Sunday, October 24, 2010

प्रत्येकाचा उत्सव...!!

प्रत्येक देशात, देशातल्या विविध धर्मीयांमध्ये, त्यातल्या विविध पंथांमध्ये, वेगवेगळ्या घराण्यांमध्ये, वेगवेगळ्या लोकांचे असंख्य असे सण या जगात आहेत. राष्ट्रीय सण धार्मिक सण, कौटुंबिक सण अशी वर्गवारी केली जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव, दिवाळी, ईद, ख्रिसमस, लग्नाचा वाढदिवस, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, असे विविध उत्सव आपण साजरे करत असतो.... जगभर....!!
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे म्हणतात...
एवढे वैविध्य आणि विलक्षण कल्पकतेने निर्मिलेले हे सण उत्सव माणसाच्या जीवनात अढळ स्थानी आहेत. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाला विरोध करणारे कम्युनिस्ट लोकही त्यांचे त्यांचे दिवस साजरे करतातच. "क्रांती दिवस, मुक्ती दिवस" अशा नावांनी... एकूणच काय...तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी मानवाच्या जीवनातून सण उत्सव वगळणे शक्य होणार नाही.
जगातील सर्व देशांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जातींमध्ये, शहरांमध्ये, जंगलांमध्ये, खेड्यांमध्ये साजरा केला जातो असा एकमेव उत्सव म्हणजे "वाढदिवस".....!!!!

गेल्या काही वर्षात भोगवादी संस्कृती का काय म्हणतात त्याचा प्रभाव पडून सर्व काही साजरे करायची प्रथा पडली आहे असा काही लोक दावा करतात. त्यांचे म्हणणे काहीही असो, वाढदिवस साजरा करायची प्रथा या भोगवादी वगैरे संस्कृतीमुळे निर्माण झालेली नाही....त्याचे स्वरूप बदलले असेल...नव्हे बदलले आहेच...पण वाढदिवस साजराच केला जात नव्हता असे म्हणणे अडाणीपणाचे लक्षण ठरेल.... वाढदिवशी आईने ओवाळणे पूर्वीही होते...आत्ताही आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते पूर्वीही होते आताही आहेत. वाढदिवस युरोपात आहे तसा अमेरिकेतही आहे...आणि आशियातही आहे.. तालिबान्यांच्या मध्यपूर्वेतही आहे...

खरे तर वाढदिवस साजरा करावे असे या दिवसात काहीच नसते. समजा मी २० वर्षांचा झालो तर यात आनंद व्यक्त करावे असे काय आहे? कधी कधी विचार करता मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करण्यामागे माणसाची मूळची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असावी. सगळ्याच प्राण्यांमध्ये असणारी "Survival" ची प्रवृत्ती. आपण जगामध्ये इतकी वर्षे टिकून आहोत, टिकून राहिलो आहोत याचा आनंद म्हणजे वाढदिवस.....!!!!! टिकून राहण्याच्या या आनंदाला आयुष्याच्या उत्तरार्धात ग्रहण लागायला सुरुवात होते. जसजशी पन्नाशी ओलांडली जाते.. हळू हळू आपल्या आयुष्यातले दिवस कमी होत असल्याची भावना वाढते. आणि पुढे पुढे तर वाढदिवस ही एक काहीशी नकोशी बाब होऊन जाते. सुरुवातीला वाटणारे "टिकून राहिलो" हे सुख समाधान संपत जाते. आणि पाचवा सत्ता संपादनाचा वाढदिवस साजरा करतानाच पंतप्रधानाला जशी खुर्ची सोडावी लागते तसेच काहीसे आयुष्याच्या उत्तरार्धात होत जाते.
"मी टिकून राहिलो" या प्रवृत्तीतून निर्माण झालेला वाढदिवस हा "वैयक्तिक उत्सव" असतो... त्यामध्ये समाजाच्या कोणत्याही घटकाचा संबंध नसतो. त्या व्यक्तीच्या आनंदात सामील होणे हा भाग वेगळा. ते आपण करतोच...नव्हे केलेच पाहिजे... त्यामुळे लोकांचा संबंध नसणे तरीही त्यांचा सहभागी असणे असे काहीसे वाढदिवस या "व्यक्ती उत्सवाबाबत" घडते.

