Monday, September 24, 2018

तडजोडीच्या पुढे जाताना

“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो, काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या मुलीचा पगार अमुक अमुक आहे, पण त्यापेक्षा जास्त पगार असणाराच नवरा असावा कारण शेवटी घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे.” अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांबद्दलही मला असंच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन मला आपल्या पालकांना दुजोरा देणाऱ्या मुला-मुलींचं जास्त आश्चर्य वाटतं. शिवाय अशा मंडळींची संख्याही कमी नाही, हे बघून काही प्रमाणात चिंताही वाटते. 

मला कायमच प्रश्न पडत आला आहे की स्त्री-पुरुष समता हे एक जीवनमूल्य म्हणून आपण खरंच स्वीकारलं आहे का? की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे? असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं? त्या निमित्ताने निदान ही स्त्री-पुरुष समता अंमलात तरी येते आहे की..’ असा प्रश्न पडू शकतो. तडजोड असली म्हणजे आपण सतत यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याही नकळत शोधत राहतो. तडजोड म्हणजे जणू तात्पुरता उपाय. तात्पुरती मलमपट्टी. तडजोड ही भावना मुळातच नकारात्मक आहे. तडजोडीकडून आपल्याला स्वीकाराकडे (Acceptance) जायला हवं. स्वीकाराच्या पुढे येतं ते म्हणजे अनुकूल होणं (Adaptation). आणि अनुकूलनाकडून आपण जातो आत्मसात (Internalization) करण्याकडे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ असं एक वाक्य नेहमी बोललं जातं. मला ते बिलकुल पटत नाही. सुरुवात तडजोडीने होतही असेल. पण तडजोडीकडून आत्मसात करण्याकडे जाण्याचा हा चार टप्प्यांचा प्रवास हा, केवळ लग्नच नव्हे, तर कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया आहे. म्हणूनच एखादी गोष्ट आपण तडजोड म्हणून अंमलात आणली आहे की एक जीवनमूल्य म्हणून आपण हे स्वीकारून पुढे जात आत्मसात केलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.


हे आठवण्याचं एक कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत लग्नाला उभे मुलगे, मुली आणि त्यांचे पालक, यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत जेव्हा एखाद्या विवाहसंस्थेत किंवा वेबसाईटवर नांव नोंदवलं जातं तेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांत ‘जोडीदार कमावता असावा का’ हा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये मुलींकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये ‘असलाच पाहिजे’ हाच पर्यायच निवडलेला असतो. मुलांकडून मात्र ‘काहीही चालेल हा पर्याय निवडला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. ‘आर्थिकदृष्ट्या घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पुरुषाची आहे, आणि स्त्रीने देखील कमावलं तर अधिक बरे पडेल, हे खरं असलं तरीही ते काय बंधनकारक नाही’ ही विचारधारा अगदी पक्की झाली आहे. मध्यंतरी एक मुलगी मला सांगत होती, “लग्नानंतर काही वर्ष मला आवडतंय तोवर मी जॉब करीन. पण नंतर करीनच असं नाही. मला माझे पेंटिंग वगैरे छंद जोपासायला आवडेल. त्यामुळे मला नवराही असा हवाय जो आत्ताची माझी लाईफस्टाईल तरी निदान टिकवू शकेल एवढे कमावत असेल.” या मुलीचं लग्न जमायला काहीच अडचण नाही आली. पण विचार करा असं एखाद्या मुलाने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असतं तर? मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं? बरं, हा सगळा पुरुषानेच घर चालवण्याचा आग्रह केवळ मुलींकडून येतो असं नव्हे तर ते आपलंच मुख्य काम आहे अशी बहुसंख्य पुरुषांचीही समजूत आहे. एकुणात मध्ययुगीन मानसिकतेला बढावा देण्याचं काम दोघं मिळून करतात अगदी! 

या सगळ्याचा अर्थ, आता उलट परिस्थिती आणावी असा नव्हे. आता स्त्रियांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी आणि पुरुषांनी मुख्यतः आपले छंद जोपासावेत, घर-मुलं याकडे बघावं असंही मी सुचवत नाहीये. लग्नाच्या नात्यामध्ये, अरेंज्ड मॅरेज असेल नाहीतर लव्ह मॅरेज, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं असो किंवा घरकाम-मुलं या दृष्टीने घर चालवणं असो, ती दोघांचीही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. म्हणून आपण इथे समता हा शब्द ‘समन्यायी या अर्थी वापरत आहोत. समन्यायी व्हायचं, याचा अर्थ असा की, ‘स्त्री आहेस म्हणून तुझं काम हे आणि ‘पुरुष आहेस म्हणून तुझं काम ते ही विचारधाराच मूळातून काढून टाकावी लागेल. हे होणार नाही तोवर आपल्या समाजाची मानसिकता विषम न्यायाचीच राहिल. का कुणास ठाऊक, अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात असा माझा अनुभव आहे. आपल्या समाजात मुक्त विचार आणि उदारमतवाद हा तडजोडीकडून स्वीकार आणि अनुकूलन यासह आत्मसात करण्याकडे जायला हवा. त्याचं प्रतिबिंब जोडीदार निवडीच्या प्रक्रियेतही दिसायला हवं. जमेल आपल्याला हे?

(दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

3 comments:

  1. खुप छान विषय मांडला आहेस तन्मय.. खर तर ही मानसिकताच आहे समाजाची.. ती बदलेल अस वाटत नाही.. पण जर एखाद्या मुलीने एरवाया मुलाला म्हणले की माझा पगार भरपूर आहे तू नोकरी केली नाहीस तरी चालेल तर हे एखादा मुलगा मान्य करेल का? नाहीच करणार.. याचे कारण मानसिकता.. बायकोच्या पगारावर किंवा शब्दशः म्हणजे बायकोच्या जीवावर बसुन खाणारा नवरा असे समाज म्हणेलं ही भीती... बायकोचा पगार जास्त असेल तर ती तुझ्या वरचढ होईल, डोक्यावर बसेल.असेच मुलांच्या मनावर बिंबवले गेलेय आणि जातय पण... पण यांत खरच बदल व्हायला हवा त्याकरिता प्रामुख्याने मुला मुलींना समुपदेशनाची गरज आहे.. आणि तुझ्यासारख्या तरूण मुलांनी हा विचार मनावर घेतला तर हे शक्य होईल पण... खुपच छान लेख... तुझे प्रत्येक विष्यावरचे लेख ख्या छान असतात... Keep it Up..

    ReplyDelete
  2. 'अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात'हे अगदी खरंच पटलं... मला ही हाच प्रश्न पडतो. लहानपणापासून मोठे होइपर्यन्त झाशीच्या राणीच्या गोष्टी सांगून मोठं करायच आणि लग्नाच्या वेळी थोरा मोठ्यासमोर एक शब्द ही बोलला तर मुलगी फार उद्धट किंवा शिक्षण जास्त झालं म्हणून घमेन्ड आहे अस आज ही बोललं जातं...

    ReplyDelete
  3. नमस्कार तन्मय. अतिशय उत्तम लेख. माझ्या नात्यातील काही मुलांची लागणे जमवताना ही मानसिकता मी अगदी जवळून अनुभवली आहे.

    ReplyDelete