Thursday, January 20, 2011

नष्ट होण्यात मजा आहे...!

र्मग्रंथात सांगितलं आहे की एक हजार वर्षांनी जग नष्ट होणार. युरोपातल्या सगळ्या लोकांमध्ये भीती पसरली. ९९५...९९६...९९७...९९८... असे करता करता एक दिवस इसवी सन ९९९ उजाडले. शेवटचे वर्ष... देवाचीच इच्छा.. या वर्षानंतर सगळं संपणार म्हणून श्रीमंतांनी गरिबांना पैसे वाटायला सुरुवात केली. अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्या सगळ्या लोकांनी गोदामातील दडवून ठेवलेले अन्न भुकेल्या लोकांमध्ये वाटून टाकले. अनेक वर्षांपासूनचे शत्रू, मरताना कटुता संपवूयात असं म्हणत एकमेकांचे मित्र बनले. सगळे लोक जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करू लागले, मरताना गाठीशी पुण्य असावे म्हणून परोपकार करू लागले. सात आठ पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती असलेले लोक पुढच्या पिढ्यांचा विचार सोडून देऊन सर्व संपत्ती वाटून टाकू लागले. मरण्यापूर्वी हे जग एकदा तरी पहिलेच पाहिजे अशा भावनेने असंख्य लोक जग पहायला निघाले...सफरींवर  निघाले! असंख्य लोक धर्मातील पंथा पंथातील भेद मिटवून सलोख्याने राहू लागले. देशांमधील युद्धे थांबली. जसजसा विश्वाच्या अंताचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे लोक आपापल्या इच्छा पूर्ण करून चर्च मध्ये जमा झाले. २५ डिसेंबर..ख्रिसमस.. सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. असंख्य नाटके, लग्न, गाण्याचे कार्यक्रम, सामुहिक नृत्य...जल्लोषात लोक आपले मरणाचे भय आणि दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होते. अखेर इ.स. ९९९ चा ३१ डिसेंबर संपला... १ जानेवारी उजाडला... काहीच घडले नाही. मग २...३...४... करता करता ३१ जानेवारी उजाडला. हळूहळू पाहता पाहता इ.स. १००० चे बाराही महिने संपले...इ.स. १०००...१००१...१००२... ही पण वर्षे भुर्रकन उडून गेली. काहीच घडले नाही. आता जगाचा अंत होणार नाही.. लोकांना कळून चुकले. श्रीमंतांनी गरिबांना वाटलेले पैसे परत मागायला सुरुवात केली. गरिबांनी ते द्यायला नकार दिला. मग भांडणे सुरु झाली. पुन्हा एकदा भुकेले लोक रस्त्यांमधून फिरू लागले.. मित्रांमध्ये वितुष्ट आले...पुढच्या पिढ्यांसाठी द्रव्य साठवायला सुरुवात झाली. देशांमध्ये युद्धांना तोंड लागले. पंथा पंथातले वाद पुन्हा सुरु झाले. नास्तिक लोक सगळ्या आस्तिक लोकांना नावे ठेऊ लागले. चोऱ्या दरोड्यांना ऊत आला. धर्माचे प्रमुख असलेल्यांनी धर्माची म्हणजेच पर्यायाने स्वतःची सत्ता अबाधित राहावी म्हणून नवनवीन नियम तयार केले. एकूणच जग आधी होते तसलेच झाले... मधला वर्षभराचा काळ हा स्वप्नवत वाटू लागला.

----------------------------------------------------------------------------------------

जगातल्या काही मोठ्या संस्कृतींची गोष्ट...

इजिप्शियन संस्कृती...प्रचंड मंदिरे, ग्रेट पिरामिड आणि ममी बनवून मृतदेह जपून ठेवणारी संस्कृती. सुमारे दोन तीन हजार वर्षांपूर्वी या त्या आधी किमान एक हजार वर्ष अस्तित्वात असलेल्या जुन्या संस्कृतीचा नाश झाला. अत्यंत हुशार, प्रगल्भ अशी संस्कृती एकाएकी नष्ट झाली. का नष्ट झाली, कशामुळे नष्ट झाली याबाबत कसलाही खुलासा इतिहास करू शकत नाही. इ.स.पूर्व ३०० च्या आसपास अलेक्झांडर जेव्हा इजिप्त मध्ये गेला तेव्हा त्याला तिथली सगळी संकृती मोडकळीला आलेली दिसली. आणि अडाणी लोक तिथे राज्य करताना आढळले. 

मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती... त्या काळी स्थापत्यशास्त्रामध्ये आशियातील सर्वोत्तम नगरे सिंधू नदीपासून ते अफगणिस्तानातील अमुदर्या नदीपर्यंत पसरली होती. इथल्या नगर रचनेकडे पाहून आधुनिक काळातही चकित व्हावे! ख्रिस्तपूर्व ३००० पासून ख्रि.पू. १६०० पर्यंत या संस्कृतीची भरभराट झाली. त्यानंतर अचानक इथे राहणाऱ्या लोकांनी भांडी कुंडी वगैरे सगळे काही सोडून ही नगरे सोडून दिली. हडप्पा संस्कृती नष्ट झाली. इथे राहणारे लोक इथून निघून का गेले, कुठे गेले...इतिहासाला काहीच माहित नाही. त्याच लोकांचे वंशज म्हणवणारे गंगेच्या खोऱ्यात पसरलेले लोक मात्र त्यांच्या इतके प्रगल्भ नव्हते. हडप्पा संस्कृती का नष्ट झाली? 

माया संस्कृती... दक्षिण अमेरिकेत प्रचंड मोठी बांधकामे, थडगी, अप्रतिम मंदिरे बांधणारी ही संस्कृती. हजारो लोक राहू शकतील अशी अप्रतिम नगरे आणि आजही आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावेल असे खगोलशास्त्रातले ज्ञान ही या माया संस्कृतीची खासियत. इ.स. १००० पर्यंत हे सगळे टिकून होते. पुढे एका एकी ही संस्कृती नष्ट झाली. या नगरांमध्ये राहणारे लोक सगळे काही तसेच सोडून निघून गेले. पुढे पाचशे वर्षांनी जेव्हा युरोपीय वसाहतवादी तिथे आले तेव्हा त्यांना या प्रचंड नगरांमध्ये राहणारे अडाणी आदिवासी सापडले. माया संस्कृती कशी नष्ट झाली, ते सगळे लोक कुठे गेले, नेमके काय झाले याबाबत कोणालाच काही माहित नाही. 

इतक्या प्रगल्भ, हुशार आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या या संस्कृती का नष्ट झाल्या? त्यांनी आपले ज्ञान पुढच्या पिढ्यांना का दिले नाही? नैसर्गिक वृत्तीच्या विरोधात जाऊन त्या संस्कृतीन्मधले लोक असे का वागले?? त्यांना आपला वंश जिवंत ठेवायचा नव्हता का? त्यांना माणूस प्राणी जगावा असे वाटले नाही का? नेमके काय झाले? अशा नष्ट झालेल्या अजून किती संस्कृती, नगरे जमिनीखाली आहेत माहीतच नाही...

--------------------------------------------------------------------------------------

