Monday, August 4, 2014

सोला(र)पूरची प्रयोगशाळा

जूनचा पहिला आठवडा. मान्सूनचा पत्ता नाही. उन्हाळा संपत आलेला, नद्या नाले कोरडे ठणठणीत. भगभगीत उजाड माळरान. एखादे गाव जवळ आले की थोडीफार दिसणारी हिरवी शेती. बाकी सगळीकडे पिवळ्या रंगाचे निर्विवाद वर्चस्व. अशा रस्त्यावरून जात असताना मध्येच जंगलच म्हणावे इतकी घनदाट झाडी असलेला पट्टा... हीच ती सोला(र)पूर च्या खटपट्या माणसाची प्रयोगशाळा !

पुणे सोलापूर रस्त्यावर दोनशे-सव्वा दोनशे किलोमीटरवर मोहोळ गावी उजवीकडे वळायचे
अंकोलीच्या रस्त्यातले ओसाड भगभगीत माळरान
आणि विजापूर रस्त्याला लागायचे. त्या रस्त्यावर सरळ गेल्यावर कुरुल गावी उजवीकडे पंढरपूरच्या दिशेला वळायचे. हा सोलापूर-पंढरपूर रस्ता. तसा छोटाच आहे सध्या. पण या रस्त्याचे चौपदरीकरण करून त्याला ‘भक्ती मार्ग’ असे नाव आता राज्य सरकार देणार आहे म्हणे. पंढरपूरच्या दिशेला वळल्यावर साधारण ५-१० मिनिटात डावीकडे अंकोली गावाच्या अलीकडे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम दिसते. पाटी वगैरे काहीच नाही. पण झाडांनी गच्च भरलेली अशी ती एकमेव जागा असल्याने शोधायला अवघड जात नाही. आत येताना असंख्य पाट्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. एखाद्या कडक शिस्तीच्या पण प्रेमळ मास्तरीण बाईंसारख्या असलेल्या सुमंगला देशपांडे यांनी आम्ही पोचल्यावर आमचं स्वागत केलं आणि आल्या आल्या हातात पाणी आणि पोहे देऊन त्यांनी आम्हाला सगळ्या पाट्या वाचायची सूचना केली. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला मिळणारा भाव, १९७१ मध्ये एक किलो धान्याच्या किंमतीत किती लिटर डीझेल मिळत होते, किती साखर मिळत होती आणि आता काय परिस्थिती आहे, मुंबई ठाणे पुणे नाशिक अशी शहरे ग्रामीण भागातल्या विनाशाला कशी कारणीभूत आहेत वगैरे वगैरे मुद्द्यांच्या पाट्या इथे आहेत. अशीच एक पाटी ज्यावर मुक्काम पोस्ट अंकोली, सोला(र)पूर जिल्हा असे लिहिलेले आहे. 


सुपीक जमीन आणि पाण्याचा मुबलक साठा

विज्ञानग्राम मध्ये असणारी घनदाट झाडी
इथली सगळी जमीन ही एखाद्या स्पंज सारखी झाली आहे. झाडाचा पालापाचोळा पडून पडून त्याची माती होत एकूणच जमीन अतिशय भुसभुशीत आणि सुपीक झाली आहे. अनवाणी पायाने चाललात तर अत्यंत सुखद असा भुसभुशीत मातीचा गारवा तळपायाला जाणवतो. “आत्ता पडतो त्याच्या दसपट पाउस इथे पडला तरी पूर येणार नाही, कारण सगळं पाणी हा जमिनीचा स्पंज शोषून घेईल. आणि पाउस कमी आला तरी इतकं पाणी जमिनीत मुरलेलं आहे की चिंताच नाही.”, देशपांडे सांगतात. आम्ही गेलो त्यावेळी उन्हाळा संपत आला होता. सामान्यतः यावेळी सगळीकडच्या विहिरी कोरड्या पडलेल्या असतात. देशपांड्यांची सुमारे २० फूट व्यासाची आणि ७० फूट खोल असणारी विहीर भरलेली होती. आजूबाजूच्या दगडातून पाणी झिरपत असल्याचा आवाज त्या विहिरीत घुमत होता. आणि हे झिरपून येणारं पाणी विहिरीत भरण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. अशा त्या जमिनीवर एकूण तीन विहिरी आहेत. एका क्षमतेपर्यंत विहीर भरेल आणि मग जमिनीखालच्या झऱ्यातून इतरत्र निघून जाईल. तसं झालं तर ऐन वेळेला गरज असताना विहिरीत पाणी कमी असण्याची शक्यता. म्हणून मग देशपांडेंनी एक मोठे शेततळे खोदले आहे. संपूर्ण तळ्याच्या तळाला प्लास्टिक शीट्स घालून पाणी झिरपून जाणार नाही याची काळजी घेतली आहे. (खरे तर प्लास्टिक वापरणे देशपांड्यांच्या तत्वज्ञानात बसत नाही. पण उदात्त हेतू लक्षात घेता सध्या याकडे दुर्लक्ष करूया.) तळ्याच्या पृष्ठभागावर मोहरीच्या तेलापासून बनवलेले अगदी नैसर्गिक असे एक द्रावण सोडले आहे, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. ५ एकर पसरलेले (सुमारे २ लाख स्क्वे फूट) आणि २५ फूट खोल असे हे तळे. विहिर भरली पूर्ण की मग ते इथल्या पाण्याचा उपसा करून सगळे पाणी या तळ्यात टाकतात. असे वर्षभर सुरु असते. सकाळी उपसा करून पाणी शेततळ्यात साठवायचे. संध्याकाळी विहीर पुन्हा भरलेली असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी शेततळ्यात पाणी भरायचे. असे हे चक्र. आणि याचा परिणाम म्हणजे सगळीकडे आज दुष्काळ आणि शेतीला, प्यायला पाणी नसल्याची ओरड होते आहे पण देशपांड्यांच्या विज्ञानग्रामात ५० लाख घनफूट (१४,१५,८४,००० लिटर्स) पाण्याचा साठा आहे. शिवाय विहिरींमध्ये रोज जे पाणी झिरपते आहे ते वेगळेच. या तळ्याला ते म्हणतात- वॉटर बँक. ज्याला पाणी हवे तो काढू शकतो यातून- कर्ज म्हणून! पण परत तेवढेच पाणी या बँकेत भरण्याची जबाबदारी पण त्याच माणसाची. इथे इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट म्हणून पाण्याचा उपसा करण्यासाठी एक साधासा पंप तयार करून बसवला आहे. याला वीज वापरायची गरज नाही. या पंपाला बैल जोडायचा जो गोल फिरतो आणि पाण्याचा उपसा होतो. शिवाय वॉटर बँक जमिनीच्या उंचावरच्या भागात खोदलेली असल्याने इतर भागात पाणी साध्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार पोचवता येतं. त्यामुळे इथेही वीज लागत नाही.
उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसातही तुडुंब भरलेली वॉटर बँक

