Monday, July 8, 2024

नशिबातले ‘स्टार्स’!

वर्तमानपत्रात सिनेमाच्या परीक्षणाखाली त्या सिनेमाला ‘स्टार्स’ दिलेले असतात. ही पद्धत बरीच जुनी आहे. जी व्यक्ती परीक्षण लिहिते तीच ते स्टार्स देखील देते. आणि आपण सगळे केवळ वाचक या नात्याने त्यात सहभागी. एखादं हॉटेल थ्री-स्टार आहे की फाईव्ह स्टार आहे हे आपण ठरवत नाही. कोण ते ठरवतं हे जाणून घेण्याच्या फंदातही आपण फारसे पडत नाही. ते कोणीतरी आपल्यासाठी ठरवून दिलेलं असतं जणू. इथेही केवळ ग्राहक या नात्याने आपण त्यात सहभागी. अशा काही मोजक्या जागा सोडल्या, किंवा वर्तमानपत्रातले वाचकांचा पत्रव्यवहार वगैरे विभाग सोडले तर सामान्य माणसाची भूमिका बघ्याचीच असे. इंटरनेट क्रांतीने या व्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला. इंटरनेटच्या लाटेवर स्वार होत सोशल मिडियाची त्सुनामी आली आणि तिने पारंपरिक व्यवस्थेला नुसता धक्का दिला असं नव्हे तर ती व्यवस्था उध्वस्त करून टाकली.


वर्तमानपत्र असो किंवा कोणत्याही पारंपरिक व्यवस्था, सगळीकडे नियंत्रण ठेवणाऱ्या संपादक नामक यंत्रणा असते. म्हणजे कोणता मजकूर वाचकांपर्यंत पोहचणार आणि कोणता नाही हे संपादक, मालक मंडळींच्या मर्जीवर अवलंबून. सोशल मिडियाने हे नियंत्रण हटवले. आणि ‘युझर जनरेटेड कंटेंट’ म्हणजे वापरकर्त्यांनी तयार केलेला मजकूर असणाऱ्या वेबसाईट्स, सोशल मिडिया आला. यूट्यूब हे त्याचं एक अव्वल उदाहरण. स्वतः यूट्यूब कंपनी व्हिडीओ, गाणी, सिनेमे तयार करत नाही. पण तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक व्हिडीओ तयार करतात आणि यूट्यूबवर टाकतात. म्हणजेच जे वापरकर्ते आहेत तेच निर्मातेही आहेत! युट्यूबवर दररोज साधारणतः तब्बल ७ लाख २० हजार तासांचा व्हिडीओ मजकूर लोकांकडून अपलोड होतो म्हणजे नव्याने बघण्यासाठी उपलब्ध केला जातो. यूट्यूबचे छोटे व्हिडीओज् म्हणजे ज्यांना YouTube Shorts म्हणतात ते दिवसाला सरसरी ७,००० कोटी वेळा बघितले जातात. हे आकडे एका दिवसातले आहेत! वर्षाला जवळपास ३००० कोटी डॉलर्स एवढा यूट्यूबचा जाहिरातीतून येणारा महसूल आहे. वापरकर्त्यांनी तयार केलेला मजकूर असणाऱ्या वेबसाईट्सने काय क्रांती केली आहे त्याची कल्पना यावी म्हणून ही आकडेवारी दिली.

