Saturday, December 22, 2018

नाती आणि ‘स्पेस’

शाळेत कधीतरी ‘मला एक कोटी रुपये मिळाले तर...’ या विषयावर निबंध लिहिल्याचं आठवतंय. त्यावेळी कौन बनेगा करोडपती जोरात सुरु झालं होतं, त्याचा परिणाम असावा. पण विषय चांगलाच रंजक होता. डोक्यात कितीही वेगवेगळ्या कल्पना आल्या तरी शाळेत मार्क मिळवण्यासाठी निबंध लिहितो आहोत ही गोष्ट डोक्यात पक्की असल्याने आपोआप आपण ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टी लिहित जातो. मग साहजिकच त्या निबंधात गरजूंना मदत करणे, हॉस्पिटल बांधणे, ग्रंथालय उभारणे अशा भरपूर गोष्टींचा भरणा होता. आणि मग निबंधाच्या सगळ्यात शेवटी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठीही काहीतरी एक छोटी गोष्ट होती. सगळं कसं अगदी आदर्श! माझा आणि इतर मुलांचा निबंध फार वेगळा नव्हता. ‘आपल्याकडे असलेले एक कोटी रुपये कसे लोकांना ऐकायला आवडेल अशा गोष्टीत आपण खर्च करू’ याच विचाराने सगळ्यांनी निबंध लिहिल्यावर वेगळं काही असण्याची शक्यता नव्हतीच फार. मर्यादित रिसोर्सेस (स्त्रोत) असतील तर ते कसे वापरावेत याबद्दलची स्वतःची कल्पना लिहिताना, त्याही वयात आमच्यावर, कोणत्याही कारणाने का असेना, एका विशिष्ट प्रतिमेचा पगडा होता. ‘अमुक अमुक पद्धतीनेच करणे म्हणजे योग्य’ अशी ती भूमिका. हे असं प्रतिमेत अडकणं आणि उपलब्ध रिसोर्सेसचा वापर या दोन्ही गोष्टी मला नुकत्याच एकदम आठवल्या त्याचं कारण म्हणजे आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात ‘स्पेस’ या शब्दावर झालेली चर्चा.

“अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे जी मला आमच्या नात्यांत ‘स्पेस’ देईल,”, ही अपेक्षा अनेक मुला-मुलींकडून येते. नुकतेच एका गप्पांच्या कार्यक्रमात उपस्थित मुला-मुलींशी मी याबद्दल बोलत होतो. ‘स्पेस हवीच’ याबद्दल बहुसंख्य मंडळींचं एकमत होतं. “स्पेस हवी ते बरोबर, पण किती स्पेस द्यायची ते कळत नाही..”, उपस्थितांमध्ये असणारी स्नेहा म्हणाली. स्पेस द्यायची तर किती द्यायची हाही प्रश्न महत्त्वाचा आहे यावरही सगळ्यांनी माना डोलावल्या. मग अनीश म्हणाला की, “इतकी स्पेस द्यावी की दुसऱ्याला आपण कशाततरी येऊन अडकलो आहे असं वाटू नये.”, त्यावर ऋचा म्हणाली,“पण स्पेस देण्याच्या नादात असंही होऊ नये की, कोणी कोणाला आन्सरेबलच (उत्तरदायी) नाही. तसं झालं तर लग्न करण्याचा फायदा काय?”. वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे मुलंमुली चांगलीच गोंधळात पडू लागली होती. नेमकं कशाला स्पेस म्हणावं इथपासून ते किती स्पेस देणं म्हणजे योग्य अशा प्रश्नांचा शोध घेणं सुरु झालं. ‘नात्यात स्पेस देणे’ याविषयी प्रत्येकाच्या अनेक कल्पना आणि त्याबद्दलचे अनेक आडाखेदेखील. बघितलेल्या किंवा ऐकीव गोष्टींच्या आधारे तयार केलेले अनेक समज-गैरसमज आणि त्यातून तयार झालेल्या ‘स्पेस’ विषयीच्या अनेक प्रतिमा. नात्यातली स्पेस देणं-घेणं म्हणजे नेमकं काय?

जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात किंवा कोणतंही नातं निर्माण करतात, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट घडते. आणि ती म्हणजे, ते एक प्रकारे त्यांच्याकडे असणाऱ्या ‘रिसोर्सेस’चं पुनर्वाटप करतात. म्हणजे काय? तर नातं निर्माण होतं तेव्हा, माझ्याकडे असणारा वेळ, पैसा, प्रत्यक्षातली जागा (घर) हे जे रिसोर्सेस माझ्याकडे असतात त्यातला सर्व किंवा काही भाग मी जोडीदाराला देण्याचं मान्य करतो आणि ते प्रत्यक्षातही आणू लागतो. नात्यातल्या दोन्ही व्यक्ती हे करतात.मला असं वाटतं, माझ्या रिसोर्सेसचं वाटप मी कसं करायचं हे ठरवण्याचं मला असणारं स्वातंत्र्य म्हणजे ‘स्पेस’ असणं. आपली गंमत अशी होते, की नात्यात रिसोर्सेसचं वाटप कसं असलं पाहिजे याबद्दलच्या पारंपारिक प्रतिमांच्या चौकटी एवढ्या घट्ट आहेत की हे आपण स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी बाजूलाच पडतं. आणि मग ‘स्पेस मिळत नाही’ ही तक्रार होऊ लागते.

स्पेस देणं/घेणं हा मुद्दा मुख्यतः ‘वेळ’ या महत्त्वपूर्ण रिसोर्सशी निगडीत आहे. आणि इतर कशाहीपेक्षा या विषयात संघर्ष लवकर होण्याची शक्यता अधिक. कारण पैसा आजपेक्षा उद्या जास्त मिळू शकतो, आज एक बेडरूमचे घर असेल तर उद्या ते तीन बेडरूम्सचं असू शकतं. पण वेळ? आजही २४ तासच हातात आहेत आणि उद्याही. थोडक्यात मर्यादित रिसोर्स असल्याने या वेळेचं वाटप हा फार गंभीर मामला बनतो. इथेच शाळेत निबंध लिहिताना डोक्यात येत असे त्याप्रमाणे, मर्यादित रिसोर्स आणि पारंपारिक कल्पनांमधून तयार झालेल्या प्रतिमा यांची सांगड घालून योग्य काय, अयोग्य काय याच्या अपेक्षा ठरतात. नात्यात असणाऱ्या वा लग्नाला उभ्या व्यक्तींकडून तर हे घडतंच घडतं. आणि मग निबंध लिहावा तसं ‘पॉलिटिकली करेक्ट’ गोष्टींची आश्वासनं दिली जातात. “माझा सगळा वेळ तुझ्याचसाठी असेल”, “आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करू” इ.इ. गोष्टी ठरवल्या जातात. पण आपलं नातं हा आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा ‘एक’ भाग असला तरी ‘एकमेव’ नसतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपण अगदी सगळ्या गोष्टी एकत्र करत नाही. दोघं वेगळ्या ठिकाणी कामावर जाणं, आपापल्या आवडीच्या गोष्टी करण्यात स्वतंत्र वेळ घेणं, घरातली कामे वेगळी वाटून घेऊन वेगवेगळी करणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र केल्या जातातच असं नाही. पण तरीही हे अनेकदा सहज चालतं, कारण पारंपारिक प्रतिमेत या गोष्ट बसणाऱ्या आहेत.पण प्रवासाला जाणं, सिनेमाला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला/जेवायला जाणं अशा कित्येक इतर गोष्टी दोघांपैकी कोणाच्याही एकाच्या डोक्यातल्या प्रतिमेत बसणाऱ्या नसतील तर मात्र यावर बंधनं घालण्याचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रयत्न होतो. म्हणजे, दुसऱ्याच्या रिसोर्स वाटपाबाबतच्या निर्णयस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, म्हणजेच दुसऱ्याची ‘स्पेस कमी करण्याचा प्रयत्न होतो.अर्थातच, स्पेस देण्याचा थेट संबंध विश्वास या गोष्टीशी देखील आहे. आपला आपल्या जोडीदारावर, आपल्या नात्यावर विश्वास आहे ना? नसेल तर कदाचित ‘स्पेस’पेक्षाही मोठे प्रश्न तुमच्या नात्यात तुमच्यासमोर आ वासून उभे आहेत!