देशपांडेंचे घर एकदम साधे आहे. गोल मोठा चर खणून त्यात त्यांनी मोठी झाडं लावली. ती झाडं वाढल्यावर त्यांना आतल्या बाजूला खेचून बाहेरच्या बाजूने फांद्या छाटून एक मोठा घुमट तयार केला आहे. आणि या सगळ्या झाडांच्या बुन्ध्यांना कापडाने गुंडाळले. गरज असेल तिथे शेणाने सारवले आहे. झाडांच्या फांद्यांचाच घुमट केल्याने डोक्यावर नैसर्गिक अच्छादन आहे. तरी उतरते कापड टाकले आहे. गरज असेल तिथे बांबू वापरून आधार वगैरे दिला आहे. तो बांबू त्यांच्याच जमिनीतला आहे. तो इतका मुबलक आहे की अशी अजून दहा घरेही सहज बांधून होतील. बहुतांश गोष्टी नैसर्गिक. देशपांड्यांच्या जमिनीच्या बाहेर बनलेल्या फार थोड्या गोष्टी या सगळ्या बांधणीत वापरलेल्या. ज्या बाहेरच्या गोष्टी वापरल्या त्याही लोकांनी भंगारात फेकलेल्या अशा. तारा, गंजलेली बिजागरे, पत्रे इत्यादी. गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या दृष्टीने तो खरा हुशार वास्तुविशारद, जो माझ्या चालण्याच्या अंतरात उपलब्ध होणारी सामग्री वापरून माझे घर बांधून देऊ शकतो!” या गांधीजींच्या विचारांचा मोठाच पगडा देशपांड्यांवर आहे.

त्यांच्या या विलक्षण घरात आल्या आल्या उजवीकडे थंडगार पाण्याचे माठ भरून ठेवलेले. घरात मध्यभागी जुन्या काळी असायचा तसला एक मोठा पंखा लटकावलेला. आपण हातात घेऊन पंख्याने वारा घेतो तसला मोठाच्या मोठा पंखा. तो फिरवायला एक दोरी बांधलेली. बसल्या जागी दोरी हातात धरून ओढल्यावर तो अजस्त्र पंखा लीलया फिरतो आणि खोलीभर वारा पसरतो. त्याला वाळ्याचे पडदे लावण्याची सोय आहे. त्यावर थोडे पाणी टाकून मग वारा घेतल्यावर एकदम झकास कूलर तयार. या सगळ्यात सुद्धा कुठेच विजेचा वापर नाही. घराच्या दारात विविध प्रयोग करून दाखवण्यासाठी उपकरणे ठेवलेली. त्यात सायकल चालवून वीज तयार करण्याचा प्रयोग तर विशेषच. विहीरीवर असतो तसला रहाट लावून एक बादली त्याला लटकवलेली. त्यात पाणी भरून मग दोरी खेचून ती बादली साधारण ७ एक फूट उंचावर न्यायला देशपांडेंनी सांगितलं. म्हणजेच शरीराची उर्जा वापरून तेवढे पाणी ७ फूट उंचावर न्यायला किती कष्ट पडले हे समजलं. मग त्यांनी बैटरी सायकलला जोडली. सायकल चालवली की वीज तयार होणार होती आणि त्या विजेच्या आधारावर तेवढेच पाणी ७ फूट उंचावर चढवले जाणार होते. सायकल मारून हे सगळे केल्यावर लक्षात आले की एकच काम करायला लागणारी शारीरिक उर्जा वेगवेगळी होती. वीज निर्माण करून पाणी चढवणे हे अधिक थकवणारे होते. म्हणजेच जेव्हा वापरलेली सगळी उर्जा ‘शरीर ऊर्जे’मध्ये मोजली तेव्हा लक्षात आलं की वीज वापर हा काही किफायतशीर मामला नाही! हाच या प्रयोगांचा मुख्य उद्देश आहे. मग सायकल मारून वीज निर्माण करून पाणी तापवण्याचा प्रयोग झाला, लाकडाचा तुकडा साध्या करवतीने कापण्याशी विजेवर चालणाऱ्या करवतीने कापून तुलना करून बघितली. दोन्हीकडे एकूण लागणारी उर्जा बघता, विजेच्या बाबतीत ती जास्त लागते आहे हेच लक्षात आलं.

