Saturday, August 25, 2018

...प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.


दरवर्षी आम्ही शाळेचे माजी विद्यार्थी आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी जातो. याही वर्षी गेलो होतो. शाळेत असताना अक्षरश: हजारो वेळा म्हणलेली आपली प्रतिज्ञा पुन्हा म्हणली. त्यातलं हे एक वाक्य मला खूप आवडतं- प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. त्याही दिवशी हे डोक्यात राहिलं. प्रत्येकाशी प्रेमाने वागेन’, चांगला वागेन’, नम्रतेने वागेन’, आदराने वागेन असं काहीही म्हणता आलं असतं खरं तर. पण आपली प्रतिज्ञा ज्यांनी लिहिली त्या पी. व्ही. सुब्बाराव यांनी सौजन्य हा चपखल बसणारा शब्द निवडला. इंग्रजीत सौजन्याला असणारा पर्यायी शब्द म्हणजे कर्टसी. याचं मूळ कोर्ट, म्हणजे दरबार या शब्दात आहे. दरबारातली मंडळी एकमेकांना ज्या पद्धतीने आदर देत वागवतील तशी भावना मनात ठेवून वागणं म्हणजे सौजन्याने वागणं. सौजन्यामध्ये समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून आदर देणं तर आहेच, पण त्याबरोबर नम्रताही आहे. सौजन्य हा शब्दच मुळी सु-जन म्हणजे चांगला माणूस इथून आला असल्याने या शब्दाच्या अर्थात चांगुलपणाही आहे. आणि एवढं सगळं असूनही स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्याची मुभा देखील यात आहे. इंग्रजीत ज्याला असर्टिव्ह म्हणलं जातं तसं असण्याला सौजन्य आड येत नाही. सौजन्य या एकाच शब्दात केवढ्या गोष्टी एकदम साध्य होतात!

सेपियन्स या आपल्या पुस्तकात लेखक युवाल नोआह हरारी लिहितो की, एखाद्या टोळीत सामान्यत: सगळ्यात ताकदवान व्यक्ती टोळीचं प्रमुख पद भूषवत असेल अशी अनेकदा आपली समजूत असते. पण आपल्या इतिहासात हे असं असल्याचं दिसून येत नाही. वैयक्तिक ताकदीपेक्षा जी व्यक्ती टोळी मधल्या इतर सदस्यांशी सौजन्याने वागते, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करते अशी व्यक्ती टोळीप्रमुख बनण्यासाठी जास्त लायक ठरते. लेखक हरारी आपला मुद्दा मांडताना मानवाशी जवळीक असणाऱ्या बोनोबो आणि अन्य माकडांचंही उदाहरण देतो. या माकडांमध्ये सुद्धा इतरांपेक्षा अधिक चांगली सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल्स) असणारे माकड त्या टोळीचे प्रमुख होण्याची शक्यता जास्त असते. या सामाजिक कौशल्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे- सौजन्य. काय गंमत आहे बघा, सौजन्य हा काही केवळ माणसाच्या बुद्धीतून उपजलेला प्रगत समाजातला गुण आहे असं नव्हे, तर अस्तित्वासाठी आपल्यात असणारा हा एक नैसर्गिक आणि आदिम गुण आहे. सौजन्याने वागण्याचे फायदे माणसाने टोळ्यांमध्ये राहत असल्यापासून अनुभवले, शिकले आणि आत्मसातही केले.

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या, जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत आपल्यामधून हरवलेलं सौजन्य. हे आत्मसात केलेलं आपल्यातलं सौजन्य गेलं कुठे असा प्रश्न मला कधीकधी पडतो. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत परिस्थिती गंभीरच आहे. “अहो आम्ही इतक्या लोकांना वेबसाईटवरून रिक्वेस्ट पाठवली, पण समोरून काही उत्तरच येत नाही. होकार/नकार काहीतरी कळवावा की...”, आपल्या मुलीसाठी जोडीदार शोधणारे एक वैतागलेले काका मला सांगत होते. गंमत म्हणजे, मुलीकडच्या मंडळींना वाटतं की २०१८ साल उजाडलं तरीही मुलाकडची मंडळी आम्हाला अशी कमी कशी काय लेखतात? आणि मुलाकडच्या अशा परिस्थितीतल्या पालकांना वाटतं की मुलीकडची बाजू आता डोईजडच होऊ लागली आहे. खरा भाग असा की मुलीकडचे असोत किंवा मुलाकडचे, समोरच्या बाजूकडून सौजन्याची वागणूक न मिळण्याचा अनुभव सगळ्यांना येतो आहे. आपल्याला संपर्क साधणार्‍या मंडळींशी आपण किमान आवश्यक सौजन्याने वागणं का बरं शक्य होत नसेल? आजच्या जगात आपला संदेश, आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहचवायला ना फारसा वेळ लागतो, ना खर्च. पण तरीही आपल्याला संपर्क साधणारे म्हणजे कोणी याचक आहेत आणि त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही असा आविर्भाव बाळगणाऱ्या मंडळींचे काय करावे? मी तर नेहमी सांगतो, की ज्यांच्याकडे साधे उत्तर कळवण्याचेही सौजन्य नाही अशा कुटुंबाशी नातं निर्माण नाही झालं हे एका दृष्टीने बरंच झालं की! माणसाला माणूस म्हणून आदराने वागवण्याची, सौजन्याने वागवण्याची मूलभूत जबाबदारी देखील पार पाडता येत नसेल तर नवीन नाती निर्माण करणं, ती टिकवणं, फुलवणं, बहरणं या फार लांबच्या गोष्टी झाल्या.