इतका महत्वाचा, प्रत्येकाच्या आयुष्यात दर वर्षी येणारा "व्यक्ती केंद्रित" उत्सव कित्येक हजार वर्षांपासून आहे... आणि तरीही व्यक्तीवादाचे तत्वज्ञान आत्ता आत्ताचे आहे, कोणीतरी तयार केलेले आहे असे काही जण म्हणतात हा केवढा विरोधाभास.....!!!

भारतात प्राण्यांचेही उत्सव साजरे केले जातात. बैल पोळा, वसुबारस, नागपंचमी हे त्यातलेच काही... प्रत्येकाला महत्व मिळावं, जगातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी किंमत असावी, मान असावा अशा विलक्षण समानतेच्या आणि परस्पर आदराच्या भावनेतून असे सण निर्माण झाले असावेत असं मला वाटतं. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणे हा "प्रत्येक व्यक्तीला महत्व" द्यायचा दिवस या एका विलक्षण लोकशाही केंद्रित विचारसरणीचा अप्रतिम नमुना...
महिन्याला ५०० रुपये मिळवणाऱ्या माणसाचा वाढदिवसही "एक दिवस" असतो...आणि ५ कोटी मिळवणाऱ्याचाही वाढदिवस "एकंच दिवस" साजरा केला जातो.
केवढी मोठी समानता जगातल्या सगळ्या भागात आहे....!!! माणसामध्ये समानता आणि परस्परांना आदर आणि महत्व द्यायची वृत्ती मुळातच असली पाहिजे. त्याशिवाय वाढदिवस हा वैयक्तिक उत्सव इतके हजारो वर्ष टिकला नसता...
वाढदिवशी रस्त्यातून चालताना सगळ्यांच्या नजर आपल्याकडे आहेत...आपण अतिशय महत्वाची व्यक्ती आहोत अशा थाटात आपण जात असतो... ते तसे वाटणे किती सुखावह असते... उत्सवमूर्ती बनणे, celebrity बनणे हे सगळ्यांनाच कुठे शक्य असते. पण वाढदिवशी "celebrity" म्हणून मिरवण्याचा मान प्रत्येकाला दरवर्षी मिळतो...!!!
आणि म्हणूनच जगभर साजरा केला जाणारा वाढदिवस हा "व्यक्तीकेंद्रित उत्सव" मला अतिशय प्रिय आहे....!!!!!!

Sunday, October 17, 2010

लॉक किया जाय?