“तुमचे एक दिवसाचे मलमूत्र तुम्हाला १०० दिवसांनी तुम्हालाच एक वेळचे उत्तम जेवण देऊ शकते.”, अशी प्रस्तावना करून त्यांनी केलेल्या एका प्रयोगाची माहिती दिली. साधारण ५०-६० शालेय मुलांना एकत्र करून त्यांना आपले एक दिवसाचे मलमूत्र एका पोत्यात भरायला सांगितले. प्रत्येक पोत्यात भरपूर गवत भरले. थोडे पाणी टाकले आणि मग पोते बंद करून ३-४ दिवस तसेच ठेवले. तीन चार दिवसांनी एकेक पोते उघडले. त्यात माती तयार झालेली होती. त्या मातीत मक्याचे रोप लावले. आणि पुढचे अडीच पावणेतीन महिने फक्त त्या रोपाला नेमाने पाणी घातले. १०० दिवसांनतर प्रत्येक रोपाला सुंदर चवदार अशी ४-५ मक्याची कणसे आली. आणि त्याच मक्याच्या भाकऱ्या जेवणात सगळ्या मुलांनी खाल्ल्या! अशा पद्धतीने प्रयोगांनी आपले सिद्धांत सिद्ध करून दाखवणाऱ्या अरुण देशपांडे यांची आणि त्यांना तितक्याच जिद्दीने साथ देणाऱ्या सुमंगला देशपांडे यांनी, गेली २७ वर्षे कष्ट करून उभारलेले विज्ञानग्राम ही एक अभूतपूर्व प्रयोगशाळा आहे.

जगातले सर्वोत्तम सोलार पैनेल आणि पाणी खेचायचा पंप
“जगातले सगळ्यात उत्तम सोलार पैनेल कुठे बनते माहित्ये का?” अरुण देशपांडे विचारतात. “सगळ्यात स्वस्त आणि पृष्ठभागावर पडलेल्या सूर्यप्रकाशातून सगळ्यात जास्त उर्जा निर्माण करणारे पैनेल...”, असे पैनेल कुठे बनत असेल असा विचार करता करता आपल्या मनात जर्मनी, अमेरिका, जपान ही नावं येऊन जातात. ‘जर्मनीने नुकतेच सोलार पॉवर प्लांट्स च्या सहाय्याने जगातील सर्वाधिक सौरउर्जा निर्माण करणारा देश असे बिरूद पटकावल्याचे मी वाचले होते. साहजिकच माझ्या मनात देशपांडे म्हणतात तसे पैनेल जर्मनीतच बनत असणार असा विचार आला. “आजूबाजूला बघा...प्रत्येक झाडाचे प्रत्येक पान हे जगातले सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात प्रभावी सोलार पैनेल आहे”, आमच्या डोक्यातही नसणाऱ्या गोष्टी अरुण देशपांडेंनी आम्हाला सांगायला सुरुवात केली, “प्रत्येक झाड सूर्यप्रकाशापासून उर्जा निर्माण करते. इतकी उर्जा, की झाड स्वतः तर जगतेच, पण त्याबरोबर असंख्य प्राणीमात्र आणि जीवांना जगवते इतकी उर्जा प्रकाशसंश्लेषण (photo synthesis) प्रक्रियेमध्ये तयार होते असते! शिवाय ही उर्जा तयार होत असताना झाड प्राणवायू बाहेर टाकत असतो. म्हणजे पर्यावरणाला पूरक अशी ही उर्जा तयार होत असते!”.
“पाणी खेचण्याचा सर्वात उत्तम पंप कोणता माहीत आहे काय?”, देशपांडे विचारतात. यावेळी आम्ही सर्व गप्प. मग तेच हसून पुढे म्हणतात, “झाडाचे खोड आणि मुळे! बघा की, कुठलं कुठलं थेंब थेंब पाणी शोषून घेतं झाड. मग आम्ही विचार केला की याचाच वापर करून झाडांना पाणी का देऊ नये?...” देशपांडे आता आपल्याला नवीन काहीतरी दाखवणार किंवा सांगणार या विचाराने आम्ही उत्सुकतेने बघू लागलो. त्यांनी एक पाईप घेतला. साधारण पाच मिलीमीटर व्यासाचा असेल. छोटासा पाईप. त्याच्या तोंडाशी एक मातीची विटी बसवलेली. “ही साधी माती आहे. ओली करून अशी विटी दांडू मधल्या विटीच्या आकारात पाईपच्या तोंडाला लावली. आणि मग माठ करताना भाजतात तशी भाजली. आता माठाप्रमाणेच ही विटी पण सच्छिद्र (porous) आहे. या पाईपचे दुसरे टोक पाण्याने भरलेल्या तळ्यात वा विहिरीत सोडा. आणि ही विटी तुमच्या झाडाच्या मुळाशी खड्डा करून त्यात टाका. खड्डा बुजवून टाका. आता झाडाची मुळे या विटीच्या मार्फत पाईपमधून आपल्याला हवे तितके पाणी खेचून घेतील...” वरवर पाहता अतिशय सोपे पण भन्नाट अशी ही पाणी देण्याची पद्धत आहे. पिकांना पाणी द्यायचं असेल तर एकच मोठा पाईप नदीत/कालव्यात सोडून ठेवायचा आणि त्याला असंख्य छोटे पाईप जोडायचे ज्यांच्या दुसऱ्या बाजूला या मातीच्या विटी बसवलेल्या असतील. आणि या विटी २-३ रोपांमध्ये एक अशा पद्धतीने जमिनीत लावलेल्या असतील. देशपांड्यांच्या सांगण्यानुसार एक टन ऊसासाठी सामान्यतः पाटाने पाणी दिल्यावर दिवसाला ३०० लिटर पाणी लागते. अगदी टायमर बसवून, पंप लावून आधुनिक पद्धतीने वीजेचा वापर करून ठिबक सिंचनाने पाणी दिले तर साधारणपणे १५० लिटर पाणी लागते. पण या विटीच्या पद्धतीने पाणी दिले तर जेमतेम ३५ लिटर पाणी पुरेसे होईल...!

