Tuesday, August 30, 2011

गैरसमजुतीच्या भोवऱ्यात...


अण्णांच्या निमित्ताने, देशभर चर्चा वादविवाद मोर्चे, आंदोलने, आरोप प्रत्यारोप यांचा पाऊस पडला. एकूणच फारसा मतदानाला कधी बाहेर न पडलेला, भ्रष्टाचाराला भरपूर हातभार लावलेला- पण मनातून भ्रष्टाचार नकोसा असलेला, एकूणच प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष बाळगणारा पण स्वतः काहीही करण्याची इच्छा असूनही धमक नसणारा असा मध्यमवर्ग अण्णांना पाठींबा द्यायला मोठ्या संख्येने रस्त्यावर आला. अण्णा म्हणतील तसे झाले तर कदाचित सर्व भ्रष्टाचार नष्ट होईल, देशातून सोन्याचा धूर निघू शकेल अशी भाबडी आशा बाळगणारा हा वर्ग (काही जणांना तर १ रुपयाला ४० डॉलर अशी आपली अर्थव्यवस्था झाली असेल अशी स्वप्नेही पडू लागली!). अर्थात या सगळ्यामध्ये असलेला लोकांचा सहभाग आणि सहभागामागे असलेली भावना ही शंभर टक्के प्रामाणिक होती याबद्दल मला जराही शंका नाही. अनेक लोक काहीतरी बदल घडतोय आणि आपण त्याचा भाग असला पाहिजे अशा भावनेनेही आले होते. 
अगदी पहिल्यापासून, एप्रिल मधल्या अण्णांच्या उपोषणापासूनच लोक राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या नावे बोंब मारत होते. प्रत्येक वेळी मोर्चा, सभा वगैरे साठी येणाऱ्या लोकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल पराकोटीचा तिरस्कार दिसून येत होता. आपले राज्यकर्ते हे एकजात चोर आहेत आणि सगळ्यांना शनिवारवाड्यावर फाशी दिले पाहिजे असे म्हणणारेही असंख्य लोक मला या सगळ्या कालावधीत भेटले. लोकशाही मध्ये लोकच आपल्या राज्यकर्त्यांबद्दल असे म्हणताना पाहून मी चकित झालो. नाराज झालो. दुखावलो गेलो. 

फेसबुकवर आपल्या प्रोफाईल वर पॉलीटीकल व्ह्यूज या कॉलम मध्ये 'नॉट पॉलीटीकल' असे अभिमानाने लिहिणारे असंख्य लोक असतात. त्याचा या मंडळींना अभिमानही असतो. (यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे. संसदेपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र महिलांना ५०% आरक्षण दिलेलं असताना एका बाजूला ही अवस्था!) अनेकदा आमच्या परिवर्तन संस्थेसंदर्भात असंख्य लोकांना भेटायची वेळ येते. परिवर्तन ही एक राजकीय संघटना आहे असे सांगितल्यावर लोक बिचकतात. 'म्हणजे कोणत्या पार्टीचे तुम्ही' असे संशयानेच विचारतात. 'निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नव्हे, लोकांचे हक्क अधिकार याविषयी आम्ही काम करतो जे राजकीयच आहे' अशा आशयाचे ५ मिनिटांचे स्पष्टीकरण दिल्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास बसतो. हे झालं सामान्य लोकांचं. ते एकवेळ ठीक आहे. पण आम्ही राजकीय नाही असे सामाजिक संस्थांचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझं डोकंच फिरतं. स्वतःला जागरूक म्हणवणारा हा गट असून राजकीय नाही असे अभिमानाने सांगणे या सारखा महामुर्खपणा कोणत्याही लोकशाही देशात दिसणार नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत उभारलेली राज्यकर्ती संस्था. जर संपूर्ण यंत्रणाच लोकांची असेल तर खुद्द लोकच अ-राजकीय कसे असू शकतात??? लोकशाहीमध्ये मानो या न मानो, आपण राजकारणाशी जोडलो गेलेलो असतोच. सकाळी चहातली साखर आणि वर्तमानपत्र इथूनच राजकारणाच्या प्रभावाची सुरुवात होते. आणि हा प्रभाव कायम सुरूच असतो. मनोरंजनापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत. सर्वत्र राजकारण आहेच आणि असणारच कारण ही लोकशाही आहे. 'मी राजकीय आहे' असे ज्या दिवशी आपण आणि आपल्यातले बहुसंख्य अभिमानाने म्हणायला शिकू त्या दिवशी या देशातली लोकशाही यशस्वी होऊन प्रगल्भ व्हायला लागली आहे असे म्हणता येईल. तोपर्यंत आपण अजूनही बाल्यावस्थेत आहोत. लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या दृष्टीने तेराव्या चौदाव्या शतकात इंग्लंड मध्ये असलेली परिस्थिती आणि आत्ताची आपली परिस्थिती यात मला फार काही फरक जाणवत नाही. आपण उठता बसता टिळक-गांधी-सावरकर-नेहरू ही नावे घेतो, पण हे नेमके कशासाठी भांडले याची 'समज' फारच थोड्यांना आहे बहुतेक. माहिती अनेकांना आहे. पण माहिती असणे म्हणजे समज असणे असे नव्हे. हे लोक ब्रिटीशांच्या विरुद्ध लढले नाहीत. हे लढले भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी. जर युद्ध फक्त ब्रिटीशांच्या विरुद्ध असतं तर १५ ऑगस्ट नंतरही सुरु राहिलं असतं. लढाई होती ती राजकीय हक्कांसाठी. प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी हे सगळे लोक लढले आणि आज पासष्ट वर्षानंतर तेच अधिकार हक्क वापरायला नकार देण्यात आपण धन्यता मानतोय. 

