Thursday, December 22, 2011

सर'कार'नामा...!

चारचाकी गाडी ही गोष्ट प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाते. साहजिकच राजकारण आणि सत्ताकारण यामध्ये गाडीला विशेष महत्व आहे. माझ्या डोक्यात जेव्हा हा विषय पहिल्यांदा आला तेव्हा सगळ्यात आधी मला जुने मराठी सिनेमे आठवले. विशेषतः सामना आणि सिंहासन. दोन्हीमध्ये राजकारण आणि राजकारणी मंडळी. साधारणपणे गावातला पाटील- राजकारणी यांच्याकडे कायम एक जीप. ती जीप म्हणजे एक सत्तेचे केंद्रच. अगदी हिंदी फिल्म्स मध्ये सुद्धा गावच्या ठाकूर कडे कायम एक जीप. ज्याच्या ड्रायव्हर किंवा त्या शेजारच्या सीट वर बसून ते आपली सत्ता गाजवणार...! सिंहासन मध्ये गावातल्या आमदाराकडे जीप आणि शहरात मात्र गाड्यांमध्ये विविधता हे अगदी व्यवस्थित दाखवलं आहे. 
मध्यंतरी निवडणुका राजकारण वगैरे विषयांवर एका मित्राशी गप्पा सुरु झाल्या. तो मित्र मुळातला कलाकार, त्याचा राजकारण वगैरेशी फार संबंध नाही. आवर्जून मतदान करायला मात्र जातो तो. बोलता बोलता तो एकदम उसळून म्हणला," जे लोक रस्त्यात बोलेरो गाडी उभी करतात आणि ट्राफिक जाम करतात त्यांना गां*वर वेताच्या छडीने फटके दिले पाहिजेत..."
किती प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती ही...! 
पूर्वी लाल दिव्याची गाडी, किंवा भारत सरकार, महाराष्ट्र शासन वगैरे लिहिलेली गाडी (बहुतेक वेळा Ambassador) दिसली तर त्याला मान दिला जात असे. तो मान आम्हालाही मिळाला पाहिजे, या भावनेतूनच कदाचित गाडीवर पक्षाचा/ संघटनेचा किंवा तत्सम स्टीकर लावणे ही गोष्ट सुरु झाली असावी. शिवसेनेचा वाघ, मनसेचा झेंडा, राष्ट्रवादीचे घड्याळ, काँग्रेसचा हात यांचे स्टीकर आजकाल गाड्यांवर सर्रास बघायला मिळतात. वास्तविक पाहता नंबरप्लेटवर स्टीकर किंवा चित्र असण्यावर कायद्याने बंदी आहे. तसे असल्यास रु १००/- एवढा दंडही आहे. पण तरीही आमचे नेते बिनधास्तपणे नंबरप्लेटवर आपले चिन्ह चिकटवतात.. बिचारे ट्राफिक हवालदार! अशा गाड्यांवर कारवाई करावी तर पंचाईतच.. चुकून एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय पडला तर काय घ्या..! त्यामुळे या गाड्या रस्त्याच्या मध्यात कोणाचीच तमा न बाळगता उभ्या केल्या जातात. अनेकदा यातून दाढी वाढलेली अवाढव्य देह असलेली आणि चेहऱ्यावर प्रचंड गुर्मी असणारी गुंड दिसणारी (असतीलच असं नाही !) माणसं उतरतात. मग काय बिशाद कोणा पुणेकराची की तो त्यांना इथे गाडी लावू नका म्हणून सुनावेल?! ट्राफिक जाम झाल्यावर लोक या मंडळींना शिव्या देत पुढे जातात पण निवडणुकीच्या वेळी मात्र या सगळ्या गोष्टी विसरून मतदान करतात किंवा करतंच नाहीत...! (पुणेकरांना स्मृतिभ्रंश झाला आहे... त्यामुळे कलमाडी पुण्याचा खासदार आहे यात काहीच आश्चर्य नाही...!!) पण चिंता नसावी राजकीय पक्ष अशा प्रकारे रस्त्यात आपली अवाढव्य गाडी उभी करून ट्राफिक निर्माण करतात आणि पुणेकरांना भविष्यात वाढणाऱ्या प्रचंड ट्राफिक चे आत्तापासूनच ट्रेनिंग देतात. या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर पुण्याच्या छोट्या रस्त्यांवर कितीही ट्राफिक वाढला तरी पुणेकर आत्मविश्वासाने तोंड देतील याबद्दल मला जराही संदेह नाही..!  
मनसेने या सगळ्या बाबतीत बऱ्यापैकी बाजी मारली आहे. पूर्वी शिवसेना आघाडीवर होती. राष्ट्रवादी बऱ्यापैकी आहे. काँग्रेस तुरळक आणि भाजप अगदी कमी (किमान या बाबतीत तरी पार्टी विथ डिफरन्स असं त्यांना म्हणता येतं!). कार वर असणारे स्टिकर्स आहेतच पण मनसेने दुचाकी पण सोडल्या नाहीत. दुचाकी च्या नंबरप्लेटवर मनसेचा झेंडा असणं ही गोष्ट नवीन राहिली नाहीये... साहजिकच अशी बाईक कोणी चालवत असेल तर आजूबाजूचे मध्यमवर्गीय पांढरपेशा लोक गाडी हळू आणि जपूनच चालवतात. एकूणच यामुळे वाहतूक सुरळीत राहायला मदत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे असे समाजकार्य करणाऱ्या या मंडळींना शिव्या देणे आपण थांबवावे असे विनम्र आवाहन... 
या सामाजिक कार्यात राजकीय पक्षच आघाडीवर असले तरी इतर सामाजिक संस्था आणि स्वघोषित जातीय पुढारी यांचा वाटा नक्कीच मोठा आहे. "राजे", "राजे, पुन्हा जन्माला या", "मी मराठा", "मी मराठी", "ब्रिगेड", "पतित पावन" अशा स्टिकर्सनी गाड्या अप्रतिम रंगवलेल्या असतात. एकूणच आपल्या जीवनान्त्ला एकसुरीपणा दूर करण्याचे श्रेय या मंडळींना जाते. 
सध्याच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीत, झगमगत असलेल्या मॉल वाल्या दुनियेत साहजिकच स्वातंत्र्य आणि मुक्त वावर वाढला आहे. परंतु हे सगळं तात्पुरतं आहे याची जाणीव याच संघटना पक्ष करून देत असतात. कितीही सुंदर काचेची दुकानं तुम्ही बांधलीत तरी "बंद" च्या दिवशी ती उघडी ठेवण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही.. इतकेच नव्हे तर valentine day वगैरे ला मुक्तपणे फिरावं म्हणणाऱ्या मंडळींना चोप मिळेल असा संदेश या संस्था देतात... या सगळ्याची आठवण सातत्याने या कार वरच्या स्टिकर्स मधून तुम्हाला-आम्हाला या संस्था सातत्याने करून देत असतात. साहजिकच "उगीचच भयमुक्त राहू नका... आम्ही आहोत" असा संदेश या स्टिकर्स च्या माध्यमातून समाजाला दिला जातो...!
वास्तवाची जाणीव करून देण्याचे फार मोठे काम या स्टिकर्स असलेल्या दुचाक्या आणि गाड्या करत असतात. प्रत्येक गोष्टीकडे स'कारा'त्मक दृष्ट्या बघितले पाहिजे. 
आपली गाडी नो पार्किंग मध्ये उभी असल्यावर ती उचलून नेली जाते. शिवाय दंड भरावा लागतो किंवा तो टाळण्यासाठी पोलिसाचे खिसे गरम करावे लागतात आणि भ्रष्टाचार वाढतो. त्यामुळे माझे समस्त पुणेकरांना आवाहन की त्यांनी लवकरात लवकर स्टीकर पद्धतीचा अवलंब करावा. आपण मत कोणालाही देत असाल किंवा नसाल, नंबर प्लेटवर कोणत्यातरी पक्षाचे चिन्ह असणे फार गरजेचे आहे. शिवाय गाडीच्या काचेवर राजे/शिवराय/आम्ही कोल्हापूरचे/ छत्रपती/ नडेल त्याला तोडेल/ छावा/ सरकार राज/जय महाराष्ट्र वगैरे वगैरेचे स्टिकर्स लावून घ्यावेत. किंवा फारशी चिंता न करता स्थानिक आमदाराचे नाव फोटोचा स्टीकर करून तो लावावा. यामुळे आपली गाडी कुठेही असली तरी उचलली जाणार नाही. थोडक्यात भ्रष्टाचाराची पाळी येणार नाही. आणि एकूणच भ्रष्टाचार कमी होईल. उपोषण वगैरे मार्गांपेक्षा भ्रष्टाचार निर्मुलनासाठी स्टीकरचा मार्ग सोपा आहे हेच मी यातून सिद्ध करत आहे..! 
माझा हा लेख वाचून जास्तीत जास्त लोकांनी स्टिकर्स लावले तर, लोकपालचे जसे 'जन'लोकपाल झाले.. तसेच या लेखाचे नाव मी सर'कार'नामा वरून जन'कार'नामा असे ठेवीन असे मी जाहीर आश्वासन देतो..! 
बाकी तुम्ही सुज्ञ आहात... आवश्यक तो संदेश घ्यावा...!! 

Saturday, November 19, 2011

दिवाळी फराळ...

मच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. त्यामुळे दिवाळी फराळ हा प्रकार जोरदार असतो..! त्यातही आजीकडे एक दिवस फराळ कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी फराळ हा एकदम जिव्हाळ्याचा विषय... पण चकली-लाडू यापलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रकारच्या फराळाची आमच्याकडे पद्धत आहे... अगदी वर्षानुवर्षे चालू असा वैचारिक फराळ...! 

आमच्याकडे दर वर्षी दिवाळी अंकांची मेजवानीच असते... दिवाळी अंक बाजारात आले की कपड्यांच्या दुकानात सेल लागल्यावर बायकांची जी अवस्था होते तीच माझी होते.. 
लहानपणी शाळेत असताना मी मला जे दिवाळी अंक हवे असायचे (उदा. छात्र प्रबोधन, किशोर, ठकठक, कुमार इ.) ते मी 'कमवायचो'..! 
शाळेला दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत सगळेच दिवाळी अंक बाजारात यायचे. त्याची किमतीसह यादी बाबा आणून ठेवायचे. आणि मी घरोघर फिरून दिवाळी अंकांची ऑर्डर घ्यायचो. सुरुवात अर्थातच नातेवाईक-मित्र अशी व्हायची. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळाल्या की मग आईच्या मैत्रिणी, त्यांच्या सोसायट्या, मग दिसेल त्या बिल्डींग मध्ये घुसून सेल्समनगिरी करायचो. सहावी सातवीतला मुलगा घरपोच दिवाळी अंक विक्री करतोय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. माझा मित्र सोहम हा ज्ञान प्रबोधिनीत होता. त्यांना त्यांच्या शाळेने फटाके विक्री करायला सांगितलेली असे. त्यामुळे एक दोन वर्ष आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. फटाके आणि दिवाळी अंक, घरपोच विक्री! दोघांच्याही हातात आपापल्या याद्या आणि एक ऑर्डर घ्यायची वही. 
ऑर्डर्स घेतल्या की मग अप्पा बळवंत चौकात जायचे, तिथल्या 'संदेश एजन्सी' मधून सगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि मग सगळ्या घरांमध्ये ते पोचते करायचे हा उद्योग दिवाळीचे आधी २ दिवस चालायचा... 'संदेश' मधून मला सवलतीच्या दरात अंक मिळायचे. प्रत्येक अंकामागे २०% सुटायचे. मग हे पैसे वापरून मी माझी दिवाळी अंकांची खरेदी करायचो...! जास्तीत जास्त दिवाळी अंक खरेदी करता यावेत म्हणून मी अक्षरशः दिवसभर ऑर्डर्स घेत भटकायचो. सतत हिशोब करून किती ऑर्डर्स अजून घ्यायला लागतील ते बघायचो. पण एकदा का माझे दिवाळी अंक हातात आले की मग पुढची सुट्टी जी जायची त्याला तोड नाही...!!! दिवसभर तंगड्या पसरून वाचत पडायचे...!!! तेव्हा लागलेली ही सवय आता आयुष्यात कधी सुटेल असं वाटत नाही... 
नेहमीप्रमाणेच याही वर्षी भरपूर दिवाळी फराळ झाला...! अंतर्नाद, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अनुभव, साप्ताहिक सकाळ, जत्रा, माहेर, मानिनी, प्रपंच, आवाज, अनुवाद, चिन्ह अशा एकसे एक अंकांनी यावेळची दिवाळी भन्नाट गेली...!
त्यातले काही खास लेख प्रत्येकाने वाचावेत असेच आहेत. साप्ताहिक सकाळ मध्ये असलेला पुण्याच्या नदीवरचा लेख तुफान आहे. अतिशय अभ्यासपूर्ण...! पुण्यातली नदी, नदीचे प्रदूषण आणि सरकारची भूमिका अशा विविध गोष्टी या लेखात आहेत. 
महाराष्ट्र टाईम्स तर विलक्षण आहे... गेल्या ५० वर्षातले मटा मध्ये छापून आलेले उत्तमोत्तम लेख एकत्र करून छापले आहेत. गोविंदराव तळवलकरांच्या चीन हल्ल्यावारच्या एखाने या अंकाची सुरुवात होते... मग पु. ल., तेंडूलकर, हृदयनाथ मंगेशकर, इरावती कर्वे, आर के लक्ष्मण, नरहर कुरुंदकर, गदिमा, सुहास पळशीकर, कुमार केतकर, कुसुमाग्रज, सुनीताबाई देशपांडे, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गजांचे लेख एकाच अंकात मिळणे ही फारच मोठी मेजवानी होती...! यापैकी पुलंनी लिहिलेला बालगंधर्व यांच्यावरचा लेख, गदिमांचा आचार्य अत्रेंवरचा लेख, विजय तेंडूलकर, नारळीकर आणि नानाचा लेख तर फारच सुंदर. गोविंद तळवलकर यांचे सर्वच लेख अफाट..! महाराष्ट्र टाईम्स चा अंक हा नुसता वाचायचा अंक नसून संग्रही ठेवायचा अंक आहे. 
इतरही सगळ्याच दिवाळी अंकात खजिनाच आहे. अक्षर मधला मटा च्या ५० वर्षातल्या ३ प्रमुख संपादकांवर लिहिलेला प्रकाश अकोलकरांचा लेख, किंवा अक्षर मधला सोशल मिडिया वरचा स्वतंत्र विभाग, प्रपंच मधला "जगण्यावर शतदा प्रेम करावे" या विभागातले आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे लेख, अंतर्नाद मधले लेख, चिन्ह मधले नाडकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांचे लेख, माहेर मधला डॉ अभय बंग यांच्या मुलाचा लेख, लोकसत्ता मधला गिरीश कुबेर यांचा लेख हे सर्वच फार वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे. 

