Sunday, March 28, 2010

देव...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम नुकताच झाला. परिवर्तन या आमच्याच संस्थेने तो आयोजित केला होता. या निमित्ताने पुन्हा एकदा डोक्यात श्रद्धा-अंधश्रद्धा, देव संकल्पना, वैज्ञानिक दृष्टीकोन, अध्यात्म या सगळ्या विचारांचे वादळ उठले.
शाळेत असताना इतर असंख्य मुलांप्रमाणेच मीही "देव नाही" अशा मताचा झालो होतो... पुढे पुढे जस जसा मोठा झालो, विचार करू लागलो तस तसा मी देव ही "संकल्पना" म्हणून मान्य करू लागलो. "मनाला बरं वाटावं, मानसिक आधार" म्हणून माणसाने देव या संकल्पनेची निर्मिती केली असा माझा ठाम विश्वास तयार झाला. मी निसर्गाला देव म्हणू लागलो कारण 'संपूर्ण विश्वाची गती आणि उर्जा' म्हणजेच देव आशी मी देवाची व्याख्या केली. आणि त्यानुसार निसर्ग हाच देव असे मी ठरवले. पण मग जेव्हा मी अशा काही लोकांच्या संपर्कात आलो की जे मला सांगत होते की अरे हे सगळं विज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व काही चालू आहे. उत्क्रांतीवादाच्या नियमाप्रमाणे आपण तयार झालो आहोत..... देव वगैरे सगळं काही झूट आहे....तेव्हा मी विचारात पडलो...
पण मग असा लक्षात आलं की "उर्जेचे स्वरूप बदलता येते पण, उर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही" हा भौतिकशास्त्रातला नियम आहे... मग सगळं भौतिकशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीनी चालू आहे असं असलं तरी सुरुवातीला जी प्रचंड उर्जा या विश्वात तयार झाली असेल ती "तयार" कोणी केली??? कोणत्याही सामान्य मानवाचे तर हे काम नक्कीच नाही.... आणि म्हणूनच या विश्वाच्या आणि उर्जेच्या निर्मात्याला, म्हणजेच निसर्गाला देव असे म्हणावे असे मी ठरवले...
देव आहे हे ठरलं पण पुढे प्रश्न आला श्रद्धेचा.... श्रद्धा व्यक्त कशी करावी? मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार करून "सगळं नीट होऊ दे रे बाबा!" असं म्हणणं म्हणजे श्रद्धा बाळगणं का?? हे मला पटेना... देवाबद्दल आणि माहित नसलेल्या त्या प्रचंड उर्जेच्या निर्मात्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे, आदर आहे... पण ती व्यक्त कशी करावी हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे असे मला वाटू लागले.
आणि इथेच मी माझ्या दुसऱ्या मताची आणि नव्याने तयार तिसऱ्या मताची सांगड घातली. मनाला बरं वाटेल मानसिक समाधान मिळेल अशा कोणत्याही मार्गाने श्रद्धा ठेवायला निसर्ग देव परवानगी देतो असे माझे ठाम मत बनले. शिवाय देव हा मूर्तीत शोधायची गरज नाही तो प्रत्येक गोष्टीत आहे या संतांच्या भूमिकेचा मी माझ्या परीने जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीत उर्जा आहे, गती आहे... आणि म्हणूनच त्यांचा निर्माताही सृष्टीत सर्वत्र आहे... आणि सर्वत्र म्हणजे माझ्यातही आहे....
इथेच माझ्या अध्यात्मावरच्या विचारांची सुरुवात झाली. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणूस त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या १०-१६ टक्केच भाग वापरतो.... आईनस्टाइन त्याचा मेंदू इतर कोणत्याही मानवापेक्षा जास्त म्हणजे १६ टक्क्यांपर्यंत वापरायचा असं आधुनिक शास्त्र सांगतं... वैज्ञानिक पद्धतीनी सिद्ध झालेली ही गोष्ट....! असं असताना जी गोष्ट वापरात नाही ती गोष्ट उत्क्रांत्वादाच्या नियमाप्रमाणे नष्ट व्हायला हवी होती..... "होमो इरेक्तस" नावाचा मानव अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा होता... तो उत्क्रांत होत होत आजचा "होमो सेपियन सेपियन" हा हुशार मानव तयार झाला. पण मानावांमधील सगळ्यात हुशार मानव जेमतेम १६ टक्के मेंदू वापरात असेल तर उर्वरित ८४ टक्के मेंदू, माणसाची शेपटी जशी वापर नसल्याने नष्ट झाली तसाच नष्ट व्हायला हवा होता. पण तसे गेल्या हजारो वर्षात घडलेले नाही. काय कारण असेल याचं? माणसाचा उरलेला ८४ टक्के मेंदूही कार्यरत असणार आणि म्हणूनच तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत टिकून आहे..!! पण ८४ टक्के मेंदू काय काम करतो याचं उत्तर आधुनिक विज्ञान अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही. माझ्या मते, तो उर्वरित ८४ टक्के मेंदू म्हणजेच जो प्रत्येक माणसात आहे असे आपण म्हणतो तो देवाचा अंश. तो देवाचा अंश प्राप्त करण्यासाठीच, ती प्रचंड अशी अध्यात्मिक अनुभूती मिळवण्यासाठीच लोक जीवाचा आटापिटा करतात... कारण आत्ता वापरतो त्यापेक्षा पाचपट जास्त मेंदू वापरता आला तर ती उर्जा केवढी प्रचंड असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही.

अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित करण्याचा प्रयत्न आहे असे माझे ठाम मत आहे. त्यासाठी आपल्या वेदांमध्ये योग साधना सांगण्यात आली संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. योग काय किंवा नाम स्मरण काय, त्याचा मूळ गाभा एकंच आहे असे नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. याचा मूळ गाभा आहे आपल्या शरीरातली सर्व उर्जा एखाद्या ठिकाणी केंद्रित करणे... स्वामी विवेकानंद ध्यानमग्न अवस्थेत जेव्हा बसायला सांगतात तेव्हा त्याचा अर्थ असतो निस्तब्ध बसून अंगातली सारी उर्जा केंद्रित करणे....आणि त्यामुळेच अनेकांना जी अध्यात्मिक अनुभूती येते ती केवळ त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झाल्यामुळे येत असली पाहिजे असं मला वाटतं. अनेकदा आपण पाहतो/ऐकतो की संत साधू हे वासना लोभ या "सर्वांपलीकडे" गेलेले असतात.... याचा अर्थ काय? याचा अर्थ असं आहे की त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झालेला असल्यामुळे त्यांना, सामान्य १६ टक्के मेंदूच्या माणसाला ज्या वासना, इच्छा आकांक्षा असतात त्या शिल्लकच राहिलेल्या नसतात. ते १६ टक्क्यांच्या पलीकडे गेलेले असतात...!!!!

बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे शरीर हे मेल्यावरही कुठल्या न कुठल्या स्वरुपात शिल्लक राहते (वैज्ञानिक दृष्ट्या हे पटते. कारण शरीर म्हणजेही एक प्रकारची उर्जाच!! ), म्हणजेच मेल्यानंतर माणसाच्या शरीरातील उर्जेचे रूप बदलते आणि माणूस विश्वातल्या विविध उर्जांमध्ये विखुरला जातो त्यालाच आपण देवाघरी जाणे म्हणतो कारण देव सर्वत्र आहे, कुठल्याही उर्जेत जरी मनुष्याचे शरीर गेले तरी ते देवाचेच म्हणजेच त्या माहित नसलेल्या प्रचंड उर्जेचेच घर असते....!!! ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित केलेल्या व्यक्तीस आधीच देवाचा म्हणजेच उर्जेचा साक्षात्कार झालेला असतो, अशा वेळी जगातल्या इतर उर्जेत विलीन होण्याचे भय या लोकांना का बरं वाटेल??? आणि म्हणूनच त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही... त्यांनाच आपण संत म्हणतो!!!!

