Saturday, April 7, 2018

गरज, सोय, चैन इत्यादी.

मी लहान असताना, बालभवनमध्ये शोभाताईंनी (भागवत) एक उपक्रम घेतला होता. गंमत जत्रा का असं काहीतरी नाव होतं बहुतेक. नेमकं आठवत नाही. त्या जत्रेत खोटे पैसे आणि खोट्या गोष्टी मांडल्या होत्या. आम्हा लहान मुलांमधील काही मंडळी दुकानदार होती, तर काही माझ्यासारखी गिऱ्हाईक. प्रत्येक गिऱ्हाईकाला एक टोपली आणि ठराविक रक्कम दिली होती. आणि त्या जत्रेत गिऱ्हाईकाने आपल्या घरासाठी खरेदी करायची होती. सगळे पैसे संपवलेच पाहिजेत असं बंधन नव्हतं. मी मात्र झटपट माझी सगळी खरेदी करून हातातले पैसे संपवले. सगळ्या विकत घेतलेल्या गोष्टी टोपलीत ठेवून आता पुढे काय याची वाट बघू लागलो. सगळ्यांची खरेदी संपल्यावर मग आम्हाला एक यादी दिली गेली. कुठल्या वस्तू गरज या वर्गात मोडतात, कुठल्या सोय या वर्गात आणि कुठल्या चैन या प्रकारात मोडतात ते त्या यादीत लिहिलं होतं. आणि मग आम्ही विकत घेतलेल्या वस्तू त्यानुसार बघायच्या होत्या. त्यावर किती पैसे खर्च केले हे बघायचं होतं. मी घेतलेल्या ८-१० गोष्टींपैकी केवळ एकच गोष्ट गरज मधली होती. एखाद-दोन सोय म्हणता येईल अशा गोष्टी होत्या आणि बाकी सगळ्या गोष्टी या चैनीच्या होत्या. बहुतांश पैसे मी त्यावरच खर्च केले होते. प्रत्येक गिऱ्हाईकाने आपापली खरेदीची यादी अशी गरज-सोय-चैनमध्ये विभागून वाचून दाखवली. काहींनी तर केवळ सोयीच्या गोष्टी खरेदी केल्या होत्या, काहींनी बऱ्यापैकी समतोल साधला होता, काहींनी पैसे वाचवले होते तर सोयीला अनेकांनी प्राधान्य दिलं होतं. इथे तो खेळ संपला. आम्हाला कोणीही तुम्ही काय करायला हवं होतं या आशयाचं भाषण दिलं नाही. पण या खेळाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. आजही आहे. कोणती गोष्ट ही आपली गरज आहे, सोय आहे आणि चैन आहे याचा विचार नकळतच माझ्या मनात येऊन जातोच जातो.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपला जोडीदार निवडताना ज्या अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात त्यामुळे होणारे घोळ. आपल्या नेमक्या गरजा कोणत्या, कोणत्या गोष्टी असल्याने सोय होणार आहे आणि कोणत्या गोष्टी म्हणजे चैन आहेत याचा विचार करायलाच हवा. मध्यंतरी एक मुलगी आमच्या ऑफिसला मला भेटायला आली होती. तिला असा मुलगा जोडीदार म्हणून हवा होता की जो कल्याणीनगर-कोरेगावपार्क इथेच राहणारा असेल. मी ही अपेक्षा ऐकून थोडासा चक्रावलो. या अपेक्षेमागेचं काय कारण असं विचारल्यावर ती म्हणाली की ती राहते कल्याणीनगरला, तिचं ऑफिस नगर रोडला. त्यामुळे ऑफिसला जायला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिला लागत नाही. आणि हेच लग्नानंतरही व्हायला हवंय. मला या उत्तरानंतर खरंतर हसू आलं. मी तिला विचारलं, “असं मानूया की तुझ्या अपेक्षेनुसार तुला नवरा मिळाला, आणि नंतर मग तुझ्या कंपनीने तुझं ऑफिस हिंजवडीला नेलं, तर मग तू काय करणार? नोकरी बदलणार, घर बदलणार की नवरा बदलणार?”. त्यावर ती चांगलीच विचारांत पडली, आणि म्हणाली, “मी या गोष्टीचा कधी विचारच नव्हता केला!”. हे उदाहरण अपवाद वाटेल. पण अशी कितीतरी उदाहरणं बघण्यात येतात. मुंबईत लोकलच्या वेस्टर्न लाईनवर राहणारी मुलगी सेन्ट्रल लाईनवरच्या ठिकाणी लग्न करून जायला तयार नसते या विषयावर एका टीव्ही चॅनेलने कार्यक्रम केला होता! हे केवळ मुलींच्याच नव्हे तर मुलांच्या बाबतीतही लागू होतंच. आपल्या आईने ज्या पद्धतीने कुटुंब-नोकरी-स्वयंपाक असं सगळं सांभाळलं तसंच आपल्या बायकोनेही करावं अशी नव्वदीच्या दशकातली मानसिकता अनेक मुलांची आजही आहे, ही मला त्यांच्याशीच बोलून बोलून समजलेली गोष्ट आहे.

