Friday, May 17, 2024

नात्यातल्या ‘स्पेस’चं गौडबंगाल...

अपेक्षांबद्दल बोलताना कोणत्याही लग्नाळू मुलाकडून किंवा मुलीकडून बोलण्यात हमखास येणारा शब्द म्हणजे ‘स्पेस. नात्यात स्पेस देणारी व्यक्ती जोडीदार म्हणून सर्वांनाच हवी आहे. हे स्पेसचं गौडबंगाल नेमकं आहे काय? स्पेस देणं म्हणजे नेमकं काय हे मुला-मुलींना फार तपशीलांत नीट सांगता येत नाही आणि पालक तर याबाबत अजूनच गोंधळलेले दिसतात. पण हा मुद्दा जसा लग्नाआधी महत्त्वाचा आहे तसा कित्येक घटस्फोट प्रकरणांमध्येही प्राधान्याने बोलला जातो. आणि म्हणून लग्न टिकवणे आणि फुलवणे यासाठीही या ‘स्पेस’च्या विषयात खोलवर डोकवून गांभीर्याने बघणं आवश्यक आहे.

स्पेस म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर काही गोष्टी या फक्त माझ्या आणि व्यक्तिगत असू शकतात याला असणारी मान्यता आणि त्या गोष्टींसाठी अवकाश. आता या ‘काही गोष्टीं’मध्ये काय काय येतं? दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा ते एक प्रकारे स्वतःकडे असणारे स्रोत (रिसोर्सेस) वाटून घेण्याचं, शेअर करायचं ते मंजूर करतात. यात वेळ, ऊर्जा, माहिती, पैसा आणि प्रत्यक्ष स्पेस म्हणजे जागा (घर) या प्राथमिक गोष्टी झाल्या. समाजातलं एकमेकांचं, एकमेकांच्या कुटुंबांचं नेटवर्क, गुडविल हे रिसोर्सेसही वाटून घेतले जातात. पैसा आजपेक्षा उद्या जास्त-कमी मिळू शकतो, घर आज आहे त्यापेक्षा उद्या मोठं असू शकतं, ऊर्जा देखील मन आणि शरीराच्या तंदुरुस्तीनुसार वर खाली होऊ शकते. पण वेळ? ती एक गोष्ट अपरिवर्तनीय आहे. सर्वांसाठी दिवसाचे २४ तासच आहेत. वेळ नावाचा स्रोत मर्यादित असल्याने असेल कदाचित, पण ‘स्पेस बाबतच्या बहुसंख्य चर्चा एकमेकांना द्यायचा वेळ आणि स्वतःसाठी घ्यायचा वेळ या मुद्द्यांपाशी येऊन थांबताना मला दिसतात. पूर्वीच्या काळी स्त्री-पुरुष दोघांनाही व्यक्तिगत स्पेस किंवा प्रायव्हसी नावाचा प्रकार फारसा उपलब्ध नव्हता. जरा सुखवस्तू घरांमध्ये पुरुषांना ही चैन थोडीफार तरी उपलब्ध होती, स्त्रियांची मात्र सरसकट मुस्कटदाबी होती. विसाव्या शतकापासून हे चित्र टप्प्याटप्प्याने बदललं आणि एकविसाव्या शतकात तर खूपच बदल झाला. गेल्या शंभर वर्षांत ज्या प्रकारे अर्थकारणाने गती घेतली, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कामासाठी घराबाहेर पडू लागल्या, तशी स्वतःच्या पैशाबाबत, स्वतःच्या वेळेबाबत स्वतःहून ठामपणे निर्णय घेण्याची स्त्री-पुरुष दोघांचीही ऊर्मी बळावली. त्यातूनच स्पेस देणाऱ्या जोडीदाराची अपेक्षा डोकावू लागली.

