Wednesday, October 3, 2012

ध्यास


भीषण वादळे आली जरी,
सोडून गेले भित्रे उंदीर जरी,
नव्हे बुडणारे हे जहाज,
विसरले सारे तरी...


संकटांचे पहाड कोसळले जरी,
अडचणींचे डोंगर उभे ठाकले जरी,
थकणार नाही, थांबणार नाही,
अंधार दाटून आला तरी...

कोणी आमची खूप चेष्टा केली.
कोणी आम्हाला मूर्ख ठरवले,
कोणी आम्हाला स्वप्नाळू म्हणले,
कोणी तर चक्क स्वार्थी म्हणले.
टीका झाली तरी सुधारणा करत कार्यरत राहणे,
हा आमचा स्वभाव आहे
नुसते टिकणे नव्हे, तर अधिक प्रगल्भ बनणे,
ही आमची सवय आहे.  

परिवर्तन हाच आमचा ध्यास आहे,
परिवर्तन हाच आमचा श्वास आहे.
ध्येय आमचे निश्चित आहे,
मार्ग आमचा स्वच्छ आहे.
हे सोपे नाही याची कल्पना स्पष्ट, आम्हाला आहे,
सोपे काही नाकोचे, अवघड आव्हानच स्वीकारायचे आहे.

धर्मांचे अन् संस्कृतीचे रक्षक दंड थोपटून आमच्याविरुद्ध उभे राहतील,
कारण त्यांचे दुकान आम्ही बंद करू.
लोकांच्या जीवाचा सौदा करणारे शस्त्र परजून आमच्याविरुद्ध उभे राहतील,
कारण त्यांचे सौदे आम्ही हाणून पाडू.
गुंड पुंड, आणि समाजहिताचा देखावा करणारे आमच्या जिवावर उठतील,
कारण ते गुंड आहेत हे आम्ही ठासून सांगू.
समाजाचे रक्षकच कायद्याचा गैरवापर आमच्याविरुद्ध करू पाहतील,
कारण ते गुंडांच्या हातातले बाहुले आहेत, हेही आम्ही ठासून सांगू.

कोणी आम्हास जातीयतेच्या विळख्यात अडकवायला बघेल,
कोणी आम्हास धाक दपटशाने नमवायचा प्रयत्न करेल.
कठोर राहू, सावध राहू...
कारण कधी कोणी मित्रच भोस्कायला बघेल.


पुरंदरचा तह केला म्हणजे राज्य धुळीस मिळत नसते,
शिवरायांनी शिकवले आम्हां,
योग्य वेळी, योग्य ती पावले घ्यायचा
धूर्तपणा शिकवला त्यांनी आम्हां...


समोरचा शत्रू दिल्लीचा खुद्द औरंग्या !
तरी थडगे त्याचे इथेच आहे.
आज नाहीतर उद्या शत्रूचे समाजाच्या,
थडगे असणार इथेच आहे.




असेल ध्यास परिवर्तनाचा तर स्वागत तुमचे आहे.
जिद्द, चिकाटी अन् निर्भयता एवढेच मागणे आमचे आहे.

इथे तुमचा धर्म वा तुमची जात विचारली जाणार नाही,
तुम्ही स्त्री की पुरुष ते महत्वाचे नाही,
अन् तुमचा रंग काळा की गोरा याला महत्व नाही.
परिवर्तनाची प्रामाणिक इच्छा हाच सदस्यत्वाचा निकष,
समाजपरिवर्तनाचा विचार, यापलीकडे कसले आलेत निकष?!

बलदंड सत्ता अन् त्याचे माजलेले सत्ताधारी,
वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे, पण माजलेले सत्ताधारी-
राजकारणी, उद्योगपती, गुंड, धर्म अन् झुंडीचे कारभारी,
यांच्याच जहांगीरदाऱ्या आम्हाला उखडायच्या आहेत,
यांच्या अन्यायकारक चौकटी मोडायच्या आहेत.
परिवर्तनाची ही इच्छा बाळगणारा प्रत्येकजण या लढाईतील सैनिक आहे,
परिवर्तन व्हावे म्हणून झटणारा प्रत्येकजण या लढाईचा सेनानी आहे.

तुमच्याच इच्छेमुळे तुम्ही आज आमच्यातलेच एक झालात,
परिवर्तनाच्या प्रचंड कार्यामधले एक सहकारी झालात.

शपथ घेऊ आपण आज-
कर्तव्यावरील निष्ठेने, चालत राहू आपण,
व्यक्ती व्यक्ती महत्वाची, पण व्यक्तिपूजेला फाटा देऊ आपण.
उच्च ध्येयाकडे पाहून.
अंतिम उद्दिष्टाकडे पाहून.

भीषण वादळे आली जरी,
सोडून गेले भित्रे उंदीर जरी,
नव्हे बुडणारे हे जहाज,
विसरले सारे तरी...

संकटांचे पहाड कोसळले जरी,
अडचणींचे डोंगर उभे ठाकले जरी,
थकणार नाही, थांबणार नाही,
अंधार दाटून आला तरी...

कारण,
परिवर्तन आपला ध्यास आहे,
परिवर्तन आपला श्वास आहे.

 - तन्मय कानिटकर
२ ऑक्टोबर २०१२

No comments:

Post a Comment