Saturday, September 25, 2010

परिवर्तन बद्दल थोडेसे....

२६/११/२००८ ला मुंबई वर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले होते... एक प्रकारचा विलक्षण अस्वस्थपणा सगळीकडे पसरला होता... तशाच अस्वस्थ मनस्थितीत मी असताना मला इंद्रनील चा फोन आला-"भेटूया".
दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. "आपण काहीतरी केला पाहिजे..." इंद्रनील बोलू लागला.
"अरे पण काय करणार?? दहशतवादावर आपण काय करणार??" -मी.
"दहशतवादावर नाही.. पण देशासाठी काहीतरी करायला सुरुवात तर करू, नुसते बसून तर राहू शकत नाही...."- इंद्रनीलला माझ्या शंका आणि नकारात्मक प्रश्न मुळीच आवडले नव्हते.
"ठीक आहे, पण काय करायचं आहे? झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण??"- मी काहीशा चेष्टेच्या सुरात त्याला विचारले.
"माहित नाही... त्याचा विचार आपण नंतर करू. काहीतरी करायचा विचार तर सुरु करू. त्यासाठी लोकांना गोळा करायला पाहिजे. यापुढे नुसतं बसून राहणं शक्य नाही. तू आहेस ना? "- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी!' असे काहीसे विचार करत मी त्याला होकार दिला. मग सलग दोन तीन वेळा आम्ही भेटलो. दरम्यान विक्रांत नावाचा एक मुलगाही आम्हाला भेटला. त्याच्याही डोक्यात असेच काहीसे विचार घोळत होते. 'मग एकत्रच काम करू' असे ठरले. आपल्या ओळखीच्या आणि काहीतरी करायची इच्छा असलेल्या सगळ्या मुलांची आपण एक मिटिंग घेऊ असे आमचे ठरले. मिटिंग साठी जागा हवी होती. मी आणि इंद्रनील बीएमसीसी चे त्या वेळचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे सरांकडे गेलो. त्यांना आमच्या डोक्यातले विचार सांगितले. आणि मिटिंग साठी एक वर्ग द्यावा अशी विनंती केली. सरांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले...! 
८ डिसेंबर २००८ ला आम्ही मिटिंग घेणार असल्याचे आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना कळवले. जे इच्छुक असतील त्यांनी यावे असेही कळवले.
दुसऱ्या बाजूला २६/११ मुळेच अतिशय अस्वस्थ मनस्थितीत "आता स्वस्थ बसायचं नाही. आपण काही ना काहीतरी करायचंच" असं म्हणत हृषीकेश आणि त्याचे मित्र विचार करत होते. त्यांना होणाऱ्या मिटिंग बद्दल कळले. आपल्यासारखेच काही विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवत आहेत हे कळल्यावर ते सगळे आपण होऊन मिटिंग ला उपस्थित राहिले.
पहिल्याच मिटिंग ला किती लोक येणार आम्हाला शंका होती. पण सुमारे ३५-४० लोक उपस्थित होते. सुमारे दोन एक तासांच्या वादविवाद आणि चर्चेनंतर एक स्वतंत्र अशी संस्था आपण सुरु करावी आणि कामाला सुरुवात करावी असे ठरले. कामाचे स्वरूप काय असावे कसे असावे हे ठरवण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरले. पुढचे २ दिवस काम विचार करण्यात गेले. स्वतंत्र संस्थेची आवश्यकता का आहे याबद्दल सर्वांना कळणे आवश्यक होते. शिवाय कामाचे स्वरूप हे इतर असंख्य संस्थांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाचे असावे यावर आम्ही अनेकदा चर्चा केली.
Be the change you want to see...!!!