‘आता माझा सगळा वेळ तुझा, आणि सगळं एकत्र करू’ अशा कितीही आणाभाका लग्न करताना घेतल्या तरी व्यवहारात असं थोडीच होणार आहे? नोकरी, व्यवसाय असो किंवा अगदी घरगुती कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं असो; नवरा-बायको काय सदैव एकत्र नसतात. पण त्याबद्दल कोणी कधी आक्षेप घेत नाही. का नाही घेत? कारण तेच व्यावहारिक आहे हे सर्वमान्य आहे. पण काही गोष्टी या नवरा-बायकोने एकत्रच केल्या पाहिजेत अशी समजूत वर्षानुवर्षाच्या आपल्या मनावर ठसली गेलेली असते. ‘आणि ते नसेल तर लग्नच कशाला केलं?’ असा सवालही केला जातो. एक प्रकारे, त्या गोष्टी जोडप्याने एकत्र केल्या तरच त्यांच्या नात्याला अर्थ आहे असं मानलं जातं. गंमत अशी आहे की की यातल्या ‘त्या गोष्टींची यादी प्रत्येकाची वेगळी असू शकते. ती काळानुसार बदलते देखील! पूर्वीच्या काळी कॉफी शॉप मध्ये जाणं, हॉटेलात जाणं या गोष्टी आपल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात असा प्रघात होता. आता ते उरलेलं नाही. म्हणजेच माझ्याकडे असणारे वेळ आणि पैसे यातले थोडे रिसोर्सेस मी लग्नाचा जोडीदार सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करणं हे आधीपेक्षा आता जास्त सहज स्वीकारलं जातंय. किंवा लग्नानंतर काही वर्षांनी हळूहळू नवरा-बायको सदैव एकत्र राहायचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक गोष्टी एकमेकांशिवाय स्वतंत्रपणे करू लागतात. कालानुरूप नात्यांत झालेला हा बदल असतो. ही फक्त छोटीशी उदाहरणं दिली. पण यातून लक्षात येईल की स्पेसची मर्यादा एकदा ठरवली की काळ्या दगडावरची रेघ असा प्रकार नसतो. ती गोष्ट प्रवाही असते, बदलती असते, आजकालच्या भाषेत ‘Fluid’ असते. त्यामुळेच नुसत्या ‘मला स्पेस हवी’ या वाक्याला फारसा अर्थ नाही. आज प्रत्येक व्यक्तीला स्पेस आहेच. फक्त तुमची स्पेसची व्याख्या किती विस्तारलेली आहे हे बघायला हवं. आणि त्यासाठी मला स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं, ते का हवं आहे याची स्पष्टता हवी.

एकदा स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं आणि ते का हवं याची स्पष्टता आली की मग पुढचा फार महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे संवादाचा. एकविसाव्या शतकातली लग्न आधी असायची तशी सरधोपट असणार नाहीत. बदललेल्या जगातली नाती बहुरंगी, बहुढंगी आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच व्यक्ती व्यक्तीनुसार नात्यांच्या तऱ्हा बदलणार आहेत. पन्नास शंभर वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येकाचं काम ठरलेलं असायचं. तेच त्याने किंवा तिने करायचं ही रीत होती. अपवाद सोडून देऊ, पण रुळलेली वहिवाट हाच जगण्याचा मार्ग मानणारे बहुसंख्य होते. पण जगण्याच्या नवनवीन वाटा आजकालच्या पिढीने शोधल्या आहेत. यामध्ये नोकरी-व्यवसायाच्या वाटा तर आहेतच, पण मनोरंजनाच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, छंद-आवडी यातल्या आहेत. आता जेव्हा सरधोपट मार्ग सोडून आपण आडवाटेला लागतो तेव्हा अधिक कष्ट घ्यावे लागतात. कधी नवीन मार्ग तयारही करावे लागतात. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद. आपल्या जोडीदाराशी दिलखुलास, मनमोकळा संवाद साधून आपल्याला स्पेस हवी म्हणेज नेमकं काय हवं ते सांगणं, त्यावर समोरच्याचं मत ऐकणं, विचारांची देवाणघेवाण करणं; आणि या सगळ्यातून विश्वासाचा पाया रचणं. त्या पायावरच स्पेसचा डोलारा उभा असणार आहे. हे नात्याच्या सुरुवातीला एकदाच करून पुरेसं नाही. कारण आपण बदलतो! तुम्ही, मी, आपले जोडीदार, आपल्यातली प्रत्येक व्यक्ती ही दोन वर्षांपूर्वी होती तशीच्या तशी असत नाही. आपल्याला येणाऱ्या भल्या बुऱ्या अनुभवांमुळे, नवीन शिक्षणामुळे, बघितलेल्या-वाचलेल्या-ऐकलेल्या नवीन गोष्टींमुळे, वयामुळे आपण सतत बदलत असतो. आणि म्हणून संवादाची ही सगळी प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्याला पर्याय नाही.

