Friday, December 17, 2010

खरेखुरे स्वातंत्र्य...

आजूबाजूला पाहिलं की मला नेहमी जाणवतं की,  आपण सगळेच.... तुम्ही, मी, आपले नातेवाईक, मित्र, ओळखीचे आणि अनोळखी लोकही...सगळेच गुलाम आहोत. ही गुलामी आपणच आपल्यावर लादून घेतली आहे... स्वखुशीने...!!! पिढ्यान पिढ्या अशा प्रकारची गुलामगिरी करायची सवयच जडली आहे आपल्याला. ब्रिटीश लोकांपासून भारत स्वतंत्र होणे, गोऱ्या लोकांच्या वर्चस्वातून काळे स्वतंत्र होणे, तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या जाचातून अस्पृश्य समाज स्वतंत्र होणे, सरकारी बंधनातून आर्थिक व्यवस्था मुक्त होणे इ.इ.सर्व स्वातंत्र्याच्या गोष्टी आपण वाचतो, पाहतो, अनुभवतो. यासगळ्याहून भयंकर अशा गुलामगिरीत आपण आहोत हे वास्तव आपण पार विसरून गेलो आहोत...

"भाऊ, राजसाहेबांनी सांगितलंय... तस्सच करणार आपण..", नाक्यावरचा पक्या.
"अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला बलिष्ठ करायचं स्वप्न ठेवलंय आपल्यासमोर. त्यानुसार मी काम करतो.", सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता वैभव.
"ऑर्डर आली की गोळी चालवायची हे माझं काम", सुभेदार सिंग.
"मी सांगतोय तसच वागायचं, यावर एक शब्दही चर्चा नकोय.", श्रीयुत कुलकर्णी आपल्या १८ वर्षीय मुलाला उद्देशून.
"त्या मुलीला भेटायचं नाही म्हणजे नाही.", प्रेयसी आपल्या प्रियकराला.
"आमच्या गुरूंनी सांगितलं आहे असं करायचं.", शास्त्रीय नृत्यशिक्षण घेणारी एक मुलगी.
" पिंडाला कावळा शिवला पाहिजे", भटजीबुवा ओंकारेश्वराच्या घाटावर.
"मुसलमानांना मारला पाहिजे.", एक हिंदू.

वरची सगळी वाक्ये बारकाईने वाचा.. काय दिसतंय? मला तर या सगळ्यातून गुलामगिरी दिसत आहे... शुद्ध गुलामगिरी...वैचारिक गुलामगिरी...
आपण विचार करायचे विसरलो आहोत का??? आपला मेंढ्यांचा कळप का झाला आहे??? आपण कोणाचे तरी गुलाम होण्यासाठी एवढे आसुसलेलो का आहोत?? कायम आपल्याला राजसाहेब, कलाम किंवा गुरु का हवा आहे?


 "अनुयायित्व" या बंधनात आपण सगळे अडकून पडलो आहोत. अनुयायी होणं म्हणजे काय? गुलामगिरी पत्करणं... समर्पित होऊन जाणं...स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट करणं, स्वतः विचार करण्याचा नाकारणं... यामध्ये माणूस स्वतःची सुटका करून घेतो. मानवी मनाला जबाबदारी नको असते. एखादी गोष्ट समोरचा सांगतोय म्हणून करण्याने जबाबदारी कमी होते. गांधी म्हणले की स्वदेशी वापरा म्हणून मी खादी वापरणार, सावरकर म्हणले धर्माला वाचवा की चालले धर्माला वाचवायला, स्वतःहून विचार करण्याचे टाळणे हा अनुयायीत्वाचा सगळ्यात मोठा दोष आहे. अनुयायीत्वामुळे कट्टरता येते, उच्च-नीचता येते, योग्य-अयोग्यता येते. अमुक अमुक विचारसरणी योग्य आहे म्हणून सर्वांनी तीच अनुसरली पाहिजे असा आंधळा आग्रह वाढीस लागतो. माणसाला जबाबदारी टाळण्यासमोर स्वतःच्या स्वातंत्र्याचीही फिकीर राहत नाही. आणि आता तर शेकडो वर्षांच्या या पारतंत्र्यामुळे आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीवच माणूस विसरून गेला आहे. त्यामुळे माणसाला खरोखरीचा विकास साधायचा असेल तर आधी स्वतंत्र व्हावे लागेल. स्वतंत्र याचा अर्थ समाजात न राहणे असा नव्हे. उलट या वैचारिक स्वातंत्र्याने समाज अधिक प्रगल्भ व्हायला मदत होईल.