आता हे टाळण्यासाठी काय बरं करावं? चार पायऱ्या माझ्या डोक्यात येत आहेत. एक म्हणजे समोरची व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, या सत्याचा स्वीकार. “मेरे रंग में रंगने वाली...” वगैरे म्हणत जोडीदार शोधायचे दिवस केव्हाच संपले. ते गाणं येऊनही तीस वर्ष उलटली. अजूनही तुम्ही तिथेच असाल तर कठीणच आहे. आता तुमच्या रंगात रंगणारी व्यक्ती मिळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित तुम्ही दोघे मिळून नवीन रंग निर्माण कराल किंवा आपापल्या रंगाचं स्वतंत्र अस्तित्व राखत, एक बहुरंगी सहजीवन तयार कराल. यातलं काहीच अयोग्य नाही. दुसरी पायरी आहे प्रतिमांच्याचौकटी मोडीत काढण्याची. ‘नवरा आहे म्हणजे त्याने अमुकच वागलं पाहिजे’, ‘गर्लफ्रेंड आहे म्हणजे याच पद्धतीने मला वेळ दिला पाहिजे’ यासारख्या प्रतिमा फेकून द्याव्या लागतील. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, स्वतंत्र आहे, त्यामुळे प्रत्येक नातं देखील वेगळं आहे, युनिक आहे. ते प्रतिमांच्या चौकटीत बसवायला जाण्यात कसलं आलंय शहाणपण?

‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. तिसरीपायरी आहे संवादाची. यावरून मला एका जोडप्याचा किस्सा आठवतो. त्यांना आपण मधुरा आणि समीर म्हणूया. लग्न ठरल्यावर एकदा समीरने मधुराला सहजच विचारलं की तुला माझ्याकडून, एक नवरा म्हणून काय काय अपेक्षा आहेत. मधुरा म्हणाली, “मला तुझा रोज एक तास हवाय.”. बस्स, एवढंच? समीरला आश्चर्य वाटलं. त्यावर मधुरा म्हणाली, “हा एक तास पूर्णपणे माझा असला पाहिजे. म्हणजे त्यात आपले नातेवाईक, मित्र, सिनेमा, टीव्ही, पुढे मुलं झाली की ती, आपला बेडरूममधला वेळ, मोबाईल, काम यातलं काहीही नसेल. रोजचा एक तास फक्त माझ्यासाठीचा असेल.” मला तुझ्या ‘२४ तासांतला एक तास हवाय’ इतकी स्पष्ट अपेक्षा मधुराने समीरसमोर मांडली. समीरकडे असणाऱ्या रिसोर्सपैकी नेमकं काय हवंय याबाबत मधुराने नेमका संवाद साधला. प्रतिमांच्या चौकटी मोडीत काढल्यावर हा संवादच आपल्याला आपल्या नात्याला आपलं हवं ते रूप द्यायला मदत करेल. नातं निर्माण होतं तेव्हा काही स्पेस ही ओव्हरलॅप होईल, काही मात्र स्वतंत्र राहील याची स्पष्टता आणि मानसिक तयारी आपल्याला लाग्नाच्याच नव्हे तर कोणत्याही नात्यात ठेवावी लागते. त्यासाठीच संवाद महत्त्वाचा आहे. चौथी, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे लवचिकता. नात्याच्या सुरुवातीच्या काळात कदाचित सगळ्यांना मधुराइतकी स्पष्टता असेलच असं नाही. पण या गोष्टी वारंवार बोलण्याच्या आहेत, केवळ सुरुवातीला नव्हे. अधून मधून सिंहावलोकन करून, आपण आपल्या स्वतःच्या रिसोर्सेसच्या वाटपाबाबत आणि एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षांबाबत काय बोललो आहोत, आत्ताची परिस्थिती काय आहे, आपल्याला काय हवं आहे, कसं हवंय अशा गोष्टींवर संवाद व्हायला हवा. या संवादातून असा निष्कर्ष निघाला की काही गोष्टी बदलण्याची गरज आहे, तर त्याचा स्वीकारही व्हायला हवा. तेवढी लवचिकता आपल्याला दाखवायला हवी. मला वाटतं, या चार पायऱ्या नीट पाळल्या तर आयुष्यातला ‘नात्यातली स्पेस’ या विषयावरचा प्रत्येकाचा निबंध वेगळा आणि मस्त होईल!

