Sunday, February 19, 2012

निवडणूक, प्रचार, कार्यकर्ते इत्यादी...

बंडू आणि तात्या चहा पीत बसलेले असतात... दोघही निवांत... बंडू बिडी पेटवतो आणि एक प्रदीर्घ झुरका घेत तात्याला विचारतो, "काय रे तात्या, पुढची इलेक्शन कधीये?"
"दोन वर्षांनी..."- तात्या बंडूच्या हातातून बिडी घेत उद्गारतो...
आता पुढची दोन वर्ष कशी काढायची, आर्थिक नियोजन कसे करायचे या विचारात दोघंही गढून जातात..  धुरांची वलयं काढता काढता दोघांच्याही डोक्यात २ महिने तरळून गेले...
बंडू आणि तात्या म्हणजे अस्सल "स्टार प्रचारक"..! शिवाय त्यांचा होणारा खर्च इलेक्शन कमिशन ला दाखवावाही लागत नाही... दोघांनाही ८-१० निवडणुकांचा अनुभव. म्हणाल तिथे म्हणाल त्या लोकांसमोर बोलण्याची त्यांची हातोटी म्हणजे विलक्षणच! त्यामुळे दोघांनाही भरपूर भाव! पण सुरुवातीलाच ते दोघंही जात नाहीत. "तिकीट नक्की झालं की या" असं ते प्रत्येक उमेदवाराला सांगतात. काहीजण "आमचं तिकीट कोन कापतं तेच बघतो. अन कापलं तरी आपन उभा राहनार" असं सांगतात. अशावेळी मग बंडू आणि तात्याला काही बोलता येत नाही आणि मग दोघंही प्रचारात सामील होतात. दोघांकडे एकेक डायरी असते. त्यामध्ये संपूर्ण प्रचाराचे शेड्युल असते, पण त्यातही शेवटचे ५ दिवस मोकळे सोडलेले असतात... एकाच प्रभागात असणारे १०-१५ उमेदवारांचा प्रचार करायचा म्हणजे डायरी पाहिजेच. जसजसे उमेदवार नक्की होतात तसतशी बंडू-तात्याची डायरी भरत जाते. सकाळी पंजासाठी प्रचारफेरी, दुपारी कमळासाठी सभेचे नियोजन, संध्याकाळी घड्याळाच्या रोड शोचे आयोजन तर रात्री इंजीनासाठी मतदार याद्यांचे काम.. असे दिवसभर काम करायचे, कामाचे पैसे वाजवून घ्यायचे- तशी आधीच बोली झालेली! अशा प्रकारे महिनाभर काम केल्यावर कोणत्या पक्षाचे काय मुद्दे आहेत, कोणाचे कमजोर मुद्दे काय आहेत, कोणावर कसले आरोप झाले आहेत याची इत्यंभूत माहिती बंडू आणि तात्याला मिळते. मग या बातम्या गपचूप काही पत्रकारांना कळवायच्या त्याबदल्यात चहा बिडी उकळायची ही या दोघांची खासियत..!
असे होता होता प्रचाराचे शेवटचे ५ दिवस उरतात. आता उमेदवार नक्की झालेले असतात, प्रचाराची धामधूम उडालेली असते. आणि प्रचारासाठी लागणाऱ्या पोरांची किंमत सुद्धा वधारलेली असते..! काही ठिकाणी २०० रुपये दिवस तर काही ठिकाणी तब्बल २००० रुपये दिवस..! अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली की बंडू आणि तात्या एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे बसतात... समोर सगळे सगळे उमेदवार- भाऊ, दादा,बाबा,अण्णा, भाई,रावसाहेब अगदी सगळे!... शेवटचे ५ दिवस बंडू आणि तात्या पूर्णवेळ एकाच उमेदवाराचा प्रचार करतात. ती त्यांनी वर्षानुवर्षे घालून घेतलेली शिस्त आहे. एक उमेदवार बोली सुरु करतो, आधी बोली बंडू साठी, "५००० रुपये दिवस!", त्यावर दुसरा ओरडतो, "१० हजार!" तिसरा आणखीन जोरात ओरडतो," १२ हजार!".... बाकीचे काही कार्यकर्ते असूयेने आणि इर्षेने बंडू-तात्याकडे बघत असतात. पण अनेकांच्या डोळ्यात आदराचे भावही असतात. 'एक दिवस आपल्याला या पायरीवर पोचायचं आहे' असे भाव अनेकांच्या चेहऱ्यावर असतात..!