लोकांनी दिवाळी अंकाचे वाचन केले तरी दिवाळीच्या महिन्याभरात लोकांची प्रगल्भता कित्येक पटींनी वाढेल. दिवाळीच्या निमित्ताने विचारवंत, तज्ञ, पत्रकार, जाणकार लोक आपण होऊन माहितीचा, विचारांचा खजिना उघड करत असतात. तो भरभरून घेणे आणि स्वतःला प्रगल्भ करणे आपल्याच हातात आहे. 
वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कालच एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. बोलता बोलता तो म्हणाला ते एकदम पटलं. तो म्हणाला, आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात. एक फोटो कोणीतरी 'शेअर' करतो त्यावर कोणाचीतरी बदनामी असते. आणि कसलीही शहानिशा न करता असंख्य लोक त्याचा प्रसार करतात. आणि बेधुंदपणे या गोष्टी पसरतात लोक त्यावर विश्वासही ठेवतात. हे सगळं मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे. सर्वांगाने विचार करून, माहिती घेऊन, खोलवर वाचन केले गेले पाहिजे. समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. 

Tuesday, November 1, 2011

चारित्र्य, कर्तृत्व वगैरे वगैरे...


मागे एकदा एक अप्रतिम ई मेल वाचला होता:
पुढील पैकी कोणता मनुष्य तुम्हाला नेता म्हणून आवडेल?
१) हा माणूस रोज दारू, प्रचंड सिगारेट. रात्र रात्र जागरणं तर रोजचीच.
२) हा माणूस दारू पितो शिवाय अनेक बायकांशी याची लफडी असल्याची सातत्याने चर्चा. शिवाय सत्ता जाऊ नये यासाठी धडपड.
३) हा माणूस कधीच दारू पीत नाही. सिगारेटला तर शिवतही नाही. एकच प्रेयसी, जिच्याशी लग्न. 

सर विन्स्टन चर्चिल  
यापैकी पहिली व्यक्ती आहे ग्रेट ब्रिटीश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, दुसऱ्याचे नाव आहे महान अमेरिकन अध्यक्ष फ्रांक्लीन डी रूझवेल्ट आणि तिसऱ्याचे नाव आहे एक भयानक हुकुमशहा अडोल्फ हिटलर!! 

किती लवकर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवून टाकतो ना?? विशेषतः व्यसन आणि लैंगिक चारित्र्य या बाबतीत तर भारतीय लोक ताबडतोब आपले मत बनवून टाकतात. त्यातही राजकारणाच्या बाबतीत एकदम हळवे होतात. सिनेमातल्या नट्या आणि नट यांची कितीही लफडी वगैरे असली तरी त्याविषयी फारसे वाईट कधीच वाटत नाही उलट त्या बातम्यांमध्ये जरा जास्तच रस असतो. पण एखाद्या राजकीय व्यक्तीचे कोणाशीही संबंध असतील तर मात्र आपल्या डोक्यातून ती व्यक्ती पार बादच होऊन जाते. अर्थात अमिताभ बच्चन चे अनेक नट्यांबरोबर संबंध होते (अशी चर्चा तरी होती, खरेखोटे अमिताभ, रेखा, जया यांनाच ठाऊक) तरीही निवडणुकीच्या रिंगणात त्याला मात्र या तराजूवर तोलले गेले नाही...! 
मस्तानी
सध्या फेसबुक वर राहुल गांधी च्या कोलंबियन मैत्रिणी वरून जोरदार चर्चा वगैरे चालू आहेत. किंवा उठ सूट नेहरूंच्या आणि लेडी माउंटबैटन यांच्या संबंधावरून टीका होत असते. असल्या भंपक भपकेबाज प्रचाराला आपले लोक बळी पडतात हे आपले खरोखरच दुर्दैव आहे. राहुल गांधी किंवा नेहरूंवर टीका करायची तर त्यांच्या कार्यावर करा, विचारधारेवर करा. या दोघांच्या किंवा इतर कोणाच्याही बाजूने बोलायचा माझा उद्देश नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की कोणाचेही काही का संबंध असेनात कोणाशीही, त्याने त्याच्या कर्तृत्वावर फरक पडत नाही ना हे महत्वाचे. त्यामुळे मूल्यमापन करायचे तर कर्तृत्वाचे करा, विचारांचे करा... त्यांचे लैंगिक चारित्र्य वगैरे कसे होते असल्या भंपक आणि फुटकळ गोष्टींचा बाऊ करणे थांबायला हवे. पण आपल्या इथल्या परंपरावादी बिनडोक लोकांना याबाबत अक्कल नाही आणि हे समजून घेण्याची प्रगल्भताही नाही.
आमच्या पुराणात-इतिहासात द्रौपदी पाच पांडवांची बायको होती. शिवाय प्रत्येक पांडवाच्या स्वतंत्र बायकाही होत्या. विवाहबाह्य संबंध होते, विवाह पूर्व संबंध होते. अर्जुनाने द्रौपदी असताना कृष्णाच्या बहिणीचे हरण केले म्हणून कोणी त्याच्या  कर्तृत्वावर आक्षेप घेत नाही. किंवा पाच पती असूनही द्रौपदीच्या धैर्याची आणि महानतेची स्तुतीच ऐकायला मिळते. कोणी शिवाजीचे मूल्यमापन शिवाजीच्या आठ पत्नी होत्या या गोष्टीवरून करू लागले तर त्या व्यक्तीला आपण वेड्यातच काढू...! मस्तानी होती म्हणून बाजीरावाचे शौर्य कमी होत नाही.

एखाद्या व्यक्तीची भरपूर लफडी असतील पण ती प्रचंड काम करणारी असेल, भ्रष्टाचार वगैरे दृष्टीने स्वच्छ असेल तरी आपल्या इथे एखादा एकपत्नीवाला भ्रष्ट गुंड मनुष्य विक्रमी मताधिक्क्याने निवडून येईल. असले बुरसटलेले मतदार असतील तर या देशात राजकीय प्रगती कधी होणारच नाही. विचार करण्याची पद्धती बदलल्याशिवाय राजकीय परिवर्तन टिकाऊ होणार नाही. अर्थात हे फक्त आपल्या इथे आहे अशातला भाग नाही. अमेरिकेतही एखाद्या राजकीय व्यक्तीचे विवाह बाह्य वगैरे संबंध असणे तिथल्या लोकांना पचत नाही. पण फ्रान्स चे उदाहरण आवर्जून द्यावे वाटते. फ्रान्सच्या अध्यक्षांनी सार्कोझी यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेऊन इटालियन गायिका असलेल्या कार्ला ब्रुनी या आपल्या प्रेयसीबरोबर विवाह केला. तिथल्या मिडीयाने या गोष्टीवर भरपूर टीका टिप्पणी केली. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दाच बनवला. देशाचा अध्यक्ष असे कृत्य करूच कसे शकतो असे म्हणत सार्कोझी यांच्यावर तोफ डागली. पण फ्रेंच जनता तिथल्या राजकारण्यांपेक्षा प्रगल्भ निघाली. त्यांनी विरोधी पक्षीयांना मुळीच भिक घातली नाही. आपल्याकडे हे होऊ शकते? 
सार्कोझी आणि कार्ला ब्रुनी
मुळात विवाह, लैंगिक संबंध वगैरे गोष्टी एखाद्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्याबाबत इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही हे आपल्या लोकांना कळतच नाही. याचा अर्थ या सगळ्यावर कोणी टीका करूच नये असा माझा बिलकुल आग्रह नाही. ते स्वातंत्र्य नसेल तर लोकशाहीला काय अर्थ? फक्त टीका करायची तर तेवढ्या मुद्द्यापुरती करा. त्याचा संबंध उगीचच कुठेतरी जोडत बसायची गरज नसते. राहुल गांधीला कोलंबियन मैत्रीण आहे, किंवा प्रमोद महाजन यांची अनेक लफडी होती अशी चर्चा असते हि बाब मला पटत नाही किंवा आवडत नाही असे कोणाला म्हणायचे असेल तर त्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. आणि कोणाचाही असूही नये. पण कोणी जर म्हणायला लागले की राहुल गांधी राजकीय नेता म्हणून भुक्कड आहे कारण त्याला कोलंबियन मैत्रीण आहे तर माझा आक्षेप आहे. कारण या वाक्यात ना प्रगल्भता दिसते ना बौद्धिक कुवत दिसते. 

एखाद्याची गर्लफ्रेंड आहे यात "लो मोराल्स" (Low morals) कसे काय झाले??? त्याच्या भावना, त्याचे प्रेम हे कोणावर असावे, कोणावर नसावे, कितीवेळा असावे, किती जणींवर/ जणांवर असावे याचा आणि इतरांचा काय संबंध?? यामध्ये लो मोराल्स म्हणजे कमी दर्जाची तत्वे काय आहेत?? ज्यामध्ये दोन्ही बाजूंची परस्पर संमती आहे, अशा कोणत्याही (लैंगिक, भावनिक, बौद्धिक, अध्यात्मिक इ.) प्रकारच्या नात्याला आक्षेप घेणारे इतर लोक कोण?? ती गोष्ट आवडली नाही असे असू शकते. पण त्याचा आणि राजकीय मुल्यमापनाचा काय संबंध? शिवाय काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलीने इतर मुलांशी बोलणे या गोष्टीलाही लो मोराल्स चे काम म्हणले जायचे. पुढे काळ बदलला. नंतर मुलामुलींमध्ये स्पर्श होण्याला समाजात आक्षेप असायचा. पण आजकाल सहज मिठी मारणं ही काय फार मोठीशी गोष्ट राहिली नाहीये. एकूणच काय तर आपण हळू हळू प्रगल्भ होतोय. या गोष्टी नगण्य आहेत हे समजून घेतोय. त्यामुळे लो मोराल्स वगैरे गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. तारतम्याने त्या बदलल्या जातात, बदलायच्या असतात नाहीतर आपल्यात आणि श्री राम सेने सारख्या भुक्कड लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. "माझ्या राजकीय नेत्याने कसे जगावे याचा आदर्श घालून द्यावा" अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर मला त्याच्या बुद्धीची कीव करावी वाटेल. राजकीय नेत्याचे काम आहे राजकीय नेतृत्व करणे. लैंगिक नैतिकतेचे आदर्श घालून देणे हे राजकीय नेत्याचे कामच नाही. 