संवादाला धरूनच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जोडप्याची प्रायव्हसी’. आपण वैयक्तिक बाबतीत खाजगीपणाविषयी बोललो. पण खाजगीपणा ही गोष्ट जोडप्यांना आणि कुटुंबांनाही लागू होते. म्हणेज एखाद्या जोडप्याने त्यांच्यातल्या किती आणि कोणत्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तींसमोर उघड करायच्या, लग्नानंतर निर्माण झालेल्या त्यांच्या दोघांच्याच ‘स्पेस मध्ये तिसऱ्या व्यक्तीला वा व्यक्तींना किती आतपर्यंत येऊ द्यायचं हे त्या दोघांनी एकमेकांशी संवाद साधून ठरवायला हवं. प्रत्येक नात्याची आपापली एक स्पेस तयार होत असते. नवरा-बायकोसारख्या जवळीक असणाऱ्या (intimate) नात्यांत हे अवकाश जपणं, निरोगी राखणं अत्यावश्यक असतं. एकमेकांचे आई-वडील, नातेवाईक, जवळचे मित्र-मैत्रिणी यांना आपल्या दोघांच्या स्पेसमध्ये किती येऊ द्यायचं याविषयी चर्चा व्हायला हवी. नवीन नात्यासाठी तर हे अधिकच महत्त्वाचं.  

‘स्पेस’ची अपेक्षा ही नजीकच्या गेल्या काही दशकांमधली असल्याने ‘ही सगळी आजकालच्या मुलांची थेरं/फॅड्स आहेत’ असं म्हणत पटकन टीकाटिप्पणी करण्याचा मोह आधीच्या पिढीतल्या अनेकांना होऊ शकतो. स्पेस मिळण्याची, व्यक्तिगत अवकाश जपण्याची शक्यता आणि संधी गेल्या काही दशकांत वाढली असली तरी माणसाची प्रायव्हसीची गरज आदिम आहे. अगदी प्राचीन इतिहासातही याविषयी मंथन झालेलं आढळतं. काय खाजगी मानावं आणि काय नाही याचे नियम आडाखे बदलत गेलेले दिसतात. आपण सामाजिक प्राणी असलो तरीही स्वतःबरोबर वेळ घालवण्याची आपल्याला आवड असते. आणि तो वेळ कसा घालवायचा हे फक्त आपण ठरवतो. कधीही कोणाला न दाखवता केवळ स्वतःपुरती कविता करणारी एखादी आजी आपल्याला माहित असते बघा! तेव्हा हे काहीतरी नवीन ‘फॅड’ नसून मानवी गरज आहे हे नक्की.

एकुणात ‘स्पेस’ या गोष्टीकडे थोडं खोलात जाऊन बघणं गरजेचं आहे. नात्यात आवश्यक वाटणारी स्पेस निर्माण करण्यासाठी दोघांमध्ये निकोप संवाद असेल, सहभाग असेल तर अशी स्पेस नात्यासाठी आणि अर्थातच व्यक्तीशः दोघांसाठीही वरदान ठरू शकते. तेव्हा याकडे ‘कुठली ही नवी ब्याद’ असं न बघता सकारात्मकपणे बघितलं पाहिजे.

(दि. ६ मे २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Thursday, May 9, 2024

‘अनुरूप’शी लग्न !

रूढार्थाने ज्याला ‘व्यावसायिक दृष्टी’ म्हणतात त्याचा लवलेशही माझ्या मूळ स्वभावात नाही. नफा-नुकसान दृष्टी, व्यवहारात फसवणूक न होण्यासाठी लागणारं चातुर्य (किंवा धूर्तपणा), गोष्टीचं बाजारमूल्य ओळखणं अशा व्यवसायाला आवश्यक गोष्टी स्वभावतः माझ्यात नाहीत. उलट मी एक स्वच्छंदी वृत्तीचा माणूस. आवडेल ते करावं, किंवा कधी एखाद्या सामाजिक प्रश्नाला भिडावं आणि त्यात मनसोक्तपणे वाहवत जावं अशी वृत्ती. त्यामुळे ‘अनुरूप विवाहसंस्था’ या घरच्या १९७५ पासूनच्या व्यवसायात मी पडेन असं बिलकुल माझ्या डोक्यात नव्हतं. पण आयुष्यात एका टप्प्यावर माझ्या असं लक्षात आलं की मला माणसांमध्ये आणि माणसांशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे! लग्न हा माणसांच्या आणि विशेषतः भारतीय माणसांच्या आयुष्यातली एक फार मोठी घटना असते. आणि अशा विषयात काम करायची संधी अनुरूपमुळे मिळू शकते एवढा एक विचार मला अनुरूपमध्ये खेचलं जाण्यासाठी पुरेसा होता. अर्थात आपली आवड आणि आपली कौशल्ये याचा मेळ साधला तरच यश हाती लागू शकतं. आवड म्हणून अनुरूपमध्ये आलो खरा, पण कौशल्यांचं काय?