परंतु १६ टक्क्यांच्या पलीकडे जाणारे/जाऊ शकणारे फारच थोडे असतात. आणि म्हणूनच १६ टक्के बुद्धिमत्ता असलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी धर्म संकल्पना आणली... आणि त्याबरोबरच देव ही कोणतीतरी बाह्य गोष्ट आहे आणि तिला खुश केल्याने आपले जीवन सुकर होणार आहे अशी समजूत सामान्य माणसांनी करून घेतली. याच्यात अनेकांनी स्वतःचा फायदा कसा होईल ते बघितले. दुसऱ्यावर कुरघोडी करायच्या मानवी स्वभावानुसार स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी काही जणांनी नवीन धर्म तयार केले. प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये १६ टक्क्यांच्या पलीकडे पोचलेले काही लोक होऊन गेले. आणि त्यांच्या असं लक्षात आला की वेगवेगळे धर्म म्हणजे शेवटी शरीरातली सर्व उर्जा केंद्रित करायचे विविध मार्ग आहेत इतकंच... शेवट होतो तो एकाच ठिकाणी!!! आणि म्हणूनच ते म्हणू लागले "राम रहीम एक है..."

धर्माच्या नावाखाली जे काही अत्याचार केले गेले, नियम बनवले गेले ते केवळ आणि केवळ समाजातल्या एका गटाने दुसऱ्या गटावर वर्चस्व गाजवण्यासाठी...!! त्यामागे कोणतीही दैवी अशी गोष्ट नाही.

या संदर्भात थोडे वाचन केल्यावर मला असे जाणवले की पूर्वीपासून देव आकाशात राहतो असे मनात असल्यामुळे त्याला खुश करायचे तर आकाशात काहीतरी पाठवले पाहिजे असे आपल्या पूर्वजांना वाटू लागले, एखादी गोष्ट जाळली की धूर बनून आकाशात जाते ही गोष्ट पाहून आपल्या बुद्धिमान पूर्वजांनी देवासाठी विविध गोष्टी पाठवण्यासाठी यज्ञ करायला सुरुवात केली.... देवाला काय आवडते याचा स्वतःच काही विचार केला आणि त्या गोष्टींची आहुती ते यज्ञात देऊ लागले. अशा असंख्य विचारांमधून अनेक वर्षांच्या अनेक लोकांच्या मंथनातून आजच्या रूढी तयार झाल्या आहेत. त्या सगळ्याच उत्तम आहेत योग्य आहेत हे म्हणणं जितका मूर्खपणाचे ठरेल तितकंच या सगळ्याच गोष्टी टाकाऊ आहेत हेही म्हणणे मूर्खपणाचे आहे.
संपूर्ण मेंदू कार्यान्वयित झालेल्या लोकांना आपण इतर सामान्य लोकांचे आयुष्य सुधारावे असे वाटू लागले. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांना आता वापरता येत असल्यामुळे त्यांनी सामान्य लोकांना प्रभावित केले आणि काही चांगल्या गोष्टी "देवाची" भीती घालत करायला लावल्या. त्यामुळेच कित्येक रूढी परंपरांमध्ये आपल्याला विज्ञान आढळते... याचेच एक छोटेसे उदाहरण: गणपतीची किंवा कोणत्याही देवतेची आरती करताना कापूर का जाळायचा असा प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर आहे की कापूर जाळल्याने हवेतील जंतू-सूक्ष्मजीव मरतात..!! लोकांची मानसिकता ही लहान मुलांसारखी असते. रात्री दात घास असं सांगितलं की लहान मुलं ऐकत नाही, पण रात्री दात नाही घासलेस तर बागुलबुवा येईल असे सांगितल्यावर ही मुले दात घासायला उठतात. एखादी गोष्ट रोज करा असं सांगितलं तर किती लोक करतील? उलट ती नाही केली तर देव रागवेल अशी भीती घातल्याने लोक चांगल्या प्रथा अंगिकारतात असं संतांच्या लक्षात आलं. अर्थातच असंख्य भोंदू लोकांनी या सगळ्याचा फायदा घेतला आणि समाजाला व लोकांना हजारो वर्षे लुटले. आता हे सर्व थांबले पाहिजे. सर्व प्रथा रूढी परंपरा यांचा वैज्ञानिक दृष्टीने विचार व्हायला हवा, पण त्याचबरोबर प्रत्येकात असणाऱ्या देवाला नाकारण्याची चूक टाळण्याची दक्षता घ्यावी, वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालायचा प्रयत्न करावा असे मला वाटते.