कोणतीही गोष्ट Black किंवा white असू शकत नाही. What about Grey shades? माणूस जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्याला असंख्य पैलू असतात. जे पैलू अनेकदा इतरांच्या समजुतीच्या कुवतीबाहेर असतात. दूरवरून एखादी गोष्ट judge करणे तितकेसे योग्य होत नाही ते त्यामुळे! एखाद्याचे असतील विवाहबाह्य संबंध किंवा एखाद्याच्या असतील एका मागोमाग एक १० गर्लफ्रेंड्स... यामध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे कोण चूक कोण बरोबर याबाबत शंभर टक्के माहिती आपल्याला असू शकत नाही आणि असण्याची गरजही नाही. त्यामुळे कोणावरही वर वर पाहून ठप्पा मारण्याची चूक आपण करू नये. आणि हो सामाजिक नैतिकतेला मान द्यावा लागतो म्हणून तर आपल्या नेत्यांचे कोणाशीही कसेही संबंध असले तरी ते गुप्त ठेवावे लागतात. म्हणूनच सगळ्या बाबतीत दांभिकता आणि अप्रामाणिकपणा दिसून येतो. मी इथे लोकांवरच टीका करतो आहे जे आपल्या नैतिकतेच्या कालबाह्य संकल्पना सोडायला तयार नाहीत. शिवाय नैतिकतेचा आदर्श घालून घ्यावा ही झाली 'आदर्शवादी' संकल्पना. पण प्रत्यक्षात तसे नसेल तरी बिघडले नाही पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही कामावर घेत असाल तर त्याची काम करायची क्षमता बघता की त्याची किती लफडी होती/आहेत हे बघता? CV मध्ये आजपर्यंतच्या गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड्सची संख्या लिहितात का??? मग आपला सेवक (By the way, लोकप्रतिनिधी आपला सेवक असतो बर का!) निवडताना निवडणुकीतच आपण असल्या भुक्कड आणि उथळ विचारांच्या आहारी का जातो? 
एकूणच लैंगिक चारित्र्य आणि कर्तृत्व याचा काडीमात्र संबंध नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना केवळ प्रचारी आणि भंपक गोष्टींना एवढे महत्व का देतो? 
सुशिक्षित झालो तरी सुसंस्कृत आणि प्रगल्भ कधी होणार?? काहींना वाटेल लैंगिक चारित्र्य जर योग्य नसेल तर कसली आली आहे सुसंस्कृतता... पण सुसंस्कृतता लैंगिक चारित्र्यात नसून माणसाला माणसासारखे वागवणे, समोरच्याला आवश्यक स्वातंत्र्य देणे आणि त्याच्या स्वातंत्र्याचा, वैयक्तिक 'स्पेस'चा आदर करणे यामध्ये असते.

Friday, September 16, 2011

मी लोकपाल


अण्णांचे आंदोलन सुरु झाले १६ ऑगस्टला. त्याला आज एक महिना झाला. जन लोकपाल-लोकपाल- भ्रष्टाचार याविषयी गेल्या महिन्याभरात हजारो काय लाखो पाने लिहिली गेली... २४ तास काही लाख-कोटी मंडळींनी याविषयी बडबड केली. अण्णा हजारेंना एक 'मसीहा' च्या रुपात बघितलं गेलं आणि तिथेच सगळी गडबड झाली. अण्णा हजारे आले म्हणजे भ्रष्टाचार संपला अशा भाबड्या समजुतीत आपली मंडळी मश्गुल होऊन गेली. याउलट असंख्य बुद्धीवादी मंडळी या भाबड्या विश्वासावर टीका करत बसले. पण प्रत्यक्ष भ्रष्टाचार किंवा प्रशासनातील गैरकारभार रोखण्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवे याचा योग्य आणि व्यापक विचार फारच थोड्या लोकांनी केला. उपोषण योग्य की अयोग्य. हा जनतेचा विजय आहे की नाही असल्या भुक्कड आणि खरेतर वरवरच्या प्रश्नांवर सातत्याने या बुद्धिवादी मंडळींनी कोरडी चर्चा केली. आंधळ्या अण्णा समर्थकांप्रमाणेच हे बुद्धिवादी म्हणवून घेणारे निर्बुद्ध लोकही आज निर्माण झालेल्या सामान्य लोकांच्या निष्क्रिय मानसिकतेला जबाबदार आहेत. 
अण्णांनी तरुणांना आंदोलन करा असे सांगितले. पण आंदोलन म्हणजे काय करा याचा कोणताही ठोस कार्यक्रम देण्यात आला नाही. गांधींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला असंख्य पैलू होते. काही ठोस कार्यक्रम गांधींनी दिले होते. स्वदेशी, दारूबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, स्वावलंबन, परदेशी मालावर बहिष्कार, सरकारी कामकाजावर बहिष्कार, संप, बंद असे असंख्य कार्यक्रम गांधींनी लोकांपुढे ठेवले होते. त्यामुळेच लोक इतक्या प्रचंड संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहज सामील होऊ शकले. आणि स्वातंत्र्य संग्रामात सातत्य राहिले. दुसरे गांधी म्हणून माध्यमांकडून आणि आंदोलन कार्त्यांकडून गौरवले गेलेल्या अण्णांनी लोकांसमोर कोणताच ठोस कार्यक्रम ठेवला नाही. त्यामुळे ही चळवळ हळू हळू थंडावत चालली आहे. जागरूक होऊनही लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यग्र होऊ लागले आहेत. सिग्नल तोडू लागलेत. कामे करून घेण्यासाठी पैसे चारू लागलेत. परिवर्तन आणायचे तर फक्त हातात मेणबत्ती घेऊन काही होत नाही तर त्याबरोबरच स्वताहून अनेक दिवस-महिने-वर्ष सातत्याने प्रयत्न करावे लागतात याची जाणीव टीम अण्णांनी आंदोलन कर्त्यांना करून द्यायला हवी होती. शिवाय अण्णांनी उपोषण सोडल्यावर जो विजयाचा उन्माद आपण सगळ्यांनीच सगळ्या देशभर पाहिला तो आक्षेपार्हच नव्हे तर भयावह होता. हाती काहीच लागलेले नसताना लोक स्वतःवर खुश होत, अण्णांवर जबाबदारी टाकून मोकळे झाले आणि घरी जाऊन झोपले...!
अण्णांच्या निमित्ताने जी जागृती या देशात, विशेषतः सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीयांमध्ये झाली आहे त्याला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य करायची गरज आहे. दिल्लीत जन लोकपाल आवश्यक आहेच आणि त्यासाठी लोक रस्त्यावर उतरले ही उत्तमच गोष्ट आहे. पण दिल्लीत जन लोकपाल आला तरी गल्लीतला भ्रष्टाचार तुम्हाला आम्हालाच थांबवावा लागेल याची स्पष्ट जाणीव आज लोकांना करून देण्याची गरज आहे. परिवर्तन खालून वरती होते. वरून खाली नाही. त्यामुळे या निमित्ताने जागरूक झालेल्या लोकांनी किमान आपल्या भागाची तरी जबाबदारी घ्यायला हवी. माझ्या भागात मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही- असा निश्चय आपल्यातल्या प्रत्येकाने करायला हवा. "मी लोकपाल" अशी आपली यापुढच्या काळात घोषणा असली पाहिजे. आणि अशा लोकपाल मंडळींचा एका भागातला गट म्हणजे लोकपाल गट....!!! असे लोकपाल गट शेकडोंच्या संख्येने शहरभर सुरु व्हायला हवेत. सरकारी जमा खर्चावर नजर ठेवणे, होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे, निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला काम करायला लावणे अशा विविध मार्गांनी लोकपाल गट स्थानिक पातळीवरचे प्रशासन सुधारू शकतात. एकदा स्थानिक पातळीवर बदल घडायला सुरुवात झाली की तो बदल हळू हळू वर जायला लागेल. स्थानिक पातळीवरचे खालच्या स्तरातली नोकरशाही आणि राजकारणी मंडळी हाच तर वरच्या भ्रष्टाचाराचा पाया असतो. म्हणूनच पायापासून सुरुवात! 
हजारो मुंग्या प्रचंड ताकदवान अशा हत्तीला जेरीला अनु शकतात ही साधी गोष्ट या लोकपाल गटाच्या कल्पनेमागे आहे...! जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येऊन भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने कृती करत नाही तोवर असले पन्नास अण्णा सुद्धा भ्रष्टाचार संपवू शकत नाहीत. म्हणूनच लोकपाल गटांची आवश्यकता आहे. मी लोकपाल बनून माझ्या भागात एकही गैरप्रकार होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. तरच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होईल. 
Updates (Date: 18th Sept 2011): कालच संभाजी बाग इथे लोकपाल गट सुरु करण्याविषयी प्राथमिक बैठक झाली. शहराच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० लोक या बैठकीला हजार होते. अगदी खराडी पासून कोथरूड पर्यंत आणि कात्रज पासून पिंपरी चिंचवड पर्यंत च्या भागातून लोक आले होते. घोले रोड, कोथरूड, वारजे कर्वेनगर आणि सहकारनगर या पुणे महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक अशा पाच लोकपाल गटांची सुरुवात काळ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे इतर क्षेत्रीय कार्यालये अगदी प्रत्येक वॉर्ड मध्ये लोकपाल गट स्थापन करण्यात यायला हवेत. फेब्रुवारी २०१२ पासून पुण्यात १५२ आणि पिंपरी चिंचवड मध्ये १२४ नगरसेवक असणार आहेत. तेवढे लोकपाल गट खरेतर असायला हवेत..!! अशा स्थानिक पातळीवर लोकपाल गट कार्यरत झाले आणि त्यांचे मजबूत जाळे तयार झाले तर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात भ्रष्टाचार तर कमी होईलच पण खरीखुरी प्रगल्भ लोकशाही नक्कीच येऊ शकेल...!
विशेष नोंद घ्यावी:- ज्यांना खरोखरच भ्रष्टाचार संपावा असे वाटते त्यांनीच सहभागी व्हावे. हा "कार्यक्रम" नाही. मेणबत्त्या वगैरे पेटवून घरी जाण्याचा सोपा मार्ग इथे नाही. ही एक गंभीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी कृती कशी करावी याविषयी चर्चा केली जाईल आणि त्या दिशेने 'कृती' करण्यासाठी लोकपाल गट तयार असतील

Tuesday, August 30, 2011

गैरसमजुतीच्या भोवऱ्यात...


अण्णांच्या निमित्ताने, देशभर चर्चा वादविवाद मोर्चे, आंदोलने, आरोप प्रत्यारोप यांचा पाऊस पडला. एकूणच फारसा मतदानाला कधी बाहेर न पडलेला, भ्रष्टाचाराला भरपूर हातभार लावलेला- पण मनातून भ्रष्टाचार नकोसा असलेला, एकूणच प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष बाळगणारा पण स्वतः काहीही करण्याची इच्छा असूनही धमक नसणारा असा मध्यमवर्ग अण्णांना पाठींबा द्यायला मोठ्या संख्येने रस्त्यावर आला. अण्णा म्हणतील तसे झाले तर कदाचित सर्व भ्रष्टाचार नष्ट होईल, देशातून सोन्याचा धूर निघू शकेल अशी भाबडी आशा बाळगणारा हा वर्ग (काही जणांना तर १ रुपयाला ४० डॉलर अशी आपली अर्थव्यवस्था झाली असेल अशी स्वप्नेही पडू लागली!). अर्थात या सगळ्यामध्ये असलेला लोकांचा सहभाग आणि सहभागामागे असलेली भावना ही शंभर टक्के प्रामाणिक होती याबद्दल मला जराही शंका नाही. अनेक लोक काहीतरी बदल घडतोय आणि आपण त्याचा भाग असला पाहिजे अशा भावनेनेही आले होते. 
अगदी पहिल्यापासून, एप्रिल मधल्या अण्णांच्या उपोषणापासूनच लोक राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या नावे बोंब मारत होते. प्रत्येक वेळी मोर्चा, सभा वगैरे साठी येणाऱ्या लोकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल पराकोटीचा तिरस्कार दिसून येत होता. आपले राज्यकर्ते हे एकजात चोर आहेत आणि सगळ्यांना शनिवारवाड्यावर फाशी दिले पाहिजे असे म्हणणारेही असंख्य लोक मला या सगळ्या कालावधीत भेटले. लोकशाही मध्ये लोकच आपल्या राज्यकर्त्यांबद्दल असे म्हणताना पाहून मी चकित झालो. नाराज झालो. दुखावलो गेलो. 

