Monday, April 14, 2014

मित्रहो,

जेव्हापासून मी आम आदमी पक्षात आलोय, तेव्हापासून आणि विशेषतः गेले काही दिवस मी अनेकांशी चर्चा केली, वाद घातले. या दरम्यान विरोधकांचे अनेक मुद्देही मला पटले. पण तरीही, आम आदमी पक्षाकडून झालेल्या काही चुका मान्य करूनही, मी आम आदमी पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, यामागे माझी नेमकी भूमिका काय आहे ते मांडण्याचा हा प्रयत्न. आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, मुद्दे सोडून आणि व्यक्तिगत पातळीवरची चर्चा यावर होऊ नये अशी इच्छा आहे. खुलेपणाने, मन मोकळे करून विचारमंथन व्हावे. इथे कमेंट्स मध्ये झाले नाही तरी चालेल पण स्वतःच्या मनात चिंतन नक्की व्हावे अशी इच्छा आहे. 

नेमके आम्ही काय करू पाहतो आहोत
'सत्ता मिळवणे' एवढाच मर्यादित उद्देश ठेवून राजकारणात येण्याचा आम आदमी पक्षाचा विचार नाही. आम्ही राजकारण बदलू पाहतो आहोत. राजकारणाची पारंपारिक पद्धती बदलू पाहत आहोत. नरेंद्र मोदी असो नाहीतर राहुल गांधी नाहीतर राज ठाकरे; या सगळ्यांचं राजकारण हे पारंपारिक पद्धतीचं आहे, सत्ता मिळवण्यासाठी पैसा आणि मग सत्तेतून अजून जास्त पैसा या दुष्टचक्रात अडकलेलं. हे तोडण्याचा, याला पर्याय देण्याचा प्रयत्न म्हणजे आम आदमी पक्ष. म्हणून आम आदमी पक्षाकडे पैसे देऊन आणलेले लोक दिसणार नाहीत, दिसतील ते फक्त विचारांमुळे एकत्र आलेले कार्यकर्ते. प्रत्येक पै पै कोठून आला आहे हे जाहीर करण्याची धडाडीही हा पक्ष दाखवतो आहे. इतर कोणताही पक्ष हे करत नाही. उलट त्यांच्याकडील निधीपैकी ७५% निधी कोठून आला हे त्यांनी जाहीर केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. 

मी या पक्षाकडे एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून बघतो. प्रयोगच आहे हा. आणि हा प्रयोग आज तरी यशस्वी होणे गरजेचे आहे. 'आजची प्रस्थापितांची राजकारणाची ही पद्धत का बरे पडली असेल' असा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं, की केवळ याच मार्गाने विजय मिळतो हा प्रस्थापित राजकारण्यांच्या मनात असणारा विश्वासच यामागे आहे. पण जर यावेळच्या निवडणुकीत असं दिसलं की, पारंपारिक भ्रष्ट राजकारण हे नव्या स्वच्छ राजकारणासमोर फिकं पडत आहे तर प्रस्थापितांमध्येही चलबिचल होईल आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि यामुळे एकूणच राजकारणात सुधारणा व्हायला सुरुवात होईल. पण जर पुन्हा प्रस्थापितच विजयी झाले तर मात्र याचा अर्थ असा होईल की बाकी काहीही असो, विजयी होण्यासाठी तुम्हाला पैसा आणि गुंडांची ताकद लागतेच. म्हणजे एका अर्थी तत्वांपेक्षा पैसा आणि गुंडांची प्रतिष्ठा समाजात वाढेल. 
आणि यातूनच 'इस देश का कुछ नहीं हो सकता' म्हणणाऱ्या निराशावाद्यांची लाट येईल. 

आपल्याला नेमके काय हवे आहे

सगळ्या चांगल्या गोष्टी आम आदमी पक्षच केवळ घडवून आणेल असा अहंभाव माझा आणि पक्षनेतृत्वाचाही नाही. पण आम आदमी पक्ष केवळ रिंगणात असल्याने होणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज काही लोक तरी स्वच्छ राजकारण करत निवडणूक लढवून संसदेत जाणं गरजेचं आहे. तिथे जाऊन त्यांनी आत प्रभावी दबाव गट म्हणून काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज तरी आम आदमी पक्षाला निवडून देऊन या पद्धतीच्या राजकारणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खरं तर विचार करणाऱ्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजाने तर अधिकच जिद्दीने उभं राहिलं पाहिजे असं माझं स्वप्न आहे.  