या आणि अशा अनेक अपेक्षांच्या मागे कारण आहे ते म्हणजे स्वतःचा कम्फर्ट झोन कधीही न सोडण्याची इच्छा. आपल्या सगळ्यांचे आपापले कम्फर्ट झोन तयार होत असतात. घरात, ऑफिसमध्ये, मित्र-मंडळींमध्ये वगैरे. हळूहळू या कम्फर्ट झोन मध्ये असणाऱ्या चैनीच्या गोष्टी पटकन सोयवाल्या कॉलममध्ये उड्या मारतात आणि सोय मधल्या गोष्टी गरजेमध्ये सरकतात. अशाप्रकारे सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये गेल्या की आपल्याला ची बाधा होते. म्हणजे आपल्या सगळ्या अपेक्षांना लावणे. “माझा होणारा नवरा महिन्याला एक लाख रुपये कमावणारा असला पाहिजे.”, “माझ्या बायकोने घरात स्वयंपाक केला पाहिजे.”, वगैरे वगैरे. अपेक्षांना लागू लागला की त्या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात. मागण्यांचे डोंगर वाढले की जोडीदार शोधणं कठीण बनू लागतं. आणि साहजिकच आहे ना, आपला कम्फर्ट झोन जसाच्या तसा ठेवून कसं बरं नवीन नातं निर्माण करता येईल? अगदी मैत्रीतसुद्धा ते होत नाही.
जोडीदार निवडताना, अपेक्षा ठरवताना, आपण काय बोलतो ते ऐकलं पाहिजे. आणि आपल्या बोलण्याकडे कान देऊन, आणि मेंदूचे दरवाजे उघडे ठेवून ऐकलं तर गरज-सोय-चैन याची वर्गवारी करणं खूप सुटसुटीत होईल. गरज-सोय-चैन नुसार आपलं बोलणं कसं बदलेल याचं हे एक उदाहरण-
·         गरज – या गोष्टी अगदी आवश्यक आहेत.
·         सोय – या गोष्टी असतील तर जरा बरं पडेल.
·         चैन- या गोष्टी असतील तर किती छान!/ किती मस्त!


जोडीदार निवडीबाबत आपल्या अपेक्षांचं असं वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करत गेलो तर लागतील अशा गोष्टी फार थोड्या आहेत हे आपलं आपल्यालाच कळत जातं. जरा बरं पडेल या सोयीकडे नेणाऱ्या शब्दांमध्ये तडजोडीची संधी असते. उदाहरणार्थ अमुक अमुक असेल तर जरा बरं पडेल, पण नसेल तरीही हरकत नाही, कारण इतर या या गोष्टी आहेत की!. चैनीच्या गोष्टी तर बोनस असतात. बाकी सगळं जुळतंय, जमतंय आणि त्यात हे पण आहे तर किती मस्त!. या गरजा-सोयी-चैन कोणत्या आहेत आणि त्या का आहेत याचा आपण विचार करत गेलो की यातल्या कोणत्या गरजा-सोयी-चैन या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः समर्थ आहोत आणि कोणत्यासाठी इतर व्यक्तींवर आपण अवलंबून आहोत हेही उलगडत जातं. खरंतर प्रेमात पडून लग्न करणारे हे सगळं त्यांच्याही नकळत मनातल्या मनात करतच असतात. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत मात्र सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये ढकलण्याची आपल्याला घाई होते. हे टाळलं पाहिजे. वस्तुनिष्ठपणे (rationally) विचार करत हे टाळलं तर मुला-मुलींचा आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांचा लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतला ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की आजची एखादी गरजेची गोष्ट उद्या चैन या कॉलममध्ये किंवा उलटं, असा प्रवास असू शकतो. त्यामुळे कोणतीच यादी ही कोणाच्याच आयुष्यात अपरिवर्तनीय नाही. म्हणून वर उल्लेख केलेला वस्तुनिष्ठ विचार एकदाच करून सोडून द्यायचा नाही, तर दर काही काळाने तो करत राहायचा. ही यादी वारंवार तपासून बघायची.

हे केवळ लग्न ठरवण्याच्या बाबतीतच लागू होतं असं नव्हे, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इतरही बाबतीत गरज, सोय आणि चैन याबाबत सजगपणे विचार करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली तर, आपलं आयुष्य अधिक आनंददायी बनू शकेल, असा माझा विश्वास आहे. अवघड वाटत असेल तर ही सवय लावून घेणं हे आधी आपण सोय या कॉलममध्ये टाकूया आणि हळूहळू गरजेमध्ये सरकवूया, काय वाटतं?! करून तर बघूया!

(दि. ७ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)


No comments:

Post a Comment