Saturday, September 15, 2018

‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा


ज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे, ती व्यक्ती मुळात कशी आहे, ही एक गोष्ट जोडीदार निवडताना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष!) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का? तुमच्यासाठी जोडीदार निवडण्यासाठी तुम्हाला अगदी नेमकेपणाने कोण ओळखतं?

आधीच्या पिढीपर्यंत पालकवर्गाची या क्षेत्रात पूर्ण सत्ता होती जणू. पण यात बदल झाला. विसाव्या शतकात बदलणाऱ्या अर्थकारण-समाजकारणाने व्यक्ती कुटुंबापासून काहीशी स्वायत्त होत गेली. मी स्वतःला कोणाहीपेक्षा जास्त ओळखतो/ते, आणि म्हणून माझ्या जोडीदाराबद्दलचा अंतिम निर्णय घ्यायला मीच सर्वाधिक लायक आहे’, असा सूर उमटू लागला. अर्थात आजही आमच्याकडे येणारे काही पालक दावा करतात की, ‘आम्हाला आमच्या मुला/मुलीच्या आवडी-निवडी, अपेक्षा असं सगळं नीट माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्याची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेण्यात काही गैर नाही. क्वचित प्रसंगी मुलं-मुलीही या म्हणण्याला दुजोरा देतात. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात काही काळ घालवला आहे अशा कोणत्याही पालक-मुलामुलींशी बोलल्यावर जाणवतं की, हे वाटतं तितकं सोपं नसतं! “आम्ही सुचवतो त्यातलं एकही स्थळ आमच्या मुलाला/मुलीला आवडत नाही” असं म्हणणारे पालक, आणि “आई-बाबांना नेमकं कळतच नाहीये, मला जोडीदार म्हणून कशी व्यक्ती हवीये.”, असं म्हणणारी मुलंमुली, आम्हाला अगदी रोज भेटत असतात. स्वतःच्या नेमक्या ओळखीचा हा गंमतीशीर घोळ झाला की लग्नाची इच्छा असतानाही लग्न लांबणीवर पडू लागतं.

आनंदी सहजीवनासाठी जोडीदार निवडीच्या अपेक्षा ठरवण्याआधी स्वची नीट ओळख करून घ्या हा झाला सिद्धांत- थिअरी. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवायचा कसा? गेल्या शतकात यावर एक उत्तर शोधलं गेलं ते मानसशास्त्रातून. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून व्यक्तिमत्व कसं आहे, स्वभाव कसा आहे, नात्याच्या दृष्टीने स्वभावातल्या धोक्याच्या जागा कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या अशा प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर देणारी यंत्रणा मानसशास्त्राने दिली. अजूनही त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आज या चाचण्या आणि त्याबरोबर केलं जाणारं समुपदेशन हे या स्व च्या ओळखीसाठी उपयोगी पडतं आहे. त्या आधारे जोडीदार निवडीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढतंय. कोणत्याही व्यक्तीला ओळखणं यात दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात- एक म्हणजे नेमक्या आणि उपयुक्त माहितीचं संकलन, जे या मानसशास्त्रीय चाचण्यांमधून केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण- जे या चाचणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि समुपदेशनातून केलं जातं. मानसशास्त्रातली वेगवेगळी साधनं हेच काम करतात. पण या जोडीला एकविसाव्या शतकात एका नव्या गोष्टीने जन्म घेतलाय. आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

द वॉल स्ट्रीट जर्नलचा २०१२ मधला एक लेख मी वाचला होता. त्याचं शीर्षक होतं- तुमचं पुस्तक तुम्हाला वाचतंय!मोबाईल, आय-पॅड किंवा किंडल अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं हातात घेऊन त्यावर ई-पुस्तक वाचणं ही गोष्ट आता भारतात देखील नवीन राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता आपल्या हातात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गंमत अशी आहे की तुम्ही त्या उपकरणातून एखादी सोय-सेवा मिळवत असता तेव्हा ते उपकरणही तुमची माहिती गोळा करत असतं. जेव्हा वाचक एखादं ई-पुस्तक वाचत असतो, तेव्हा ते उपकरणही एक प्रकारे तुम्हाला वाचत असतं. आणि त्यातून तुमच्याविषयीची माहिती मिळवत असतं. पुस्तकाच्या कोणत्या पानावर तुम्ही किती वेळ घालवलात, कुठे तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायची गरज पडली, कुठली पानं तुम्ही न वाचताच पुढे गेलात अशी सगळी माहिती गोळा केली जात असते. या माहितीचं नेमकं विश्लेषण करण्यासाठी क्लिष्ट स्वरुपाची गणिती प्रक्रिया उभारली जाते, म्हणजेच अल्गोरीदम्स बनवले जातात. हे अल्गोरीदम्स अधिकाधिक ताकदवान बनवता येतात जेव्हा विश्लेषण करण्यासाठी विस्तृत माहिती त्यांना मिळू लागते. फेस रेकग्निशन सारख्या गोष्टी या आपल्या हातातल्या मोबाईलवर आल्या आहेत. त्या या पुस्तक वाचण्याच्या उपकरणाबरोबर जोडल्यावर तुमचा चेहरा बघून कोणता मजकूर वाचताना तुम्हाला हसू आलं, कधी वाईट वाटलं अशा गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. अनेक जण आता हातात स्मार्टवॉच किंवा फिटबीट सारखी उपकरणं घालतात. यातून तुमच्या शरीराची इत्थंभूत माहितीही मिळू शकते. हे सगळं समजा, ई-पुस्तकाच्या उपकरणासह, एका यंत्रणेला जोडलं असेल तर पुस्तकाचा कोणता भाग वाचताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढले हेही नोंदवलं जाईल. या यंत्रणेच्या अल्गोरिदमला तुमच्याबद्दलची अधिक माहिती मिळेल. या माहितीचं सविस्तर विश्लेषण करून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात याचे आडाखे बांधले जातात. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही, हे तुमच्या या सगळ्या माहितीच्या विश्लेषणावरून अल्गोरिदमच सांगू शकेल!