या अभूतपूर्व आणि चक्रावून टाकणाऱ्या प्रकाराबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने अजून एक गोष्ट आणली ती म्हणजे, ज्याप्रमाणे वापरकर्ते हेच मजकूर निर्माते झाले, त्याचप्रमाणे वापरकर्ते हेच परीक्षकही झाले. सिनेमाचं परीक्षण वर्तमानपत्रात काय आलं आहे यापेक्षा वेगवेगळ्या वेबसाइट्सवर प्रेक्षकांनी काय रेटिंग दिलं आहे ते आता आपण बघू लागलो. स्विगी किंवा झोमॅटो मोबाईल अप्लिकेशन वापरून घरी जेवण मागवलं तर जेवणाला, आणि जेवण पोचवण्याची सेवा यालाही आपण स्टार्स देऊ लागलो. उबर किंवा ओला वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅबने गेलो तर ती सेवा कशी वाटली याबद्दल स्टार्स देऊन मत व्यक्त करू लागलो. गुगल असो नाहीतर फेसबुक सारखं सोशल मिडिया, आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू लागलो. किंबहुना कोणतीही सेवा निवडताना ‘रेटिंग काय आहे हे बघणं त्याचा आपल्या निर्णयावर कळत-नकळतपणे परिणाम होणं हे आपल्या आयुष्याचा आज भाग बनलं आहे. अगदी डॉक्टर मंडळींनाही प्रॅक्टो सारख्या वेबसाईट्सवर आपलं रेटिंग नीट राहील यासाठी प्रयत्न करावे लागतात. फेसबुकचा जन्म २००४ चा, यूट्यूबचा २००५ चा. झोमॅटो आलं २००८ मध्ये, तर स्विगी आलं २०१४ मध्ये. उबरचा जन्म २००९चा तर पाठोपाठ ओला कॅब्स आल्या २०१० मध्ये. डॉक्टरांसाठी प्रॅक्टो आलं २००९ मध्ये. गेल्या अवघ्या वीस वर्षांत अवतरलेलं हे युग आहे. हे सांगायचा उद्देश हा की आज लग्नाला उभी असणारी पिढी त्यांच्या कळत्या वयात हे टप्पे आणि बदल बघत मोठी झाली आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षांत अवतरलेल्या या युगात आपण सगळे ‘परीक्षण करणारे’ झालो आहोत.

नव्या युगातल्या आपल्या बदललेल्या सवयींचा आपल्या लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. जाता येता अनेक गोष्टींवर आपण निकाल देणारे न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात आपण निवाडे देऊन मोकळे होतो. कधी कपड्यांवर, कधी वागण्यावर, कधी बोलण्यावर तरी कधी सवयींवर. आणि स्वाभाविकपणे या आपल्या सवयीचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो म्हणून याविषयीची सविस्तर चर्चा आवश्यक आहे. माझ्या कामाच्या निमित्ताने मी लग्नाच्या प्रक्रियेत असणाऱ्या अनेक मुला-मुलींना भेटतो. ते लग्न ठरवण्याच्या दृष्टीने ज्या मुला/मुलींना भेटलेले असतात, ज्यांची स्थळं त्यांनी बघितलेली असतात त्याविषयी आम्ही चर्चा करतो. आणि मला अनेकदा जाणवतं ते हे, की पुरेशा विश्लेषणाआधीच त्यांचा सकारात्मक (किंवा बहुसंख्यवेळा नकारात्मक) निकाल देऊन झाला आहे! जोडीदार शोधताना तीन सेकंदात अंतिम निकाल देऊन मोकळी होणारी मुलं मुली मी बघतो तेव्हा मला आश्चर्यच वाटतं. थेट ‘हो किंवा नाही’चा अंतिम निवाडा! जेव्हा आपण निकाल देतो तेव्हा`तेव्हा तो अंतिम निवाडा असल्यासारखा अपरिवर्तनीय असतो. आपणच नकळतपणे आपल्या अहंमुळे त्यात अडकतही जातो. आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या घटनेच्या सर्व कंगोरे समजले आहेत, आणि सर्व बाजू, साक्षी पुरावे समजून घेऊन आपण निवाडे देत आहोत अशा अविर्भावात आपण निकाल जाहीर केलेला असतो. पण खरोखरच आपण हे सगळं केलेलं असतं का? कि पराचा कावळा करतो? मुला-मुलीच्या पहिल्या भेटीत कॉफीमध्ये तीन चमचे साखर घातली यावरून त्या मुलीच्या आयुष्यातल्या सगळ्या सवयींचा आडाखा बांधून तिच्याबाबत अंतिम निकालपत्र तयार करणारा मुलगा मला मागे भेटला होता. किंवा ज्या अर्थी मुलगा उशिरा आला त्या अर्थी तो नेहमीच असा वागणारा असला पाहिजे असा निकाल पक्का करणारी मुलगीही मला माहित आहे. अशी शेकडो उदाहरणं आहेत.