फेसबुकवर आपल्या प्रोफाईल वर पॉलीटीकल व्ह्यूज या कॉलम मध्ये 'नॉट पॉलीटीकल' असे अभिमानाने लिहिणारे असंख्य लोक असतात. त्याचा या मंडळींना अभिमानही असतो. (यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे. संसदेपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र महिलांना ५०% आरक्षण दिलेलं असताना एका बाजूला ही अवस्था!) अनेकदा आमच्या परिवर्तन संस्थेसंदर्भात असंख्य लोकांना भेटायची वेळ येते. परिवर्तन ही एक राजकीय संघटना आहे असे सांगितल्यावर लोक बिचकतात. 'म्हणजे कोणत्या पार्टीचे तुम्ही' असे संशयानेच विचारतात. 'निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नव्हे, लोकांचे हक्क अधिकार याविषयी आम्ही काम करतो जे राजकीयच आहे' अशा आशयाचे ५ मिनिटांचे स्पष्टीकरण दिल्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास बसतो. हे झालं सामान्य लोकांचं. ते एकवेळ ठीक आहे. पण आम्ही राजकीय नाही असे सामाजिक संस्थांचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझं डोकंच फिरतं. स्वतःला जागरूक म्हणवणारा हा गट असून राजकीय नाही असे अभिमानाने सांगणे या सारखा महामुर्खपणा कोणत्याही लोकशाही देशात दिसणार नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत उभारलेली राज्यकर्ती संस्था. जर संपूर्ण यंत्रणाच लोकांची असेल तर खुद्द लोकच अ-राजकीय कसे असू शकतात??? लोकशाहीमध्ये मानो या न मानो, आपण राजकारणाशी जोडलो गेलेलो असतोच. सकाळी चहातली साखर आणि वर्तमानपत्र इथूनच राजकारणाच्या प्रभावाची सुरुवात होते. आणि हा प्रभाव कायम सुरूच असतो. मनोरंजनापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत. सर्वत्र राजकारण आहेच आणि असणारच कारण ही लोकशाही आहे. 'मी राजकीय आहे' असे ज्या दिवशी आपण आणि आपल्यातले बहुसंख्य अभिमानाने म्हणायला शिकू त्या दिवशी या देशातली लोकशाही यशस्वी होऊन प्रगल्भ व्हायला लागली आहे असे म्हणता येईल. तोपर्यंत आपण अजूनही बाल्यावस्थेत आहोत. लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या दृष्टीने तेराव्या चौदाव्या शतकात इंग्लंड मध्ये असलेली परिस्थिती आणि आत्ताची आपली परिस्थिती यात मला फार काही फरक जाणवत नाही. आपण उठता बसता टिळक-गांधी-सावरकर-नेहरू ही नावे घेतो, पण हे नेमके कशासाठी भांडले याची 'समज' फारच थोड्यांना आहे बहुतेक. माहिती अनेकांना आहे. पण माहिती असणे म्हणजे समज असणे असे नव्हे. हे लोक ब्रिटीशांच्या विरुद्ध लढले नाहीत. हे लढले भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी. जर युद्ध फक्त ब्रिटीशांच्या विरुद्ध असतं तर १५ ऑगस्ट नंतरही सुरु राहिलं असतं. लढाई होती ती राजकीय हक्कांसाठी. प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी हे सगळे लोक लढले आणि आज पासष्ट वर्षानंतर तेच अधिकार हक्क वापरायला नकार देण्यात आपण धन्यता मानतोय. 

 नागरिक शास्त्र हा कंटाळवाणा विषय न राहता यातून प्रत्यक्ष राजकीय शिक्षण दिले गेले पाहिजे. आपण नागरिक म्हणून या देशाचे मालक आहोत, राजे आहोत. आपण आपले अधिकार नाही वापरले तर कोणीतरी आपल्यावर दादागिरी करणारच. आणि कोणीतरी दादागिरी करतंय म्हणून मी आपले अधिकार वापरतच नाही असे अभिमानाने सांगणे यात कसला आलाय शहाणपणा? लोकपाल येईल..पण ती एक केवळ व्यवस्था असेल. आणि लोकपालाची व्यवस्था तेव्हाच सक्षम असेल जेव्हा खुद्द नागरिक सक्षम असतील, राजकीय दृष्ट्या जागरूक असतील. अ-राजकीय  या शब्दातच अराजक आहे. तेव्हा आपल्याला एक सक्षम लोकशाही व्यवस्था हवी आहे की अफगाणिस्तान-पाकिस्तान सारखे अराजक याचा विचार आपण केला पाहिजे. आज जी लोकशाही आपल्या इथे शिल्लक आहे तिचा सपशेल पराभव होईल. म्हणूनच अराजकाला आमंत्रण देणारी अ-राजकीय असण्याची विचारधारा मोडून काढली पाहिजे. आपल्यातला प्रत्येक जण राजकीय आहे... राजकीय असलाच पाहिजे. राजकीय विचारधारा काय पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ती असली पाहिजे एवढे मात्र निश्चित. 
अ-राजकीय असण्याने आपण फार स्वच्छ शुद्ध, निरपेक्ष, निस्वार्थी असल्याचा गैरसमज अनेकांना होतो. या गैरसमजाच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत. यातून आता बाहेर येऊया. आपल्या लोकशाहीला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवूया. 

Friday, August 19, 2011

एक वर्ष

जानेवारी २०११
बऱ्याच दिवसांनी एक ओळखीचा मुलगा गणूला भेटला. "काय रे काय करतोस आजकाल?", गणूने विचारले. 
"मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे", तो कार्यकर्ता उद्गारला. गणूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. असे काहीतरी शब्द तो प्रथमच ऐकत होता. "अरे माहिती अधिकार कायदा येऊन साडेपाच वर्ष उलटली तुला हा कायदा माहित नाही?", कार्यकर्त्याने गणूला विचारले. पण गणूने तुच्छतेने नकारार्थी मान हलवली. जणू ही गोष्ट माहित असणे गरजेचे नाही. कार्यकर्ता नाराज झाला. त्याने आपल्या संस्थेचे महत्व गणूला सांगितले. माहिती अधिकार कायद्याबद्दल सांगितले. गणूला आनंद झाला. "खरंच खूप चांगले काम करता रे तुम्ही. ऑल द बेस्ट!", गणूने कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ताही आज आपण एकाला जागरूक नागरिक बनवले या खुशीत निघून गेला. 

एप्रिल २०११ 
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर फर्ग्युसन रोड वर जो दंगा घातला होता त्यातले स्वतःचे फोटोज गणू फेसबुक वर अपलोड करत होता. तेव्हढ्यात त्या कार्यकर्त्याने गणूला पिंग केले. 
karykarta: kay re kasa ahes?
Ganu: mast! tu?
k: sadhya jordar kama chalu ahet re. Anna hazarencha uposhan ahe. corruption door karnyasathi. 
Ganu: kay mast match zali re final... ek number jinklo apan..! dhoni chi ti shewatchi six mhanje tar ahahaha! 
k: kharay... pan ata aplyala corruption against match jinkaychie... 
Ganu: hm
K: Aik udya Balgandharv chowk te Shaniwarwada asa candle march ahe, anna hazare yanna support karnyasathi.
Ganu: ok..
K: tar nakki ye march la.. 
Ganu: hmm baghto..try karto. baki kay?
K: kahi nahi re. udyachi tayari chalue... tu volunteer mhanun join ka hot nahis? khup important cause ahe re... 
Ganu: chalo g2g... jara kam ahe. c u l8r, bye, tc. 

७ ऑगस्ट २०११
गणू बालगंधर्व चौकातून जात होता. तेवढ्यात त्याला समोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली २५-३० जणांचा घोषणा देणारा जमाव दिसला. "अरे काय चालू आहे हे?" कार्यकर्त्याला पाहून गणूने विचारले. 
"निषेध मोर्चा! अरे गणू, आपला पुण्याचा खासदार भ्रष्ट आहे आणि तिहार जेल मध्ये आहे. हे आपण सहन नाही केले पाहिजे. याचा निषेध तू मी आणि सगळ्या पुणेकरांनी मिळून केला पाहिजे. सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"फारच छान, तुमचा हेतू फारच उत्तम आहे. मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेला... गेलाच...! 

१८ ऑगस्ट २०११
जिकडे तिकडे अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत सगळ्या शहरांमध्ये. एक दिवस गणूला त्याच्या मित्रांचा फोन येतो. "अरे गणू, उद्या एक मोर्चा आहे. अण्णांना पाठींबा देण्यासाठी. आपण जाऊया. संध्याकाळी ६ वाजता." गणूने थोडा वेळ आढेवेढे घेतले. "अरे चल रे... मोर्चा संपल्यावर सगळे मस्त जेवायला जाऊ कुठेतरी..." मित्राने आग्रह केल्यावर गणू तयार झाला. अखेर गणू आपल्या मित्रांबरोबर बालगंधर्व चौकात हजार होतो जिथून मोर्चाची सुरुवात होणार असते. 
"अरे तू इथेसुद्धा आहेस वाटतं?" कार्यकर्त्याकडे पाहून गणू आश्चर्याने विचारतो.
"म्हणजे काय? मी पहिल्यापासून आहे न या आंदोलनात...!", कार्यकर्ता उद्गारतो. 
"अरे हो की... विसरलोच..", पुढे काही गणू बोलणार एवढ्यात घोषणांचा आवाज येतो- " एक सूर एक ताल" त्यापाठोपाठ आजूबाजूचे सगळे ओरडतात," जन लोकपाल जन लोकपाल"... 
सगळेच जण मोर्चाबरोबर चालू लागतात. जोरदार घोषणा झेंडे, बोर्ड यांनी वातावरण एकदम झकास तयार झालेले असते.'मी अण्णा हजारे' लिहिलेली गांधी टोपी घालून गणूही मोर्चात चालू लागतो. मोर्चा यशस्वी होतो... आपण केलेल्या प्रचंड देशसेवेमुळे गणू त्या रात्री अतिशय समाधानाने झोपी जातो. 


नोव्हेंबर २०११
अण्णांचे आंदोलन संपलेले असते. अण्णा आणि सरकार यांच्यात उभयपक्षी मान्य तोडगा निघतो. गणूचे नेहमीचे उद्योग सुरळीत चालू असतात. एक दिवस रस्त्यात कार्यकर्ता भेटतो. त्याच्या आजूबाजूला २५-३० लोकांचा घोषणा देणारा जमाव असतो. "अरे काय रे हे?", गणू कार्यकर्त्याला विचारतो.
"आपल्या खासदाराने अजून राजीनामा दिला नाहीये. असा भ्रष्ट आणि स्मृतिभ्रंश झालेला खासदार आम्हाला नको हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे."- कार्यकर्ता.
"खरंय रे तुझं म्हणणं...", गणूला पटते. 
"सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेलाच...! 

जानेवारी २०१२ 
पुणे महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम चालू असते. जिकडे तिकडे घोषणा, पत्रके, सभा! गणू एकदा रस्त्यावरून जात असतो तेव्हा त्याला रस्त्यात उभा राहून पत्रके वाटणारा कार्यकर्ता दिसतो. "अरे काय रे हे?" गणू विचारतो. 
"मतदान जागृती. पुढच्या आठवड्यात निवडणूक आहे. मतदान कर नक्की. मतदान करणे हा आपला लोकशाही हक्क तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपले कर्तव्य आहे." 
"नक्की करणार मतदान...!"- गणू.
मतदानाच्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने आणि लागूनच शनिवार रविवार आल्याने गणू आणि मित्रमंडळी कोकणात ट्रीप ला गेले...

"लोकशाही म्हणजे काय हेच आपण पार विसरून गेलो आहोत." अतिशय निराश मनस्थितीत कार्यकर्ता फेसबुक वर आपले स्टेटस अपडेट करतो. त्याच्याच खाली त्याच्या 'वॉल' वर गणूचे कोकण ट्रीप चे फोटोज अपलोड केलेले दिसत असतात. कार्यकर्ता निराश होतो. हताश होतो... पण तेवढ्यात गणूने नव्याने अपलोड केलेला फोटो त्याच्या वॉल वर दिसतो ज्यामध्ये गणू मतदान केल्यावर बोटावर केली जाणारी खूण दाखवत असतो... कार्यकर्त्याला आश्चर्य वाटते. फोटोच्या खाली गणूने लिहलेले असते- "कोकणात निघण्या आधी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडल्या उघडल्या मतदानाचा अधिकार बजावला. माझा प्रतिनिधी भ्रष्ट असणार नाही याची मतदान करताना तरी मी काळजी घेतली आहे..!" 
 थोड्याच वेळात अनेकांचे असे फोटोज फेसबुक वर झळकू लागले. प्रयत्न वाया गेले नव्हते... कार्यकर्त्याला उत्साह आला. आणि त्याने अधिकच धुमधडाक्यात कार्याला सुरुवात केली...! 