सुमारे ८-९ वर्षांपूर्वी... मला आठवतंय, त्या वेळी शाळेत होतो मी, रात्री ९ वाजता कर्फ्यू लागल्यासारखे रस्ते ओस पडायचे...भारतातले तमाम लोक, टीव्ही ला चिकटून एक विलक्षण असा खेळ बघायचे... क्रिकेट नंतर इतका प्रसिद्ध झालेला आणि लोकांना वेड लावणारा हा एकमेव खेळ असावा... "आईये, आप और हम खेलते है ये अदभूत खेल जिसका नाम है- कौन बनेगा करोडपती...!!!" अमिताभने असं म्हणताच केबीसीचं ते टिपिकल म्युझिक वाजायचं...आणि सगळी जनता श्वास रोखून पुढचा प्रश्न काय आहे हे पहायची....
"करोडपती" मुळे भारतीय टेलिव्हिजन वर क्रांती झाली असे म्हणतात... अमिताभ बच्चन नव्वदीच्या दशकात लाल की काला बादशाह असले भुक्कड सिनेमे करत दिवस घालवत होता. पण केबीसीने त्याचेही आयुष्य पालटवून टाकले...! अमिताभ त्यानंतर एक दोनच वर्षात पुन्हा एकदा सुपरस्टार बनला... केबीसी ची नक्कल करायचा इतर टीव्ही चानेल ने खूप प्रयत्न केला. "सवाल दस करोड का" "छप्पर फाडके" असले कार्यक्रम अनुक्रमे अनुपम खेर आणि गोविंदा यांनी वेगवेगळ्या चानेल वर करायचे प्रयत्न केले. पण अमिताभ तो अमिताभ.... त्याची सर गोविंदा किंवा अनुपम खेर यांना कशी येणार...??!! ज्या अभिजात पद्धतीने, विलक्षण अशा आवाजात अमिताभ प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता त्याच्या एक शतांश सुद्धा गोविंदा आणि अनुपम खेर ला जमत नव्हते.. आणि जमणे शक्यही नव्हते. कारण अमिताभ बच्चन या नावाला जे वलय आहे ते त्यांना नाही. प्रत्यक्ष लोकांशी बोलताना अमिताभ बच्चन ज्या अदबीने बोलत असे, खेळणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कार्यक्रमात सामावून घेत असे त्याला तोडच नाही.
"कौन बनेगा करोडपती-द्वितीय" असं म्हणत केबीसी सिझन २ ची सुरुवात झाली होती. सिझन एक नंतर झालेल्या ब्रेक मुळे लोकही फ्रेश होते. पुन्हा एकदा अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात दिसणार या विशेष आनंदात लोक होते. त्याचबरोबर अनुपम खेर आणि गोविंदा सारखी चिल्ली पिल्ली लोकं सिझन २ च्या वेळेस नव्हतीच. त्यांचे कार्यक्रम केव्हाच बंद पडले होते. सिझन २ ची सुरुवात झाली आणि अमिताभ बच्चन ची प्रकृती खालावली. आता काय करावे, केबीसी चे प्रोड्युसर लोक चिंतेत पडले. "शो मस्ट गो ऑन" असं म्हणत त्यांनी सुपरस्टार असलेल्या किंग खानला पाचारण केले. आणि किंग खान ने केबीसी या उच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे आव्हान स्वीकारले....
अनुपम खेर आणि गोविंदा यांच्याकडे निदान "केबीसी"चे वलय नव्हते. पण केबीसी चे वलय असूनही आणि प्रचंड प्रेक्षक वर्ग असूनही शाहरुख अमिताभची उंची गाठू शकला नाही... अमिताभच्या बोलण्यात असलेला रुबाब, आणि उच्चभ्रूपणा शाहरुखला घेता आला नाही. त्यांनी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सूत्रसंचालन करायचा प्रयत्न केला. इतर वेळी अनेक ठिकाणी स्टेज वर चांगले वाटणारे शाहरुखचे सूत्रसंचालन केबीसीच्या स्टेजवर थिल्लर वाटू लागले. यात दोष शाहरुख चा नव्हता. पण केबीसी म्हणजे अमिताभ हे समीकरण इतकं फिट्ट झालं होतं की शाहरुखला फारसा वावच मिळाला नाही... अखेर जनतेने नाकारलं म्हणल्यावर प्रोड्युसर्स तरी काय करणार... केबीसी द्वितीय बंद झाले.
नुकताच केबीसी चा तिसरा सिझन सुरु झाला आहे. अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात अत्यंत अदबीने सूत्रसंचालन करतो आहे... स्टार ऐवजी आता सोनी वरती हा कार्यक्रम लागतो आहे. खेळातल्या नियमांमध्ये काही मोजके बदलही करण्यात आले आहेत. त्यामुळे मुळातल्या खेळाची रंगतही वाढली आहे. पुन्हा इतक्या वर्षांनी अमिताभ केबीसी करतोय या विचारानेच मस्त वाटले. पण कार्यक्रमाचं स्वरूप म्हणून काही गोष्टी अतिशय खटकल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे "commercialization"... एक्स्पर्ट नामक एक लाईफलाईन सुरु करण्यात आली आहे त्यात चारू शर्मा नामक एक चमन मनुष्य बसवला जातो. पण त्याचबरोबर नुकत्याच रिलीज होऊ घातलेल्या सिनेमातले हिरो हिरोईन हजेरी लावतात. इतर कोणत्याही चानेल वरच्या टपरी reality show मधली ही गोष्ट केबीसी मध्ये असू नये असे मला मनापासून वाटले. मोबाईल कंपनीची, आयडिया ची जाहिरात करण्यासाठी खेळायला आलेल्या सामान्य खेळाडूंना डायलॉग लिहून देऊन ते पाठ करवून घेऊन तयार करून पाठवणे हेसुद्धा अत्यंत खटकले. इंडियन आयडॉल वगैरे पासून सहभागी लोकांच्या घरच्या लोकांचा व्हिडीओ वगैरे दाखवणे, इत्यादी गोष्टी लोक पाहत आहेत. तेच सर्व केबीसी च्या पडद्यावर नको वाटले.

या सगळ्या गोष्टींमुळे केबीसी चे वेगळेपण कमी होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे.. अर्थात जोवर अमिताभ आहे तोवर केबीसी इतर कशाहीपेक्षा वेगळेच राहील यात काही शंकाच नको.....