Friday, August 19, 2011

एक वर्ष

जानेवारी २०११
बऱ्याच दिवसांनी एक ओळखीचा मुलगा गणूला भेटला. "काय रे काय करतोस आजकाल?", गणूने विचारले. 
"मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे", तो कार्यकर्ता उद्गारला. गणूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. असे काहीतरी शब्द तो प्रथमच ऐकत होता. "अरे माहिती अधिकार कायदा येऊन साडेपाच वर्ष उलटली तुला हा कायदा माहित नाही?", कार्यकर्त्याने गणूला विचारले. पण गणूने तुच्छतेने नकारार्थी मान हलवली. जणू ही गोष्ट माहित असणे गरजेचे नाही. कार्यकर्ता नाराज झाला. त्याने आपल्या संस्थेचे महत्व गणूला सांगितले. माहिती अधिकार कायद्याबद्दल सांगितले. गणूला आनंद झाला. "खरंच खूप चांगले काम करता रे तुम्ही. ऑल द बेस्ट!", गणूने कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ताही आज आपण एकाला जागरूक नागरिक बनवले या खुशीत निघून गेला. 

एप्रिल २०११ 
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर फर्ग्युसन रोड वर जो दंगा घातला होता त्यातले स्वतःचे फोटोज गणू फेसबुक वर अपलोड करत होता. तेव्हढ्यात त्या कार्यकर्त्याने गणूला पिंग केले. 
karykarta: kay re kasa ahes?
Ganu: mast! tu?
k: sadhya jordar kama chalu ahet re. Anna hazarencha uposhan ahe. corruption door karnyasathi. 
Ganu: kay mast match zali re final... ek number jinklo apan..! dhoni chi ti shewatchi six mhanje tar ahahaha! 
k: kharay... pan ata aplyala corruption against match jinkaychie... 
Ganu: hm
K: Aik udya Balgandharv chowk te Shaniwarwada asa candle march ahe, anna hazare yanna support karnyasathi.
Ganu: ok..
K: tar nakki ye march la.. 
Ganu: hmm baghto..try karto. baki kay?
K: kahi nahi re. udyachi tayari chalue... tu volunteer mhanun join ka hot nahis? khup important cause ahe re... 
Ganu: chalo g2g... jara kam ahe. c u l8r, bye, tc. 

७ ऑगस्ट २०११
गणू बालगंधर्व चौकातून जात होता. तेवढ्यात त्याला समोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली २५-३० जणांचा घोषणा देणारा जमाव दिसला. "अरे काय चालू आहे हे?" कार्यकर्त्याला पाहून गणूने विचारले. 
"निषेध मोर्चा! अरे गणू, आपला पुण्याचा खासदार भ्रष्ट आहे आणि तिहार जेल मध्ये आहे. हे आपण सहन नाही केले पाहिजे. याचा निषेध तू मी आणि सगळ्या पुणेकरांनी मिळून केला पाहिजे. सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"फारच छान, तुमचा हेतू फारच उत्तम आहे. मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेला... गेलाच...! 

१८ ऑगस्ट २०११
जिकडे तिकडे अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत सगळ्या शहरांमध्ये. एक दिवस गणूला त्याच्या मित्रांचा फोन येतो. "अरे गणू, उद्या एक मोर्चा आहे. अण्णांना पाठींबा देण्यासाठी. आपण जाऊया. संध्याकाळी ६ वाजता." गणूने थोडा वेळ आढेवेढे घेतले. "अरे चल रे... मोर्चा संपल्यावर सगळे मस्त जेवायला जाऊ कुठेतरी..." मित्राने आग्रह केल्यावर गणू तयार झाला. अखेर गणू आपल्या मित्रांबरोबर बालगंधर्व चौकात हजार होतो जिथून मोर्चाची सुरुवात होणार असते. 
"अरे तू इथेसुद्धा आहेस वाटतं?" कार्यकर्त्याकडे पाहून गणू आश्चर्याने विचारतो.
"म्हणजे काय? मी पहिल्यापासून आहे न या आंदोलनात...!", कार्यकर्ता उद्गारतो. 
"अरे हो की... विसरलोच..", पुढे काही गणू बोलणार एवढ्यात घोषणांचा आवाज येतो- " एक सूर एक ताल" त्यापाठोपाठ आजूबाजूचे सगळे ओरडतात," जन लोकपाल जन लोकपाल"... 
सगळेच जण मोर्चाबरोबर चालू लागतात. जोरदार घोषणा झेंडे, बोर्ड यांनी वातावरण एकदम झकास तयार झालेले असते.'मी अण्णा हजारे' लिहिलेली गांधी टोपी घालून गणूही मोर्चात चालू लागतो. मोर्चा यशस्वी होतो... आपण केलेल्या प्रचंड देशसेवेमुळे गणू त्या रात्री अतिशय समाधानाने झोपी जातो. 