Thursday, July 14, 2011

मुंबई ब्लास्ट नंतर...

परिवर्तन या आमच्या संस्थेची सुरुवात झाली तेव्हा नुकताच २६/११ चा दहशतवादी हल्ला झालेला होता. त्यामुळे अचानक अनेकांना आता आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले होते. त्यांचे हे वाटणे काही दिवसच टिकले. जसजसे दिवस गेले आणि २६/११ च्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. तात्पुरत्या विचारांनी उगीचच आपण समाजासाठी फार काहीतरी करतोय अशा भावनेने आलेले सगळे गळत गेले. काहींचे तर गेल्या दोन वर्षात मी तोंडही पाहिले नाही. असे का घडले असे या गेलेल्या लोकांना विचारले तर प्रत्येक जण असंख्य कारणे सांगेल. असो. ती कारणे ऐकण्यात मला मुळीच रस नाही. 
एक सव्वा वर्ष उलटले आणि पुण्यात जर्मन बेकरी मध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत परिवर्तन चे सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते. माझ्या या अनुभवावर मी दैनिक सकाळ मध्ये एक लेख लिहला होता. तो वाचून असंख्य लोकांना पुन्हा एकदा आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले. आमच्या पुढच्या मिटिंग ला पुन्हा एकदा ७०-८० लोक हजार होते. जसजसे दिवस गेले आणि जर्मन बेकरीच्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. 
काल पुन्हा मुंबई मध्ये ब्लास्ट झाले आहेत. पुन्हा असंख्य लोकांच्या डोक्यात आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे असणार. ते लोक येतील, आणि उत्साह असेपर्यंत टिकतील. नंतर आपल्या कामात गुंग होतील- पुढचा ब्लास्ट होईपर्यंत...!!! 
प्रत्येकाला वैयक्तिक उद्योग आहेत, अभ्यास आहे, मित्र आहेत, करियर आहे. उलट करियर सोडून परिवर्तनचं काम करू नका असं आमचा फाउंडर मेंबर हृषीकेश प्रत्येकाला सांगतो. तो असे सांगतो कारण त्याला हे पक्क माहित्ये की आपले सगळे उद्योग सोडून हे कार्य करायची गरज नाही. 

आमचा एक मेंबर आहे, तो भेटला की सांगतो, "अरे यार नेक्स्ट मिटिंग ला नक्की येणार. पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा संपत आहे. मग सगळा वेळ परिवर्तनला"
त्यानंतर दोनेक महिने उलटून जातात,"अरे गावाला गेलो होतो."
मग पुन्हा महिन्या दोन महिन्यांनी त्याचा चेहरा दिसतो,"अरे, कॉलेज आणि सबमिशन्स वगैरे चालू झालंय. अजिबात वेळ नाही." 
पुढच्या भेटीच्या वेळी,"अरे कॉलेज मध्ये इव्हेंट्स चालू आहेत. त्यात सगळ्यात मी आहे. सॉरी."
आणि मग त्याच्या पुढच्या भेटीच्या वेळी पुन्हा एकदा त्याची परीक्षा दोन आठवड्यांवर आलेली असते. 
काय म्हणावे याला...! 

इच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. खरोखरच सकाळी ९ ते रात्री १० असे काम करणारे लोक मी पाहतो जे एवढे जास्त आपल्या कामांमध्ये व्यग्र असतानाही काहीतरी समाजासाठी करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला हे एक उदाहरण...!!
असो.... ज्याला काम करायची इच्छा आहे तो कशातूनही वेळ काढतो आणि काम करतो. ज्याला इच्छा नाही, त्याला वेळ कधीच मिळत नाही. 
एक चारोळी या निमित्ताने आठवते:
वेळ नाही ही एक सबब आहे;
वेळ काढणं हे एक कसब आहे.
सबब-कसब असा हा खेळ आहे;
ज्याला जमतो त्याला वेळ आहे..!!


एकच विनम्र आवाहन, सातत्याला महत्व आहे. तात्पुरत्या गोष्टींना नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला कालच्या ब्लास्ट मुळे अचानक देशासाठी काम करावे वाटत असेल त्यांनी स्वतःलाच एकदा विचारून घ्या की हे तात्पुरते वाटणे आहे की खरोखरची तळमळ?? आणि तात्पुरते असेल तर विचार झटकून देऊन आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागा. ते स्वतःशीच अधिक प्रामाणिक वागणे असेल. 

Saturday, July 9, 2011

संघर्ष अपरिहार्य आहे...

"प्रेम, शांती, करुणा, दया ही जीवनातील खरोखरच सर्वोच्च मुल्ये आहेत. आणि आपण ती विसरून नाही चालणार. आम्ही हेच काम करतो. आपण एकमेकांना प्रेमाने वागवला पाहिजे. भांडण असूया इर्षा या गोष्टी काढून टाकून प्रेमाने एकमेकांना आनंद देत जगलं पाहिजे," नईम बोलत होता",आम्ही तरुणांबरोबर यासाठीच काम करतो. कारण आपण तरुणच उद्याचे जग घडवणार आहोत. प्रेमाने वागल्याने जागतिक शांतता शक्य आहे.", इथून पुढे ऐकताना मला कंटाळा येऊ लागला,"कारण सर्व धर्मांमध्ये हेच सांगितले आहे. आणि गरिबांची गरजूंची सेवा हेच आपले परम कर्तव्य आहे.",का मी ही सगळी बकवास ऐकत होतो ?? नईम बोलतच होता,"अगदी शाळेतल्या मुलांपासून आम्ही याचे शिक्षण देतो. ही प्रियांका, ही म्युनिसिपालीटीच्या शाळेत जाऊन यासंबंधी मुलांशी बोलते. त्यांना सेवा करायला शिकवते.. माझ्या मते आपल्यासारख्या तरुणांनी सेवाकार्याला वाहून घेतले पाहिजे आणि विश्वमानव (Cosmo-human) बनायला हवे."
बकवास...बकवास... फक्त बकवास....!!! 
सुमारे अर्धा तास मी ही बडबड ऐकत होतो... एक लाख स्वयंसेवक असल्याचा दावा करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचा हा कार्यकर्ता. आणि करुणा आणि प्रेमाचा संदेश सगळ्या जगामध्ये देणं आणि प्रेमाची बंधुभावाची विश्वसंस्कृती निर्माण करणं हा या संस्थेचा उद्देश. भारतातच असले भंपक विचार पैदा होतात की जगभर याची मला कल्पना नाही. पण या असल्या विचारांची मला विलक्षण चीड आहे. मला त्या नईम ची कीव करावी वाटली. "काम अवघड आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. एक दिवस नक्की यश मिळेल." असं तो शेवटी म्हणल्यावर मी मनातल्या मनात पोट धरून हसलो. कोणत्या जगात राहतात ही माणसं?? यांना आजूबाजूला काय चालू आहे याची कल्पनाच नाहीये की हे झोपल्याचं सोंग घेतायत...????

समाजासाठी काम म्हणजे काहीतरी 'सेवा करणे' अशी बहुतेकांची कल्पना असते. अनाथ मुलांशी जाऊन खेळणे, वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी गप्पा मारणे, कष्टकरी मंडळींमध्ये जाऊन आपणही थोडेफार श्रम करणे (किंवा राहुल गांधी करतो तसले नाटक तरी करणे), झोपडपट्टीत जाऊन कम्प्युटर शिकवणे, रस्त्यावर उभ्या भिकाऱ्यांना (उगीचच चार चौघात) चिल्लर ऐवजी दहा रुपयाची नोट काढून देणे. अशा विविध गोष्टी असंख्य लोक अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. "मी दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी कार्य केले", असला उर्मट अहंभाव जोपासण्या पलीकडे यातून काही एक साध्य होत नाही असं माझं ठाम मत आहे. कोणीही कोणाचा उद्धार करू शकत नाही. आणि "सेवा" करून तर नाहीच नाही... 

आपण एखाद्या रोगावरची लस घेतो म्हणजे नेमके काय करतो? आपण आपल्या शरीरातील लढाऊ पेशींना एखाद्या रोगाच्या विषाणूंशी लढायचे प्रशिक्षण देतो. संघर्ष करायला तयार करतो. संघर्ष आपल्या रक्तातच असतो.
आपल्या हक्कासाठी किंवा "प्रेमाने करुणेने" जगण्याच्या किंवा या विषयी बोलण्याच्या आपल्या अधिकारांसाठीही संघर्ष करावा लागतो. अनाथालयात जाऊन मुलांशी खेळणे सोपे आहे. पण अनाथाश्रम उभारणे, वाढवणे हा संघर्ष आहे आणि म्हणूनच अवघड आहे. आमच्या परिवर्तन संस्थेत दर काही दिवसांनी एखाद दुसरी व्यक्ती येते जिला समाजासाठी काहीतरी सेवा करायची असते. स्वतःचा अहं सुखावण्यासाठी सर्वांना दिसेल अशी सेवा करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आपण फार सगळं सोपं काहीतरी शोधत असतो...सतत... अशा व्यक्तींना आम्ही अगदी निक्षून सांगतो की परिवर्तन संस्था ही संघर्षासाठी आहे सेवेसाठी नाही. 
काही लोकांना मी फार टोकाला जाऊन बोलतोय असं वाटेल. पण नीट विचार करा. कोणीतरी काहीतरी सेवाभाविपणे केलं म्हणून कोणाचा आजपर्यंत उद्धार किंवा प्रगती झाली आहे का??? कधीच नाही. जगात असे एकही उदाहरण नाही. 
उलट सर्व मोठ्या होऊन गेलेल्या माणसांनी एकच मंत्र समाजाला दिला- संघर्ष....!!!! 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की, तुला राज्य नको म्हणून तू युद्ध सोडून जाऊ शकत नाहीस. तुझ्या हक्कासाठी, सूडासाठी, क्षात्रधर्मासाठी तुला संघर्ष करावाच लागेल.
समर्थ रामदास स्वामी- बलोपासनेला पर्याय नाही, कारण स्वदेशासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी बलोपासना आवश्यक आहे.
"आम्ही समुद्रावर लढू, जमिनीवर लढू, आकाशात लढू. वेळ पडली तर कॅनडा मधून लढू. पण आम्ही शरण जाणार नाही. नाझी जर्मनीचा पराभव झाल्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही",- विन्स्टन चर्चिल च्या या वीरश्रीपूर्ण भाषणाने अख्ख्या इंग्लंड मध्ये जोश आला होता.
"शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा"- बाबासाहेब आंबेडकर. 
"बंदुकीच्या नळीतून सत्ता येते. (संघर्ष...!)"- माओ त्से तुंग.
शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे- महात्मा गांधी..!! अहिंसात्मक स्वातंत्र्यसंग्राम... 'संग्राम'...युद्ध... संघर्ष!!! गांधींनी सेवेचे महत्व अचूक ओळखले होते... पण सेवेला राजकारणात आणि व्यवहारात अवास्तव महत्व नव्हते दिले. 
सेवा हा माणसाच्या स्वभावाचा भाग असायला हवा कर्तव्याचा नाही. हक्कांसाठी, समानतेसाठी, अधिक चांगल्या राहणीमानासाठी, समाधानासाठी, बौद्धिक-वैचारिक-वैज्ञानिक-शारीरिक प्रगतीसाठी, अधिकारांसाठी संघर्ष अपरिहार्य आहे. सेवा माणसाच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आवश्यक आहे असे मी मानतो. सेवेमुळे माणूस निर्मळ राहायला मदत होते. सेवेमध्ये स्वतःला विसरून कार्य करणे अभिप्रेत असते. आणि यातूनच अहंभाव बाजूला ठेऊन संघर्ष करायची वृत्ती जन्माला येते. आणि ते महत्वाचे असते कारण संघर्ष करताना अहंकाराने कार्यहानीच होते. 
सेवा अत्यावश्यक असली तरी, ती सहजतेने व्हायला हवी. स्वभावाचा भाग बनून. म्हणून गांधींनी आश्रम पद्धत स्वीकारली. सेवा ही नित्यनेमाची गोष्ट बनून गेली. आणि म्हणूनच गांधी आणि त्यांचे अनुयायी संघर्ष ही गोष्ट अधिक जबाबदारीने आणि कर्तव्यभावनेने करू शकले. कारण त्यांच्या मस्तकावर सेवा करायच्या जबाबदारीचं ओझं नव्हतं... परिवर्तन संघर्षासाठी असलं तरी पुण्यात जर्मन बेकारी मध्ये झालेल्या स्फोटानंतर आमचे अनेक सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये सेवाकार्य करत होते. पण ते सहजतेने आलेले होते. त्यात जबाबदारीचे ओझे नव्हते. खरे कार्य त्यानंतर सुरु झाले- असे पुन्हा होऊच नये यासाठी प्रयत्न...! 
"सेवा हा स्वभाव... संघर्ष हे कर्तव्य..." हाच आपला मंत्र असला पाहिजे. नाहीतर विश्व मानव वगैरे भंपक विचारांच्या ओझ्याखाली आपण इतके दबून जाऊ की आजूबाजूच्या भयानक वास्तवतेची जाणीवच बोथट होऊन जाईल. 