"Desire is the root cause of all evil"- Gautam Buddha

प्रजनन करणे, पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करून ठेवणे, पुढे अनेक वर्ष आपले नाव या पृथ्वीवर कायम स्वरूपी रहावे, माणूस प्राणी या जगात जिवंत ठेवावा या एका विलक्षण नैसर्गिक इच्छेपोटी माणसामाणसातील हेवेदावे वाद वाढीस लागतात. देशांमध्ये युद्ध होतात. एका गटाकडून दुसऱ्याचे शोषण होते. आणि जग कितीही बदलले तरी साधारण स्वरूप तेच राहते. रोमन साम्राज्यवाद होता.. त्यानंतर युरोपीय लोकांनी वसाहतवादातून साम्राज्यवाद सुरु केला. मग रशिया अमेरिकेचा जगवारच्या वर्चस्वाचा वाद सुरु झाला. आणि आज ची अमेरिका वर्चस्व गाजवण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. धर्मावरून युद्ध पूर्वीही होत असत, आता तशा युद्धाचा गंभीर धोका जगातल्या प्रत्येक देशाला आहे. अणूयुद्धामुळे जग नष्ट होण्याचा धोका सतत मानवाच्या डोक्यावर आहे. अल कायदाच्या हाती अण्वस्त्रे, इराणकडे संहारक अस्त्रे, भारताचा अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर सही करण्यास नकार, चीनची अणुचाचणी, ग्लोबल वॉर्मिंग, समुद्राची पातळी वाढणार, मुंबई समुद्रात जाणार, २०१२ मध्ये जगबुडी होणार अशा बातम्या आल्या की जगातल्या शेकडो देशांच्या प्रमुखांची झोप उडते. मग त्या देशातल्या प्रसारमाध्यमांची...आणि मग त्या त्या देशातल्या लोकांची... 
काय आहे हे? नष्ट होण्याची भीती? 
मानव वंश जिवंत ठेवण्याचा आणि पुढच्या पिढ्यांना काहीतरी चांगले (जे स्वतःला चांगले वाटते ते) देण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आपला वंश टिकवणे त्याला महत्वाचे वाटते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलगा होणे चांगले मानले जात असे ते यामुळे (वंशाचा दिवा वगैरे...!) आपल्या मुलांसाठी गडगंज संपत्ती साठवून ठेवावी, आपले नाव इतिहासात अजरामर व्हावे, पुढच्या पिढ्यांनी आपले नाव लक्षात ठेवावे अश काही इच्छा माणसाच्या मनात घर करून राहतात. आज मी जर अमुक गोष्ट केली तर माझ्या पुढच्या पिढ्या सुखाने राहतील हे विचार वाढले. 
एका विशिष्ट वेळी, एका विशिष्ट क्षणी एका पूर्ण संस्कृतीने, मानव समूहाने भले मग तो कितीक प्रगल्भ असेना पुढच्या पिढ्यांचा विचार सोडला तर? पुढच्या पिढ्यांचा विचार, म्हणजे पुढच्या पिढीच्या निर्मितीचाही विचार, सोडून दिला तर? तो मानव समूह/ ती संस्कृती नष्ट होऊन जाईल. पण आपण केव्हा नष्ट होणार हे नेमके त्या लोकांना माहित असेल. म्हणजे उद्या समजा एका मनुष्य समूहाने ठरवले की यापुढे एकही मूल जन्माला येणार नाही. काल जन्माला आलेले शेवटचे मूल. याचाच अर्थ त्या समूहाला माहित असेल की तो पुढच्या जास्तीत जास्त शंभर वर्षाच्या कालावधीत संपुष्टात येणार आहे. ही शेवटची शंभर वर्षे ते लोक आनंदात घालवतील की दुःखात? म्हणूनच मी सुरुवातीला एक हजार वर्षांपूर्वी काय झालं ते सांगितलं. जग नष्ट होणार असं कळल्याबरोबर सगळे लोक आनंदात जगू लागले. पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचेच नाही...कारण पुढची पिढीच नसणार आहे...! 
विचार करा, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ची भीती सोडून सर्व लोक बिनधास्त ए.सी. लावत आहेत. जगातले पेट्रोल अजून २०० वर्षात संपणार आहे, म्हणून जपून वापरायची गरज नाही. मी आज ५०० कोटी जमवून उपयोग नाही, कारण ते खर्चच करता येणार नाही... असे काही घडले तर? पृथ्वीवरची माणसाची निदान शेवटची पिढी तरी आनंदात जगेल, समाधानाने जगेल...!!! एक न एक दिवस नष्ट तर व्हायचेच आहे...अणू युद्धात किंवा असह्य तापमान वाढून नष्ट होण्यापेक्षा... समाधानाने आनंदात नष्ट होण्यात मजा आहे...! 

जगातील सर्व मोठ्या संस्कृती अशाच नष्ट झाल्या असतील?? 

Monday, January 10, 2011

समृद्ध वारसा..

भारतातील जातीव्यवस्था ही जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांना बुचकळ्यात पडणारी गोष्ट आहे. अशा प्रकारची समाज रचना जगात कुठेही नाही. वर्गभेद आहे, धर्मभेद आहे, वंशभेद आहे, वर्णभेदही आहे पण जातीभेद जगात कुठेही नाही. जातीची नेमकी व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. काही इतिहासकार म्हणतात याचे मूळ भारतीय चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आहे. काही संशोधक मात्र जातीव्यवस्थेला चातुर्वर्ण्य व्यवस्थेपासून वेगळे मानतात.

जगात सर्वत्र उच्च नीचता आहे. असा एकही देश/प्रांत नाही जिथे उच्च नीचता नाही. कुठे वर्गयुद्ध आहे, कुठे पंथांमध्ये बेबनाव आहे. आणि अशा या भेदांच्या भिंती पार करूनच प्रगती साधता येऊ शकते यात काही शंकाच नाही.
पण विचार करा, समजा उद्या भेदांच्या सर्व भिंती कोसळून पडल्या सगळे समान झाले तर? सगळ्यांचा धर्म एक, वर्ण एक, जात एक, पंथ एक... आणि याचा परिणाम म्हणजे सगळ्यांचा एक आहार, एक विचार, एक मूल्ये, एक वेशभूषा, एकंच धार्मिक स्थळ.... बाप रे... असे जग किती भयानक असेल....सगळेच सारखे झाले तर माणसाच्या आणि मुंग्यांच्या जीवनात काय फरक राहिला?? 