दुसऱ्या मिटिंग ला सुमारे ७०-८० लोक हजर होते. सर्वांमध्येच जोश होता. काहीतरी करायचा उत्साह होता. याचवेळी "परिवर्तन" हे आपल्या संस्थेचे नाव ठेवायचे ठरले. देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास व्यक्त करून संपूर्ण कायदेशीर मार्गाने आपण काम करायचे असेही नक्की झाले. बऱ्याच चर्चेनंतर "भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासन" हेच देशाच्या प्रगतीच्या मार्गात असलेला एक मोठा अडसर असल्याचे एकमताने मान्य झाले. मग आपण काय करायचे? आपण ही शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करायचा. "Governance" सुधारण्यासाठी प्रयत्ने करायचे. जिथे सरकारला, शासनव्यवस्थेला मदत लागेल तिथे मदत करणे.. आणि शासन चुकते आहे, अन्यायी आहे असे वाटते तिथे विरोध करणे अशी स्थूलमानाने दिशा आम्ही त्या दिवशी ठरवली. इतकेच नव्हे, तर आपण संस्था स्थापून प्रयत्न करत असतानाच ज्या काही इतर संस्था आणि संघटना या सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे यावर एकमत होऊन, " सेतू " या स्वतंत्र मंचाची सुरुवात करण्याचेही ठरले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अशा स्वरूपाचा आईसब्रेकर नावाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्यानंतर  "मतदान जागृती" चे काम करायला सुरुवात केली. मतदान करा असे सांगत असतानाच कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास तसे मत देण्याचीही सोय असते हे आम्ही लोकांना सांगू लागलो. फर्ग्युसन, बीएमसीसी, शामराव कलमाडी कोलेज, अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी आणि मतदान जागृती असे अभियान आम्ही राबवले. २००९ मध्ये असलेल्या दोन निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सगळ्याची आखणी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे दिवस आम्ही रस्त्यात उभे राहून मतदान जागृतीचे काम करत होतो. एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होती. त्याही वेळी अशाचप्रकारचे काम आम्ही केले. परिवर्तन ची सुरुवात अशी एकदम मोठ्या संख्येने झाली तरी हळू हळू जसजसा २६/११ चा प्रभाव ओसरू लागला, तसतशी लोकांची संख्या रोडावू लागली. २६/११ चा सगळाच प्रभाव ओसरल्यामुळे आता एकूण सदस्यांची संख्या फारच थोडी होती. साप्ताहिक मिटिंग घेण्याची पद्धत पडून गेली होती. त्या मिटिंगना कधी कधी ४ कधी ८ तर कधी २ अशी उपस्थिती असायची. पण काम सुरु राहिले...कारण आता ज्यांना खरोखरच काम करायचे होते तेवढेच शिल्लक राहिले होते...!!
त्यानंतर सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समिती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न, माहिती अधिकाराचा वापर, निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली "जन विधानसभा" हा कार्यक्रम अशी विविध कामे परिवर्तन ने हातात घेतली.

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात जर्मन बेकरी मध्ये झालेल्या स्फोटानंतर परिवर्तन सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथल्या कर्मचार्यांना मदत करायचे काम केले. त्यावर एक लेख 'सकाळ' च्या 'मुक्तपीठ' मध्ये प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी परिवर्तनचे सदस्य होण्याची तयारी दर्शवली. साहजिकच २६/११ प्रमाणे अचानक उत्साह निर्माण झालेल्यांची संख्या त्यात खूप होती. तरीही काही खूप चांगले सदस्य परिवर्तन ला मिळाले. 'बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या' गरजेनुसार त्यांना हव्या त्या पद्धतीची उपकरणे बनवण्याच्या कामात परिवर्तन ने हात घातला. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या जनवाणी संस्थेच्या मदतीने सध्या हा उपक्रम सुरु आहे. इतर काही संस्थांच्या मदतीने पुण्यातल्या टेकड्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यावर बांधकामांना परवानगी द्यायच्या सरकारच्या योजनेला परिवर्तनचा विरोध आहे.

आज परिवर्तन ची सदस्य संख्या 'कागदावर' पहिली तर २५० च्या घरात आहे... पण प्रत्यक्षात पहिली तर साधारणपणे २५ च्या आसपास आहे..!!! कोणत्याही सामाजिक संस्थेला भासणारी चांगल्या (आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नियमित) कार्यकर्त्यांची उणीव परिवर्तनलाही भासते... कोणत्याही इतर सामाजिक संस्थेला जाणवणारी पैशाची चणचण परिवर्तनलाही जाणवते. परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे ही गोष्ट आमच्या मनाशी नक्की आहे. आज परिवर्तन एक छोटासा गट आहे... फारसे संख्याबळ, आर्थिक ताकद आमच्यापाशी नाही.. पण जे सदस्य शिल्लक आहेत ते मनापासून केवळ आणि केवळ समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आहेत. आणि म्हणूनच परिवर्तन पावणेदोन वर्षानंतरही कार्यरत आहे...आणि तसेच ते कार्यरत राहील. आजचे छोटे परिवर्तन उद्या एक मोठी विधायक शक्ती बनलेली असेल याबद्दल मला काडीमात्रही शंका नाही.

No comments:

Post a Comment