Saturday, July 2, 2011

नदीकाठच्या वाळवंटात...


आम्हाला कुठल्यातरी अशा ठिकाणी जायचं होतं जिथे फारसं कोणी जात नाही. तिथे असं काहीतरी पाहिजे जे आधी फारसं कोणीच पाहिलेलं नाही. शिवाय १० ते २५ जून अशा तारखाच आम्हाला शक्य असल्याने या तारखांना हवामानही चांगले असणे ही आमची अट होती. एवढेच नव्हे तर संपूर्ण खर्च प्रत्येकी १५-१६ हजारांच्या आत व्हायला हवा होता. एवढ्या सगळ्या अटी पूर्ण करणारी एक जागा आम्हाला सापडली....!! स्पिती...!!! 


पाच मुलं, तीन मुली, एक ड्रायव्हर आणि एक गाडी- तवेरा..! शिमल्याहून सुरुवात झाली. पूर्व दिशेने आम्ही शिमल्याच्या बाहेर पडलो आणि राष्ट्रीय महामार्ग नं.२२ ला लागलो. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून तिबेट मध्ये जात नाही तरीही या महामार्गाला तिबेट महामार्ग म्हणतात. किन्नौर जिल्ह्यात आम्ही शिरलो. इथले सौंदर्य मी पाहिलेल्या इतर हिमाचल च्या सौंदर्यापेक्षा थोडेफार वेगळे होते. हिमालयात एरवी आढळणारी डोंगरातली हिरवी मैदाने दिसत नव्हती. इथे उंचच उंच शिखरं. सरळ सोट कडे, आणि खळाळत वाहणारी सतलज नदी...
का कुणास ठाऊक सतलज नदी मला उगीचच ओळखीची वाटते. "एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेन्थ का जमावी आणि का जमू नये, याला काही उत्तर नाही. पंधरा वीस वर्षे परिचय असणारी माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं क्षणभरात जन्मांतरीचं नातं असल्यासारखे दुवा साधून जातात. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात.", पुलंच्या रावसाहेब मधल्या या ओळी मला आठवल्या. माणसांप्रमाणेच नदीलाही ही गोष्ट लागू होते हे मला माहित नव्हतं. जन्मापासून पाहत असल्यामुळे पुण्याच्या मुळा मुठा नद्या (?) आपल्या वाटतात असं वाटायचं... पण सतलजला पाहताच ती 'आपली' वाटून गेली...! मी २ वर्षांपूर्वी जेव्हा गंगा पहिली तेव्हा या नदीचा रंग निळा नसून भगवा आहे असा भास झाला होता. आणि गंगेबद्दल आदर वाटूनही आपलेपणा वाटला नाही. या आधी तीन वेळा बियासचं बघूनही ती कधी आपली वाटली नव्हती. याउलट महाराष्ट्रातल्या कृष्णेबद्दल मात्र जिव्हाळा वाटतो. एकूणच मला नद्यांचे विलक्षण आकर्षण आहे. विशेषतः डोंगरांमधून उगम पावून सपाट प्रदेशात येईपर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय मोहक असतो. पुढे मग घनदाट मानवी वस्ती सुरु होते आणि नदी घाण करायची यंत्रणा रात्रंदिवस राबते...

आमचा सगळा रस्ता सतलजला लागूनच होता. कधी आम्ही जरा उंचीवर जायचो खाली दरीत सतलज वाहताना दिसायची. कधी आम्ही अगदी नदीच्या किनाऱ्याच्या उंचीवर यायचो. ज्यूरी नावाच्या गावी आम्ही महामार्ग सोडला. आणि उजवीकडे वळून सरळ उंच चढण चढायला सुरुवात केली याच रस्त्यावर 'इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस' चे प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्या शेजारीच एक वीज निर्मिती केंद्र आहे. त्याच रस्त्याने अजून चढण चढत आम्ही सराहन नावाच्या गावी पोचलो.
किन्नौर भागाच्या राजाची राजधानी म्हणजे सराहन. शेकडो वर्षे इथले राजे निर्धोकपणे राज्य करत होते. उरलेल्या भारतात सुलतान झाले, बादशाह झाले, छत्रपती आणि पेशवे झाले, मधेच अफगाणी अब्दाली येऊन गेला, तरी इथले राज्य अबाधित राहिले. मग ब्रिटीश आले. ब्रिटीशांच्या अंमलाखाली संस्थानिक म्हणून इथे राजे होतेच. १९४७ साली देशातील इतर शेकडो संस्थानिकांप्रमाणेच सराहनचे संस्थानही बरखास्त झाले. इथे एक सुंदर राजमहाल आणि अप्रतिम भिमकली मंदिर आहे.
बस्पा नदी (सांगला खोरे)
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तिबेट महामार्गावरून आम्ही सतलजच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला. सराहन पासून सत्तर एक कि.मी. वर महामार्गावरच्या करछम नावाच्या गावी एक छोटे धरण बांधण्यात आले आहे. तिथेच बस्पा नदी येऊन सतलज ला मिळते. आम्ही करछम ला उजवीकडे वळून बस्पा नदीच्या काठाने निघालो. बस्पा च्या आजूबाजूला उंचच उंच डोंगर असले तरी त्यांचे कडे सरळ सोट नव्हते. नदीकाठच्या दोन्ही डोंगरांमध्ये अंतर होते. त्यामुळे एकूणच सर्व प्रदेश मोठा वाटत होता. बस्पा चे पात्रही उथळ पण रुंद होते. सांगला गाव मागे टाकून आम्ही रकछम गावी राहिलो. याच रस्त्यावर पुढे गाडी जाऊ शकणारे भारतातले शेवटचे गाव- चीटकुल होते. रकछामच्या रात्री बस्पाच्या काठावर आम्ही समोर खळाळणारे नदीचे पात्र, आणि आमचा नाच गाण्याचा दंगा...!!! अविस्मरणीय...!!

संपूर्ण पंधरा दिवसांमधला सर्वात सुंदर प्रवास आम्ही पुढच्या दिवशी केला. पुन्हा एकदा आम्ही तिबेट महामार्गाला लागलो आणि उत्तर-पूर्व दिशेने सतलजच्या डाव्या काठाने प्रवास सुरु केला. आत्तापर्यंतचे सतलज चे खोरे हिरवेगार होते. पाईन - देवदार ची झाडे होते. एकूणच डोंगरांवर जागा मिळेल तिथे झाडे होती, असंख्य ठिकाणी पिवळी जांभळी फुले होती. पण करछम चे धरण सोडले आणि अवघ्या काही मिनिटातच दृश्य पालटू लागले. उंच झाडे दिसेनाशी झाली. खुरट्या काटेरी झुडुपांची संख्या वाढली. डोंगरांचा रंग हिरवा होता तो हळू हळू करडा तपकिरी होऊ लागला. जिकडे तिकडे मातीच माती... नुसती कोरडी माती... मोठमोठाले दगड. अतिशय तीव्र उतार. त्यावर लांबून वाळू वाटेल असे छोट्या आकारांचे असंख्य दगड. एखाद्या Construction site किंवा स्टोन क्रशर च्या जागी असल्यासारखे वाटत होते. नदीचा रंग हिरवा निळा आणि फेसाळता पांढरा होता तो करडा तपकिरी झाला. डोंगरांना वेगळे करत, कापत वेगाने वाहणारी सतलज... आणि तिच्या आजूबाजूला सगळे उघडे बोडके कोरडे डोंगर....!

महामार्गावरच खाब/काह नावाचे गाव लागले. सतलज आणि स्पिती नदीचा संगम...! पूर्वेकडून येणारी सतलज आणि उत्तरेतून येणारी स्पिती... सतलज स्पितीच्या मोठ्या बहिणीसारखी दिसते... याच ठिकाणी आमचा आणि सतलजचा संबंध संपला... सतलजला उजवीकडे मागे टाकून आम्ही उत्तरेला निघालो. स्पितीच्या काठावरून. सतलज मध्ये जसा आम्ही बदल पहिला तसा स्पितीमध्ये दिसला नाही. स्पिती सतलज च्या संगमापासूनच करडी तपकिरी होती... आणि जसजसे आम्ही तिच्या उगमाकडे जात गेलो तसतसा तिचा रंग अधिक अधिक फिका होत गेला. नंतर आम्ही काझा गावी गेलो तेव्हा तर नदीचे काठ पांढरट होते आणि नदी अतिशय फिक्या तपकिरी रंगाची...! काह पासून थोड्याच अंतरावर आम्ही महामार्ग सोडला आणि पुन्हा एकदा उजवीकडे वळण घेत चढण चढू लागलो. रस्ता वेडीवाकडी वळणे घेत नदी पात्रापासून खूपच उंचावर गेला. नंतर नदी दिसेनाशी झाली. एक दोन टेकाडे ओलांडत आम्ही "मलिंग" नावाच्या गावी जाऊन पोचलो. इथेच होता नाको तलाव. नाको तलाव अतिशय स्वच्छ निळ्या पाण्याचा. त्याचे काठ अतिशय नीट बांधून काढलेले. तलावाच्या आजूबाजूलाही विलक्षण स्वच्छता. गावात शिरल्या शिरल्याच ग्राम पंचायतीच्या वतीने लावलेला बोर्ड दिसतो- "सार्वजनिक जागी धूम्रपान, मद्यपान आणि अश्लील वर्तणूक करण्यास बंदी". इथे येणारे भरपूर फिरंगी टूरीस्ट पाहून हा बोर्ड लावलेला असण्याची शक्यता आहे. पण अर्थातच या बोर्डकडे दुर्लक्ष केले जात असणार. कारण धूम्रपान तर सर्रास चालू होते...! असो... नाको तलवाजवळच बौद्ध माठ आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधलेला. सराहन नंतर या भागात सर्वत्र बौद्ध- तिबेटीयन झेंडे फडकताना दिसतात. याच मठाच्या आवारात एक बुद्ध मुर्तीही आहे.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही एक डोंगर उतरून महामार्गाला लागलो. स्पिती बरोबर आमचा प्रवास उत्तर दिशेला सुरु राहिला. दर थोड्या अंतराला आजूबाजूचे रूप पालटत होते. नदीमध्ये आम्हाला सदैव दोन प्रवाह जाणवत होते. विशेषतः वळणांवर दोन impact points दिसत होते. एकाच नदीमध्ये दोन प्रवाह कसे असू शकतात? सदैव नदीबरोबरच आमचा प्रवास असल्याने सातत्याने निरीक्षण चालू होते. चांगो नावाच्या गावी रस्त्याने स्पिती चा उजवा काठ सोडला आणि एका वेळी एकाच वाहन जाऊ शकेल अशा पुलावरून आम्ही स्पितीच्या डाव्या काठावर आलो. सूमदो गावी तिबेट महामार्ग संपला. इथून एक रस्ता उजवीकडे तिबेट च्या दिशेने जातो, दुसरा स्पितीच्या उजव्या काठावरून उगमाच्या दिशेने. या गावी बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची आवक जावक होते. इथे बार्टर सिस्टिमच चालते. अन्नधान्य चीनी हद्दीतल्या लोकांना दिले की ते उत्तम दर्जाचे स्वस्तातले स्वेटर्स आपल्या लोकांना देतात. इकडचे दुकानदार हेच स्वेटर्स टूरिस्ट लोकांना विकून भरपूर नफा कमावतात. अर्थात एकूणच लोकसंख्या कमी असणे, हा भाग अतिशय दुर्गम असणे आणि भारतीय लष्कराचे इथले अस्तित्व यामुळे या स्मगलिंग चे प्रमाण कमी आहे. ही सगळी माहिती आम्हाला पुढे काझा मधल्या एका दुकानदार बाईने सांगितली..!

