Saturday, July 14, 2018

नव्याची नवलाई

मध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर ‘न्यूनेस’ नावाचा एक सिनेमा बघितला. आयुष्यात नाविन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नाविन्याची सवय असणारे दोघं नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्याची. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला. पण यात जो मुद्दा मांडला गेला होता, तो कुठेतरी माझ्या रोजच्या अनुभवांशी जोडला जाईल असा होता. आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना वरुण म्हणाला, “लग्नानंतर आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं ही कल्पनाही मला अजून पचली नाहीये. किती कंटाळा येईल ना काही वर्षांनी!”. वरुण हे जे म्हणाला ते अनेकदा अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या गप्पांमध्ये मांडलं आहे. ‘कंटाळा येण्याच्या’ शक्यतेची भीती व्यक्त केली आहे.
या निमित्ताने मनात आलेला प्रश्न म्हणजे, आज लग्नाला उभी
असण्याच्या वयातली मिलेनियल जनरेशन म्हणजे माझी पिढी सतत नाविन्याचा ध्यास असणारी पिढी आहे का? ‘युज अँड थ्रो’ हे आज परवलीचे शब्द आहेत. “अमुक अमुक गोष्ट मी गेले चाळीस वर्ष वापरत्ये” असं सांगणारी आपली एखादी आजी असते. आपण असं काही सांगू शकू का कधी हा प्रश्न मनात येतोच येतो. एकुणात बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि रोज होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू तर वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वस्तूंच्या अपग्रेडेड व्हर्जन्स म्हणजेच सुधारित आवृत्त्या बाजारात येताना दिसतात, त्यांची किंमतही परवडेल अशी असते. आणि बघता बघता आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पटापट बदलत जातात. उदाहरणादाखल आयुष्यात आजवर मोबाईलचे किती हँडसेट्स आपण वापरले हे आठवलं तरी जाणवेल जास्तीत जास्त दर दोन-तीन वर्षांत आपण नवीन फोन घेतला आहे. हा आधीच्या आणि आत्ताच्या पिढीच्या आयुष्यात पडलेला फरक चांगला किंवा वाईट याची चर्चा आपण इथे करत नाही आहोत.  तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मुद्दा हा आहे की, आपलं सगळं आयुष्य हळूहळू नाविन्याशी आणि नाविन्याच्या इच्छेशी जोडलं गेलं आहे. एखाद्या कंपनीची वर्षानुवर्षे तीच जाहिरात टीव्हीवर दिसत असेल तर उपयोग होत नाही. आता अक्षरश: दर महिन्या-दोन महिन्याला नवनवीन जाहिराती आणल्या जाताना दिसतात. दर काही वर्षांनी नवीन नोकरी शोधणारे आज असंख्य आहेत. ‘फेसबुक’शिवाय पान हलत नाही अशी आज तरुण पिढीची परिस्थिती असूनही, नाविन्याच्या शोधात लोक दुसर्‍या कुठल्या जागी जाऊ नयेत म्हणून फेसबुकला सुद्धा सातत्याने धडपड करावी लागते. फेसबुकवर सतत नवनवीन फीचर्स, सोयी-सुविधा आणल्या जातात. हे नाविन्य न राखल्यास एक दिवस फेसबुक संपेल. कोणतंही क्षेत्र घ्या. तिथे हे लागू पडतंच.
कदाचित सतत नाविन्याची मागणी करणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे असेल, पण मिलेनियल जनरेशनचं आयुष्य आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर आहे असं मला वाटतं. त्याची एक भीतीही या पिढीत आहे. असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसं नसतं तर रोज नवनवीन खोट्या बातम्या सोशल मिडियामधून वेड्यासारख्या पसरल्या नसत्या. नाना पाटेकर नाही तर विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत काहीतरी थातूरमातूर मेसेजेस पुढे ढकलून देणं घडलं नसतं. या गोष्टी आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर पोसल्या जातात. नुसतीच नवी माध्यमं हाताशी आली म्हणून ते घडलेलं नाही. हे घडण्या मागची ऊर्जा आपल्या मनातल्या असुरक्षित, अस्थिर वाटण्याच्या भावनेमधून आली