अखेर बंडू वरची बोली संपते आणि बंडू शेवटचे पाच दिवस कोणाबरोबर प्रचार करणार हे ठरते. मग तात्यावारची बोली.. बंडू हातचा गेला हे लक्षात घेऊन तात्यावारची बोली बंडू वरच्या शेवटच्या बोलीपासून सुरु होते..! आणि ती जवळ जवळ तिप्पट होऊन संपते... पण तरीही बंडू आणि तात्या सगळे पैसे एकत्र करून समसमान वाटून घेतात. तसा त्यांच्यातला अलिखित करारच आहे. वर्षानुवर्षे असेच चालले आहे. दोघंही आपल्याकडेच यावेत प्रचाराला असा प्रयत्न बहुतेक जण करतात, पण या बोली लावण्याच्या नाट्यामुळे अनेकांना ते परवडत नाही. शेवटी दोन भाग्यवान उमेदवारांना बंडू एकाला आणि एकाला तात्या असे प्रचाराला मिळतात...! मग शेवटचे पाच दिवस मात्र दोघांना बिड्या मारायलाही वेळ नसतो. अथक काम... प्रचारादरम्यान काही ठिकाणी पैसे वाटप, ते उघडकीस आणणे, मग ते प्रकरण मिटवणे, बोगस मतदार शोधणे, अशा विविध गोष्टींकडे बंडू आणि तात्या "साईड इन्कम सोर्स" म्हणून बघतात... याच दरम्यान एकदोन मारहाणीच्या घटना घडवून आणणे हा तर या दोघांच्या डाव्या हातचा मळ..! एकूण काय तर हे पाच दिवस धंदा तेजीत येतो...
प्रचार संपला, निवडणूक झाली...एक उमेदवार जिंकला, बाकी पडले.. सिझन संपला.. मग दोघंही आपापल्या बायका पोरांना घेऊन मुळशीला मस्त दोन-चार दिवस विश्रांतीला जातात... गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे- दोघांनी मुळशीला शेजारी शेजारी छान दोन फार्म हाउसेस बांधली आहेत. अर्थात तरीही बिडी सोडून मार्लबरो मारायला लागलेत असे घडलेले नाही...!
दोघंही शांतपणे तळ्याकाठी खुर्च्या टाकून बसलेत, दोघात एक बिडी शेअर मारतायत... विचार करतायत, आता पुढची दोन वर्ष काय करायचं...!

*हे सर्व असत्य आणि काल्पनिक असून कोणाला कशामध्ये साधर्म्य बिधर्म्य वगैरे वगैरे सापडल्यास तो निव्वळ योगायोग आहे असे समजावे, किंवा आपले कान आणि डोळे फारच तीक्ष्ण आहेत असे समजावे...! :)

4 comments:

  1. kharch khup sundar lihele aahe ! aaj chaya smajache pratayaksha chitra ch dolaya samor ubhe rahate ! pan haya sagalya goshti na javabdar kon? AAPAN, RJKIYA PAKSHA, NETE MANDALI, Nivdnuk Agayog, ki Samaja til te loka jana SANTA TUKARAM, DAYNESHWAR, SANT EKNATAH, RAMDAS, hancha varsa nit chalvata yet nahi? aani tay mule Samja la ek disha denaya che karya tayana chaya hatun nit Ghadat na hi aahe ?

    ReplyDelete
  2. interesting read..many people will definitely find it as a coincidental(Yogayog)though!

    ReplyDelete
  3. Good One Tanmay..!! Really its Nice, it seems to like a movie story.... right ?

    ReplyDelete
  4. Bhariye he....!!!! Disclaimer tar uttam ch...!!!

    ReplyDelete