Wednesday, February 20, 2013

शहाण्यांचा देश


साडेसहा दशकांची बघून ही दुरवस्था, मनी माझ्या संताप साठला,
षंढ थंड आपण, हृदयांत आपल्या का नाही अजून वडवानल पेटला?

निष्क्रीय जनता पाहून सत्तानगरीत हर्ष अपार दाटतो,
एकच नाही, हरेक रंगाचा झेंडा डौलाने फडकू लागतो.
कोणी म्हणे तिरंग्यात चरखा हेच भविष्य देशाचे,
कोणी म्हणे भगवा हेच जीवन या पवित्र भूमीचे,

तिसरे लाल विळे कोयते, तर निळे चक्र एकाचे.


कोठे अतिवृष्टी तर, कोठे दुष्काळी वैराण मुलूख सारा
थेंबासाठी तडफडे जीव कोठे, कोठे रस्त्यांवर वाहे धारा
वाहून जाती कोणी कधी तूफानात,
भटके शहरोशहरी कोणी भीषण दुष्काळात.
निसर्ग वारंवार असा सत्ताधाऱ्यां फळफळला,
दशदिशांनी पैशाचा पाऊस धो धो कोसळला. 

संपवण्या येथील अधर्म, धरतीवर कोणी अजून नाही अवतरला
इथले निष्क्रीय लोक पाहून तो केव्हाच आल्या पावली परत गेला.
बदल हवा तर तो आपणच घडवायचा, हे नाही जोवर समजायचे,
बडबड अन् चर्चा केली कितीही, परिवर्तन नाही तोवर व्हावयाचे.

भ्रष्ट सिस्टीमशी लढणाऱ्याला कोणी म्हणे हा ठार पागल आहे.
भोगणाऱ्याला कोणी म्हणे बिचारा, भ्रष्ट सिस्टीमचा बळी आहे.
पागल व्हावे की बळी जावे, निवड शेवटी तुमचीच असणार.
दुर्दैव हे, आज तरी बळी जायलाच सगळे लोक आहेत तयार.

आनंदात मश्गुल आपण की, आजचा दिवस जगता आला,
कोणी सांगावे, जर उद्या स्वार्थासाठी कोणी आपला बळी दिला.
थोडेफार भाग्य असेल तर होणार बातमी ती एका दिवसाची,
जास्त असेल भाग्य जरा, तर त्यात भर काही हजार मेणबत्त्यांची.
पुढे सगळे शांत होणार,
बळी जायला लोक रांगा तेवढ्या लावणार.

पोरगी सहज उचलून नेली, बंदूक दाखवत तिजोरी लुटून नेली,
पागल तुम्ही कधी होणार?

गांडीखाली बॉम्ब फुटला, विकून देश पुरता बरबाद केला,
पागल तुम्ही कधी होणार?
साडेसहा दशके चालू तमाशा, शहाणे होऊन बघितलात,
मला सांगा आता,
पागल तुम्ही कधी होणार?


No comments:

Post a Comment