भेद नष्टच झाले तर जग निरस आणि कंटाळवाणे होऊन जाईल. अशा जगात राहणे माणूस प्राण्याला अशक्य होऊन जाईल. आयुष्यातली रंजकता टिकवून ठेवण्यासाठी भेद आवश्यक आहेत.
सर्वजण समान आहेत यासारखे दुसरे भंपक वाक्य नाही. सर्वजण समान असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निसर्गाचा सरळ सरळ अपमान करतो. निसर्गाने कोणत्याही दोन गोष्टी एकसारख्या ठेवल्या नाहीत. दोन व्यक्ती तर सोडाच पण पर्वत, नद्या, पाणी, झाडे, फुले, पाने सगळे काही वेगळे आहे. एक गुलाबाचे फूल आणि दुसरे गुलाबाचे फूल यामध्ये तंतोतंत साम्य कधीच सापडणार नाही. निसर्गाने प्रत्येकाला exclusive बनवले आहे. exclusive ला मला चांगला मराठी पर्यायी शब्द सापडला नाही. खरोखरच हाच शब्द योग्य आहे. एखाद्यात जे रसायन आहे ते दुसऱ्यात कधीच सापडत नाही. या नैसर्गिक वैविध्याचा अपमान करून सर्वजण समान आहेत असं उगीचच बोलण्यात काय अर्थ आहे? भेद ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे.

"समानता" जर कुठे आवश्यक असेल तर ती आहे संधी मध्ये. "समान संधी" हा एखाद्या विचारधारेचा पाया असू शकतो. धर्म स्वीकारण्याची, आपला व्यवसाय निवडण्याची, आपला जोडीदार निवडण्याची, आपला राजा निवडण्याची,रोजगाराची, शिकण्याची सर्वांना समान संधी असावी.  

भारतीय व्यवस्थेमध्ये प्रचंड जाती आहेत. आता जाती जातींमधील उच्च नीचता काढून टाकूया, मग काय दिसते? एक वैविध्याने नटलेला समृद्ध समाज. असंख्य रिती रिवाज असलेला..असंख्य वेगवेगळ्या पद्धतींनी नटलेला..इतकेच काय पण एकाच पदार्थ बनवण्याच्या शेकडो तऱ्हा असणारा अतिशय समृद्ध समाज. "आमचे ते सर्वोत्तम" हा दुराग्रह सोडला तर या वैविध्याचा आनंद लुटणे मुळीच अवघड नाही. एखाद्याच्या घरातला चिकन रस्सा अप्रतिम तर एखाद्याच्या घरात पुरणपोळी... कोणाकडे साधा मिरचीचा ठेचा सुद्धा वेगळा... गणपतीची आरास करायची प्रत्येकाची धाटणी वेगळी. मूर्तीच्या आकारात सुद्धा वैविध्य!

भारतीय जातीव्यवस्थेतून "आमचे ते सर्वोत्तम" आणि "आम्हीच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणार" या दोन प्रवृत्ती वजा केल्या तर हीच व्यवस्था समान संधींच्या पायावर उभी राहिल्यावर सर्वात जास्त समृद्ध आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरेल...!!! पण त्यासाठी आपल्या समाजातील  वैविध्याने नटलेल्या जातिव्यवस्थेच्या या समृद्ध वारश्यावर हजारो वर्षे हा साचलेला गंज साफ केला पाहिजे.
कदाचित या वैविध्यातूनच, हा समृद्ध वारसा टिकवण्याच्या जिद्दीतून खराखुरा एकोपा निर्माण होईल...व्हायला पाहिजे....!!!

Friday, December 17, 2010

खरेखुरे स्वातंत्र्य...

आजूबाजूला पाहिलं की मला नेहमी जाणवतं की,  आपण सगळेच.... तुम्ही, मी, आपले नातेवाईक, मित्र, ओळखीचे आणि अनोळखी लोकही...सगळेच गुलाम आहोत. ही गुलामी आपणच आपल्यावर लादून घेतली आहे... स्वखुशीने...!!! पिढ्यान पिढ्या अशा प्रकारची गुलामगिरी करायची सवयच जडली आहे आपल्याला. ब्रिटीश लोकांपासून भारत स्वतंत्र होणे, गोऱ्या लोकांच्या वर्चस्वातून काळे स्वतंत्र होणे, तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या जाचातून अस्पृश्य समाज स्वतंत्र होणे, सरकारी बंधनातून आर्थिक व्यवस्था मुक्त होणे इ.इ.सर्व स्वातंत्र्याच्या गोष्टी आपण वाचतो, पाहतो, अनुभवतो. यासगळ्याहून भयंकर अशा गुलामगिरीत आपण आहोत हे वास्तव आपण पार विसरून गेलो आहोत...

