हसणं ही एक विलक्षण गोष्ट आहे..मानव जातीला असलेलं ते एक वरदान आहे.
एखादी व्यक्ती हर्षा भोगले सारखी असते की ज्याच्या प्रसन्न हसण्याने सगळं वातावरणाच प्रसन्न होऊन जातं... काही जणांचं हसणं इतकं निर्मळ असतं की त्या निर्मळतेची भूल पडावी (वीस वर्ष सातत्याने खेळूनही, आजही विकेट पडल्यावर सचिन तेंडूलकर तितकाच निर्मळपणे कसा हसू शकतो?!!!)... काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा ('कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल फील द्यायचा आठवतंय?! ).. एखाद्याचं खुनशी हास्य ज्यामुळे समोरच्याला कापरे भरावे (अमरीश पुरीचा कोणताही सिनेमा बघा यासाठी..).. कोणाचे लाचार हसणे- जे पाहून एखाद्याला तिडीक जावी (आजूबाजूला पहिले तरी हजारो उदाहरणे सापडतील)...एखादीच माधुरी नाहीतर मधुबाला जिच्या केवळ एका हास्यासाठी लाखो लोक दिवाने व्हावेत.. एखादीच मोनालिसा, जिच्या स्मित हास्यावर शेकडो वर्ष उलटली तरी लाखो पानं लिहिली जात आहेत, संशोधन होत आहे..!!!
सामान्यतः माणसं ओळखीचा माणूस समोर दिसला तर त्याच्याकडे पाहून हसतात आणि समोरचाही माणूस हसूनच प्रतिसाद देतो. जगात कुठेही गेलात तरी यामध्ये फरक पडणार नाही. कारण हीच माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते..! सत्ताधारी नामक एक वर्ग पूर्वीपासून जगात सर्वत्र आहे.. या वर्गाने 'शिष्टाचार' या नावाखाली निर्मळ आणि स्वच्छ हसण्याची फार गळचेपी केली आहे. ब्रिटीश लोक कधी काळी जगाचे सत्ताधारी असल्याने तिथे तर हे जरा अतीच आहे. उगीचच थोडसंच कसनुसं हसायचं किंवा हसताना आवाज करायचा नाही.. असल्या फालतू आणि फुटकळ शिष्टचारांमुळे अनेक जण मोकळेपणे हसणं विसरून गेले आहेत की काय असं वाटतं.. शिष्ठ मंडळींचा आचार म्हणजे शिष्टाचार अशी माझी शिष्टाचार ची व्याख्या आहे. माझ्या ओळखीत काही मंडळी आहेत, कदाचित त्यांच्या मते हसायला पैसे पडतात...! त्यामुळे रस्त्यात वगैरे दिसल्यावर ओळख दाखवायला आपण जरी हसलो तरी ही मंडळी चेहऱ्यावर मख्ख... किंवा फार फार तर ओळख दाखवणारी अल्पशी हालचाल, एखाद दुसरी सुरकुती पडेल चेहऱ्यावर इतकीच...!!! यामागे नेमके काय कारण असते हे मला कधीच न उलगडलेले कोडे आहे. लोक एकमेकांकडे बघून सहज हसत का नाहीत? 'समोरचा हसला तरच मी हसेन' असा विचार काहीजण करतात.. यामध्ये 'अहं'चा भाव आहे. तो चूकच असला तरी किमान समोरचा हसल्यावर तरी हे लोक हसतात..! पण काही लोक तुम्ही काहीही केलं तरी हसत नाहीत. यामध्ये त्यांना कमीपणा वाटत असावा. पण अशा मंडळींचं जरा निरीक्षण केल्यावर मला जाणवलं ते म्हणजे ते स्वतःच्या अत्यंत जवळच्या मित्रांमाधेही अतिशय थोडं अर्धवट आणि मोजकं हसतात... एखाद्या कद्रू मारवाड्याने पै पै खर्च करताना करावा तसा विचार हे लोक एखाद्या सेकंदाच्या हसण्यासाठी करतात. "याच्याकडे पाहून हसल्याने माझा काही फायदा होणार आहे का?" असा विचार हे लोक करत असतील का?? असा विचार जर कोणी करत असतील तर ते महामूर्ख आहेत असं माझं ठाम मत आहे. कारण फायदा नसला तरी तोटाही नसेल तर छान प्रसन्न हसायला काय जातं?? असो.. या लोकांच्या शिष्ठपणाला कोण काय करणार?! आपण मात्र यांच्याकडे बघून हसायचे आपले व्रत सोडू नये. कारण मुळात हसणे फुकट असल्याने त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आपले हास्य फुकट गेले असेही आपल्याला म्हणता येत नाही...!!! हसल्यामुळे तब्येत उत्तम राहायला फायदा होतो असं डॉक्टर म्हणतात... असेल बुवा..! आमच्या दिलखुलास हसण्याने आमचीच तब्येत चांगली राहात असेल तर काय वाईट आहे! शिवाय हसण्याने मानसिक आरोग्य सुधारते असंही म्हणतात.