दंगलींच्या वेळी माझे आयुष्यात काहीच बिघडवले नाही अशा व्यक्तीला मी केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यामुळे ठार करायलाही तयार होतो. माझ्या नेत्याविरोधात कोणी मतप्रदर्शन केले तर त्या माणसाचे डोके फोडायला मी मागे पुढे बघत नाही. माझ्या गुरूंची कोणतीही कृती मला वंदनीयच वाटते. माझ्या अध्यात्मिक गुरूने सांगितले तस्सेच मी वागायचा प्रयत्न करतो. मग ते किती का मूर्खपणाचे असेना.

जसे एखाद्या व्यक्तीचे अनुयायित्व असते तसेच ते देशाचेही असते. पाश्चिमात्य देशांचे अनुयायित्व आपल्या समाजातील काही घटकांनी घेतले आहे. पण त्याचवेळी सनातन धर्माचे अनुयायित्व घेतलेले लोक त्या घटकांना विरोध करतात. एकूणच या विरोधांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांना विरोध करतात. अनुयायीत्वामुळे दुसऱ्याला आदर देण्याची प्रवृत्ती कमी होते. माणसाला 'माणूस' म्हणून आदर द्यायला आपण केव्हा शिकणार आहोत???

या दोषांमुळेच कोणाचाही आणि कसलाही अनुयायी होणं मला साफ नामंजूर आहे. चाहता आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. मी अनेकांचा चाहता आहे. अनेकांमाधल्या अनेक विविध गुणांचा चाहता आहे. पण अनुयायी? मुळीच नाही. त्यामुळेच मी एकाच वेळी गांधींचा आणि सावरकरांचा चाहता असू शकतो. एकाच वेळी हिटलर आणि विन्स्टन चर्चिलचा चाहता असू शकतो. पण अनुयायी? त्यांच्यात कट्टरता असते. गांधींच्या अनुयायांना सावरकरांचं नाव काढलं तरी तिडीक येते. आणि गांधींचा विषय निघाल्यावर सावरकरवादी कडवटपणे बोलतात.

माणसाला माणूस म्हणून आदर देण्यासाठी प्रत्येकातील दोषांचाही आदर केला गेला पाहिजे. तरच तो खराखुरा आदर ठरू शकेल. एखादी व्यक्ती शंभर टक्के योग्य आणि अगदी परफेक्ट असूच शकत नाही. मग ते गांधी असोत सावरकर असोत किंवा हिटलर असो.
मी ज्या व्यक्तीचा अनुयायी आहे ती व्यक्ती चूक करूच शकणार नाही किंवा मी ज्या धर्माचा आहे त्यामध्ये काही चूक असूच शकत नाही, या भावनेतून केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यच दिसून येतं.

संतांनी कायम सांगितलं की देव नाही देव्हाऱ्यात, देव माणसात पहा. याचा अर्थ काय? एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून समोरच्या व्यक्तीला महत्व द्या, आदर द्या. धर्माच्या नावे कर्मकांड करत बसू नका. त्यावर त्यांच्या अनुयायांनी काय केलं? त्यांनी संतांना देवत्व बहाल केलं. आणि त्यांना देव म्हणल्यावर ते म्हणतील ते सगळं सत्य. मग एखादा आनंद यादव जेव्हा तुकारामांचं "माणूस"पण आपल्या कादंबरीतून दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा तुकारामांना देव मानणारे हजारो अनुयायी आनंद यादवांना बिनशर्त माफी मागायला लावतात. इतकेच नव्हे तर पुस्तकावर बंदीही येते. अगदी असंच घडतं शिवाजी महाराजांबाबत, आणि ज्याला अनुयायी आहेत अशा प्रत्येकाबाबत...