आपण जेव्हा आपला जोडीदार निवडतो तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे माणूस म्हणून बघणं गरजेचं असतं; आणि एखादी सेवा घेण्याइतका माणूसप्राणी सोपा सुटसुटीत थोडीच आहे? सगळं काळं-पांढऱ्यात बघायचा प्रयत्न करणं हा शुद्ध गाढवपणा आहे; कारण माणसात गुणदोष दोन्हीही असणारच! म्हणजे ‘जे काही असेल ते आपलं नशीब असं म्हणत आहे तसं स्वीकारा आणि पुढे व्हा’ असा अर्थ बिलकुल नाही. सारासार विचार करूनच अनुरूप जोडीदार निवडायला हवा याबाबत मुळीच दुमत नाही. पण जजमेंटल म्हणजेच निकालखोर असणं, आणि आणि विश्लेषक असणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. विश्लेषणामध्ये दुरुस्तीची शक्यता असते. आधी काढलेला निष्कर्ष चुकीचा होता हे म्हणण्याची सवलत असते. समोरच्या व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला जे दिसतं, समजतं ते आपण घेत जातो. पण तेच अंतिम सत्य समजण्याचा प्रकार आपण करणं शहाणपणाचं नाही. सत्याचे अनेक पैलू असू शकतात, अनेक आयाम असू शकतात, जे आपल्यापर्यंत पोहचले नाहीत, ही शक्यता आपण विचारात घेणार की नाही? मुलाला उशीर झाला या घटनेकडे आपण वेगवेगळ्या नजरेने बघू शकतो. मुद्दाम उशीर केला, नेहमीच उशिरा जातो सगळीकडे, वाहतूक कोंडीत अडकला असेल, आज नेमकी गाडी बंद पडली, आजच नेमका उशीर झाला, निघता निघता काम आलं, काहीतरी करण्यात आज नेमका एवढा गुंतला की घड्याळाकडे लक्षच गेलं नाही; अशा कितीतरी शक्यता आहेत ना! त्या शक्यतांचा विचार करणं आणि त्यांचा वेध घेणं म्हणजे तर्कशुद्ध विचार करणं. माणसावर लेबल चिकटवून निर्णय दिला की दुरुस्तीची शक्यता मावळते. झापडं लावल्यासारखे आपण तेवढ्यालाच अंतिम सत्य मानतो. सोशल मिडियावर निकालखोर मतप्रदर्शन करण्याचा परिणाम तुलनेने छोटा असेल, पण लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत मात्र जोडीदार निवडीवर आणि पर्यायाने आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम आपण करून घेत असतो. हे निकालखोर वागणं टाळणं शक्य आहे. आणि त्यासाठी गरज आहे ती म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीची कृती यात विभागणी करण्याची.

सोशल मिडिया असो वा इतर संकेतस्थळं, आपण रेटिंग देतो, स्टार्स नोंदवतो, प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण त्या विशिष्ट सेवेविषयी बोलत असतो, व्यक्तीविषयी नाही. आपल्याला हॉटेलमधून जेवण आणून देणाऱ्या व्यक्तीशी आपली ओळखही नसते, तर आपण त्या व्यक्तीला वाईटसाईट का बरं बोलू? पण तरीही एखाद्या वेळेस आपण एकच स्टार देत असू तर त्या मागे त्या व्यक्तीची सेवा आपल्याला आवडली नाही असा त्याचा अर्थ असतो. आणि हेच सगळ्या सेवांना लागू होतं. ‘व्यक्ती’ आणि ‘त्या व्यक्तीने दिलेली सेवा’ या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याने स्वतंत्रपणे बघता यायला हव्यात. अगदी तसंच लग्नात आणि नात्यांत एखाद्या व्यक्तीची कृती पसंत नाही पडली म्हणून संपूर्ण व्यक्तीवर काहीतरी लेबल लावून फुली मारणं, किंवा व्यक्ती पसंत पडल्यावर भक्तीभाव बाळगणं शहाणपणाचं नाही. व्यक्तीच्या चांगल्या-वाईटाकडे विश्लेषक दृष्टीने बघणं, तर्कशुद्ध पद्धतीने जोखणं, आणि त्या पुढे जात यातलं माझ्यासाठी काय अनुरूप आहे आणि नाही याचा विचार करणं हे अनुरूप जोडीदार निवडताना आवश्यक आहे. व्यक्तीकडे एक स्वतंत्र गुणदोष असणारी व्यक्ती म्हणून बघूया, रेटिंग किंवा स्टार्स द्यायची संधी म्हणून नव्हे. एवढं केलं तर आपलं लग्न आणि नात्यांचे स्टार्स चमकण्याची शक्यता वाढेल, हे नक्की!  

(दि. ७ जुलै २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)