 नागरिक शास्त्र हा कंटाळवाणा विषय न राहता यातून प्रत्यक्ष राजकीय शिक्षण दिले गेले पाहिजे. आपण नागरिक म्हणून या देशाचे मालक आहोत, राजे आहोत. आपण आपले अधिकार नाही वापरले तर कोणीतरी आपल्यावर दादागिरी करणारच. आणि कोणीतरी दादागिरी करतंय म्हणून मी आपले अधिकार वापरतच नाही असे अभिमानाने सांगणे यात कसला आलाय शहाणपणा? लोकपाल येईल..पण ती एक केवळ व्यवस्था असेल. आणि लोकपालाची व्यवस्था तेव्हाच सक्षम असेल जेव्हा खुद्द नागरिक सक्षम असतील, राजकीय दृष्ट्या जागरूक असतील. अ-राजकीय  या शब्दातच अराजक आहे. तेव्हा आपल्याला एक सक्षम लोकशाही व्यवस्था हवी आहे की अफगाणिस्तान-पाकिस्तान सारखे अराजक याचा विचार आपण केला पाहिजे. आज जी लोकशाही आपल्या इथे शिल्लक आहे तिचा सपशेल पराभव होईल. म्हणूनच अराजकाला आमंत्रण देणारी अ-राजकीय असण्याची विचारधारा मोडून काढली पाहिजे. आपल्यातला प्रत्येक जण राजकीय आहे... राजकीय असलाच पाहिजे. राजकीय विचारधारा काय पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ती असली पाहिजे एवढे मात्र निश्चित. 
अ-राजकीय असण्याने आपण फार स्वच्छ शुद्ध, निरपेक्ष, निस्वार्थी असल्याचा गैरसमज अनेकांना होतो. या गैरसमजाच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत. यातून आता बाहेर येऊया. आपल्या लोकशाहीला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवूया. 

Friday, August 19, 2011

एक वर्ष

जानेवारी २०११
बऱ्याच दिवसांनी एक ओळखीचा मुलगा गणूला भेटला. "काय रे काय करतोस आजकाल?", गणूने विचारले. 
"मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे", तो कार्यकर्ता उद्गारला. गणूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. असे काहीतरी शब्द तो प्रथमच ऐकत होता. "अरे माहिती अधिकार कायदा येऊन साडेपाच वर्ष उलटली तुला हा कायदा माहित नाही?", कार्यकर्त्याने गणूला विचारले. पण गणूने तुच्छतेने नकारार्थी मान हलवली. जणू ही गोष्ट माहित असणे गरजेचे नाही. कार्यकर्ता नाराज झाला. त्याने आपल्या संस्थेचे महत्व गणूला सांगितले. माहिती अधिकार कायद्याबद्दल सांगितले. गणूला आनंद झाला. "खरंच खूप चांगले काम करता रे तुम्ही. ऑल द बेस्ट!", गणूने कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ताही आज आपण एकाला जागरूक नागरिक बनवले या खुशीत निघून गेला. 

एप्रिल २०११ 
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर फर्ग्युसन रोड वर जो दंगा घातला होता त्यातले स्वतःचे फोटोज गणू फेसबुक वर अपलोड करत होता. तेव्हढ्यात त्या कार्यकर्त्याने गणूला पिंग केले. 
karykarta: kay re kasa ahes?
Ganu: mast! tu?
k: sadhya jordar kama chalu ahet re. Anna hazarencha uposhan ahe. corruption door karnyasathi. 
Ganu: kay mast match zali re final... ek number jinklo apan..! dhoni chi ti shewatchi six mhanje tar ahahaha! 
k: kharay... pan ata aplyala corruption against match jinkaychie... 
Ganu: hm
K: Aik udya Balgandharv chowk te Shaniwarwada asa candle march ahe, anna hazare yanna support karnyasathi.
Ganu: ok..
K: tar nakki ye march la.. 
Ganu: hmm baghto..try karto. baki kay?
K: kahi nahi re. udyachi tayari chalue... tu volunteer mhanun join ka hot nahis? khup important cause ahe re... 
Ganu: chalo g2g... jara kam ahe. c u l8r, bye, tc. 

७ ऑगस्ट २०११
गणू बालगंधर्व चौकातून जात होता. तेवढ्यात त्याला समोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली २५-३० जणांचा घोषणा देणारा जमाव दिसला. "अरे काय चालू आहे हे?" कार्यकर्त्याला पाहून गणूने विचारले. 
"निषेध मोर्चा! अरे गणू, आपला पुण्याचा खासदार भ्रष्ट आहे आणि तिहार जेल मध्ये आहे. हे आपण सहन नाही केले पाहिजे. याचा निषेध तू मी आणि सगळ्या पुणेकरांनी मिळून केला पाहिजे. सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"फारच छान, तुमचा हेतू फारच उत्तम आहे. मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेला... गेलाच...! 

१८ ऑगस्ट २०११
जिकडे तिकडे अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत सगळ्या शहरांमध्ये. एक दिवस गणूला त्याच्या मित्रांचा फोन येतो. "अरे गणू, उद्या एक मोर्चा आहे. अण्णांना पाठींबा देण्यासाठी. आपण जाऊया. संध्याकाळी ६ वाजता." गणूने थोडा वेळ आढेवेढे घेतले. "अरे चल रे... मोर्चा संपल्यावर सगळे मस्त जेवायला जाऊ कुठेतरी..." मित्राने आग्रह केल्यावर गणू तयार झाला. अखेर गणू आपल्या मित्रांबरोबर बालगंधर्व चौकात हजार होतो जिथून मोर्चाची सुरुवात होणार असते. 
"अरे तू इथेसुद्धा आहेस वाटतं?" कार्यकर्त्याकडे पाहून गणू आश्चर्याने विचारतो.
"म्हणजे काय? मी पहिल्यापासून आहे न या आंदोलनात...!", कार्यकर्ता उद्गारतो. 
"अरे हो की... विसरलोच..", पुढे काही गणू बोलणार एवढ्यात घोषणांचा आवाज येतो- " एक सूर एक ताल" त्यापाठोपाठ आजूबाजूचे सगळे ओरडतात," जन लोकपाल जन लोकपाल"... 
सगळेच जण मोर्चाबरोबर चालू लागतात. जोरदार घोषणा झेंडे, बोर्ड यांनी वातावरण एकदम झकास तयार झालेले असते.'मी अण्णा हजारे' लिहिलेली गांधी टोपी घालून गणूही मोर्चात चालू लागतो. मोर्चा यशस्वी होतो... आपण केलेल्या प्रचंड देशसेवेमुळे गणू त्या रात्री अतिशय समाधानाने झोपी जातो. 


नोव्हेंबर २०११
अण्णांचे आंदोलन संपलेले असते. अण्णा आणि सरकार यांच्यात उभयपक्षी मान्य तोडगा निघतो. गणूचे नेहमीचे उद्योग सुरळीत चालू असतात. एक दिवस रस्त्यात कार्यकर्ता भेटतो. त्याच्या आजूबाजूला २५-३० लोकांचा घोषणा देणारा जमाव असतो. "अरे काय रे हे?", गणू कार्यकर्त्याला विचारतो.
"आपल्या खासदाराने अजून राजीनामा दिला नाहीये. असा भ्रष्ट आणि स्मृतिभ्रंश झालेला खासदार आम्हाला नको हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे."- कार्यकर्ता.
"खरंय रे तुझं म्हणणं...", गणूला पटते. 
"सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेलाच...! 

जानेवारी २०१२ 
पुणे महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम चालू असते. जिकडे तिकडे घोषणा, पत्रके, सभा! गणू एकदा रस्त्यावरून जात असतो तेव्हा त्याला रस्त्यात उभा राहून पत्रके वाटणारा कार्यकर्ता दिसतो. "अरे काय रे हे?" गणू विचारतो. 
"मतदान जागृती. पुढच्या आठवड्यात निवडणूक आहे. मतदान कर नक्की. मतदान करणे हा आपला लोकशाही हक्क तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपले कर्तव्य आहे." 
"नक्की करणार मतदान...!"- गणू.
मतदानाच्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने आणि लागूनच शनिवार रविवार आल्याने गणू आणि मित्रमंडळी कोकणात ट्रीप ला गेले...

"लोकशाही म्हणजे काय हेच आपण पार विसरून गेलो आहोत." अतिशय निराश मनस्थितीत कार्यकर्ता फेसबुक वर आपले स्टेटस अपडेट करतो. त्याच्याच खाली त्याच्या 'वॉल' वर गणूचे कोकण ट्रीप चे फोटोज अपलोड केलेले दिसत असतात. कार्यकर्ता निराश होतो. हताश होतो... पण तेवढ्यात गणूने नव्याने अपलोड केलेला फोटो त्याच्या वॉल वर दिसतो ज्यामध्ये गणू मतदान केल्यावर बोटावर केली जाणारी खूण दाखवत असतो... कार्यकर्त्याला आश्चर्य वाटते. फोटोच्या खाली गणूने लिहलेले असते- "कोकणात निघण्या आधी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडल्या उघडल्या मतदानाचा अधिकार बजावला. माझा प्रतिनिधी भ्रष्ट असणार नाही याची मतदान करताना तरी मी काळजी घेतली आहे..!" 
 थोड्याच वेळात अनेकांचे असे फोटोज फेसबुक वर झळकू लागले. प्रयत्न वाया गेले नव्हते... कार्यकर्त्याला उत्साह आला. आणि त्याने अधिकच धुमधडाक्यात कार्याला सुरुवात केली...!