लग्न ठरवू बघणाऱ्या मुलं-मुली आणि पालक यांच्या निमित्ताने हा विषय डोक्यात आला तरी हा काही तेवढ्या पुरता मर्यादित नाही. सौजन्याने वागणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मध्ये एकदा फेसबुकवर मी एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात अगदी सुरुवातीला एक मुलगी एका काकूंना रस्त्यात काहीतरी मदत करते. काकू पुढे आपल्या कामाला जातात तिथे त्या एका मुलाला त्याच्या काहीतरी अडचणीच्या वेळी मदत करतात. मग तो मुलगा एका प्रसंगात अशीच अजून एका व्यक्तीला मदत करतो. अशी ही दिवसभर घडणार्‍या गोष्टींची साखळी. एकाने सुरुवात केली की हळूहळू सगळ्यांनाच त्या चांगुलपणाची, सौजन्याची लागणच होते जणू. मला जाणवलं, असं आपल्याही आयुष्यात कित्येकदा घडतं की! सकाळी एखाद्या व्यक्तीशी झालेली छान भेट, घडलेली एखादी घटना यामुळे सगळा दिवस आनंदात जातो. आपला दिवस आनंदात जात असतो, आपण छान प्रसन्न मूड मध्ये असतो तेव्हा आपल्याही नकळत आपण अनेकांना या मार्गावर आणत असतो. सौजन्याची हीच गंमत आहे असं मला वाटतं.

माझ्या मते, सौजन्याचा मुद्दा हा, इंग्रजीत ज्याला एम्पथी म्हणलं जातं त्या गुणाशी निगडीत आहे. एम्पथी म्हणजे मराठीत समानुभूती (किंवा तदनुभूती.). समानुभूती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करणं. “मी आत्ता समोरच्या बाजूला असतो/असते तर नेमकं काय केलं असतं, मला काय अपेक्षित असलं असतं” हा विचार करून कृती करणं हा भाग समानुभूतीमध्ये अंतर्भूत आहे. गांधीजी म्हणायचे ना, बी द चेंज यू वॉन्ट टू सी’, जे तुम्हाला हवंय तसे तुम्ही आधी बना, तसंच आहे हे. किंवा इंग्रजीतल्या गेटिंग इन वन्स शूज या वाक्प्रचारासारखं आहे. दुसर्‍याचे जोडे घालून बघणे! आपण समोरच्या व्यक्तीला जसे वागवत आहोत तसं आपल्याला कोणी वागवलं तर आवडेल का, इतका साधा विचार करून, म्हणजेच समानुभूतीने विचार करून, वागू लागलो की आपल्या वागणुकीत आपोआप सौजन्य येईल. मात्र यासाठी आपला अहंगंड बाजूला सारावा लागतो. अहंगंड बाळगून सौजन्याने वागणं शक्य नाही. दुसर्‍याचे जोडे घालून बघायचे तर आधी स्वत:चे काढून बाजूला ठेवावे लागतात. आपला अहंगंड नेमकं तेच करू देत नाही. अहंगंड तसाच ठेवून तोंडदेखलं चांगलं वागणं म्हणजे सौजन्य नव्हे. मी, माझं कुटुंब, माझं आयुष्य या स्व केंद्री दृष्टीकोनात एक प्रकारचा छान कम्फर्ट झोन तयार होतो. आणि त्यातून या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या मंडळींबाबत सौजन्याचा बहुदा विसरच पडतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला दिलेली भेटायची वेळ पाळणे, उशीर होणार असल्यास तसं कळवणे. दुसरी व्यक्ती आपली वाट बघत असेल हा समानुभूतीने विचार केला की शक्यतो उशीर न करणे आणि उशीर होणार असल्यास कळवणे या दोन्ही गोष्टी सहजपणे डोक्यात येतात. यालाच आपण सौजन्य म्हणतो.
सौजन्याने वागणं ही काय एकदा कधीतरी करायची गोष्ट नव्हे. ती एक सवय आहे जी लावून घेतली पाहिजे. मला वाटतं, प्रगल्भ समाजासाठी समानुभूतीतून सौजन्य आणि सौजन्यातून सहकार्य, अशी ही तीन ची साखळी आहे. आपण “...आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.”, प्रतिज्ञेतलं हे वाक्य प्रत्येकाने समजून उमजून अंमलात आणायचा प्रयत्न सुरू केला तर एक प्रसन्न आणि आनंदी व्यक्ती होण्याकडे, सुदृढ कुटुंब निर्माण करण्याकडे आणि प्रगल्भ समाज बनण्याकडे उचललेलं दमदार पाऊल असेल असा मला विश्वास वाटतो. मग करूया ना हे?!

(दि. २५ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)

3 comments: