Saturday, December 8, 2018

आर या पार


‘नातं टिकवण्यासाठी नात्यात पारदर्शकता हवी’ हे किंवा असली वाक्य वापरून वापरून किती गुळमुळीत झाली आहेत, नाही का? पण तरीही, माणसामाणसांच्या नात्यात लपवाछपवी, अर्धसत्य, अपारदर्शकता हे प्रकार काही हद्दपार झालेले नाहीत. खोटं पकडायचा एक मार्ग शोधला की माणूस खोटं बोलण्याचे नवीन दहा मार्ग शोधतो. माणूस दुसऱ्याशी खोटं का बरं बोलतो?

गेल्या वर्षीच्या जूनमध्ये नॅशनल जिओग्राफिक मासिकाने कव्हर स्टोरी केली होती- ‘आपण खोटे का बोलतो?’. यात लेखक युधीजीत भट्टाचार्य म्हणतो की, ‘प्रामाणिकपणा हे चांगलं धोरण असलं तरी खोटं बोलणं हे अगदी मानवी आहे, नैसर्गिक आहे.’ रंग बदलणारे सरडे किंवा अंग फुगवून शत्रूला घाबरवू बघणारे मासे/प्राणी यांच्यासारखंच मानवामध्येही जगण्यासाठी, स्वतःच्या बचावासाठी फसवेगिरी (डिसेप्शन) करण्याची उपजतच वृत्ती असते. हार्वर्ड विद्यापीठाच्या नितीशास्त्राच्या तज्ज्ञ सिसेला बॉक म्हणतात, शारीरिक दृष्ट्या फसवेगिरी करणं किंवा बळाचा वापर करणं यापेक्षा भाषेच्या शोधानंतर खोटं बोलणं हा सोपा आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला! आपल्यातला खोटेपणा हा असा आदिम वृत्तीचा परिपाक आहे. पण मानवात आणि इतर प्राण्यांमध्ये फरक हाच आहे की, आपण आपल्या काही आदिम वृत्तींना काबूत ठेवत, मोठ्या संख्येने, सौहार्दाने एकत्र राहण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी ठरवल्या आणि त्यांचं पालन करायचं असंही ठरवून घेतलं. प्रसिद्ध लेखक युवाल नोआह हरारी या ठरवून घेण्याला ‘काल्पनिक वास्तव’ म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात नसणाऱ्या पण, अनेक व्यक्तींच्या एकत्रित कल्पनेत असणाऱ्या गोष्टी. धर्म, पैसा, देश या गोष्टी ‘काल्पनिक वास्तव या सदरात मोडतात. या काल्पनिक वास्तवातल्या गोष्टी नीट प्रत्यक्षात येण्यासाठी ‘परस्पर विश्वास’ हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. एक उदाहरण बघूया. भारतीय रुपया हे चलन आपण वापरतो. एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करायची तर खरेदी करणारी व्यक्ती आणि विक्री करणारी व्यक्ती या दोघांचाही भारतीय रुपया या चलनावर विश्वास असतो. त्यामुळे व्यवहार सुरळीत होऊ शकतो. अशा विश्वासावरच व्यापक व्यवस्था उभ्या राहिल्या. पण खोटेपणा, फसवेगिरी यामुळे विश्वासाला तडा जाऊन व्यवस्थाच ढासळण्याचा धोका असतो. कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्याला देखील हेच लागू होतं.

आपण अगदी सुरुवातीच्या, २० जानेवारीच्या, लेखात बघितलं होतं, नातं म्हणजे सामायिक अनुभव- शेअर्ड एक्स्पीरियन्स. दोन व्यक्ती जेव्हा कोणताही अनुभव एकत्र निर्माण करतात तेव्हा त्यांच्यात चांगलं/वाईट नातं निर्माण होतं. पण जेव्हा दोन व्यक्ती स्वतंत्रपणे वेगळे अनुभव घेत असतात तेव्हा, त्यांना त्यांच्यात सामायिक अनुभव निर्माण करण्याची संधी संवादामुळे मिळते. एकमेकांना एकमेकांचे अनुभव सांगितले की, या संवादामुळे सामायिक अनुभव तयार होऊन नातं निर्माण होतं. त्यामुळे अर्थातच, अधिकाधिक संवाद असणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात, किंवा एकमेकांच्या जवळ आलेल्या व्यक्तींना नातं मजबूत ठेवण्यासाठी, अधिक फुलवण्यासाठी संवादाची गरज भासते. ‘संवाद’ हे नात्याचं चलन बनू लागलं की ते चलन अधिकाधिक ‘खरं’ असलं पाहिजे हा आग्रह अवाजवी ठरत नाही. चलनावरचा विश्वास डळमळीत झाला तर नात्याचा पायाही डळमळीत होईल हे उघड आहे. याचमुळे ‘नात्यात पारदर्शकता हवी’ असं आग्रहाने मांडलं जातं.