सर्वात जास्त मेंदू वापरणारा मानव असं म्हणल्या गेलेल्या आणि विज्ञानावर परमभक्ती असणाऱ्या आईनस्टाइनने सुद्धा देवावर, देवाच्या अस्तित्वावर उघड विश्वास प्रकट केला होता.... आपण तर जेमतेम १० ते १५ टक्के मेंदू वापरणारे लोक आहोत.....!!!!!

Monday, March 22, 2010

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...!!!!!

शीर्षक वाचून हा एका राजकीय लेख असणार अशी खात्री तुम्ही बाळगली असेल. पण नंतर घोळ नको म्हणून आधीच ही गोष्ट स्पष्ट करतो की तुम्ही समजता तसला हा लेख नाही. सध्या पुणेकरांसमोर जो यक्षप्रश्न पडला आहे त्यावर उपाय आहे संयुक्त महाराष्ट्राचा!!! कोणता आहे हा यक्षप्रश्न???



थोडी पार्श्वभूमी: ३ वर्षांपूर्वी भारताच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएल सुरु करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये ८ शहरांचे संघ नक्की करण्यात आले. समस्त मराठी लोकांच्या निष्ठा मुंबापुरीच्या संघाकडे होत्या.... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यामुळे सगळ्याच मराठी जनतेची एकजूट झाली आहे असे राजकारणी लोक सांगतात त्याचे चित्र आयपीएल मधेही दिसले. क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडूलकर हा "मुंबई इंडियन्स" या संघाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करत होता... सलग ३ वर्षे महाराष्ट्राच्या या संघाची एकजूट दिसून आली.
पण हाय!! घात झाला..... इंग्रजांची फूट नीती वापरून आयपीएल च्या चालक मालकांनी महाराष्ट्रात फूट पाडली.... आणि पुण्यासाठी स्वतंत्र संघ देण्याची घोषणा केली.... इतकेच नव्हे तर ही फूट मजबूत करण्यासाठी "सहारा" कडून १७०० कोटी रुपयांची बोली पुण्यावर लावण्यात आली..!!! आता स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांना नागपूर संघ न देऊन चुचकारण्यात आले आहे.(खरंतर शरद पवारांनी स्वतंत्र विदर्भला केव्हाच पाठींबा दर्शवला आहे.) शिवाय एका "मोदी"(ललित) करवी दुसऱ्या "मोदी"(नरेंद्र) च्या राज्यातल्या अहमदाबादला आयपीएल मध्ये सामावून न घेत पवारांनी मोठीच राजकीय खेळी केली आहे असे म्हणावे लागेल ( दोन्ही मोदी भाजपशी संबंधित..!! काट्याने काटा काढण्यात पवार तरबेज आहेत!! )....!!!!!



आता पुणेकरांसमोर यक्षप्रश्न आहे तो म्हणजे आपला पाठींबा कोणाला द्यायचा?? गेली ३ वर्षे ज्यांनी आपले नेतृत्व केले त्या देवाच्या संघाला की पुणेरीपण दाखवत पुण्याच्या संघाला??? पुणेकरांचे पुण्यावर किती प्रेम आहे हे काही मी सांगायची गरज नाही.... पण प्रत्यक्ष देवाच्या विरोधात जायला पुणेकर कितपत तयार होतील याबद्दल मला चिंता आहे. आणि बाकीच्या वेळी ठीक आहे, सोयीस्कर पद्धतीनी पुणे किंवा मुंबई ला पाठींबा देता येईल, पण पुणे विरुद्ध मुंबई अशा सामन्याच्या वेळेस???
छे! छे!! पुण्याचा संघ निर्माण करून मुंबई ला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यात आले आहे असे माझे ठाम मत आहे.... सबब, पुण्याचा संघ रद्द करून आता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे आंदोलन नव्याने उभारावे लागेल आणि मुंबईसह सर्व महाराष्ट्रातून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो...!!! बाकी राज ठाकरे अद्याप या विषयात कसे पडले नाहीत ते कळत नाही. शिवाय उद्धवने तरी यात पडायला हवं, नाहीतर राज सारं श्रेय लुटून नेईल...आणि पुन्हा शिवसेनेवर नामुष्कीची वेळ येईल.....!!!!! अर्थात पुणेकरांसमोरचे ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायची राजकारणी लोकांना सवयच आहे.... त्यामुळे याही बाबतीत हे दुर्लक्ष करतील याबद्दल शंका नको...!!!
पुणेकरांनो जागे व्हा... संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढा द्या....
जय महाराष्ट्र...!!!!!