नवीन (?) आयडीऑलॉजी
देशपांडे हे जगण्याबाबत, समाजजीवनाबाबत नवीन आयडीऑलॉजी मांडतात. खरे तर नवीन म्हणावे असे काही नाही यात. महात्मा गांधींनी जे सांगितलं तेच नव्याने, आजच्या भाषेत देशपांडे सांगत आहेत. आणि कधी नव्हे इतके आज गांधीजींचे विचार आजच्या जगात महत्वाचे वाटत आहेत. जगातले पेट्रोलियम पदार्थ २०५० च्या सुमारास संपणार आहेत असे अंदाज आहेत. भारताला मिळणारे पेट्रोल तर त्या आधीच संपायची शक्यता. सध्या इराकमधल्या युद्धाने आपल्यासमोर आव्हान तयार झाले आहेच. शिवाय यापुढेही जे मिळेल तेही इतके महाग असेल की सामान्य
सोला(र)पूरचा अवलिया मनुष्य- अरुण देशपांडे
माणसाला परवडेल असे नाही. आपण जी वीज वापरतो ती बनते एकतर कोळश्याला जाळून किंवा नैसर्गिक वायूचा वापर करून. एकूण विजेच्या अत्यल्प हिस्सा हा जलविद्युत केंद्रांचा आहे आणि त्यातही अनेकदा बरेच पाणी वाया जाते. थोडक्यात आपण वीज निर्मितीसाठी कोळशाच्या, नैसर्गिक वायूच्या खाणी खोदतो. हे करत असताना पेट्रोलियम पदार्थ आणि वीज लागतेच. शिवाय हा कोळसा वा वायू खाणीपासून रिफायनरी पर्यंत किंवा वीज केंद्रांपर्यंत पोहचवण्यासाठी पुन्हा वीज किंवा पेट्रोलियम पदार्थच वापरतो. हे पेट्रोलियम आपला देश मोठ्या प्रमाणात आयात करतो. खाणी खोदताना, रस्ते-रेल्वे बांधताना जंगले तोडली जातात, डोंगरच्या डोंगर नष्ट होतात, नद्या-समुद्र प्रदूषित होतात हे नुकसान वेगळेच. आणि मग या नद्यांचे शुद्धीकरण करायला आपण मोठी जलशुद्धीकरण केंद्रे बांधतो ज्यामध्ये पुन्हा वीजच वापरली जाते! आपल्या घरातला पंखा किंवा टीव्ही किंवा कम्प्युटर चालवताना त्यासाठी एकूण किती पेट्रोल जाळले गेले असेल, किती पाणी वापरले गेले असेल थोडक्यात किती उर्जा वापरली गेली असेल हा विचार व्हायला हवा असं देशपांडे आग्रहाने मांडतात. म्हणजेच एखादी गोष्ट करताना त्यातली ‘एम्बेडेड एनर्जी’ तपासायला हवी. अमुक अमुक गोष्ट तयार होत असताना, आपल्या हातात येताना एकूण किती आणि कोणत्या स्वरूपातली उर्जा खर्च झाली याचा विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी जर पाण्याच्या आणि उर्जेच्या खर्चाच्या एककात मोजून तपासायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की आपण किती जास्त उधळपट्टी करतो आहोत. “पेट्रोलियम पदार्थांचे ठीक, पण आता जगात सगळीकडे सोलार पॉवर प्लांट्स तयार होत आहेत, मोठमोठे सोलार पैनेल्स बसणार आहेत ज्यामुळे ‘ग्रीन एनर्जी’ तयार होणार आहे. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे?”, माझ्या डोक्यात असणारा प्रश्न मी विचारल्यावर देशपांडे म्हणाले, “एक सोलार पैनेल बनवण्यासाठी एकूण लागणारी उर्जा जेवढी असते तेवढीही उर्जा आपल्या संपूर्ण आयुष्यात निर्माण करत नाही. मग आत्ताच्या या सोलार पैनेल्स चा उपयोगच काय? सोलार पॉवर प्लांट्स वर चालणारा सोलार पैनेल्स बनवणाराच संपूर्ण कारखाना बनला पाहिजे. आणि तो कारखाना चालवण्यासाठी वापरल्या गेलेल्या सोलार पैनेल्सपेक्षा जास्त पैनेल्स त्या कारखान्यातून तयार होऊन बाहेर पडली पाहिजेत. असे झाले तरच हे सोलार प्लांट्सचे मॉडेल शाश्वत आहे. जे सोलार एनर्जी बाबत तेच विंड एनर्जी बाबत. अणू उर्जा तर सर्वात फसवी. कारण अतिशय स्थिर असलेले विखुरलेले युरेनियम अणू एकत्र आणायचे ते शुद्ध करायचे आणि तो अणू कृत्रिमरित्या अस्थिर करून उर्जा पैदा करायची या सगळ्या प्रक्रीयेचे एकूण गणित बघितले तर ‘एम्बेडेड एनर्जी’ निर्माण होणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्तच आहे असं लक्षात येतं...”