"भाऊ, राजसाहेबांनी सांगितलंय... तस्सच करणार आपण..", नाक्यावरचा पक्या.
"अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला बलिष्ठ करायचं स्वप्न ठेवलंय आपल्यासमोर. त्यानुसार मी काम करतो.", सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता वैभव.
"ऑर्डर आली की गोळी चालवायची हे माझं काम", सुभेदार सिंग.
"मी सांगतोय तसच वागायचं, यावर एक शब्दही चर्चा नकोय.", श्रीयुत कुलकर्णी आपल्या १८ वर्षीय मुलाला उद्देशून.
"त्या मुलीला भेटायचं नाही म्हणजे नाही.", प्रेयसी आपल्या प्रियकराला.
"आमच्या गुरूंनी सांगितलं आहे असं करायचं.", शास्त्रीय नृत्यशिक्षण घेणारी एक मुलगी.
" पिंडाला कावळा शिवला पाहिजे", भटजीबुवा ओंकारेश्वराच्या घाटावर.
"मुसलमानांना मारला पाहिजे.", एक हिंदू.

वरची सगळी वाक्ये बारकाईने वाचा.. काय दिसतंय? मला तर या सगळ्यातून गुलामगिरी दिसत आहे... शुद्ध गुलामगिरी...वैचारिक गुलामगिरी...
आपण विचार करायचे विसरलो आहोत का??? आपला मेंढ्यांचा कळप का झाला आहे??? आपण कोणाचे तरी गुलाम होण्यासाठी एवढे आसुसलेलो का आहोत?? कायम आपल्याला राजसाहेब, कलाम किंवा गुरु का हवा आहे?


 "अनुयायित्व" या बंधनात आपण सगळे अडकून पडलो आहोत. अनुयायी होणं म्हणजे काय? गुलामगिरी पत्करणं... समर्पित होऊन जाणं...स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट करणं, स्वतः विचार करण्याचा नाकारणं... यामध्ये माणूस स्वतःची सुटका करून घेतो. मानवी मनाला जबाबदारी नको असते. एखादी गोष्ट समोरचा सांगतोय म्हणून करण्याने जबाबदारी कमी होते. गांधी म्हणले की स्वदेशी वापरा म्हणून मी खादी वापरणार, सावरकर म्हणले धर्माला वाचवा की चालले धर्माला वाचवायला, स्वतःहून विचार करण्याचे टाळणे हा अनुयायीत्वाचा सगळ्यात मोठा दोष आहे. अनुयायीत्वामुळे कट्टरता येते, उच्च-नीचता येते, योग्य-अयोग्यता येते. अमुक अमुक विचारसरणी योग्य आहे म्हणून सर्वांनी तीच अनुसरली पाहिजे असा आंधळा आग्रह वाढीस लागतो. माणसाला जबाबदारी टाळण्यासमोर स्वतःच्या स्वातंत्र्याचीही फिकीर राहत नाही. आणि आता तर शेकडो वर्षांच्या या पारतंत्र्यामुळे आपण पारतंत्र्यात आहोत ही जाणीवच माणूस विसरून गेला आहे. त्यामुळे माणसाला खरोखरीचा विकास साधायचा असेल तर आधी स्वतंत्र व्हावे लागेल. स्वतंत्र याचा अर्थ समाजात न राहणे असा नव्हे. उलट या वैचारिक स्वातंत्र्याने समाज अधिक प्रगल्भ व्हायला मदत होईल.

दंगलींच्या वेळी माझे आयुष्यात काहीच बिघडवले नाही अशा व्यक्तीला मी केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यामुळे ठार करायलाही तयार होतो. माझ्या नेत्याविरोधात कोणी मतप्रदर्शन केले तर त्या माणसाचे डोके फोडायला मी मागे पुढे बघत नाही. माझ्या गुरूंची कोणतीही कृती मला वंदनीयच वाटते. माझ्या अध्यात्मिक गुरूने सांगितले तस्सेच मी वागायचा प्रयत्न करतो. मग ते किती का मूर्खपणाचे असेना.

जसे एखाद्या व्यक्तीचे अनुयायित्व असते तसेच ते देशाचेही असते. पाश्चिमात्य देशांचे अनुयायित्व आपल्या समाजातील काही घटकांनी घेतले आहे. पण त्याचवेळी सनातन धर्माचे अनुयायित्व घेतलेले लोक त्या घटकांना विरोध करतात. एकूणच या विरोधांमुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येते. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांना विरोध करतात. अनुयायीत्वामुळे दुसऱ्याला आदर देण्याची प्रवृत्ती कमी होते. माणसाला 'माणूस' म्हणून आदर द्यायला आपण केव्हा शिकणार आहोत???