Sunday, March 21, 2010

मागणी तसा पुरवठा नाही....

मी जेव्हापासून परिवर्तन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय काम करायला लागलो आहे तेव्हापासून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे. ती म्हणजे लोकांमध्ये अशा कामांसाठी जसे कौतुक करायची वृत्ती आहे, तशीच "याने काय होणार" अशी निराशावादी वृत्तीही आहे. एकूणच सध्याच्या देशातल्या भयानक स्थितीमुळे पेटून जाऊन हे सगळं बदलायची इच्छा होण्याऐवजी उलट "कोणीतरी करायला पाहिजे" असा म्हणत आपापल्या कामात व्यग्र होणाऱ्यांचीच संख्या खूप जास्त आहे. सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे हे सगळ्यांनाच माहित आहे, मान्य आहे. अशा वेळी हि परिस्थिती बदलण्यासाठी जे प्रयत्न करायची गरज आहे त्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या फारच थोडी आहे. ही परिस्थिती बदलवणे, ही गोष्ट खूपच अवाढव्य अशी आहे. यासाठी जितक्या लोकांच्या सहभागाची आणि कार्याची आवश्यकता आहे ती संख्या पाहता सध्याची संख्या शून्य म्हणावी लागेल. थोडक्यात या कार्यासाठी जितकी मागणी आहे तितका पुरवठा नाही....
आणि मागणी तसा पुरवठा नाही म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमानुसार सगळी व्यवस्थाच कोलमडायची शक्यता निर्माण होते...अशा वेळी एकतर मागणी कमी करावी लागते किंवा पुरवठा वाढवावा लागतो. आता सध्याच्या परिस्थितीत तरी सुधारणा होणं शक्य दिसत नाही. म्हणजेच मागणी कमी करणा शक्य होणार नाही. तेव्हा पुरवठा वाढवायला हवा..... देशाच्या विकासाच्या दिशेने काम करण्यासाठी हजारो निष्ठावंत आणि तळमळीने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. सध्या हजारो तर सोडाच जेमतेम काही लोक प्रयत्न करताना आढळतात ज्यांची संख्या दोन आकड्यांच्या पुढे जात नाही.
थोडक्यात देश सुधारायचा असेल तर अलोट निष्ठेने आणि कष्टाने काम करणाऱ्यांची मोठी फौजच असली पाहिजे.
अनेक वर्षांपूर्वी अशा तरुणांची फौज निर्माण करायचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केला गेला. संघाच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल कोणीच काही बोलू शकणार नाही. मात्र त्यांच्या विचारसरणीमध्ये फारच दोष होते आणि आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे आणि कम्युनिस्ट संघटनांचे लोक अत्यंत तळमळीने, जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन कार्य करतात परंतु वास्तवाचे भान त्यांना नाही, त्यामुळे तळमळीने केलेलं प्रचंड काम वाया जातं. शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला वास्तवाचं भान आहे, राजकारणात त्यांचा हात धरणारा कोणी नाही... मात्र तत्वनिष्ठा...कर्तव्यनिष्ठा इत्यादी गोष्टींपासून ते दूर आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला ज्यांचे स्वदेश प्रेम हे संघ कार्यकर्त्यांप्रमाणे असेल, ज्यांची तळमळ आणि कार्य करण्याची इच्छा ही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसारखी समानतेच्या जोरावर उभारली असेल आणि ज्यांच्याजवळ देशाच्या दुश्मनांना नेस्तनाबूत करायचे शरद पवारांचे राजकीय कौशल्य आणि वास्तवाचे भान असेल अशा लोकांची फौज निर्माण करायची आहे....

हे अवाढव्य काम कोण एकट्या दुकट्याला पेलाव्ण्यासारखे नाही. मागणी एवढी आहे... कि पुरवठा आता तरी वाढवलाच पाहिजे.....!!!!