Saturday, March 31, 2012

इतिहासाचे गुलाम...


मी सातवीमध्ये वगैरे असताना मला इतिहासकार होण्यची इच्छा होती. अर्कीओलॉजी मध्ये वगैरे जबरदस्त रस वाटत होता. आपला दैदिप्यमान इतिहास शोधावा, लोकांसमोर मांडावा अशी जबरदस्त इच्छा मला त्यावेळी होती. जवळ जवळ ११वी पर्यंत हे सगळं टिकून होतं. पुढे इतिहास प्रेम कायम असलं तरी इतिहासकार वगैरे होण्याची इच्छा गेली ती गेलीच...
आजही माझं इतिहासावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. पण तरीही, तरीही मला असं स्पष्टपणे वाटतं की आपला समाज आपल्या इतिहासाचा गुलाम झाला असल्याने आपली सामाजिक-राजकीय प्रगती खुंटली आहे.
Shahrukh in film Swades

स्वदेस सिनेमातला एक प्रसंग मला या अनुषंगाने आठवतो. त्या प्रसंगात मोहन भार्गव (शाहरुख खान) अमेरिकेच्या प्रगतीबद्दल बोलत असताना एक म्हातारे बुवा उठतात आणि म्हणतात की, "आपल्याजवळ असं काही आहे जे त्यांच्याकडे कधीच नव्हतं आणि कधीच नसेल..!".. मोहनला आश्चर्य वाटतं, तो विचारतो "ते काय?", तेव्हा त्याला उत्तर मिळतं- "संस्कार आणि परंपरा..." या उत्तरानंतर एकदम सगळी मंडळी खुश होतात आणि अमेरिकेची प्रगती ऐकून आलेला न्यूनगंड झटकून पटकन अहंगंड स्वीकारतात- आम्ही कसे महान..! (प्रत्येकाने आवर्जून पहा हा सिनेमा आणि यातला हा प्रसंग) यापुढे मोहन म्हणतो की, अमेरिकेचे स्वतःचे संस्कार आहेत आणि स्वतःच्या परंपरा आहेत. पण अमेरिका महान झली ती तिथल्या लोकांच्या कष्टामुळे...!
भारतीय मनोवृत्तीच्या दृष्टीने हा प्रसंग फार बोलका आहे. आज मला जाणवणारी सगळ्यात मोठी सामाजिक समस्या म्हणजे आपण इतिहासातून बाहेरच येत नाही. आणि म्हणूनच नवा इतिहास घडवूच  शकत नाही. आमचे पूर्वज कसे थोर होते आणि इथे कसा सोन्याचा धूर निघायचा यातच आम्ही रममाण. 'ब्रिटीश आले आणि सगळं लुटून नेलं नाहीतर आम्ही आज अमेरिकेपेक्षाही श्रीमंत असतो' या विचारात आमचे तासन तास जातात. प्रत्यक्ष जात नसतील, पण डोक्यात मागे कुठेतरी आपण महान होतो आणि मुळातच आपण महान आहोत हा पोकळ अहंगंड आपण जपत आलो आहोत. आपले पूर्वज थोर होतेच याबाबत शंकाच नाही, पण ते कितीही श्रेष्ठ असले तरीही सध्या, वर्तमानकाळात आपला समाज अत्यंत बकवास आणि घृणा यावी इतका वाईट आहे हे जोवर आपण स्वीकारत नाही, तोवर कोणत्याही प्रकारची नवनिर्मिती आणि प्रगती आपण करूच शकणार नाही.

शिवाजी महाराजांबद्दल आदर-प्रेम आणि भक्तीभाव वाटणार नाही असा मराठी मनुष्य सापडणे अवघड. पण शिवाजी महाराज थोर होते म्हणून आजचा मराठी समाजही कसा काय थोर झाला?? बाजीराव शूर लढवय्या होता म्हणून पुण्याचे लोक आजही फार लढवय्ये आहेत असे कोणी म्हणले तर त्याला वेड्यातच काढायला पाहिजे. आम्ही अजूनही फेसबुकवरसुद्धा पानंच्या पानं भरवतोय की महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे याने गोळी मारली ही गोष्ट योग्य की अयोग्य. ६४ वर्ष उलटली या घटनेला. पण तरी यावर लोक तावातावाने भांडताना दिसतात. अगदी रिसर्च करून भांडतात..!
पण भविष्यात आपल्याला काय घडवायचे आहे, भविष्यात आपल्याला आपला देश कसा हवा आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे आहे याविषयी अत्यल्प चर्चा. या आणि अशा विषयांवर रिसर्च तर दूरच पण साधी माहितीही नसते. इतिहासाबद्दल बोलले आणि इतिहासावर (आणि इतिहासातल्या व्यक्तींवर) वर्तमानातल्या प्रश्नांची जबाबदारी टाकली की वर्तमानातला समाज भविष्य घडवण्याची जबाबदारी झटकू शकतो. मला तर वाटतं आपल्याला भविष्य घडवायची इछाच उरली नाहीये किंबहुना आपण भविष्य घडवू शकू याबाबतच शंका निर्माण झालीये, आपण भयानक न्यूनगंडाने ग्रासून गेलोय. आणि अशावेळी इतिहासातून स्फूर्ती घेण्याऐवजी आपण इतिहासाचे उदात्तीकरण करून न्यून झाकण्याचा प्रयत्न करतो आहोत.