अपारदर्शकता अविश्वासाला खतपाणी कशी घालते ते बघूया. जेव्हा अपारदर्शकता असते आणि हे समोरच्यालाही जाणवतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीचा मेंदू आपल्या क्षमतेनुसार त्या न दिसणाऱ्या, अपारदर्शक जागा भरू लागतो. गेल्या वेळच्या लेखात आपण  माहित नसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या जागा भरून काढण्याच्या मेंदूच्या करामतीविषयी थोडी चर्चा केली होती. एक उदाहरण देतो. एका मुलाच्या, त्याला आपण रोहन म्हणूया, विवाहसंस्थेत भरलेल्या फॉर्ममध्ये ‘ड्रिंकिंग’ या सवयीपुढे ‘कधीच नाही’ असं लिहिलं होतं. त्याचा तो फॉर्म बघणाऱ्या एका मुलीने, तिला आपण सानिका म्हणूया, रोहनचं फेसबुकवरचं प्रोफाईल बघितलं. तिला असं दिसलं की, फेसबुकवरच्या काही फोटोंमध्ये रोहनच्या हातात ग्लास दिसतोय. त्यातलं पेय दारूसारखं दिसतंय. आता या परिस्थितीत सानिकाच्या डोक्यात अनेक शक्यता येत जातात. रोहनने मुद्दाम खोटं लिहिलं असेल का? की त्याच्या पालकांनी खोटं लिहिलं असेल? की त्याने आणि त्याच्या पालकांनी एकत्र ठरवून हे खोटं विवाहसंस्थेच्या प्रोफाईलवर लिहिलं असेल? की त्याच्या पालकांना तो दारू पितो याचा पत्ताच नसेल? की त्याच्या हातातल्या ग्लासात व्हिस्की नसून अॅपल ज्यूस असेल? पुरेशी पारदर्शकता नसल्याने सानिकाच्या मेंदूने गाळलेल्या जागा भरताना असंख्य वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेतला. या डोक्यात येणाऱ्या शक्यतांना प्रतिसाद कसा द्यायचा हे माणसा-माणसाप्रमाणे बदलेल. पण मुद्दा हा की, डोक्यातल्या ‘शक्यतांच्या’ आधारे माणूस स्वतःचा प्रतिसाद ठरवू लागतो आणि प्रत्यक्ष काय आहे किंवा नाही, याची शहानिशा न झाल्याने कल्पनेतल्या शक्यतांनाच वास्तव मानून वागू लागतो. त्या व्यक्तीसाठी तेच काल्पनिक वास्तव बनतं. पण इथे कदाचित रोहन आणि सानिका या दोघांचं वास्तव वेगळं असल्याने अविश्वास आणि बेबनाव निर्माण होतो. अशावेळी नातं निर्माण होणं आणि पुढे टिकणंही कठीणच.

यावर उपाय काय? अर्थातच, नात्यांत जितकी जास्त पारदर्शकता ठेवता येईल तितकी ठेवावी, हे तर आहेच. पण तत्पूर्वी, पारदर्शकता ठेवण्यासाठी योग्य असं वातावरणही दोन्ही बाजूंनी निर्माण करावं लागेल. यासाठी मला एक त्रिसूत्री डोक्यात येते आहे- खोटं बोलण्याच्या अनेक कारणांमध्ये, समोरची व्यक्ती मला नीट समजून घेणार नाही या कारणाचा मोठा पगडा असतो. आधीचे अनुभव, ऐकीव गोष्टी यावर आधारित हा ‘समजून घेणार नाही’ हा निष्कर्ष काढलेला असतो. मला वाटतं, समोरच्याचा एम्पथी म्हणजे समानुभूतीने विचार करणं, त्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं, लगेच निष्कर्ष काढून लेबलं चिकटवून मोकळं न होणं ही पहिली पायरी असू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे मतभिन्नतेचा स्वीकार. ‘‘अ’ आणि ‘ब यांच्यात मतभिन्नता असू शकते’ या शक्यतेचा त्या दोन्ही व्यक्तींनी केलेला स्वीकार. मतभिन्नता असली म्हणजे थेट संघर्षाचा पवित्रा घेण्याची गरज नसते. दोन व्यक्ती मतभिन्नतेतूनही मार्ग काढू शकतात. किंबहुना दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा हे करतही असतो. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने अनेक मतं आणि विचार अस्तित्वात असूनही सौहार्दाने राहण्याची कला मानवप्राणी गेल्या हजारो वर्षात शिकला आहे. सामाजिक पातळीवर जे जमलं, ते व्यक्तिगत पातळीवरही अधिक प्रभावीपणे अंमलात आणणं शक्य आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे, समोरच्या व्यक्तीचा आहे तसा स्वीकार. हा स्वीकार नसेल तर पारदर्शकता न ठेवणं, आणि स्वीकारली जाईल अशी प्रतिमा उभी करत राहणं हेच आकर्षक वाटेल. यातून नात्यांत दांभिकता तेवढी निर्माण होईल. असं नातं टिकेल का? आणि टिकलं तरी फुलेल, बहरेल का?!

पारदर्शक नात्याची निर्मिती ही अशी दोन्ही बाजूंनी करावी लागते.  रानटी अवस्थेत जगताना फसवेगिरी (इंग्रजीत ज्याला ‘डिसेप्शन’ म्हणतात) हा इतर प्राण्यांप्रमाणेच मानवप्राण्याच्याही अस्तित्वासाठी महत्त्वाचा भाग असेलही, पण एकविसाव्या शतकात मात्र नेमकी उलटी परिस्थिती आहे. मानवी नातेसंबंधांच्या बाबतीत अधिकाधिक गुंतागुंतीच्या, डीसेप्टिव्ह म्हणजे फसव्या आणि क्लिष्ट रचनांनी बनलेल्या समाजात आपण राहत असताना, पारदर्शकता आणि माणसांतला परस्पर विश्वास ही आपल्या अस्तित्वासाठीच गरजेची गोष्ट आहे. अगदी ‘आर या पार’चीच लढाई आहे ही. पण समानुभूती (एम्पथी), मतभिन्नतेचा स्वीकार आणि प्रत्येकाचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर; या त्रिसूत्रीच्या सहाय्याने अधिक पारदर्शक, सौहार्दाचं आणि प्रगल्भ असं आयुष्य आपण जगू शकू असा माझा विश्वास आहे.

(दि. ८ डिसेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

No comments:

Post a Comment