सूमदो वरून डावीकडे वळण घेऊन आम्ही काझाच्या दिशेने निघालो. नदीमध्ये अजूनही दोन स्वतंत्र प्रवाह जाणवत होते. एखादा थोडा उंचवट्याचा भाग आला की दोन प्रवाह वेगळे होऊन मध्ये एक खंजिरीच्या आकाराचे बेट तयार झालेले दिसे. अशी असंख्य बेटे नदी पत्रात दिसत होती... अखेर शिच्लिंग नावाच्या गावी आम्हाला दोन प्रवाहांचा उलगडा झाला. इथे पिन नावाची नदी येऊन स्पितीला मिळत होती. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा होता. पिन नदीच्या उगमाच्या दिशेने गेले की राष्ट्रीय अभयारण्य आहे जिकडे हिमालयीन चित्ते आढळतात. आम्ही स्पिती बरोबरच उत्तरेला जात राहिलो. आणि अखेर काझा नावाच्या गावी पोचलो. लाहौल स्पिती जिल्ह्यातले हे दोन नंबरचे सर्वात महत्वाचे ठिकाण. सराहन- नाको रस्त्यावर पुह नावाचे गाव आहे. पुह ते काझा या भागात येण्यासाठी परदेशी नागरिकांसाठी विशेष परवाना काढणे बंधनकारक असते.

पिन नदी आणि स्पितीचा संगम सोडल्यापासून आश्चर्यकारक रित्या स्पितीचे पात्र उगमाच्या दिशेने मोठे मोठे होत गेले. काझाला स्पितीचे पात्र मुठा नदीच्या जवळ जवळ पाच ते सहापट मोठे होते. नदी अजिबात खोल नव्हती. शिवाय एकसलग पण नव्हती. पण विस्तीर्ण पत्रातच असंख्य ओहोळ तयार झालेले. मध्ये मध्ये वाळूची बेटे. पांढरी वाळू. नदीच्या आजूबाजूचे डोंगर मात्र आधीसारखेचसारखेच करडे तपकिरी... संपूर्ण खोऱ्यात वाऱ्यामुळे किंवा डोंगरांवरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे विलक्षण आकार तयार झालेले. कुठे प्रचंड आकाराचे वारूळ असावे असे डोंगर तर कुठे अगदी आखीव रेखीव बांधलेल्या किल्ल्याप्रमाणे आकार.. अगदी बुरुजांसकट!! आणि हे सगळे प्रचंड आकाराचे. मधेच एके ठिकाणी पांढऱ्या वाळूमध्ये प्रचंड आकाराचे काळे उंचवटे.. कसे तयार झाले माहित नाही...! सारेच विलक्षण... निसर्गाची किमया...!

"की" च्या बौद्ध मठातील धर्मगुरू.
दुसऱ्या दिवशी काझातून आम्ही "की" नावाच्या ठिकाणी एक हजार वर्षे जुना बौद्ध मठ पाहायला गेलो. दुरून हा मठ विलक्षण विलोभनीय दिसतो. आणि या उंचावरच्या मठावरून खाली स्पिती नदी, त्याच्या काठी असणारी हिरवीगार शेते दिसतात. आणि या सगळ्याच्या मागे मातकट डोंगर उतार आणि त्यावर शुभ्र पांढरा बर्फ...!!! मठात आत गेल्यावर एका बौद्ध धर्मगुरूने आमचे स्वागत केले. मी पाहिलेल्या माणसांमध्ये हा मनुष्य सर्वात निर्मळ आणि स्वच्छ होता...आणि कदाचित तितकाच गूढही...! जवळजवळ टक्कल, चष्मा, बारीक मिशी, आणि ओठांवर सदैव एक स्मितहास्य. सुमारे २० वर्षांपूर्वी खोटं बोलून नेपाळमधल्या आपल्या घरून पळून तो इथे आला होता. त्याने आम्हाला सर्वांना बिनदुधाचा अप्रतिम चहा दिला. मग आम्ही एका शांत खोलीत गेलो. तिथे काही दिवे जळत होते. दलाई लामांचे फोटो होते. भिंतीवर चित्र काढलेली होती. एके ठिकाणी कित्येक वर्ष जुनी असलेली हस्तलिखिते नीट मांडून ठेवली होती. एकूणच त्या खोलीत धीर गंभीर आणि अध्यात्मिक वातावरण होते. "और भी मंदिर है यहाँ पे, लेकिन मेरे ख्याल से दो ही देखो लेकिन दिल से देखो.." धर्मगुरूचे हे म्हणणे आम्हाला पटले आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
इथून पुढचा टप्पा होता जगातील सर्वात उंचावरचे वसलेले गाव- किब्बर...!
मोहेंजोदारोची आठवण करून देणारे स्पिती खोऱ्यात दूरवर वसलेले एक गाव
किब्बर कडे दूरवरून पाहिल्यावर मोहेंजोदारोच्या घरांची आठवण होते... बैठी धाब्याची घरं... एका घराच्या गच्चीत आम्ही चढून बसलो होतो. तुफान वारा आणि त्यामुळे थंडी...! कदाचित "की" च्या बौद्ध मठाचा परिणाम असेल पण किब्बर मध्ये आम्ही सगळेच खूप शांत आणि विचारमग्न झालो होतो. 

ज्या घराच्या गच्चीत बसलो होतो त्या घराच्या मालकिणीने आम्हाला चहासाठी घरात बोलावले. अतिशय साधे सुटसुटीत पण मोठे घर. एका खोलीच्या मध्यभागी चूल, हेच त्यांचे किचन, डायनिंग आणि हॉल. मध्यभागी चूल असल्याचा फायदा असा होतो की संपूर्ण खोली उबदार होते. भिंतीला लागून भारतीय बैठक पसरलेली.. त्याच्या पुढ्यात टेबलासारखा लाकडी ओटा. अप्रतिम वाफाळता चहा...!!!  "आप हमारे मेहमान हो... आप किसी भी घर में जाओ, सब चाय पिलायेंगे लेकिन कोई भी पैसे नहीं लेगा.", त्या चहा देणाऱ्या बाईने आम्ही देऊ केलेले पैसे नाकारले. किब्बर काय श्रीमंत गाव नाही. पण तरीही येणाऱ्या लोकांना पाहुणे मानत आपल्या परिस्थितीनुसार त्यांचे स्वागत करायची पद्धत तिथे आहे.

काहीतरी विलक्षण वेगळ्या भावना, विचार सगळ्यांच्या डोक्यात होत्या. जणू आम्ही नेहमीच्या जगात नव्हतोच. कारण आम्ही समोर पाहत होतो ते वेगळेच काहीतरी होते. इथली माणसं, त्यांचा निर्मळपणा, इथलं खडतर जीवन, या थंड वाळवंटात शेती करणारे लोक, निसर्गाचे रौद्र भीषण रूप... सारेच विलक्षण...
दुसऱ्या दिवशी लोसर नावाच्या गावी राहून आम्ही रोहतांग मार्गे मनालीमध्ये आलो... काझा ते लोसर सगळा प्रवास आम्ही स्पिती च्या डाव्या काठावरून केला. काझा नंतर स्पिती हळू हळू छोटी होत गेली. जसजसे उगमाकडे जाऊ लागलो तसा तिच्या पात्राचा आकार छोटा झाला. "कुन्झुम पास" या ठिकाणी आम्ही पोचलो आणि आमचा आणि स्पिती चा संबंध संपला. अवघी एखाद दुसरी टेकडी सोडून स्पिती चा उगम होता. स्पितीच्या उगमापासून ते स्पिती सतलजला मिळेपर्यंतचा सर्व प्रवास आम्ही पाहिला... स्पितीच्या उगमापासून शेवटापर्यंतचा हा प्रवास कमालीचा सुंदर आहे. आजूबाजूला सदैव वाळवंट... विविध प्रकारचे खडक, माती, प्रचंड वेगवेगळ्या रंगाचे दगड... आणि हिमालयाच्या पर्वतराजीला कापत पुढे जाणारी स्पिती....!!
 स्पिती...! 
"की" चा बौद्ध मठ
स्पितीचा अनुभव अभूतपूर्व होता. काहीतरी मौल्यवान असे आम्हाला या सगळ्या प्रवासात मिळाले... जे शब्दात सांगणे अशक्य आहे...

Sunday, June 26, 2011

निरुत्तर...


मनातले असंख्य विचार
भसाभस कागदावर उतरवले,
उगीचच लोकांना
भडाभडा सांगितले.
शहाणपणाचा आव आणला,
थोडाफार भाव खाल्ला!
मी नेहमी असाच वागतो का?
मी नेहमी असाच का वागतो??
उत्तरं नाहीत...
मी बसलोय तिथून बियास दिसत नाहिए,
पण तिचं अस्तित्व मात्र जाणवतंय.
तिचा खळाळणारा आवाज नसता तरी,
तिचं असणं जाणवलं असतं का?
तिचं असणं का जाणवलं असतं??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणतं, मेल्यावरही आपण 'असतो',
आत्मारूपी उरतो.
माझ्यानंतर माझं 'असणं'
कोणाला जाणवेल का?
कोणाला का जाणवेल??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणलं, दोनच दिवस महत्वाचे-
जन्माला आलो तो, आणि
जेव्हा कळतं
जन्माला का आलो तो!
खरंच असं असतं का?
खरंच असं का असतं??
उत्तरं नाहीत...

तीन प्रश्न नेहमीचेच-
कुठून आलो?
का आलो?
कुठे चाललो?
यांची उत्तरं शोधायची का?
यांची उत्तरं का शोधायची??
उत्तरं नाहीत...

एकजण म्हणला,"तुझे विचार भुक्कड आहेत"
दुसरा म्हणला," तू मुळातच मद्दड आहेस"
तिसरा म्हणला," तू भोंदूच नाहीस,
तर कमअक्कलही आहेस"
"छे छे माझ्या मते तर तू
अगदी अस्सल आहेस,"
चौथा उद्गारला.
माझे फक्त चौथ्याशीच पटते,
प्रत्येकाचं असंच असतं का?
प्रत्येकाचं असंच का असतं??
उत्तरं नाहीत...

डोक्यातले शेकडो प्रश्न,
मी नेहमीच निरुत्तर होतो.
प्रश्नांच्या समुद्रात डुंबत राहतो,
पण तरीही,
कधीच,
उत्तरं नाहीत...

तन्मय कानिटकर
२५/०६/२०११ 

Monday, May 16, 2011

शहरीकरण, भारत, द होल अर्थ डिसिप्लीन इ. इ.

र्यावरणवादी, गांधीवादी, समाजवादी, सामाजिक कार्यकर्ते,  राजकीय नेते, शहर नियोजन तज्ञ आणि एकूणच सामान्य नागरिक शहरीकरणाला खूप विरोध करतात. वेगाने होत जाणारे शहरीकरण हा महाराष्ट्रासमोरचा आणि देशासमोरचाच एक मोठा प्रश्न होऊन बसला असल्याचे चित्र आहे.
"शहरीकरण म्हणजे प्रदूषण, शहरीकरण म्हणजे ढासळलेली नितीमत्ता, शहरीकरण म्हणजे माणसांचा गजबजाट, शहरीकरण म्हणजे ट्राफिक जाम, शहरीकरण म्हणजे आर्थिक विषमता, शहरीकरण म्हणजे आयुष्याचा प्रचंड वेग, शहरीकरण म्हणजे जीवघेणी स्पर्धा, शहरीकरण म्हणजे चैनबाजी.... एकूणच शहरीकरण म्हणजे वाईट.. तर याउलट खेडेगाव म्हणजे शुद्ध हवा, खेडेगाव म्हणजे परंपरा सांभाळणारा समाज, खेडेगाव म्हणजे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नाही, खेडेगाव म्हणजे ध्वनी प्रदूषण नाही, खेडेगाव म्हणजे संथ निवांत आयुष्य, खेडेगाव म्हणजे प्रामाणिकपणा, खेडेगाव म्हणजे नैतिकतेची खाणच! " अशी एक सामान्य समजूत आहे. या असल्या समजुतीला आपल्या बॉलीवूड सिनेमांनी आणि असंख्य कथा कादंबऱ्यांनी खत पाणीच घातलं. गावातून आलेला गरीब बिचारा भोळा मनुष्य हा कित्येक चित्रपटांचा हिरो आहे. शहरातल्या लोकांना असल्या गोष्टी पाहायला वाचायला उगीचच आवडतात. कदाचित असल्या गोष्टींमध्ये नकळतच त्यांच्या मनातील आदर्शवादी माणसाची काल्पनिक मूर्ती साकार होते.
माझ्या मते खेडेगाव म्हणजे भोळेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा या सगळ्या भंपक समजुती आहेत. माणूस इथून तिथून सगळीकडून सारखाच. शहरामध्ये टिकून राहण्याच्या स्पर्धेत माणूस आपोआपच स्वतःचे हित बघायला शिकतो. आणि त्यात काहीही गैर नाही...अगदी शंभर टक्के...! कारण शेवटी Survival हीच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळेच खेडेगावान्मधेही माणसं एकमेकांवर कुरघोड्या करतात, जातीपातीचे समूह तयार करून स्वतःभोवती संरक्षक भिंत उभारायचा प्रयत्न करतात. यामुळेच खेड्यांमध्ये जाती चे राजकारण मोठे आहे. यामध्ये अशिक्षित असण्याचाही हातभार लागतो. आणि लोक अशिक्षित राहण्याचे कारणही तिथल्या लोकांना त्याची गरज न भासणं हे आहे. Survival साठी शिकणं आवश्यक असतं तर खेड्यातले लोक शिकले असते. पण शिकण्याने केवळ आयुष्य सुधारतं आणि त्याशिवायही माणूस जगू शकतो या विचाराने खेड्यात अशिक्षितपणा जास्त आहे. एकूण मुद्दा एवढाच की खेड्यातले लोक तेवढे चांगले असल्या भ्रामक समजुतीमध्ये कोणीही राहू नये.