या दोषांमुळेच कोणाचाही आणि कसलाही अनुयायी होणं मला साफ नामंजूर आहे. चाहता आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. मी अनेकांचा चाहता आहे. अनेकांमाधल्या अनेक विविध गुणांचा चाहता आहे. पण अनुयायी? मुळीच नाही. त्यामुळेच मी एकाच वेळी गांधींचा आणि सावरकरांचा चाहता असू शकतो. एकाच वेळी हिटलर आणि विन्स्टन चर्चिलचा चाहता असू शकतो. पण अनुयायी? त्यांच्यात कट्टरता असते. गांधींच्या अनुयायांना सावरकरांचं नाव काढलं तरी तिडीक येते. आणि गांधींचा विषय निघाल्यावर सावरकरवादी कडवटपणे बोलतात.

माणसाला माणूस म्हणून आदर देण्यासाठी प्रत्येकातील दोषांचाही आदर केला गेला पाहिजे. तरच तो खराखुरा आदर ठरू शकेल. एखादी व्यक्ती शंभर टक्के योग्य आणि अगदी परफेक्ट असूच शकत नाही. मग ते गांधी असोत सावरकर असोत किंवा हिटलर असो.
मी ज्या व्यक्तीचा अनुयायी आहे ती व्यक्ती चूक करूच शकणार नाही किंवा मी ज्या धर्माचा आहे त्यामध्ये काही चूक असूच शकत नाही, या भावनेतून केवळ आणि केवळ वैचारिक पारतंत्र्यच दिसून येतं.

संतांनी कायम सांगितलं की देव नाही देव्हाऱ्यात, देव माणसात पहा. याचा अर्थ काय? एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून समोरच्या व्यक्तीला महत्व द्या, आदर द्या. धर्माच्या नावे कर्मकांड करत बसू नका. त्यावर त्यांच्या अनुयायांनी काय केलं? त्यांनी संतांना देवत्व बहाल केलं. आणि त्यांना देव म्हणल्यावर ते म्हणतील ते सगळं सत्य. मग एखादा आनंद यादव जेव्हा तुकारामांचं "माणूस"पण आपल्या कादंबरीतून दाखवायचा प्रयत्न करतो तेव्हा तुकारामांना देव मानणारे हजारो अनुयायी आनंद यादवांना बिनशर्त माफी मागायला लावतात. इतकेच नव्हे तर पुस्तकावर बंदीही येते. अगदी असंच घडतं शिवाजी महाराजांबाबत, आणि ज्याला अनुयायी आहेत अशा प्रत्येकाबाबत...


अनुयायित्व आपल्याला बौद्धिक दृष्ट्या पंगू करून सोडते.
आपण प्रत्येक गोष्टीवर स्वतः विचार केला पाहिजे. इतरांचं लिखाण वाचलं पाहिजे, इतरांचे विचार ऐकले पाहिजेत, पण त्यावर स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. ज्या वेळी आपण वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त करू तेव्हा माणूस विवेक बुद्धीने काम करेल. आणि म्हणूनच संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले व्यक्तिगत स्वरूपाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. अनुयायित्व नाकारून व्यक्तिगत स्वातंत्र्याचा लख्ख उजेड सर्वत्र पसरायला हवा.
माणूस म्हणून आपला विकास होण्यासाठी या स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे...

Monday, December 6, 2010

रद्दीचा महिमा...!!