अशाने आपला समाज कुठे जाणार आहे???

यासर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला जे आहे ते आवडते. आहे त्याच चौकटीत थोडेफार झालेले बदल आपल्याला चालतात. आपण "जैसे थे"वादी झालेलो आहोत. आपल्या देशात कधीच खालून वरून पूर्ण घुसळण झाली नाही. जी झाली, जे बदल झाले ते त्यामानाने टप्प्याटप्प्याने झाले. आपल्याकडे कधीही "क्रांती" झाली नाही. कायमच उत्क्रांतीच होत गेली. आहे त्या सिस्टीम मध्ये सुधारणा करत, थोडेफार बदल करत आपला समाज घडला आहे. काही मंडळींनी क्रांती घडवायचा प्रयत्न केला... आणि क्रांती म्हणजे शब्दशः क्रांती- आमूलाग्र बदल... शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ही काही त्यातलीच नावे. यांनी क्रांतिकारी विचार आणायचा आणि रुजवायचा प्रयत्न केला. काही प्रमाणात असाच प्रयत्न स्वा. सावरकरांनीही केला. पण समाज आपली मूलभूत चौकट सोडायला तयार नाही. अशी इतरही अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी मूलभूत सामाजिक चौकटच बदलण्याचे प्रयत्न केले. आणि जोवर आपण मूलभूत चौकट मोडायचे प्रयत्न करत नाही तोवर कुठलाही बदल टिकाऊ होणार नाही. आपल्या प्रत्येक परंपरेला, अस्मितेला, अभिमानाला आणि व्यवस्थेला "हे असेच का" असा प्रश्न विचारायला आपण सुरुवात केली पाहिजे. कोणीतरी काहीतरी कधीतरी लिहून ठेवलाय म्हणून आपण अनेक गोष्टी करत असतो, मान्य करत असतो. पण वर उल्लेख केलेल्या मंडळींनी यालाच आक्षेप घेतला आणि प्रस्थापित गोष्टींना नाकारलं! आपण आपल्या समाजातील समजुतींना रूढींना आणि विचारांना कधी challenge च करत नाही. आदिलशाही निजामशाही असते, असे का? अस्पृश्यता असते, असे का? महिलांनी शिकायचे नसते हे कोणी ठरवलं आणि का ठरवलं? असे जर प्रश्न आपल्या इतिहासातल्या या थोर मंडळींनी विचारले नसते तर आज असणाऱ्या थोड्याफार चांगल्या गोष्टीही दिसल्या नसत्या.या सगळ्या लोकांच्या इतिहासातून आपण घ्यायचे तर हे घ्यायचे की त्यांनी प्रस्थापित गोष्टींना challenge केलं. आणि म्हणून बदल घडले. प्रस्थापित गोष्टी उगाळत बसणे, इतिहास घोटत बसणे यातून मूलभूत बदल घडण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रस्थापित व्यवस्थेलाच मुळातून "हे असे का?" असे आपण खडसावून विचारात नाही तोवर इतिहासातून आपण काहीही शिकत नाही एवढेच ध्यानात घ्यावे. आणि साहजिकच मनाने इतिहासातच जगत राहिल्याने आपल्या हातून काही उज्वल गोष्ट घडेल अशी आशाही बाळगू नये.

इतिहासाचे माणसाच्या जीवनात काहीएक स्थान असते. इतिहासातून माणसाला स्फूर्ती मिळते, इतिहास रंजकही असतो. त्यामुळे मनोरंजन हेही इतिहासाचे कार्य मानले गेले आहे. इतिहासातून शिकण्याला महत्व आहे. पण हे सगळे का?? कारण आपण भविष्य घडवावे. नवा इतिहास घडवावा म्हणून.
पण इतिहासाचा वापर करून आपण अधिकाधिक निष्क्रिय आणि बेजबाबदार होत चाललोय का यावर खरोखरच खूप गांभीर्याने आणि खोलवर विचार व्हायला हवा. आपल्या राजकारणावरही इतिहासाचा इतका पगडा असण्याचे एकमेव कारण म्हणजे समाजावरच इतिहासाचा पगडा आहे.
या 'ऐतिहासिक गुलामगिरीतून आपण कधी मुक्त होणार?