कोणी कितीही काही केलं तरी शहरीकरण होतेच आहे. शहरांची वाढ बेसुमार होत आहे. खेड्यांमधून लोकांचे लोंढे शहरांकडे येतायत. रोजगाराच्या आशेने. कारण सांगितलं जातं की तिथे रोजगार उपलब्ध नाही म्हणून ते शहरात येतात. शहरांचा बकालपणा वाढतोय, झोपडपट्ट्या वाढतायत, गुन्हेगारी वाढते आहे. मग यावर उपाय काय? शहराकडे खेडेगावातील माणूस कधीच येऊ नये, यासाठी तिथल्या तिथेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे गरजेचे आहे, असा उपाय काही लोकांकडून सांगितला जातो. परंतु अशा पद्धतीने लोक खेडेगावातच अडकून पडतील. त्यांचे राहणीमान उंचावणार कसे? त्याहून महत्वाचे म्हणजे 'समृद्ध' कसे होणार?! म्हणजे खेड्यातला माणूस आणि शहरातला माणूस दोघेही जरी महिन्याला २०,००० रुपये कमावत असतील, तरी खेड्यातला माणूस रोज जेवणात पिठलं भाकरीच खाणार, पण शहरातला माणूस मात्र महिन्यातून चार वेळ विविध हॉटेल्स मध्ये जाऊन चायनीज, अमेरिकन, फ्रेंच, पंजाबी असं खाणार! किंवा शहरातला तरुण महिन्यातून किमान दोनदा पब मध्ये जाऊन मनसोक्त नाचतो किंवा शहरातील तरुणींना प्रचंड स्वातंत्र्य आहे पण खेड्यात मात्र मनसोक्त नाचायला तमाशा सोडून काही नाही. अशा अनेक गोष्टी. या एकदा खेड्यातल्या माणसाला कळल्या (आणि त्या कळणारच कारण टीव्ही खेड्यान्मधेही घराघरात पोचलाय) की त्याला शहराचे आकर्षण निर्माण होणार... ते कसे रोखणार??!!! यावर काही महाभाग असं सुचवतील की हेच स्वातंत्र्य, त्याचबरोबर हॉटेल्स वगैरे हे सर्व खेड्यातही असावं. म्हणजे त्या खेड्यात ते झालं की आजूबाजूच्या गावचे जिथे हे सगळं नसेल ते त्या खेड्यात येऊ लागतील, हळूहळू ते खेडे एक बाजारपेठ बनेल. त्यासाठी चकाचक रस्ते येतील. बाजारपेठ म्हणल्यावर व्यापारी येतील. दुकाने येतील. मग त्या खेड्याचे शहर व्हायला कितीसा वेळ लागणार?!! मग माझा प्रश्न असा आहे की असं झालं तर त्या खेड्याचं शहरीकरणच झालं की...!!!! मग शहरीकरण हा प्रकार रोखावा कसा?

अनेकदा मी यावर खूप सखोल विचार केला आहे.. आम्हा मित्रांमधेही यावर चर्चा झाली आहे. काही काही वेळा तर जेवा खायची शुद्धच राहत नसे, तासन तास चर्चा, वाद, विचारसरणी वरून चर्चा चालूच...!  विशेषतः मनसे च्या भूमिकेनंतर हे सगळं वाढलं. शहरांकडे येणारे लोंढे आणि त्यामागची मानसिकता. त्यातून उद्भवणारे 'मूळच्या लोकांच्या' नावाने होणारे राजकारण... तरीही हे सगळं कसं रोखावं, यासगळ्यावरचा उपाय काय हे मात्र उमगत नव्हतं... मध्यंतरी सहजच एक मासिक हाती पडलं आणि त्यामधला एक लेख वाचता वाचता त्यातले काही मुद्दे आणि माझे विचार असे एकदम नवीनच काहीतरी गवसले. तेच आज तुमच्यासमोर मांडावे वाटले म्हणून हा लेख...

स्टूअर्ट ब्रांड या विचारवंताने आपल्या ‘द होल अर्थ डिसिप्लीन’ (The whole earth Discipline) या नवीन पुस्तकामधून संपूर्ण शहरीकरणाचा विचार मांडला आहे. शहरीकरण हा प्रकार वाईट न मानता, शहरीकरणाला एक चांगली गोष्ट मानून त्याचे योग्य नियोजन करावे. आज जगातील आणि भारतातीलही ४५-५०% जनता शहरांमध्ये राहते. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की पुढच्या २० वर्षात हीच टक्केवारी साधारणपणे ८० च्या घरात पोचलेली असेल. याचा अर्थ शहरांचा भूभाग वगळता इतर भूभाग निर्मनुष्य असेल.. किंवा अत्यंत जास्त विरळ लोकसंख्येचा असेल. जर हे होणारच आहे तर त्या दृष्टीने नियोजन का करू नये? एका प्रचंड मोठ्या शहराच्या महानगरपालिकेचे केवळ प्रशासकीय दृष्टीकोनातून अनेक छोटे प्रभाग करावेत. आणि त्या प्रभागांना मर्यादित स्वायत्तता देऊन विकास आणि नियोजन करावे. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या ते कठीण जाणार नाही. शहराचा विस्तार हा एखाद्या जिल्ह्याएवढा असावा. म्हणजे ७०-८० लाख लोक सहज मावू शकतील. अशा विस्तीर्ण जागी योग्य नियोजन करून शहरीकरण घडवून आणले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून शहराचे नियोजन झाले तर ही शहरे विद्रूप आणि घाण होणार नाहीत.  
८०% लोकसंख्या एकाच जागी एकवटल्याने अनेक फायदे होतील. सगळ्यात महत्वाचा म्हणजे विखुरलेल्या लोकसंख्येसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्मितीवर होणारा अफाट खर्च कमी होईल. लांबच लांब कालवे खोदणे, कित्येक हजार किलोमीटर्स च्या विजेच्या लाईन्स टाकणे, हजारो किलोमीटर्स चे रस्त्यांचे आणि रेल्वेचे जाळे तयार करणे, विखुरलेल्या लोकसंख्येला सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देणे अशा असंख्य गोष्टींवर होणारा अफाट खर्च कमी होईल. आणि हा पैसा अधिक रचनात्मक, नवनिर्मितीसाठी वापरता येईल. शहरीकरण अधिक व्यापक आणि नियोजन करून करणे शक्य होईल.
याशिवाय होणारा अजून एक फायदा म्हणजे शहरात ८०% जनता राहू लागली की उरलेली २०% जनता असेल शेतकरी..! यामुळे खेडेगावांमध्ये मुबलक प्रमाणात शेतजमीन उपलब्ध होऊन. सलग मोठ्या जमिनींच्या पट्ट्यांवर यांत्रिक शेती करून शेती उत्पादन वाढवणेही शक्य होईल. शिवाय प्रचंड मोठा भूभाग हा वनीकरण, वनसंवर्धन, अभयारण्ये यासाठी खुला राहील. अशा असंख्य ठिकाणी नियोजन करून पर्यटन व्यवसाय वाढवता येऊ शकतो. पर्यटनातून येणारे परकीय चलन आपल्या अर्थव्यवस्थेला उपयोगी पडणारे आहे. नियोजन करून बांधलेली धरणे, वनीकरण या प्रकल्पांमधून पर्यावरण संवर्धनाचे फार महत्वाचे कार्य होऊ शकते.
स्टूअर्ट ब्रांड याच्या शहरीकरणाच्या विचारांपलीकडे जाऊन मला भारताच्या संदर्भातही शहरीकरणाचा विचार पसंत पडतो. आज जे शहरे विरुद्ध खेडी असे चित्र सामाजिक क्षेत्रात आहे ते समूळ नष्ट होईल. याशिवाय कोणीही कितीही नाकारले तरी शहरांमध्ये भेदभावाच्या भिंती कमी आहेत. किमान व्यवहाराच्या पातळीवर तरी या भिंती आड येत नाहीत. साक्षरता आणि सुशिक्षितपणा यातला फरक महत्वाचा आहे. खेड्यांमध्ये साक्षरता आहे, शहरांमध्ये सुशिक्षितपणा वाढीस लागेल. आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रगल्भ व्हायला मदत होईल.
राजकीय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला आज मतदारांपर्यंत पोचायचे म्हणजे मोठाच प्रश्न असतो. प्रचारांमध्ये पाण्यासारखा पैशाचा अपव्यय होतो. आणि त्याचमुळे पैसा असलेलेच लोक राजकारणात सहभाग घेऊ शकतात. खऱ्या खुऱ्या लोकशाहीची वाटचाल ही शहरीकरणातून होऊ शकेल. शहरातच सामाजिक संस्था जास्त का असतात?! याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या वाढीस लागलेली प्रगल्भता. दूर दूर वसणाऱ्या खेड्यांपर्यंत निवडणूक प्रक्रिया पोचवण्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारचा प्रचंड पैसा खर्च होतो. हा सगळा पैसा आणि याच्याशी निगडीत श्रम, हे सगळेच सुनियोजित शहरीकरणाच्या प्रयोगाने साध्य करण्यासारखे आहे.
कलेच्या दृष्टीने बघायला गेलं तर नाटक, संगीत, सिनेमा या क्षेत्रात सातत्याने नवनिर्मिती आणि प्रयोगशीलता ही शहरांमध्येच का दिसून येते?! याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शहरांमधला बहुसांस्कृतिक समाज! आणि याच कारणामुळे, या प्रचंड exposure मुळे शहरामध्ये स्वातंत्र्य असते, सहजता असते. भारतीय समाजाच्या दृष्टीने ब्रांड चे शहरीकरणाचे मॉडेल मला फारच आवडले.
यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे नियोजन.. planning... नियोजन शून्य शहरांची सध्याची परिस्थिती आपण पाहतोच आहोत. त्यामुळे शहरीकरणाच्या विचारांमध्ये नियोजन हा भाग गृहीत धरलेला आहे.
खरंच सुनियोजित शहरीकरणाने असंख्य प्रश्नांचा गुंता सुटू शकतो? मी कदाचित खूप वरवर विचार मांडला असेल. पण ही कल्पना मला विचार करायला लावणारी होती एवढे मात्र खरे. या लेखात मांडलेल्या विचारांमध्ये असंख्य त्रुटी असतील कदाचित.मी अस्सल शहरी मनुष्य आहे आणि मला शहरी जीवन मनापासून आवडते... म्हणूनही कदाचित मला ब्रांड चे विचार अधिक आवडले... पण अगदी त्रयस्थपणे विचार करायचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हाही मला त्यात असंख्य गोष्टी आकर्षक दिसल्या.. पण यावर अधिकाधिक चर्चा व्हावी असे मला वाटते. म्हणूनच संपूर्ण लेख नीट वाचून आपल्या प्रतीक्रीयांपेक्षा (reaction) खरं तर  विचारपूर्वक मत (opinion) ऐकायला मला आवडेल...! कमेंट्स करून, ईमेल करून, एस एम एस करून आपली मतं मला जरूर कळवा..! माझी विचारधारा सुधारण्यासाठी, प्रगल्भ करण्यासाठी त्याचा उपयोगाच होईल..