Monday, April 23, 2012

क्रांतीचे दूत कोणास म्हणावे?

क्रांतीचे दूत ?!

मूर्ख आहेत ते जे काम करतात, परिस्थिती सुधारण्यासाठी,
शत्रू आहेत क्रांतीचे जे लढतात, अन्याय थांबवण्यासाठी.
कुठे कुठे चुकून परिवर्तन घडते आहे,
यानेच खरी क्रांती दूर जाते आहे.

समाज आपला निवांत आहे, आपल्याच आनंदात मश्गुल आहे.
चोऱ्या दरोडे बलात्कार झाले, कोणी कोणालाही ठार मारे,
मारू दे नां, आपण बरे अन आपले काम बरे..!
असे म्हणणारेच खरे क्रांतीचे दूत आहेत,
बाकी 'बदल घडवतो' म्हणणारे झूठ आहेत.

क्रांतीसाठी वातावरण कसे पोषक हवे,
त्यासाठी समाजात पुरेसे शोषक हवे.
म्हणून मतदान न करून शोषक निवडून द्यायलाच हवेत,
कसलीही कसर नको
म्हणून भंपक विरोधकही आपण निवडायलाच हवेत.

भ्रष्टाचार आम्हीच करतो कारण,
क्रांती जवळ यायला हवी आहे.
थंडपणे बसून राहतो कारण,
क्रांती जवळ यायला हवी आहे.

दूत होण्या क्रांतीचे, किती कष्ट करावे लागतात.
समोर कितीही काही घडले, मूग गिळावे लागतात.
परिस्थिती बिघडू देणे हेच आमचे ध्येय आहे
कारण आमचा विश्वास- यानेच क्रांती येणार आहे.

पण कोणालाच किंमत नाही, निष्क्रिय लोकांच्या योगदानाची.
सामाजिक कार्यकर्त्यांना तर कळतंच नाही, सतत बोंब आमच्या नावाची.
सामाजिक कार्यकर्ते म्हणे, अक्कल यांची दोन अणे.
काम करून कधी बदल होत नसतो,
निष्क्रियता हाच मंत्र- यानेच बदल घडत असतो!  

---------

या दूतांना वाटतं,
क्रांती म्हणजे नवीन पहाट असेल, क्रांती म्हणजे नवनिर्मिती असेल.
त्यांना कोणीतरी सांगायला हवे,
क्रांती म्हणजे अंधार असेल. क्रांती म्हणजे विध्वंस असेल.
सुक्याबरोबर ओलेही जळणार...
आणि ओले जळल्यावर धूर तेवढा होणार!

पैशासाठी अन्नासाठी पोटासाठी
होतील भीषण मारामाऱ्या
पाण्यासाठी, हवेसाठी.. रक्तासाठीही
होतील भीषण मारामाऱ्या
क्रांती म्हणजे काय असेल? यापेक्षा वेगळे काही नसेल.

क्रांतीचे हे दूत तेव्हा कपाळाला हात लावून बसतील.
कपाळ तरी शिल्लक असेल का??
की सगळ्यात आधी यांची डोकी उडवलेली असतील?

खरे सांगू?
क्रांतीसाठी वेळ यावी लागत नाही.
मुहूर्त पाहून सुरुवात करणारा क्रांती घडवत नाही.
परिस्थिती बिघडण्याआधीच ती सावरता येते.
त्या प्रयत्नांनाही क्रांतीच  म्हणले जाते.

निष्क्रिय राहून विध्वंस होण्यास खत पाणी द्यायचे,
की कृतीशील होऊन क्रांतीचे खरे दूत व्हायचे?
तुम्हीच आहे ठरवायचे,
क्रांतीचे दूत कोणास म्हणावयाचे...!


- तन्मय कानिटकर 
२३ एप्रिल २०१२ 

1 comment: