Thursday, March 17, 2011

हे चालणार नाही...!!!

परवाच पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो. तिथे फॉर्म सबमिशन ची एक भली मोठी रांग होती.. लोक सकाळपासून येऊन त्या वाढत्या उन्हात उभे होते. त्या लोकांमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न स्तरातले लोक सुद्धा होते. एखाद दुसरे उच्च आर्थिक स्तरातले कुटुंब गॉगल लावून उभे होते... एकूणच रांगेची शिस्त सगळ्यांना पाळावी लागत होती. आणि सगळेच 'समान' होऊन गपचूप रांगेत उभे होते. फरक असला तर फक्त कपड्यांमध्ये होता. उन्हाचा त्रास, सरकारी कामामुळे आलेली असहायता, फुकट जाणारा वेळ यामुळे सगळेच त्रस्त झाले होते.. 
तेवढ्यात एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत रांगेच्या बाजूने पुढे आला. तिथे पोचताच त्याने फोन बंद केला आणि तिथे उभ्या सिक्युरिटी गार्डला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि अमुक अमुक अधिकाऱ्याला दाखव असे फर्मावले. एकूणच त्या माणसाचा अविर्भाव, उच्चभ्रू कपडे यामुळे सिक्युरिटी गार्ड निमुटपणे आत गेला. पाचच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला थेट आत सोडले. सगळ्यांच्या समोरच हे घडले.. आपण इथे तासन तास उभं राहायचं आणि हे लोक मात्र वशिला लावून पुढे जाणार याला काय अर्थ आहे असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले. 
मध्ये थोडा वेळ गेला. एक पन्नाशीच्या बाई, पांढरे केस, बॉब कट केलेला, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि एका कानाला लावलेला Black Berry!! भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. "सिक्युरिटी,सिक्युरिटी, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो.." असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो..!! त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. "ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली? ही लोकशाही आहे..." "वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे??" "हे चालणार नाही...!" या २-३ लोकांना ताबडतोब रांगेतल्या सगळ्यांचाच पाठींबा मिळाला. त्यांच्या मनातलेच तर बोलले जात होते. आपल्यावर काहीसा अन्याय झाल्याची भावना सगळ्यांचीच होती... "हे चालणार नाही..." असं म्हणत एक काका पुढे झाले. आणि सिक्युरिटी गार्ड वर नजर ठेवू लागले, अजून एक दोन जण पण त्यांच्याबरोबर नजर ठेवायला उभे राहिले.. पुढच्या तासा दोन तासात काही लोक ओळख सांगून वगैरे आत जायचा प्रयत्न करू लागले. पण गार्ड ने त्यांना आत सोडले नाही. आपल्यावर नजर ठेवणाऱ्या लोकांची त्या गार्डला भीती वाटली.. आणि बघता बघता सगळे सुरळीत होत लोक रांगेने एक एक करत आत गेले कोणीही मध्ये घुसले नाही कोणाला घुसू दिले गेले नाही...!!!!

असे शेकडो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. अगदी कॉलेज ची फी भरतानाही कोणी मध्ये घुसला तर मागचे लोक आरडा ओरडा करतात. हीच गोष्ट सगळीकडे घडते. "हे चालणार नाही" असं म्हणत जेव्हा लोक जागरूक होतात तेव्हा राज्यकर्त्यांना झुकावेच लागते... आज खरोखरच सरकार वर नजर ठेवायची गरज आहे. त्या काकांप्रमाणे प्रत्येक जागरूक नागरिकाने हे काम करायला हवं. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शास्त्र आपल्याकडे आहे. एकदा का नागरिकांची सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर आहे हे सरकारला जाणवू लागले की अपप्रवृत्ती, अकार्यक्षमता, गैरकारभार, भ्रष्टाचार या सगळ्याला आळा बसेल... वरच्या उदाहरणात जसे मी तासन तास उभा आहे आणि कोणीतरी पुढे येऊन घुसतो आहे आणि सरळ आत जातो आहे या मुळे जी अन्यायाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तीच भावना आपलाच कर रूपाने दिलेला पैसा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी खिशात घालताना पाहून निर्माण व्हायला हवी. किंबहुना ती अधिक गंभीर आणि अधिक आक्रमक असली पाहिजे. कारण प्रश्न केवळ अन्यायाचा नसून कष्ट करून घाम गाळून आपण कमावलेल्या पैशाचा आहे...
ज्या दिवशी "हे चालणार नाही" असं म्हणत सरकारवर नजर ठेवायला पुढे येतील त्या दिवशी प्रशासन पातळीवरच्या व्यापक परिवर्तनाची सुरुवात होईल... माहिती अधिकाराबाबत जागरूकता,प्रसार आणि परिणामकारक वापर या तीन गोष्टींनी हे साध्य करणे शक्य आहे...

2 comments:

  1. The problem is people donot speak up at mass scale. They raise their voice in tits and bits and that too for few minutes.We as a nation are proving to be most tolerant nation in the world. We are very much insensetive about injustice, corruption, delays, red-tapism and so on and so forth. We have become immune to any kind of supression. Most of the Middle and educated class just enjoy HD, i-pods and Diomands. We once upon a time was the most argumentative nation now we are turning to " Mouni" Nation. Media is exposing but there is a spiritual silence in the society

    ReplyDelete
  2. Somehow I disagree your thoughts.... Yes we are inactive... yes we have become tolerant... But still we speak out loud against corruption... against irregularities... against red tapism... We speak out in a different form. We write blogs, we avoid voting, we debate on facebook...All this are forms of expression...
    I have all the hopes of involving those i pod teenagers in a large scale mass movement...
    What I really want is a something that will "click" them... I think you know what I meant! There is always a click factor involved with teenagers...!
    few years back Rang De Basanti spread the trend of Candle light marches which suddenly became a fashion... Now, candle light marches is an old thing... I'll have to find out something very innovative and yet, sustainable..! I don't know what exactly that "click" thing would be... but i'm sure I'll find it soon.. and once I get it, mark my words, I'll do something really big...

    ReplyDelete