हे फक्त ई-पुस्तकाच्या बाबत लागू नाही. सगळीकडेच आहे. मोबाईल आणि इंटरनेट मार्फत या अल्गोरीदम्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टींची सातत्याने नोंद ठेवली जाते. आपल्या आवडी-निवडी, मित्रपरिवार, आपण कुठे जातो फिरतो, सवयी, आनंदाचे क्षण, रागाचे क्षण या सगळ्याची माहिती सातत्याने बघू शकता येईल, तपासता येईल असे अल्गोरिदम तयार करून, त्यातून तुम्ही नेमके कसे आहात याची एक प्रतिमा निर्माण होत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा, जी या सगळ्या माहिती आणि विश्लेषणानंतर तुम्हाला योग्य ते सल्ले देते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट सर्च केली असेल आणि त्यानंतर फेसबुक उघडलं तर त्या सर्च केलेल्या गोष्टीशी निगडीत जाहिराती तुम्हाला दिसू लागतात. ही या अल्गोरिदम्सची कमाल आहे. जसजसं जास्त क्लिष्ट अल्गोरीदम्स आणि सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या क्षमतांपेक्षा अधिक दर्जेदार काम करू लागतात, तसतसं आपण त्यावर अवलंबून राहू लागतो. हे आत्ताही घडतंच आहे. लेखक युवाल नोआह हरारी आपल्या एका भाषणात याविषयी बोलताना गुगल मॅपचं उदाहरण देतो. अपरिचित शहरात गेल्यावर तिथले रस्ते माहित नसताना गुगल मॅपला एखाद्या ठिकाणी जायचं कसं ते आपण विचारतो. आणि त्यानंतर ते अॅप्लिकेशन जे सांगतं ते बिनबोभाट पाळतो. का बरं? कारण आपल्याला विश्वास असतो, की या परिस्थितीत हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षाही अधिक योग्य काहीतरी सांगणार आहे.

नेटफ्लिक्स वरच्या ब्लॅक मिरर नावाच्या भन्नाट मालिकेत एक भाग या विषयावर आहे. त्यातल्या एक अशी व्यवस्था दाखवली आहे, जिथे अल्गोरीदम्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तुमच्यासाठीचा अनुरूप जोडीदार निवडला जातो. अर्थात ती एक काल्पनिक कथा आहे. पण या प्रकारच्या गोष्टी भविष्यात फार लांब नाहीत. आजही तुमच्या फेसबुकवरच्या वावराच्या आधारे, तुमच्या मित्रपरिवाराच्या आधारे तुम्हाला फेसबुक हे काही लोक तुम्हाला माहित असतील(पीपल यू मे नो) असं म्हणत सुचवतं. लग्नासाठी जोडीदार निवडण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स, डेटिंग साईट्स या अशा गोष्टींचा प्राथमिक पातळीवर वापर करू लागल्या देखील आहेत. अर्थातच अधिकाधिक सुधारणा होत त्याही भविष्यात त्यावर विसंबून राहता येईल एवढ्या जास्त विश्वासार्ह बनतील. मानसशास्त्रातल्या साधनांसह, ‘स्व च्या ओळखीसाठी एका नव्या वाटेवर आपला आता प्रवास चालू आहे. नजीकच्या भविष्यात, तुम्हाला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त नीट ओळखणाऱ्या अल्गोरिदमच्या आधारे तुमच्यासाठी अनुरूप जोडीदार कोण असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू लागला तर आश्चर्य वाटायला नको! त्यावेळी आपण गुगल मॅप सारख्या गोष्टीवर आज ठेवतो तसा पूर्ण विश्वास ठेवू का, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे!

(दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment