Saturday, July 9, 2011

संघर्ष अपरिहार्य आहे...

"प्रेम, शांती, करुणा, दया ही जीवनातील खरोखरच सर्वोच्च मुल्ये आहेत. आणि आपण ती विसरून नाही चालणार. आम्ही हेच काम करतो. आपण एकमेकांना प्रेमाने वागवला पाहिजे. भांडण असूया इर्षा या गोष्टी काढून टाकून प्रेमाने एकमेकांना आनंद देत जगलं पाहिजे," नईम बोलत होता",आम्ही तरुणांबरोबर यासाठीच काम करतो. कारण आपण तरुणच उद्याचे जग घडवणार आहोत. प्रेमाने वागल्याने जागतिक शांतता शक्य आहे.", इथून पुढे ऐकताना मला कंटाळा येऊ लागला,"कारण सर्व धर्मांमध्ये हेच सांगितले आहे. आणि गरिबांची गरजूंची सेवा हेच आपले परम कर्तव्य आहे.",का मी ही सगळी बकवास ऐकत होतो ?? नईम बोलतच होता,"अगदी शाळेतल्या मुलांपासून आम्ही याचे शिक्षण देतो. ही प्रियांका, ही म्युनिसिपालीटीच्या शाळेत जाऊन यासंबंधी मुलांशी बोलते. त्यांना सेवा करायला शिकवते.. माझ्या मते आपल्यासारख्या तरुणांनी सेवाकार्याला वाहून घेतले पाहिजे आणि विश्वमानव (Cosmo-human) बनायला हवे."
बकवास...बकवास... फक्त बकवास....!!! 
सुमारे अर्धा तास मी ही बडबड ऐकत होतो... एक लाख स्वयंसेवक असल्याचा दावा करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचा हा कार्यकर्ता. आणि करुणा आणि प्रेमाचा संदेश सगळ्या जगामध्ये देणं आणि प्रेमाची बंधुभावाची विश्वसंस्कृती निर्माण करणं हा या संस्थेचा उद्देश. भारतातच असले भंपक विचार पैदा होतात की जगभर याची मला कल्पना नाही. पण या असल्या विचारांची मला विलक्षण चीड आहे. मला त्या नईम ची कीव करावी वाटली. "काम अवघड आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. एक दिवस नक्की यश मिळेल." असं तो शेवटी म्हणल्यावर मी मनातल्या मनात पोट धरून हसलो. कोणत्या जगात राहतात ही माणसं?? यांना आजूबाजूला काय चालू आहे याची कल्पनाच नाहीये की हे झोपल्याचं सोंग घेतायत...????

समाजासाठी काम म्हणजे काहीतरी 'सेवा करणे' अशी बहुतेकांची कल्पना असते. अनाथ मुलांशी जाऊन खेळणे, वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी गप्पा मारणे, कष्टकरी मंडळींमध्ये जाऊन आपणही थोडेफार श्रम करणे (किंवा राहुल गांधी करतो तसले नाटक तरी करणे), झोपडपट्टीत जाऊन कम्प्युटर शिकवणे, रस्त्यावर उभ्या भिकाऱ्यांना (उगीचच चार चौघात) चिल्लर ऐवजी दहा रुपयाची नोट काढून देणे. अशा विविध गोष्टी असंख्य लोक अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. "मी दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी कार्य केले", असला उर्मट अहंभाव जोपासण्या पलीकडे यातून काही एक साध्य होत नाही असं माझं ठाम मत आहे. कोणीही कोणाचा उद्धार करू शकत नाही. आणि "सेवा" करून तर नाहीच नाही... 

आपण एखाद्या रोगावरची लस घेतो म्हणजे नेमके काय करतो? आपण आपल्या शरीरातील लढाऊ पेशींना एखाद्या रोगाच्या विषाणूंशी लढायचे प्रशिक्षण देतो. संघर्ष करायला तयार करतो. संघर्ष आपल्या रक्तातच असतो.
आपल्या हक्कासाठी किंवा "प्रेमाने करुणेने" जगण्याच्या किंवा या विषयी बोलण्याच्या आपल्या अधिकारांसाठीही संघर्ष करावा लागतो. अनाथालयात जाऊन मुलांशी खेळणे सोपे आहे. पण अनाथाश्रम उभारणे, वाढवणे हा संघर्ष आहे आणि म्हणूनच अवघड आहे. आमच्या परिवर्तन संस्थेत दर काही दिवसांनी एखाद दुसरी व्यक्ती येते जिला समाजासाठी काहीतरी सेवा करायची असते. स्वतःचा अहं सुखावण्यासाठी सर्वांना दिसेल अशी सेवा करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आपण फार सगळं सोपं काहीतरी शोधत असतो...सतत... अशा व्यक्तींना आम्ही अगदी निक्षून सांगतो की परिवर्तन संस्था ही संघर्षासाठी आहे सेवेसाठी नाही. 
काही लोकांना मी फार टोकाला जाऊन बोलतोय असं वाटेल. पण नीट विचार करा. कोणीतरी काहीतरी सेवाभाविपणे केलं म्हणून कोणाचा आजपर्यंत उद्धार किंवा प्रगती झाली आहे का??? कधीच नाही. जगात असे एकही उदाहरण नाही. 
उलट सर्व मोठ्या होऊन गेलेल्या माणसांनी एकच मंत्र समाजाला दिला- संघर्ष....!!!! 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की, तुला राज्य नको म्हणून तू युद्ध सोडून जाऊ शकत नाहीस. तुझ्या हक्कासाठी, सूडासाठी, क्षात्रधर्मासाठी तुला संघर्ष करावाच लागेल.
समर्थ रामदास स्वामी- बलोपासनेला पर्याय नाही, कारण स्वदेशासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी बलोपासना आवश्यक आहे.
"आम्ही समुद्रावर लढू, जमिनीवर लढू, आकाशात लढू. वेळ पडली तर कॅनडा मधून लढू. पण आम्ही शरण जाणार नाही. नाझी जर्मनीचा पराभव झाल्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही",- विन्स्टन चर्चिल च्या या वीरश्रीपूर्ण भाषणाने अख्ख्या इंग्लंड मध्ये जोश आला होता.
"शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा"- बाबासाहेब आंबेडकर. 
"बंदुकीच्या नळीतून सत्ता येते. (संघर्ष...!)"- माओ त्से तुंग.
शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे- महात्मा गांधी..!! अहिंसात्मक स्वातंत्र्यसंग्राम... 'संग्राम'...युद्ध... संघर्ष!!! गांधींनी सेवेचे महत्व अचूक ओळखले होते... पण सेवेला राजकारणात आणि व्यवहारात अवास्तव महत्व नव्हते दिले. 
सेवा हा माणसाच्या स्वभावाचा भाग असायला हवा कर्तव्याचा नाही. हक्कांसाठी, समानतेसाठी, अधिक चांगल्या राहणीमानासाठी, समाधानासाठी, बौद्धिक-वैचारिक-वैज्ञानिक-शारीरिक प्रगतीसाठी, अधिकारांसाठी संघर्ष अपरिहार्य आहे. सेवा माणसाच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आवश्यक आहे असे मी मानतो. सेवेमुळे माणूस निर्मळ राहायला मदत होते. सेवेमध्ये स्वतःला विसरून कार्य करणे अभिप्रेत असते. आणि यातूनच अहंभाव बाजूला ठेऊन संघर्ष करायची वृत्ती जन्माला येते. आणि ते महत्वाचे असते कारण संघर्ष करताना अहंकाराने कार्यहानीच होते. 
सेवा अत्यावश्यक असली तरी, ती सहजतेने व्हायला हवी. स्वभावाचा भाग बनून. म्हणून गांधींनी आश्रम पद्धत स्वीकारली. सेवा ही नित्यनेमाची गोष्ट बनून गेली. आणि म्हणूनच गांधी आणि त्यांचे अनुयायी संघर्ष ही गोष्ट अधिक जबाबदारीने आणि कर्तव्यभावनेने करू शकले. कारण त्यांच्या मस्तकावर सेवा करायच्या जबाबदारीचं ओझं नव्हतं... परिवर्तन संघर्षासाठी असलं तरी पुण्यात जर्मन बेकारी मध्ये झालेल्या स्फोटानंतर आमचे अनेक सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये सेवाकार्य करत होते. पण ते सहजतेने आलेले होते. त्यात जबाबदारीचे ओझे नव्हते. खरे कार्य त्यानंतर सुरु झाले- असे पुन्हा होऊच नये यासाठी प्रयत्न...! 
"सेवा हा स्वभाव... संघर्ष हे कर्तव्य..." हाच आपला मंत्र असला पाहिजे. नाहीतर विश्व मानव वगैरे भंपक विचारांच्या ओझ्याखाली आपण इतके दबून जाऊ की आजूबाजूच्या भयानक वास्तवतेची जाणीवच बोथट होऊन जाईल. 

2 comments:

  1. Aawadlay. 'Sewaa' warun halkasa wishayaantar-'Dusryaachaa wichaar na karne' mhanje swaartha. Yaachaa artha 'swatahchaa wichaar karne' mhanje swaartha asa hot naahi. Mala jara filmy examples aathawli. Ab Tak Chhappan madhye Jatin cha 'Desh ke liye kuchh kiyaa' mhanlyaawar Nana ni tyalaa wedyaat kaadhna; kinwaa A Wednesday madhye Nasir cha "Main koi maseeha nahi hoo Rathore saab, yeh main sirf apne liye kar rahaa hoo." he statement. 'Dusryaacha bhala karaawa' asa idealistic wichaar karnyaa pekshaa swataahcha rakta khawalla ki 'sewaa' jaasta parinaamkaarak hote...

    ReplyDelete