सुदैवाने माझ्या खात्यात दोन-तीन जमेच्या गोष्ट होत्या. २००८ मध्ये, कॉलजमध्ये असताना आम्ही काही मित्रांनी परिवर्तन या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून सातत्याने चालू आमच्या सामाजिक-राजकीय कामामुळे एक व्यापक दृष्टीकोन तयार व्हायला मदत झाली होती. माझं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर काही काळ स्वतःचं स्वतंत्रपणे काम मी केलं. त्यानंतर एका सामाजिक क्षेत्रातल्या सल्लागार कंपनीत नोकरी केली. नोकरीतली ही दोन वर्षं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ९ ते ५ अशी साचेबद्ध नोकरी मी कधीही करणार नाही असं म्हणणारा मी नोकरीला लागलो कारण कंपनी सामाजिक क्षेत्रातली होती, म्हणजे माझ्या आवडीचा विषय. पण तरी ती ‘नोकरी होती. स्वच्छंदी वागण्याला मर्यादा होत्या. या नोकरीमुळे आपोआप माझ्यात शिस्त आली. ठरलेला दिनक्रम असल्यावर एक सहज लय येते आयुष्यात, तसं झालं. दुसरा मोठा फायदा झाला तो ‘सल्लागार’ कंपनीत काम केल्याचा. अशा कंपन्यांमध्ये एखाद्या विषयावर किती तास, किती मिनिटे काम केलं यानुसार कामाचं शुल्क क्लायंट कडून घेतलं जातं. याचा अर्थ असा तुमचं कंपनीसाठी असणारं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे आणि त्यात तुम्ही किती काम करू शकता यावर तुमची कार्यक्षमता ठरणार आहे. शिवाय ते काम कारकूनी पद्धतीचं नाही. सल्लागार नात्याने कामाचा दर्जाही घसरून चालणार नाही. दर्जा न खालावता, स्वतःच्या सर्वोत्तम कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धतशीर शिकवण त्या दोन वर्षात मला मिळाली. मी थेट अनुरूपचं काम करायला लागलो असतो तर हे कधीही शिकलो नसतो. व्यवसायिक वृत्तीकडे जाण्याची सुरुवात नोकरीपासून झाली ती अशी!

माझ्या कामाची सुरुवात झाली ती डॉ गौरी कानिटकर म्हणजे माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली. अगदी लहानपणापासून, म्हणजे माझी आजी कार्यरत होती तेव्हापासून मी अनुरूपचं काम बघत आलो आहे. कॉलेजात असताना मी अनुरूपच्या वेबसाईटवर प्रोफाइल्स अपलोड करण्याचं काम करायचो, ज्याचे मला ५ रुपये प्रतिप्रोफाईल असे पैसे आईबाबा द्यायचे. तोच माझा पॉकेट मनी असायचा. त्यामुळे अनुरूपचं काम चालतं कसं याची मला माहिती होती. २०१४ मध्ये मी अनुरूपच्या कामाला लागलो तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. मित्र-मैत्रिणींच्या घरी लग्नाबद्दल बोलणं चालू झालं होतं, त्यातले काहीजण अनुरूपचे सदस्य झालेही होते. त्याचा मला फारच फायदा झाला. अनुरूपकडून किंवा कोणत्याही विवाहसंस्थेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे मला अगदी सहज कळत होतं. नुसती माहिती मिळत होती असं नाही तर त्याच वयात मी असल्याने मला ते म्हणणं अधिक नीट समजतही होतं.