वारंवार हा प्रश्न येतो की आज तरी आपल्या देशाला अस्थिर सरकार परवडणारे नाही. माझं म्हणणं आहे की, तसं बघितलं तर अस्थिर सरकार केव्हाही वाईटच असतं, आज काय आणि ५ वर्षांनी काय! पण खरं सांगायचं तर अस्थिरतेला घाबरून आता चालणार नाही. गेली १५ वर्षे तर स्थिर सरकार आहेच आपल्या देशात. पण याच काळात आपली पत अधिकाधिक ढासळली आहे. राजकारणाची पातळी नको इतकी घसरली आहे. पैशाचा आणि दारूचा महापूर कसा वाहतो निवडणुकांत हे पाहतो आहोत आपण. या सगळ्या परिस्थितीत बदल हवा तर काही काळ अस्थिरता येणार हे गृहीत धरलं पाहिजे. या सगळ्या प्रस्थापितांना अस्थिर केल्याशिवाय हे जागे तरी कसे होतील? आणि इतकं होऊनही ते जागे नाही झाले तर पुढच्या निवडणुकांत आम आदमी पक्षाच्या जागा वाढतील आणि आम्हीच स्थिर सरकार देऊ. 
आज आम आदमी पक्षामुळे अस्थिरता आल्यास हीच परिवर्तनाची नांदी असेल. 

जसं हिंसा चांगली का वाईट या प्रश्नाचं उत्तर काळ-वेळ-परिस्थिती आणि उद्देश पाहून ठरतं तसंच यावेळच्या निवडणुकीच्या बाबतीत अस्थिरतेचं आहे. यावेळची अस्थिरता ही दूरचा विचार करता चांगली असेल... किंबहुना मी तर म्हणेन आज अस्थिरता अत्यावश्यकच आहे. 
गंमतीचा भाग असा की सध्या मी गलिच्छ वस्त्यांपासून प्रचंड मोठ्या सोसायट्यांपर्यंत सगळीकडे फिरतो आहे प्रचारासाठी. पण अस्थिरतेचा मुद्दा मध्यमवर्गाने उपस्थित केला तितका कोणीही केला नाही. मला वाटतं, मध्यमवर्गात असणारी स्वाभाविक 'स्थितीप्रियता' आता कुठेतरी मोडावी लागेल. आहे ते बरं चाललं आहे, थोडीफार डागडुजी करून चालवून नेऊ असा विचार करून चालणार नाही. निदान मला तरी थोड्याफार डागडुजीने काम होईल असं वाटत नाही. माझ्या मते आता सगळा राजकारणाचा गाडा गदागदा हलवून योग्य मार्गाला लावायला हवाय. खालून वरून घुसळण करायला हवीये. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला हवंय. अगदी सर्वंकष मंथन. आता मंथन म्हणल्यावर यामधून सुरुवातीला अस्थिरतेचं वगैरे विष बाहेर येईल. पण शेवटी अमृतच बाहेर येणार हे नक्की... 
मागे एक मस्त ओळ वाचली होती- comfort zone is a beautiful place, but nothing ever grows there. 

आणि हो, उद्या आम आदमी पक्षाचे लोकही आजच्या प्रस्थापित पक्षांसारखे नालायक निघाले तर त्यांनासुद्धा हाकलून लावण्याची जिद्द आपल्या सारख्या सुशिक्षित आणि देश व समाजाविषयी सजग असणाऱ्यांनी बाळगली पाहिजे असे मी मानतो. पण बदल हवा असेल तर आजतरी जे आम आदमी पक्षाच्या निमित्ताने जे होत आहे त्याला सक्रीय पाठिंबा दिलाच पाहिजे आणि म्हणूनच आम आदमी पक्षाच्या 'झाडू'लाच मत देणे आवश्यक आहे याबद्दल मी निःशंक आहे.