"मला परिवर्तनचं काम करायची खूप इच्छा आहे रे. पण नोकरीमुळे शक्य नाही.", माझ्या एका मित्राने मला सांगितले.
"तू दर महिन्याला तुझ्या घरातली रद्दी दे. तेवढं करू शकलास तरी खूप मदत होईल.", माझ्या या उत्तरावर तो बुचकळ्यात पडला. "रद्दी?? त्याने काय होणार??" त्याला काहीच कळेना...
कोणत्याही सामाजिक संस्थेला दोन महत्वपूर्ण गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे उत्तम कार्यकर्ते आणि काम करण्यासाठी पैसे.
कोणतंही काम करायचं तर पैसे लागतातच.. परिवर्तनच्याही कामाला पैशाची गरज पडते. माहिती अधिकारात अर्ज दाखल करायचे असतात, येणाऱ्या माहितीसाठीचे पैसे द्यावे लागतात. कार्यक्रम असतात, पत्रकार परिषदा असतात, पोस्टर बनवायची असतात... एक ना अनेक गोष्टी. या सगळ्यासाठी पैसे गोळा करणे हा एक मोठा कठीण उद्योग असतो. त्यावर इतर काही सामाजिक संस्थांप्रमाणेच आमचाही तोडगा म्हणजे "रद्दी संकलन"...!!! गेले दीड ते दोन वर्ष काही घरातून दर महिन्याला रद्दी गोळा करून ती विकून जे पैसे गोळा होतात ते परिवर्तन साठी वापरले जातात. दर महिन्याची रद्दी गोळा करून असे कितीसे पैसे गोळा होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. इतकेच काय आमच्या काही सदस्यांनाही अजून रद्दीचा महिमा नीटसा उमजला नाहीये. एक वर्तमानपत्र असेल तर दर महिन्याला किमान ४५ ते ५० रुपयाची रद्दी साठते. दोन वर्तमानपत्र अनेकांच्या घरात असतात. त्यामुळे प्रत्येक घरातून किमान ८० ते १०० रुपयांपर्यंतची रद्दी मिळू शकते. आणि विश्वास नाही बसणार, पण फक्त रद्दी संकलनातून एक सामाजिक संस्था चालू शकते...
परिवर्तनच्या कामात हातभार लावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. गेल्या दीड वर्षात ६००० पेक्षा जास्त रुपये केवळ ६ घरांमधील रद्दीतून जमा झाले. ६ घरातील रद्दी जर एवढा हातभार लावत असेल तर अनेक घरातल्या रद्दीतून खूपच कामाला हातभार लागेल.
केवळ १०० घरातील रद्दी दर महिना गोळा होऊ शकली तर त्यातून किमान ६००० रुपये दरमहा गोळा होऊ शकतात. परिवर्तन च्या कामाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी या इंधनाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ज्या कोणाला परिवर्तनचे प्रत्यक्ष काम करणे शक्य नाही. त्याने आपल्या घरातील रद्दी परिवर्तनला द्यावी. आपले हे योगदान सुद्धा चांगल्या परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक पाऊल असेल.
विचार करा आणि लगेच रद्दी द्यायला सुरुवात करा...!!!!

Wednesday, November 17, 2010

"असल्या फंदात पडू नकोस..."

मध्यवर्गीय लोकांना सुरक्षिततेबाबत "पझेसिव्हनेस" तयार झाला आहे. एका सुरक्षित कवचात राहून आयुष्य जगण्याची सवय आणि आवड सगळ्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे जरा कोणी त्या कवचातून बाहेर पडून काही वेगळे करू लागला की त्याला मागे खेचत सुरक्षित कवचात आणण्याची स्पर्धा मध्यमवर्गीय करतात.
माझ्या ओळखीत कित्येक मुलं अशी आहेत की जे सुरुवातीला देशासाठी/समाजासाठी काहीतरी करावं या विचाराने आमच्या परिवर्तन संस्थेत आले, आणि नंतर "असल्या फंदात पडू नकोस" अशी घरून सक्त ताकीद मिळाल्यावर येण्याचे बंद झाले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून परिवर्तन मध्ये असणारी स्वयंसेवकांची उणीव आज दोन वर्षांनतरही कायम आहे. घरात बसून सिस्टीम वर टीका करणं, मतदानालाही बाहेर न पडणं...बोलण्यात "हुकुमशाहीच हवी खरं तर.." असे उद्गार काढणं आणि एका बाजूला टिळकांपासून गांधींसकट सावरकरांपर्यंतच्या "स्वातंत्र्य" सैनिकांचे गुणगान करणं आणि कोणी काही चांगलं काम करू लागला की "बाकी काही उद्योग नसतील" अशी खोचक टीका करणं यापलीकडे मध्यमवर्ग काहीही विशेष करत नाही.

मध्ये एकदा अभय बंग यांचं एक भाषण ऐकलं... "सध्या समाज pleasure च्या मागे लागला आहे.. 'MORE pleasure, INTENSE pleasure, CONTINUOUS pleasure आणि UNENDING pleasure' हेच मध्यमवर्गाच्या आयुष्याचं ध्येय झाल्यासारखं झालं आहे." असं त्यावेळी अभय बंग यांनी सांगितलं. यामधल्या "Pleasure" या शब्दाच्या जागी "security" हा शब्द टाकला तरी ते सत्यच आहे...