असणार. यातून अर्थातच नातेसंबंध, लग्न या विषयांत देखील एक प्रकारची अस्थिरता शिरकाव करते. आणि त्यातून यापासून दूर पळण्याची वृत्तीही बळावते. आपण आहोत तो कम्फर्ट झोन सोडून नवीन कोणत्या तरी असुरक्षित गोष्टीत कशासाठी पडायचं असा एक विचार अनेकांच्या मनात डोकावतो आणि मग त्यातून लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधांची भीती वाटू लागते. इंग्रजीत ज्याला कमिटमेंट फोबिया म्हणतात तो हा प्रकार. खरी गंमत अजून पुढेच आहे. माझ्या मते, अस्थिरतेतून निर्माण होणार्‍या या भीतीची आपल्याला इतकी सवय झाली आहे की ही सवय आणि दुसर्‍या बाजूला असणारी नाविन्याची ओढ यामुळे कुठेतरी आपल्याला स्थैर्याचीही भीती वाटू लागली आहे! रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे!”, असं आज मिलेनियल जनरेशन मधली मुलं-मुली म्हणतात तेव्हा ते एकाच व्यक्तीबरोबर राहायचं म्हणजे ‘आता आयुष्यात काही नाविन्य उरणारच नाही’ अशा निष्कर्षाच्या दिशेला जातात. एकाच वेळी, लग्नाच्या आधी अस्थिरतेतून वाटणारी असुरक्षितता आणि लग्नानंतर येणार्‍या स्थैर्याचीही भीती अशी काहीशी ही कोंडी आहे.
खरं तर थेट या ‘आता काही नाविन्यच उरणार नाही’ अशा निष्कर्षाला जाण्याची गरज नसते. कोणत्याही नात्यांत नाविन्य निर्माण करता येऊ शकतं. अनेक जोडपी असा प्रयत्न करताना दिसतातही. एकत्र एखादी नवीन गोष्ट शिकणं इथपासून ते लग्नानंतरही एकट्यानेच फिरायला जाणे- ‘सोलो ट्रीप’ला जाणे इथपर्यंत अनेक गोष्टी अनेक जोडपी नात्यांतलं नाविन्य टिकवण्यासाठी करतात. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की माणूस बदलतो. आपल्याला येणार्‍या अनुभवांमुळे, वयामुळे आपल्यात अनेक बदल होतच असतात. नात्यांतल्या नाविन्याचाच हा भाग आहे. त्या बदलांचा किंवा नाविन्य येण्याचा वेग कदाचित कमी असल्याने, पटकन लक्षात येत नाही. पण असे छोटे-मोठे बदल माणसांत नसते झाले तर खरंच कंटाळवाणं होईल! पण एकमेकांसोबत राहताना हे होत जाणारे बदल अनुभवणं, त्याचीही मजा घेणं यामुळे नातं अधिक घट्ट आणि प्रगल्भ व्हायला मदत होते. त्यामुळे लग्नाआधीच, लग्नानंतर नाविन्य जाईल आणि आयुष्य एकदम स्थिर होऊन जाईल किंवा प्रवाही राहणार नाही याची भीती बाळगण्याची गरज नसते. आणि पुढचा मुद्दा असा की सतत नात्यांत नाविन्य असलंच पाहिजे आणि ते नसणारं आयुष्य कंटाळवाणंच असेल असं गृहीत धरून आपणच उगीच एका गोष्टीचं, “बाप रे केवढं भयानक असेल ते” असं म्हणत ‘भयानकीकरण’ करतो. नाविन्य आणत नातं फुलवणं आणि स्थैर्यामध्ये असणारी शांत सुरक्षितताही एकत्र अनुभवणं या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत पुढे जाण्यात शहाणपण आहे. नाही तर आपण सतत कसल्या तरी शोधात नाखूष राहू. ‘नाविन्य’ या साधनालाच साध्य मानून पुढे गेलं तर गडबड होते. ‘नाविन्य हवं’ म्हणून काहीतरी करण्यापेक्षा जे करायचं आहे, हवं आहे त्यासाठी नवीन काहीतरी करू, ही विचारांची दिशा ठेवली तर डोक्यातला गोंधळ कमी होईल, हे नक्की.  
(दि. १४ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

1 comment:

  1. The 벳익스플로어 act of gambling itself is not illegal in most conditions, which may make it easier for individuals to justify risky gambling behaviors. Unfortunately, most people who've a gambling dependancy don’t see it as an issue. Only21 percentof incarcerated individuals assessed as having gambling dependancy thought that their gambling was problematic. Understanding gambling dependancy information may help scale back stigma and misunderstandings associated to this disorder and make it easier to seek out|to search out} entry toprofessional therapy.

    ReplyDelete