रूरबन जीवनशैली!
आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळे देश जसे आजकाल कार्बन फूटप्रिंट तपासतात, तसेच प्रत्येक नागरिकाने स्वतःचा कार्बन फूटप्रिंट आणि त्याचबरोबर वॉटर फूटप्रिंट तपासायला हवा. देशपांडेंनी सांगितलेला हा विचार डोक्यात घेतल्यावर उगीचच गरज नसतानाही सगळ्या खोलीतला दिवा किंवा पंखा आपण चालू ठेवणार नाही. अंतिमतः असं लक्षात येईल की शेवटी आपल्या गरजा कमी करण्याशिवाय पर्याय नाही. जशी शहरी जीवनशैली अतिशय नुकसान करणारी आणि टाकाऊ आहे तशीच ग्रामीण जीवनशैलीही आज शाश्वत स्वरुपाची नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने अर्बन आणि रुरल म्हणजे शहरी आणि ग्रामीण यांचा मिलाफ साधणारी ‘रूरबन’ जीवनशैली आपल्या जगाला आता अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही असे देशपांडे ठामपणे मांडतात.

गांधीजींनी सांगितलेखेड्यांकडे चला’ पण नेहरूंपासून ते आजच्या पिढीपर्यंत कोणीच हे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. खेड्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचाही प्रयत्न कधी झाला नाही. जो काही विकास, जी काही प्रगती झाली ती शहरांना केंद्रस्थानी ठेवून झाली. साहजिकच शहरांच्या गरजा भागवण्यासाठी बलिदान दिले गेले ते खेड्यांचे. इथपर्यंत देशपांडे जे सांगतात ते नेहमीचंच वाटतं. सगळीकडे आपण हेच वाचत असतो की. पण इथून पुढे ते म्हणतात, “या सगळ्या परिस्थितीत बदल करायचा असेल, शेतकऱ्याची आणि खेड्यांची पिळवणूक शोषण थांबवायचे असेल तर शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण बनून संप पुकारला पाहिजे. शेतकरी संपावर गेले पाहिजेत. एकदा अन्न मिळणं बंद झालं की शहरी लोक सोन्याचा भाव द्यायला लागतील एकेका दाण्याला...शेतकऱ्यांची पिळवणूक होते ती तो संप पुकारत नाही म्हणून.”. देशपांडे पुढे म्हणतात, “पाण्याच्या बाबतीतवॉटर बँकचेमॉडेल राबवून स्वयंपूर्ण होऊन आणि शहरी जीवनशैलीचा पूर्ण त्याग करून शेतकरी संपूर्णपणे स्वयंपूर्ण जगू शकतो.” बऱ्याच अंशी त्यांनी हे आपल्या राहण्यातून दाखवून दिलं आहेच. ऐन उन्हाळ्यात त्यांच्या तळ्यात पाणी कसे आहे, त्यांचे जंगल हिरवेगार कसे आहे, त्यांच्या विहिरींना पाणी कसे आहे हे बघायला लांबलांबहून लोक येत असतात. देशपांडेंचे रूरबन मॉडेल यशस्वी व्हायला हवे असेल तर साधारण ५० कुटुंबांनी एकत्र राहावे असे ते सांगतात. एका दृष्टीने ते एका आगळ्या वेगळ्याकम्यूनचीच संकल्पना सांगतात. प्रत्येक कुटुंबाचे शेत वेगळे असले तरी पाणीवापर वगैरे गोष्टींनी एकमेकांशी जोडलेले असतील. एका कम्यून मध्ये एखादा शिक्षक असावा, एखादा डॉक्टर असावा इत्यादी इत्यादी. प्रत्येक कुटुंब रोज जेमतेम - तास शारीरिक कष्ट करून स्वतःला किमान वर्षभर पुरेल इतके अन्न धान्य सहज पिकवू शकतो. इतकेच नव्हे तर कापसासारखे पीक घेऊन वस्त्राची गरजही भागवू शकतो. निवाऱ्यासाठी आवश्यक लाकूड आणि बांबू सारख्या गोष्टी त्याला स्वतःच्या जमिनीवर उपलब्ध होतील. आणि एकदा जीवनशैली बदलली की विजेवर असणारे आणि पर्यायाने बाहेरच्या जगावर असणारे अवलंबित्व देखील कमी होईल अशी ही सगळी देशपांडेंची मांडणी आहे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असताना आपल्या सहकाऱ्यांना घेऊनटॉलस्टॉय फार्म’ हा प्रयोग केला होता. तो काहीसा असाच. या फार्म वर सगळी कुटुंबे एकत्र राहायची, लागतील तेवढे धान्य पिकवायची. सगळ्यांच्या गरजा कमी. राहणीमान साधे. हे सगळे विचार आजच्या सामान्य सुशिक्षित नोकरदार माणसाला झेपणारा आणि पचणारा नाही. म्हणूनच “शहरी बुद्धिवादी माणसांनी या रूरबन मॉडेलचा स्वीकार केला आणि अशा पद्धतीने वेगळे आयुष्य जगायला सुरुवात केली तर इतर सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतील. आणि एकूणच मानवजातीचे कल्याण होईल.”, अरुण देशपांडे त्यांच्या आमच्या पिढीकडून असणाऱ्या अपेक्षा मांडतात, “जगात सगळीकडे क्रांती घडली ती बुद्धिवादी तरुणांमुळे. तेव्हा संपूर्ण वेगळी जीवनशैली अंगीकारण्याची क्रांती करायची असेल तर तुमच्यासारख्या तरुणांना कृतीतून इतरांना मार्ग दाखवावा लागेल.” रिव्हर्स मायग्रेशन- उलट्या दिशेने स्थलांतर हे त्यांचं स्वप्न आहे. शहरातून लोक गावाकडे परत यायला हवे आहेत. मग शहरीकरण आणि त्याच्याशी संबंधित असणारे असंख्य प्रश्न शिल्लकच राहणार नाहीत असे देशपांडे मांडतात.

‘गावाकडे परत जायचं म्हणजे गावातल्या जातीपातीच्या उच्च निचतेच्या भिंती जपून ठेवण्यासारखे नाही का? पुन्हा महारवाडे गावाच्या वेशीवर वासायला लागतील’ या माझ्या प्रश्नावर देशपांडे हसले आणि म्हणाले, “प्रश्न बरोबर आहे तुझा. पण गावात राहायला या म्हणजे आजची ग्रामीण जीवनपद्धती स्वीकारा असं माझं म्हणणं नाहीच. मला ‘रूरबन’ जीवनशैली अपेक्षित आहे. पुन्हा गावगाडे अपेक्षित नाहीत.”

अरुण देशपांडे हा एक प्रयोगशील खटपट्या मनुष्य आहे. प्रयोगातून, स्वतः त्यांत सामील होऊन त्यांनी हे मॉडेल तयार केलं आहे. पण त्यांना साथ हवी आहे ती जनसामान्यांना पटवून सोबत घेऊन पुढे जाऊ शकणाऱ्या मंडळींची. सामाजिक-राजकीय नेत्यांची. देशपांडेंचे मॉडेल आकर्षक तर आहेच पण त्याचबरोबर आव्हानात्मक आहे. आजची जीवनशैली, त्यात असणाऱ्या अगदी सहज वाटणाऱ्या गोष्टी नाकारणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. आजच्या बुद्धिवादी मध्यमवर्गाने कन्झ्युमरिस्ट किंवा टीकाकारांच्या भाषेतील चंगळवादी जीवनशैली स्वीकारली आहे. विजेचा वापर अधिकाधिक वाढत जात आहे. आणि वीज म्हणल्यावर देशपांड्यांच्या भाषेत पाण्याचा, जंगलांचा नाश. देशपांड्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच जगातील फॉसिल फ्युएल संपणार आहे. आणि सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी हे शाश्वत उर्जा स्त्रोत नाहीत. यापैकी फॉसिल फ्युएल संपण्याच्या बाबतीत दुमत असायचे कारण नाही. पण सोलार पैनेल्स बाबत मला अजूनही अधिकृत नेमकी अशी आकडेवारी मिळालेली नाही. एका सोलार पैनेल मधली एम्बेडेड एनर्जी किती आणि त्याच्या आयुष्यात किती उर्जा ते निर्माण करेल अशी आकडेवारी. त्यामुळे देशपांड्यांच्या या दाव्याबाबत माझ्या मनात तरी साशंकता आहे.