‘स्पेस’ला मराठीत शब्द आहे अवकाश. मला हा शब्द आवडतो. यात खुल्या आकाशाचा भास आहे. स्वातंत्र्याची अनुभूती आहे. स्वातंत्र्य माणसाला जबाबदार बनवतं असं सामाजिक क्षेत्रात मानलं जातं. नात्यातल्या निर्णयस्वातंत्र्यातून निर्माण होणारं अवकाश, नात्याला आणि नात्यातल्या व्यक्तींना जबाबदार बनवतं. चुकलो, धडपडलो तरी, प्रगल्भ बनवतं. वर्षभर आपण वेगवेगळ्या विषयांवर इथे चर्चा केली. अगदी नातं म्हणजे काय इथून सुरुवात होत ते तडजोड, नव्याची नवलाई, अहंगंड, लिव्ह इन, सेक्शुअल कम्पॅटिबिलीटी, तुलना, पर्याय, पारदर्शकता अशा अनेक विषयांत मुशाफिरी केली. अर्थातच या विषयांत कसलं गाईडबुक नाही. अमुक अमुक म्हणजेच काहीतरी अंतिम फंडा आहे असंही नाही. उलट स्वतःला पुरेशी ‘स्पेस’ देत (म्हणजे त्यात रिसोर्सेसचं स्वतःसाठी वाटप आलंच!) या विषयांवर मुक्त चिंतन करणं, चर्चा करणं; आणि आपली नाती फुलवण्याचा, बहरवण्याचा, प्रगल्भ करण्याचा सतत प्रयत्न करणं यातच शहाणपण आहे. या वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

(दि. २२ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या 'मैफल' या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, December 8, 2018

आर या पार


‘नातं टिकवण्यासाठी नात्यात पारदर्शकता हवी’ हे किंवा असली वाक्य वापरून वापरून किती गुळमुळीत झाली आहेत, नाही का? पण तरीही, माणसामाणसांच्या नात्यात लपवाछपवी, अर्धसत्य, अपारदर्शकता हे प्रकार काही हद्दपार झालेले नाहीत. खोटं पकडायचा एक मार्ग शोधला की माणूस खोटं बोलण्याचे नवीन दहा मार्ग शोधतो. माणूस दुसऱ्याशी खोटं का बरं बोलतो?

गेल्या वर्षीच्या जूनमध्ये नॅशनल जिओग्राफिक मासिकाने कव्हर स्टोरी केली होती- ‘आपण खोटे का बोलतो?’. यात लेखक युधीजीत भट्टाचार्य म्हणतो की, ‘प्रामाणिकपणा हे चांगलं धोरण असलं तरी खोटं बोलणं हे अगदी मानवी आहे, नैसर्गिक आहे.’ रंग बदलणारे सरडे किंवा अंग फुगवून शत्रूला घाबरवू बघणारे मासे/प्राणी यांच्यासारखंच मानवामध्येही जगण्यासाठी, स्वतःच्या बचावासाठी फसवेगिरी (डिसेप्शन) करण्याची उपजतच वृत्ती असते. हार्वर्ड विद्यापीठाच्या नितीशास्त्राच्या तज्ज्ञ सिसेला बॉक म्हणतात, शारीरिक दृष्ट्या फसवेगिरी करणं किंवा बळाचा वापर करणं यापेक्षा भाषेच्या शोधानंतर खोटं बोलणं हा सोपा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला! आपल्यातला खोटेपणा हा असा आदिम वृत्तीचा परिपाक आहे. पण मानवात आणि इतर प्राण्यांमध्ये फरक हाच आहे की, आपण आपल्या काही आदिम वृत्तींना काबूत ठेवत, मोठ्या संख्येने, सौहार्दाने एकत्र राहण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी ठरवल्या आणि त्यांचं पालन करायचं असंही ठरवून घेतलं. प्रसिद्ध लेखक युवाल नोआह हरारी या ठरवून घेण्याला ‘काल्पनिक वास्तव’ म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या पण, अनेक व्यक्तींच्या एकत्रित कल्पनेत असणाऱ्या गोष्टी. धर्म, पैसा, देश या गोष्टी ‘काल्पनिक वास्तव या सदरात मोडतात. या काल्पनिक वास्तवातल्या गोष्टी नीट प्रत्यक्षात येण्यासाठी ‘परस्पर विश्वास’ हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. एक उदाहरण बघूया. भारतीय रुपया हे चलन आपण वापरतो. एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करायची तर खरेदी करणारी व्यक्ती आणि विक्री करणारी व्यक्ती या दोघांचाही भारतीय रुपया या चलनावर विश्वास असतो. त्यामुळे व्यवहार सुरळीत होऊ शकतो. अशा विश्वासावरच व्यापक व्यवस्था उभ्या राहिल्या. पण खोटेपणा, फसवेगिरी यामुळे विश्वासाला तडा जाऊन व्यवस्थाच ढासळण्याचा धोका असतो. कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्याला देखील हेच लागू होतं.

आपण अगदी सुरुवातीच्या, २० जानेवारीच्या, लेखात बघितलं होतं, नातं म्हणजे सामायिक अनुभव- शेअर्ड एक्स्पीरियन्स. दोन व्यक्ती जेव्हा कोणताही अनुभव एकत्र निर्माण करतात तेव्हा त्यांच्यात चांगलं/वाईट नातं निर्माण होतं. पण जेव्हा दोन व्यक्ती स्वतंत्रपणे वेगळे अनुभव घेत असतात तेव्हा, त्यांना त्यांच्यात सामायिक अनुभव निर्माण करण्याची संधी संवादामुळे मिळते. एकमेकांना एकमेकांचे अनुभव सांगितले की, या संवादामुळे सामायिक अनुभव तयार होऊन नातं निर्माण होतं. त्यामुळे अर्थातच, अधिकाधिक संवाद असणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात, किंवा एकमेकांच्या जवळ आलेल्या व्यक्तींना नातं मजबूत ठेवण्यासाठी, अधिक फुलवण्यासाठी संवादाची गरज भासते. ‘संवाद’ हे नात्याचं चलन बनू लागलं की ते चलन अधिकाधिक ‘खरं’ असलं पाहिजे हा आग्रह अवाजवी ठरत नाही. चलनावरचा विश्वास डळमळीत झाला तर नात्याचा पायाही डळमळीत होईल हे उघड आहे. याचमुळे ‘नात्यात पारदर्शकता हवी’ असं आग्रहाने मांडलं जातं.

अपारदर्शकता अविश्वासाला खतपाणी कशी घालते ते बघूया. जेव्हा अपारदर्शकता असते आणि हे समोरच्यालाही जाणवतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेंदू आपल्या क्षमतेनुसार त्या न दिसणाऱ्या, अपारदर्शक जागा भरू लागतो. गेल्या वेळच्या लेखात आपण  माहित नसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या जागा भरून काढण्याच्या मेंदूच्या करामतीविषयी थोडी चर्चा केली होती. एक उदाहरण देतो. एका मुलाच्या, त्याला आपण रोहन म्हणूया, विवाहसंस्थेत भरलेल्या फॉर्ममध्ये ‘ड्रिंकिंग’ या सवयीपुढे ‘कधीच नाही’ असं लिहिलं होतं. त्याचा तो फॉर्म बघणाऱ्या एका मुलीने, तिला आपण सानिका म्हणूया, रोहनचं फेसबुकवरचं प्रोफाईल बघितलं. तिला असं दिसलं की, फेसबुकवरच्या काही फोटोंमध्ये रोहनच्या हातात ग्लास दिसतोय. त्यातलं पेय दारूसारखं दिसतंय. आता या परिस्थितीत सानिकाच्या डोक्यात अनेक शक्यता येत जातात. रोहनने मुद्दाम खोटं लिहिलं असेल का? की त्याच्या पालकांनी खोटं लिहिलं असेल? की त्याने आणि त्याच्या पालकांनी एकत्र ठरवून हे खोटं विवाहसंस्थेच्या प्रोफाईलवर लिहिलं असेल? की त्याच्या पालकांना तो दारू पितो याचा पत्ताच नसेल? की त्याच्या हातातल्या ग्लासात व्हिस्की नसून अॅपल ज्यूस असेल? पुरेशी पारदर्शकता नसल्याने सानिकाच्या मेंदूने गाळलेल्या जागा भरताना असंख्य वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेतला. या डोक्यात येणाऱ्या शक्यतांना प्रतिसाद कसा द्यायचा हे माणसा-माणसाप्रमाणे बदलेल. पण मुद्दा हा की, डोक्यातल्या ‘शक्यतांच्या’ आधारे माणूस स्वतःचा प्रतिसाद ठरवू लागतो आणि प्रत्यक्ष काय आहे किंवा नाही, याची शहानिशा न झाल्याने कल्पनेतल्या शक्यतांनाच वास्तव मानून वागू लागतो. त्या व्यक्तीसाठी तेच काल्पनिक वास्तव बनतं. पण इथे कदाचित रोहन आणि सानिका या दोघांचं वास्तव वेगळं असल्याने अविश्वास आणि बेबनाव निर्माण होतो. अशावेळी नातं निर्माण होणं आणि पुढे टिकणंही कठीणच.