माझा एक मुंबई मधला मित्र आहे, म्युझिक अरेंजर आहे. दिवसातले १२-१४ तास तो कामात असतो. कामाचा थकवा तर येतोच. पण कामाच्या ठिकाणी असलेल्या मंडळींनाही खूप वेळच्या कामामुळे खूप ताण पडतो. अशा वेळी हा पठ्ठ्या आपल्या धमाल विनोद बुद्धीच्या सहाय्याने सगळं वातावरण सतत हसवत ठेवतो. तुफान विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहून थकवा कमी होतो आणि शिवाय कामही अतिशय उत्तम होतं असा त्याचा अनुभव आहे.
सचिन तेंडूलकर एकदा एका मुलाखतीत म्हणला होता, "टीम मध्ये धमाल वातावरण ठेवणारे दोन खेळाडू आहेत एक युवराज आणि दुसरा हरभजन. हे दोघे सतत इतरांची थट्टा करणे खोड्या काढणे अशा गोष्टी करून टीम ला हसवत राहतात. ड्रेसिंग रूम मधेच आम्ही इतके मस्त वातावरणात असतो की साहजिकच त्याचा उत्कृष्ट परिणाम आम्हाला खेळताना दिसून येतो."
माझ्या एका मित्राच्या घरातले त्याच्यासह सर्व जण जाड..! पण त्यांच्या घरातले सर्व जण स्वतःच्या जाडीवर दिलखुलासपणे विनोद करतात आणि हसतात...! इतकं की शेवटी अनेकदा लोकच म्हणतात, "एवढे काही तुम्ही जाड नाही..!" स्वतःच्या व्यंगांवर, कमीपणावर, चुकांवर मोकळेपणे हसता येणं हे प्रगल्भपणाचे लक्षण आहे. घसरून पडणाऱ्याला सगळेच हसतात... आणि जरूर हसावे त्यात काहीच चूक नाही..!! स्वतः घसरून पडल्यावरही स्वतःवर हसता यायला हवे..! कधी कधी लोक आपल्याला हातोहात मूर्ख बनवतात.. अशा घटना प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. त्या त्या वेळी आपण चिडतो संतापतो (ती प्रतिक्रिया असते!) पण नंतर मात्र आपल्याला किती सहज एखाद्याने फसवावे यावर हसता यायला हवे. नंतर आयुष्यभर उगीचच ती घटना आठवत चिडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा त्यावर हसून त्या आठवणींवर मनसोक्त हसावे, स्वतःची थट्टा करावी.. यामुळे किती समाधान मिळते हे आपल्यालाच जाणवेल.