हे खरंच शक्य होईल?
देशपांड्यांची विचारधारा एकदम स्वीकारणे हे माझ्यासारख्या रूढार्थाने उजव्या विचारसारणीच्या माणसांना कठीण आहे. मुळात ‘कसेल त्याची जमीन, जमीन त्याचे धान्य, ज्याच्याकडे धान्य तो स्वतंत्र’ या देशपांड्यांच्या विचारांमध्ये ‘बाजारा’चे महत्व शून्य होते. देव-घेव आणि बाजारात अन्न धन्याला मिळणारा भाव या सगळ्या गोष्टी निघून जातात. अत्यंत छोट्या खेड्याच्या किंवा खरे तर कम्यून पातळीवर सगळ्या गरजा भागायला लागल्यावर मोठमोठे उद्योग उरणारच नाहीत. शहरात त्यांना स्वस्त मजूर देखील उपलब्ध होणार नाहीत. आणि एकूणच गांधीजींच्या स्वप्नातला विकेंद्रित आणि प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण असणारा देश तयार होईल अशी ही सगळी देशपांडेंची मांडणी माझ्या मनाला पटली नाही. यातले एक महत्वाचे कारण म्हणजे मानवी स्वभाव. माणसाला आपले आयुष्य अधिकाधिक सोपे करण्याची ओढ असते. चाकाचा शोध, अग्नीचा शोध, धातूंचा शोध, शेतीचा शोध हे सगळं होत गेलं कारण माणसाला सोपं आयुष्य जगायचं असतं. एवढं काय काय घडत आज आपण एका टप्प्यावर पोहचलो आहोत. इथून पुन्हा मागे वळण्यासाठी वा वेगळा रस्ता धरण्यासाठी किती लोक तयार होतील याबद्दल मला शंका आहे. स्पर्धा असली की माणूस अधिकाधिक त्वेषाने कामाला लागतो, नवनवीन शोध लावतो आणि इतरांपेक्षा अधिक सुखकर आयुष्य जगण्याची स्पर्धा करू लागतो. हे अगदी नैसर्गिक आहे असं माझं मत आहे. स्पर्धा, सुखकर आयुष्य सोडून तुलनेने शारीरिक कष्ट देणारे आयुष्य स्वीकारायला लोक तयार होतील? आज तरी शहरातील जीवनशैलीचा फॉसिल फ्युएल वर आधारलेला डोलारा एक दिवस कोसळणार आहे यावर विश्वास बसावा अशी परिस्थिती नाही. कागदावर गणित मांडून ही गोष्ट समजावून सांगता येते मात्र जनतेचा विश्वास कागदावरच्या गणितापेक्षा जे दिसतंय त्यावर अधिक असतो. आणि दिसताना त्याला असं दिसतं की, शहरात वीज अधिक काळ मिळते. गावात मात्र भारनियमन; गावात सायकल मारावी लागते वा बैलगाडीतून प्रवास करावा लागतो, शहरात खराब असेल कदाचित पण बस मधून फारसे कष्ट न करता प्रवास करता येतो; शहरात आनंद अधिक आहे, गावात मात्र कष्ट आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गांधीजींनी हाच सगळा प्रयोग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण औद्योगिकीकरणाच्या त्या युगात गांधींचा प्रयोग टिकाव धरू शकला नाही. आता आर्थिक उदारीकरणाची, जागतिकीकरणाची फळे चाखल्यानंतरचा मध्यमवर्गीय समाज या प्रयोगाला कितपत थारा देईल याबद्दल माझ्या मनात शंका आहेत.. पण आज जे लोक जागतिकीकरण, चंगळवाद आणि मोठ्या उद्योगांना विरोध करतात, शहरात स्थलांतरित झालेल्या गरिबांच्या हक्कांसाठी भांडतात अशा रूढार्थाने ज्यांना डावे म्हणलं जातं त्यांनी देशपांड्यांचं हे मॉडेल स्वीकारण्याचं आणि तसं जगून दाखवण्याचं आव्हान स्वीकारून दाखवलं पाहिजे. “शहरी गरिबांचे प्रश्न शहरात राहून सोडवणं म्हणजे वरवर मलमपट्टी करण्यासारखं आहे. खरं काम गावात केलं तरच उलट स्थलांतर सुरु होईल आणि प्रश्न सुटतील.” असं देशपांडे सांगतात. डाव्या मंडळींना आपल्या पाठीराख्या गरीब श्रमिक वर्गासमोर अन्यायमुक्त जीवन जगून एक उदाहरण घालून देण्याचा मार्ग देशपांड्यांच्या मॉडेलमुळे खुला झाला आहे. पुण्यात माझ्या ओळखीतले असे अनेक कम्युनिस्ट-डाव्या विचारांचे लोक आहेत. साधारण माझ्याच वयाचेच. मूळ घर कुठेतरी गावात असणारे. पण शिक्षण नोकरी निमित्त पुण्यात आलेले. यांनी आपले शहरातले आयुष्य सोडून गावातले देशपांड्यांच्या मॉडेल मधले आयुष्य जगून दाखवावे. आपल्या सोबत इथल्या इतरही स्थलांतरितांना पटवून घेऊन जाऊन दाखवावे. श्रमिकांच्या न्यायासाठी जे लढत आहेत अशा अनेकांना देशपांड्यांच्या मॉडेल वर आधारित कम्यून स्थापून त्यात जागून पाहण्याची आणि उदाहरण निर्माण करण्याची संधी आहे. कष्ट करणाऱ्या सर्वांना जमीन, सर्वांना धान्य, सर्वांना शिक्षण, सर्वांना पाणी, सर्वांना आरोग्य...!! पण त्यांना तरी हे जमेल की नाही याबद्दल शंका आहे. कारण त्यांनाही या सगळ्या खुल्या अर्थकारणाच्या मिळणाऱ्या फायद्यांची सवय झाली आहे. शहरी जीवनाची सवय झाली आहे. भांडवलवादी वाईट असतात, शेतकऱ्याला वाचवण्यासाठी उद्योगांना विरोध वगैरे बडबड करण्यापुरती यांची धमक. पण प्रत्यक्ष स्वतः जगण्याची वेळ आली तर मात्र ते शहरातच राहून बोलत राहतील. शेतकऱ्याला स्वावलंबी बनवून खेडेच्या खेडे स्वयंपूर्ण करायचा प्रयत्न या डाव्या विचारांच्या शहरी लोकांपैकी बहुसंख्य लोक करणार नाहीत याची मला खात्री आहे. असो.

