतात तुम्ही..."- सद्या
" हो, पण आम्ही कालच लावला तो..."- मुलगी
"अहो पण असा कसा करू शकता तुम्ही??" सद्या जवळपास ओरडलाच..
"हे पहा मि. सद्या, आम्ही संगीतलेल्याच वेळी कार्यक्रम प्रसारित करू असे नाही. तशा आशयाची पाटी आमच्या ऑफिस च्या दरवाज्यातच लावलेली आहे. ती तुम्ही वाचली नाही ही आमची चूक असू शकत नाही..."- मुलीने ठामपणे सद्याला बजावले आणि फोन ठेवून दिला.

सद्या हृष्या आणि कान्या तिघेही हतबल....
त्यात फोन वर फोन येत होते... "अरे तुमचा कधी आहे?", "आत्ता काहीतरी वेगळंच लागला होतं..."
दिवसभरात असेही अनेक जण भेटले जे खरं तर सकाळी ११ वाजता उठले होते पण आपल्या मित्रांना वाईट वाटू नये म्हणून भेटल्या भेटल्या त्यांनी " वा! काय अप्रतिम कार्यक्रम झाला रे!!! तू तर एकदम फक्कड बोललास..." अशी प्रतिक्रिया दिली...!!!!

राहून राहून तिघांच्या कानात एकंच गोष्ट घुमत होती... "आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे....."