या सगळ्या गोष्टी विचारांत घेऊन काही महत्त्वाचे बदल अनुरूपच्या कामात करावेत असं मला वाटत होतं. विशेषतः कामकाजाच्या पद्धतीत. आपण नवीन असतो तेव्हा आपण धडाधड निर्णय घेऊन गोष्टी बदलून टाकू असं वाटत असतं. तो उत्साह महत्त्वाचा असला तरी त्याला तारतम्याची जोड द्यावी लागते, हे तेव्हा कुठे कळत होतं! सुरुवातीच्या काळात माझे माझ्या आईशी (म्हणजे माझ्या बॉसशी!) असंख्य छोट्या मोठ्या गोष्टीवरून खटके उडायचे. कामकाजाच्या अनेक जुन्या पद्धतींवर मी कडाडून टीका करत तुटून पडायचो अगदी. पण हळूहळू अनेक गोष्टी ‘अमुक पद्धतीनेच का केल्या जातात’ यामागचा विचार माझ्या लक्षात येऊ लागला. कारणमीमांसा लक्षात आली. आणि त्याचवेळी त्या कारणमीमांसेला विचारात घेऊनही नवीन काही बदल आम्ही केले. आधीच्या पिढीतली आई आणि तरुण पिढीतला मी; या दोघांच्या विचारातून मध्यममार्ग काढले, जे कंपनीसाठी सर्वोत्तम होते. यात कोण किती पावलं मागे आलं हा मुद्दा दुय्यम ठरू लागला; पहिल्या वर्ष-दोन वर्षांच्या काळातच एकदा ही दिशा नक्की झाल्यावर पिढी वेगळी असूनही एकत्र काम करताना अडचण येईनाशी झाली. यात माझ्या मोठ्या भावाचं- अमेयचंही योगदान आहे. अनुरूपची पहिली वेबसाईट अमेयनेच बनवली होती आणि आजही तो अमेरिकेत राहून अनुरूपच्या टेक्निकल कामाचं नियोजन बघतो. त्याच्या जागतिक दृष्टिकोनामुळेही आमच्या कामाला अधिक चांगली दिशा येत गेली. आजही आम्हा तिघांमध्ये मतभेद होत नाहीत असं नाही. पण मार्ग काढला जातो, जो अंतिमतः अनुरूपच्या आणि अनुरूपच्या सदस्यांच्या भल्याचा विचार करून घेतलेला निर्णय असतो. गेल्या वर्षी आम्ही गुजराती भाषिकांसाठीही अनुरूप सुरू केलं आणि आजी-आई-बाबा या सगळ्यांनी अनुरूपमध्ये केलेल्या डोंगराएवढ्या पायाभूत कामाचा पुन्हा प्रत्यय आला. प्रस्थापित व्यवसायात येऊन प्रयोग करणं तुलनेने सोपं असतं. पण गुजरात माझ्यासाठी नवीन होतं. इथे सगळ्या जुन्या-जाणत्यांचा अनुभव पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरला!  

माझं पदव्युत्तर शिक्षण मिडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज् यातलं असल्याचा थेट फायदा झाला आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून अनुरूपच्या मार्केटिंगची सूत्र हातात घेतली. एकविसाव्या शतकात अनुरूपचं ब्रँडिंग कसं असावं याविषयी आम्ही असंख्य वेळा चर्चा केली. आई आणि बाबा या दोघांनी अनुरूपचं काम करताना नुसतं वधू-वर सूचक मंडळासारखं काम करण्यापेक्षा एक सर्वसमावेशक विवाहसंस्थेसारखं काम करण्याचा ध्यास घेतला. दोघंही समुपदेशक म्हणून काम करायचे, आईने पुढे यातच तिचा अभ्यास वाढवून थेट पीएचडी देखील केली. मला वाटू लागलं की हे सगळं ब्रँडिंगमध्ये उतरलं पाहिजे. नुसता जोडीदार शोधून देण्यापेक्षा तुमचं लग्न टिकावं, फुलावं यासाठी अनुरूपकडून जे काम केलं जातं ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अनुरूपचा विचार लोकांपर्यंत पोहचवू हे डोक्यात ठेवून, गेली दहा वर्षं अनुरूपचं ब्रँडिंग केलं गेलं आहे. पारंपारिक जाहिरातींपासून ते सोशल मिडिया रील्स पर्यंत प्रत्येक माध्यमाचा मी खुबीने वापर केला. त्याचा फायदा असा झाला की पालक पिढीचा अनुरूपवर असलेला विश्वास तर अबाधित राहिलाच, पण नव्या पिढीला अनुरूपची एक वेगळीच ओळख झाली. “अरेंज्ड मॅरेज म्हणजे काहीतरी बुरसटलेले, जुने, कालबाह्य” अशी संकल्पना असणाऱ्या नव्या पिढीला त्यांचेच विचारही अनुरूपच्या मंचावर ऐकायला मिळाले तेव्हा दोन्ही पिढ्यांमध्ये सेतू बांधला गेला. मला वाटतं अनुरूपच्या ब्रँडिंगचं हे सर्वात मोठं यश आहे.

अनुरूपचे आगळेवेगळे कार्यक्रम ही अनुरूपची खासियत असली तरी त्यांची संख्या वाढवण्याची गरज होती. मी त्यावर भर दिला. अनुरूपचे काही मोजक्या शहरात वर्षाला जेमतेम १५ कार्यक्रम होत असत. आज जगातल्या भारत-अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलिया या चार देशातल्या २५ शहरांत मिळून वर्षभरात १०० पेक्षा जास्त कार्यक्रम होतात. लवकरच जर्मनी आणि इंग्लंड इथेही हे कार्यक्रम मी नेणार आहे. ऑनलाईन कार्यक्रमांची सुरुवात कोविड दरम्यान झाली आणि आता कोविडनंतरही ते सुरू आहेत! बहुतांश कार्यक्रम हे मुला-मुलींसाठी असल्याने आणि मी त्याच पिढीचा प्रतिनिधी असल्याने, त्यांना काय रुचेल-पटेल-आवडेल याचा विचार मला करता आला आणि त्यानुसार कार्यक्रमांची रचना बदलली. शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा चांगलाच फायदा मला आज अनुरूपचे कार्यक्रम घेताना होतो! 

जो अडसर सुरुवातीला मी आणि माझ्या आईसाठी होता तोच, अनुभव आणि पिढीचा अडसर मी आणि अनुरूपमधल्या माझ्या सहकाऱ्यांमध्येही होता. घराणेशाहीचा फायदा घेऊन थेट डोक्यावर कोणीतरी येऊन बसणार हे कोणालाच फारसं आवडत नाही. इथे मी नवखा अननुभवी तरुण थेट संचालक म्हणून पदावर आलो होतो. तर दुसऱ्या बाजूला आईबाबांच्या बरोबरीने कंपनी मोठी करण्यात योगदान दिलेल्या सहकारी. माझी आणि आईची कामाची पद्धतही अनेक बाबतीत अगदी परस्परविरोधी असल्यानेही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्यांचं मला मोलाचं सहकार्य मिळत आलं आहे. माझ्या कधी अप्रगल्भ वागण्यालाही समजून घेतलं आहे. एकमेकांकडून शिकत आमची सगळी उर्जा कंपनी मोठी करण्यात आम्ही लावतो आहे. आज दहा वर्षांनी मागे वळून बघत मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं खरंतर लग्न म्हणजे वेगळं काय असतं? व्यक्तीबरोबर कुटुंबाशीही लग्न होतं. वेगवेगळ्या पिढीचे लोक एकत्र येतात. आचारविचारांची देवाणघेवाण होते. कधी खटके उडतात, वादही होतात. पण त्यावर आपण तोडगे काढतो, दोन्ही बाजू अहंभाव सोडून दोन दोन पावलं पुढे येतात आणि गुण्यागोविंदाने नांदतात. जरी कुटुंबातला व्यवसाय असला तरी अनुरूपच्या कुटुंबात येताना मी एक प्रकारे बाहेरूनच लग्न होऊन आलो होतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून जाणं टाळता येण्यासारखं नव्हतं बहुतेक. अनुरूपचं काम करताना कंपनी मोठी होण्याबरोबर मीही प्रगल्भ झालो, अनेक गोष्टी शिकलो. आधी होतो त्याहीपेक्षा मी अधिक चांगली व्यक्ती बनलो. कोणत्याही नात्याकडून हेच तर अपेक्षित असतं ना!

(दि.२९ एप्रिल २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)