एकुणात सांगायचा मुख्य मुद्दा असा की, अजून तरी देशपांड्यांची विचारधारा जशीच्या तशी आत्मसात करून राहण्याची इच्छा, माझ्यासारख्या भांडवलवादाचे, मुक्त अर्थव्यवस्थेचे आणि जागतिकीकरणाचे समर्थन करणाऱ्या शहरी तरुणांमध्ये निर्माण होणे कठीण आहे. पण माझ्यासारख्याच नाही तर डाव्या अथवा पुरोगामी वगैरे म्हणवणाऱ्या मंडळींनाही हे सहजपणे झेपणारे नव्हे. असे असले तरीही देशपांड्यांच्या पाणी आणि शेतीविषयक प्रयोगांचे स्वागतच केले पाहिजे. नव्हे, प्रसारही केला पाहिजे. कारण आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागात दिलासा देण्याचे काम या प्रयोगांमधून होऊ शकते. त्याचबरोबर अभ्यासकांनी देशपांड्यांच्या अभ्यासाला, प्रयोगाला पुढे न्यायला हवे. ती जीवनशैली आत्मसात करून जगणे आज कदाचित शक्य नसेल. पण प्रयोग म्हणून तरी हा सगळा प्रकार अधिकाधिक विकसित करणे आवश्यक आहे. म्हणजे देशपांडे म्हणतात तसे उद्या आपल्यावर इंधनाच्या बाबतीतले अस्मानी संकट कोसळले तर आपल्याकडे पर्यायी जीवनाचे विकसित असे मॉडेल अगदी तयार असेल. भविष्यातील संकटाच्या तयारीच्या दृष्टीने तरी देशपांड्यांचे हे मॉडेल जिवंत ठेवले पाहिजे आणि अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याबद्दल शंका नको. त्याचबरोबर जास्तीत जास्त सजग नागरिकांनी देशपांड्यांच्या विज्ञानग्रामला भेट द्यायला हवी. तेथे केलेले काम बघायला हवे. ते बघून, ते बोलतात ते ऐकून, आपल्या वीज वापराला, किंबहुना उधळपट्टीला थोडातरी लगाम बसला तरी मोठेच यश म्हणावे लागेल.

विकासाची व्याख्या
आपल्याला आपल्या विकासाच्या व्याख्या तपासून पाहण्याची आज गरज आहे. विसाव्या शतकात प्रचंड अवजड उद्योगधंदे, धूर ओकणारी कारखान्यांची धुराडी, कोळसा-डीझेल फस्त करणाऱ्या रेल्वे, प्रचंड मोठी धरणं हे विकासाचे निकष बनले होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योग, त्यांच्या काचेच्या इमारती, बुलेट ट्रेन्स, चकचकीत मॉल्स, मल्टीप्लेक्स, आठ-दहा पदरी रस्ते, घराघरात एसी, झोपडीझोपडीवर डिश टीव्हीची चकती, प्रत्येक हातात स्मार्टफोन, कुटुंबाकडे किमान नैनो गाडी असे विकासाचे निकष बनले आहेत. आपण ज्या कोणत्या गोष्टीला ‘विकास’ म्हणू तो शाश्वत असावा, पर्यावरणपूरक असावा, किमान पर्यावरणाला हानी न पोहचवणारा असावा, उर्जेचे उपलब्ध स्त्रोत लक्षात घेऊन होणारा असावा असा सगळा विचार आता आपल्याला, आपल्या पिढीला करायला हवा आहे. आजची व्याख्या बदलायला हवी आहे काय? मला माहीत नाही... मी यातला तज्ञ नाही. पण मनुष्य प्राण्याच्या हितासाठी आपल्या सर्वांनाच लवकरात लवकर शाश्वत विकासाच्या दिशेने, शाश्वत अशा उर्जा स्त्रोतांच्या दिशेने जावे लागणार आहे एवढे मात्र नक्की. त्या दिशेचा शोध घेणे जगभर चालू आहे. भारतात तुलनेने हे प्रयत्न कमी आहेत आणि म्हणूनच देशपांडे दांपत्यासारख्या प्रयोगशील मंडळींचे महत्व आपल्या देशात अनन्यसाधारण आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

(दि. ३ ऑगस्ट २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध http://magazine.evivek.com/?p=6254)

2 comments:

  1. Wa ! Lay Bhari ! . BHannat ! .. AJun ek asach Sampurna Gawa sathi 3-4 year cha prayog .. Konitari ek a gawat kela hota

    Bhutalachi patali wadhawinyasathi .. Nakki aathwat nahiye pan tv war magachya warshi dakhwat hote .. Krupaya mahiti asel tar post karawi

    ReplyDelete
  2. Tanmay viti cha nemaka vapar kalala nahi, surface tension ni thodya far pramanat pani yeil hi, pan mulat phakta surface tension chya joravar kiti door paryant paani odhala jail yabaddal shashankata ahe.

    ReplyDelete