यासंबंधी एक किस्सा आठवतो मला. माझी मावशी सांगलीची. तिचे आजोबा फार सज्जन आणि सरळ माणूस. ते सांगलीतल्या एका दत्त मंदिराचे विश्वस्त होते. एक दिवस त्यांच्याकडे एक कोणीतरी 'महाराज' आले आणि म्हणले मी देवाचाच अवतार. बरेच दिवस त्यांनी फुकट पाहुणचार झोडला. पंचक्रोशीतून लोक त्यांच्या दर्शनाला यायचे. एक दिवस त्यांनी सांगितले की जाऊन मंदिरात नारळ फोडा आणि दत्त महाराज स्वतः तुम्हाला दर्शन देतील. मावशीचे आजोबा आणि असंख्य लोक मंदिरात गेले आणि नारळ फोडला. लोकांनी भिंग लावून लावून दत्त दिसतो का पहिले. पण उत्तम खोबऱ्याव्यतिरिक्त आत काहीच नव्हते. मंडळी घरी येऊन पाहतात तर काय? ते महाराज पसार झालेले...!! घरातल्या त्या वेळच्या सर्व मंडळींच्या (स्वतःच्या आजोबांसकट) बावळटपणावर मावशी आणि आम्ही सगळेच नेहमी मनसोक्त हसतो...!!
"दैनिक सकाळ"ने एकदा १०,००० हसणाऱ्या लोकांच्या फोटोंचं प्रदर्शन लावलं होतं. मला त्यांच्या या विलक्षण प्रदर्शनाचं प्रचंड कौतुक वाटलं होतं. अगदी सामन्यातला सामान्य माणूस त्या फोटोंमध्ये होता (माझाही फोटो होता त्या प्रदर्शनामध्ये). रस्त्यावर फिरून फिरून पुण्यातल्या विविध भागात जाऊन हे फोटो काढण्यात आले होते. त्या प्रदर्शनात एक फेरफटका मारला तरी विलक्षण वाटत होतं.. जिकडे पाहू तिकडे हसणारे चेहरे..! अहाहा... सामान्य लोकांच्या हसण्याचा असामान्य अविष्कार होता तो... कितीतरी लोकांच्या नकळत त्यांचे फोटो टिपण्यात आले होते. लहान बाळांपासून ते सुरकुत्यांच्या जाळ्या चेहऱ्यावर असलेल्या वृद्ध मंडळींपर्यंत सर्व जण मस्त हसतायत...!!!
रंग दे बसंती मध्ये ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडी एक डायलॉग आहे, 'मला दोनच प्रकारे मरणाऱ्या व्यक्ती माहित होत्या. एक जे आरडा ओरडा करत मरतात आणि दुसरे जे शांतपणे मरतात, पण मग माझी तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींशी भेट झाली. जे हसत हसत मरणाला सामोरे गेले... "
माणसाच्या आयुष्यात अडचणी आणि दुःखाचे क्षण येतंच असतात. पण अशा वेळी उदास चेहरा केल्याने अडचणीतून मार्ग सापडणार असतो काय?? मग त्यापेक्षा सदा हसतमुख राहिल्याने जर स्वतःबरोबर इतरांनाही आनंद मिळणार असेल तर त्यात वाईट काय..!!
मला कधी कधी चार्ली चाप्लीन, लॉरेल हार्डी, मिस्टर बीन, आर के लक्ष्मण, परेश रावल, मेहमूद, जॉनी लिव्हर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले आणि सर्व विदुषक लोक या मंडळींचं विलक्षण हेवा वाटतो.. जगाला हसवण्याचं काम हे फार मोठं काम आहे. स्वतःची दुःखं चिंता बाजूला ठेवून लोक यांच्याकडे पाहून मनसोक्त हसतात... केवढं मोठं काम... केवढे उपकार या मंडळींनी जगावर केले आहेत. सातत्याने जगाला हसत ठेवले आहे.
हसायला पैसे पडत नाहीत. हसल्याने कोणतेही नुकसान होत नाही. तेव्हा हसताना कंजूषी करणे बंद करूया.. शिष्ठपणा सोडून देत दिलखुलास आणि मोकळेपणे हसायला शिकूया...
'चिंटू'चं एक पोस्टर होतं माझ्याकडे- "मला हसायला आवडतं, तुम्हाला?"...!!!!
मला खरंच हसायला खू SSSSSS प आवडतं...! तुम्हाला??