परिवर्तन च्या माध्यमातून आम्ही नुकतेच राजकीय पक्षांच्या अतिक्रमणाबाबत चा प्रश्न हाती घेतला आहे. आमच्या एका सदस्याला त्याच्या लंडन मधल्या भावाचा फोन आला... "असल्या फंदात पडू नकोस.."!! राजकीय पक्ष म्हणले की मध्यमवर्गीय लोकांच्या मनात धडकी भरते. इतकी दहशत खरोखरच जर राजकीय पक्षांनी निर्माण केली असेल तर परिवर्तनचे काम दुप्पट गतीने आणि खरं तर दुप्पट आक्रमकतेने करायची आवश्यकता आहे. कारण दहशत असेल तिथे लोकशाही नांदू शकत नाही.
एका अत्यंत मागासलेल्या, स्वार्थी आणि क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन मध्यमवर्गीय लोकांशी बोलताना होते... आणि हे मध्यमवर्गाच्या रक्तातच आहे की "मध्यमवर्ग" या नावातच आहे कळायला मार्ग नाही... शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी एका माणसाने आपले आयुष्य लोकांसाठी खर्च करायचे ठरवले. पुण्यातल्या मध्यमवर्गीय क्षुद्र लोकांनी त्या माणसाची हुर्यो उडवली, टोमणे मारले, मागे खेचायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला कुचेष्टेने ठेवलेले "सार्वजनिक काका" हे नाव पुढे मात्र अत्यंत आदराने घेतले जाऊ लागले ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ज्योतिबा फुले, टिळक, आगरकर, महर्षी कर्वे,  आंबेडकर, गांधी, सावरकर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... असंख्य.....!!!

भ्रष्टाचार नको असे प्रत्येकाला वाटते, पण एका बाजूला भ्रष्टाचार नसेल तर आपण इतर अल्प उत्पन्न गटाच्याच दर्जाचे होऊ या भितीमाधेही मध्यमवर्ग बुडाला आहे... 'समजा एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सामान्यतः लोकांना जर ४ दिवस लागत असतील तर मला पण तेवढेच लागतील...त्यापेक्षा २०० रुपये देऊन २ दिवसात का ते करून घेऊ नये.' अशी मध्यमवर्गीय मनोवृत्ती भ्रष्टाचार शाबूत ठेवते. किंबहुना भ्रष्टाचाराला अभय देते. आणि तरी भ्रष्टाचार विषयावर व्याख्यान झोडणारे आणि ऐकणारे दोघेही मध्यमवर्गीयच असतात...!!!

शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्याच्या घरात... असं म्हणलं जातं... आजकाल तर अशी परिस्थिती आली आहे की शेजारी जरी शिवाजी जन्माला आला तरी आपले महाभाग त्यांच्याकडे जातील आणि त्या शिवाजी च्या आईला म्हणतील," काकू, तुमच्या मुलाला आवरा, फार व्रात्य झाला आहे. आत्ताच करा काहीतरी नाहीतर नंतर मुलगा पार वाया जाईल."
असे किती शिवाजी जन्माला येऊन बँक, सरकारी ऑफिस किंवा आय टी कंपनीत कारकुनाचं काम करत असतील काय माहित...
सगळ्यांचेच हे केवढे तरी मोठे नुकसान आहे....

मध्यमवर्ग बदलाला घाबरतो. वेगळेपणाला घाबरतो. पण अतिशय मोठा विरोधाभास असा की या बदलाचे, वेगळेपणाचे विलक्षण आकर्षण याच वर्गाला वाटत असते.(परिवर्तन बद्दल विलक्षण कुतूहल असणारे आणि कौतुक करणारे असंख्य भेटले. पण आपण होऊन काम करायची तयारी दाखवणारे जवळपास नाहीच...) पण त्यामुळे त्या बदलाचा एक भाग व्हावे असे मात्र त्यांना वाटत नाही. कारण सदैव कुठल्यातरी भीतीने मध्यमवर्ग ग्रासलेला असतो.. आणि ही “गमावण्याची” भीतीच सुरक्षिततेबाबतचा पझेसिव्हनेस निर्माण करते....

'मी आणि माझे छोटेसे कुटुंब... माझ्या कुटुंबाचं सुख...आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक वगैरे वगैरे सर्व प्रकारची सुरक्षितता या पलीकडे पहायचे नाही..' या क्षुद्र मनोवृत्तीच्या दलदलीत सगळा मध्यमवर्ग पुरता रुतलेला आहे... यातून या समाजाला बाहेर काढायचे काम जवळपास अशक्य आहे... कारण ही मनोवृत्ती सामान्य मानवी स्वभावाचा भाग आहे... त्यामुळे जोवर मध्यमवर्ग आहे तोवर ही मनोवृत्ती असेल... आणि म्हणूनच कोणत्याही परिवर्तनाच्या, बदलाच्या कार्यात मध्यमवर्गाचा पाठींबा कधीच मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे... पाठींबा किंवा सहकार्य तर सोडाच उलट विरोध सहन करावा लागेल... पण ज्या दिवशी परिवर्तनाच्या तुमच्या उद्दिष्टांमध्ये तुम्ही सफल व्हाल तेव्हा हाच वर्ग नाकं मुठीत धरून तुमच्यासमोर लोटांगण घालायला येणार आहे याबद्दल मला जराही शंका नाही...