अनुयायित्व आपल्याला बौद्धिक दृष्ट्या पंगू करून सोडते.
आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतः विचार केला पाहिजे. इतरांचं लिखाण वाचलं पाहिजे, इतरांचे विचार ऐकले पाहिजेत, पण त्यावर स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. ज्या वेळी आपण वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त करू तेव्हा माणूस विवेक बुद्धीने काम करेल. आणि म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले व्यक्तिगत स्वरूपाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. अनुयायित्व नाकारून व्यक्तिगत स्वातंत्र्याचा लख्ख उजेड सर्वत्र पसरायला हवा.
माणूस म्हणून आपला विकास होण्यासाठी या स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे...

Monday, December 6, 2010

रद्दीचा महिमा...!!

"मला परिवर्तनचं काम करायची खूप इच्छा आहे रे. पण नोकरीमुळे शक्य नाही.", माझ्या एका मित्राने मला सांगितले.
"तू दर महिन्याला तुझ्या घरातली रद्दी दे. तेवढं करू शकलास तरी खूप मदत होईल.", माझ्या या उत्तरावर तो बुचकळ्यात पडला. "रद्दी?? त्याने काय होणार??" त्याला काहीच कळेना...
कोणत्याही सामाजिक संस्थेला दोन महत्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे उत्तम कार्यकर्ते आणि काम करण्यासाठी पैसे.
कोणतंही काम करायचं तर पैसे लागतातच.. परिवर्तनच्याही कामाला पैशाची गरज पडते. माहिती अधिकारात अर्ज दाखल करायचे असतात, येणाऱ्या माहितीसाठीचे पैसे द्यावे लागतात. कार्यक्रम असतात, पत्रकार परिषदा असतात, पोस्टर बनवायची असतात... एक ना अनेक गोष्टी. या सगळ्यासाठी पैसे गोळा करणे हा एक मोठा कठीण उद्योग असतो. त्यावर इतर काही सामाजिक संस्थांप्रमाणेच आमचाही तोडगा म्हणजे "रद्दी संकलन"...!!! गेले दीड ते दोन वर्ष काही घरातून दर महिन्याला रद्दी गोळा करून ती विकून जे पैसे गोळा होतात ते परिवर्तन साठी वापरले जातात. दर महिन्याची रद्दी गोळा करून असे कितीसे पैसे गोळा होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. इतकेच काय आमच्या काही सदस्यांनाही अजून रद्दीचा महिमा नीटसा उमजला नाहीये. एक वर्तमानपत्र असेल तर दर महिन्याला किमान ४५ ते ५० रुपयाची रद्दी साठते. दोन वर्तमानपत्र अनेकांच्या घरात असतात. त्यामुळे प्रत्येक घरातून किमान ८० ते १०० रुपयांपर्यंतची रद्दी मिळू शकते. आणि विश्वास नाही बसणार, पण फक्त रद्दी संकलनातून एक सामाजिक संस्था चालू शकते...
परिवर्तनच्या कामात हातभार लावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. गेल्या दीड वर्षात ६००० पेक्षा जास्त रुपये केवळ ६ घरांमधील रद्दीतून जमा झाले. ६ घरातील रद्दी जर एवढा हातभार लावत असेल तर अनेक घरातल्या रद्दीतून खूपच कामाला हातभार लागेल.
केवळ १०० घरातील रद्दी दर महिना गोळा होऊ शकली तर त्यातून किमान ६००० रुपये दरमहा गोळा होऊ शकतात. परिवर्तन च्या कामाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी या इंधनाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या कोणाला परिवर्तनचे प्रत्यक्ष काम करणे शक्य नाही. त्याने आपल्या घरातील रद्दी परिवर्तनला द्यावी. आपले हे योगदान सुद्धा चांगल्या परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक पाऊल असेल.
विचार करा आणि लगेच रद्दी द्यायला सुरुवात करा...!!!!