यावर उपाय काय? अर्थातच, नात्यांत जितकी जास्त पारदर्शकता ठेवता येईल तितकी ठेवावी, हे तर आहेच. पण तत्पूर्वी, पारदर्शकता ठेवण्यासाठी योग्य असं वातावरणही दोन्ही बाजूंनी निर्माण करावं लागेल. यासाठी मला एक त्रिसूत्री डोक्यात येते आहे- खोटं बोलण्याच्या अनेक कारणांमध्ये, समोरची व्यक्ती मला नीट समजून घेणार नाही या कारणाचा मोठा पगडा असतो. आधीचे अनुभव, ऐकीव गोष्टी यावर आधारित हा ‘समजून घेणार नाही’ हा निष्कर्ष काढलेला असतो. मला वाटतं, समोरच्याचा एम्पथी म्हणजे समानुभूतीने विचार करणं, त्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं, लगेच निष्कर्ष काढून लेबलं चिकटवून मोकळं न होणं ही पहिली पायरी असू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे मतभिन्नतेचा स्वीकार. ‘‘अ’ आणि ‘ब यांच्यात मतभिन्नता असू शकते’ या शक्यतेचा त्या दोन्ही व्यक्तींनी केलेला स्वीकार. मतभिन्नता असली म्हणजे थेट संघर्षाचा पवित्रा घेण्याची गरज नसते. दोन व्यक्ती मतभिन्नतेतूनही मार्ग काढू शकतात. किंबहुना दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा हे करतही असतो. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने अनेक मतं आणि विचार अस्तित्वात असूनही सौहार्दाने राहण्याची कला मानवप्राणी गेल्या हजारो वर्षात शिकला आहे. सामाजिक पातळीवर जे जमलं, ते व्यक्तिगत पातळीवरही अधिक प्रभावीपणे अंमलात आणणं शक्य आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, समोरच्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार. हा स्वीकार नसेल तर पारदर्शकता न ठेवणं, आणि स्वीकारली जाईल अशी प्रतिमा उभी करत राहणं हेच आकर्षक वाटेल. यातून नात्यांत दांभिकता तेवढी निर्माण होईल. असं नातं टिकेल का? आणि टिकलं तरी फुलेल, बहरेल का?!

पारदर्शक नात्याची निर्मिती ही अशी दोन्ही बाजूंनी करावी लागते.  रानटी अवस्थेत जगताना फसवेगिरी (इंग्रजीत ज्याला ‘डिसेप्शन’ म्हणतात) हा इतर प्राण्यांप्रमाणेच मानवप्राण्याच्याही अस्तित्वासाठी महत्त्वाचा भाग असेलही, पण एकविसाव्या शतकात मात्र नेमकी उलटी परिस्थिती आहे. मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत अधिकाधिक गुंतागुंतीच्या, डीसेप्टिव्ह म्हणजे फसव्या आणि क्लिष्ट रचनांनी बनलेल्या समाजात आपण राहत असताना, पारदर्शकता आणि माणसांतला परस्पर विश्वास ही आपल्या अस्तित्वासाठीच गरजेची गोष्ट आहे. अगदी ‘आर या पार’चीच लढाई आहे ही. पण समानुभूती (एम्पथी), मतभिन्नतेचा स्वीकार आणि प्रत्येकाचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर; या त्रिसूत्रीच्या सहाय्याने अधिक पारदर्शक, सौहार्दाचं आणि प्रगल्भ असं आयुष्य आपण जगू शकू असा माझा विश्वास आहे.

(दि. ८ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)