नोव्हेंबर २०११
अण्णांचे आंदोलन संपलेले असते. अण्णा आणि सरकार यांच्यात उभयपक्षी मान्य तोडगा निघतो. गणूचे नेहमीचे उद्योग सुरळीत चालू असतात. एक दिवस रस्त्यात कार्यकर्ता भेटतो. त्याच्या आजूबाजूला २५-३० लोकांचा घोषणा देणारा जमाव असतो. "अरे काय रे हे?", गणू कार्यकर्त्याला विचारतो.
"आपल्या खासदाराने अजून राजीनामा दिला नाहीये. असा भ्रष्ट आणि स्मृतिभ्रंश झालेला खासदार आम्हाला नको हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे."- कार्यकर्ता.
"खरंय रे तुझं म्हणणं...", गणूला पटते. 
"सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेलाच...! 

जानेवारी २०१२ 
पुणे महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम चालू असते. जिकडे तिकडे घोषणा, पत्रके, सभा! गणू एकदा रस्त्यावरून जात असतो तेव्हा त्याला रस्त्यात उभा राहून पत्रके वाटणारा कार्यकर्ता दिसतो. "अरे काय रे हे?" गणू विचारतो. 
"मतदान जागृती. पुढच्या आठवड्यात निवडणूक आहे. मतदान कर नक्की. मतदान करणे हा आपला लोकशाही हक्क तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपले कर्तव्य आहे." 
"नक्की करणार मतदान...!"- गणू.
मतदानाच्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने आणि लागूनच शनिवार रविवार आल्याने गणू आणि मित्रमंडळी कोकणात ट्रीप ला गेले...

"लोकशाही म्हणजे काय हेच आपण पार विसरून गेलो आहोत." अतिशय निराश मनस्थितीत कार्यकर्ता फेसबुक वर आपले स्टेटस अपडेट करतो. त्याच्याच खाली त्याच्या 'वॉल' वर गणूचे कोकण ट्रीप चे फोटोज अपलोड केलेले दिसत असतात. कार्यकर्ता निराश होतो. हताश होतो... पण तेवढ्यात गणूने नव्याने अपलोड केलेला फोटो त्याच्या वॉल वर दिसतो ज्यामध्ये गणू मतदान केल्यावर बोटावर केली जाणारी खूण दाखवत असतो... कार्यकर्त्याला आश्चर्य वाटते. फोटोच्या खाली गणूने लिहलेले असते- "कोकणात निघण्या आधी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडल्या उघडल्या मतदानाचा अधिकार बजावला. माझा प्रतिनिधी भ्रष्ट असणार नाही याची मतदान करताना तरी मी काळजी घेतली आहे..!" 
 थोड्याच वेळात अनेकांचे असे फोटोज फेसबुक वर झळकू लागले. प्रयत्न वाया गेले नव्हते... कार्यकर्त्याला उत्साह आला. आणि त्याने अधिकच धुमधडाक्यात कार्याला सुरुवात केली...! 

2 comments:

  1. ha karyakarta tuch..........n he asle ganu aplyala jago jagi bhetatat.....agdi malahi.....

    ReplyDelete
  2. Bhari aahe ...!!!
    maza pan ya karyakarta sarkha zaalay.

    I am happy that our efforts do not go in Vain.

    Pudhchi rally kadhi aahe ? - Ganu kaal vicharat hota mala. He He He.

    ReplyDelete