Sunday, June 26, 2011

निरुत्तर...


मनातले असंख्य विचार
भसाभस कागदावर उतरवले,
उगीचच लोकांना
भडाभडा सांगितले.
शहाणपणाचा आव आणला,
थोडाफार भाव खाल्ला!
मी नेहमी असाच वागतो का?
मी नेहमी असाच का वागतो??
उत्तरं नाहीत...
मी बसलोय तिथून बियास दिसत नाहिए,
पण तिचं अस्तित्व मात्र जाणवतंय.
तिचा खळाळणारा आवाज नसता तरी,
तिचं असणं जाणवलं असतं का?
तिचं असणं का जाणवलं असतं??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणतं, मेल्यावरही आपण 'असतो',
आत्मारूपी उरतो.
माझ्यानंतर माझं 'असणं'
कोणाला जाणवेल का?
कोणाला का जाणवेल??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणलं, दोनच दिवस महत्वाचे-
जन्माला आलो तो, आणि
जेव्हा कळतं
जन्माला का आलो तो!
खरंच असं असतं का?
खरंच असं का असतं??
उत्तरं नाहीत...

तीन प्रश्न नेहमीचेच-
कुठून आलो?
का आलो?
कुठे चाललो?
यांची उत्तरं शोधायची का?
यांची उत्तरं का शोधायची??
उत्तरं नाहीत...

एकजण म्हणला,"तुझे विचार भुक्कड आहेत"
दुसरा म्हणला," तू मुळातच मद्दड आहेस"
तिसरा म्हणला," तू भोंदूच नाहीस,
तर कमअक्कलही आहेस"
"छे छे माझ्या मते तर तू
अगदी अस्सल आहेस,"
चौथा उद्गारला.
माझे फक्त चौथ्याशीच पटते,
प्रत्येकाचं असंच असतं का?
प्रत्येकाचं असंच का असतं??
उत्तरं नाहीत...

डोक्यातले शेकडो प्रश्न,
मी नेहमीच निरुत्तर होतो.
प्रश्नांच्या समुद्रात डुंबत राहतो,
पण तरीही,
कधीच,
उत्तरं नाहीत...

तन्मय कानिटकर
२५/०६/२०११