Saturday, April 7, 2018

गरज, सोय, चैन इत्यादी.

मी लहान असताना, बालभवनमध्ये शोभाताईंनी (भागवत) एक उपक्रम घेतला होता. गंमत जत्रा का असं काहीतरी नाव होतं बहुतेक. नेमकं आठवत नाही. त्या जत्रेत खोटे पैसे आणि खोट्या गोष्टी मांडल्या होत्या. आम्हा लहान मुलांमधील काही मंडळी दुकानदार होती, तर काही माझ्यासारखी गिऱ्हाईक. प्रत्येक गिऱ्हाईकाला एक टोपली आणि ठराविक रक्कम दिली होती. आणि त्या जत्रेत गिऱ्हाईकाने आपल्या घरासाठी खरेदी करायची होती. सगळे पैसे संपवलेच पाहिजेत असं बंधन नव्हतं. मी मात्र झटपट माझी सगळी खरेदी करून हातातले पैसे संपवले. सगळ्या विकत घेतलेल्या गोष्टी टोपलीत ठेवून आता पुढे काय याची वाट बघू लागलो. सगळ्यांची खरेदी संपल्यावर मग आम्हाला एक यादी दिली गेली. कुठल्या वस्तू गरज या वर्गात मोडतात, कुठल्या सोय या वर्गात आणि कुठल्या चैन या प्रकारात मोडतात ते त्या यादीत लिहिलं होतं. आणि मग आम्ही विकत घेतलेल्या वस्तू त्यानुसार बघायच्या होत्या. त्यावर किती पैसे खर्च केले हे बघायचं होतं. मी घेतलेल्या ८-१० गोष्टींपैकी केवळ एकच गोष्ट गरज मधली होती. एखाद-दोन सोय म्हणता येईल अशा गोष्टी होत्या आणि बाकी सगळ्या गोष्टी या चैनीच्या होत्या. बहुतांश पैसे मी त्यावरच खर्च केले होते. प्रत्येक गिऱ्हाईकाने आपापली खरेदीची यादी अशी गरज-सोय-चैनमध्ये विभागून वाचून दाखवली. काहींनी तर केवळ सोयीच्या गोष्टी खरेदी केल्या होत्या, काहींनी बऱ्यापैकी समतोल साधला होता, काहींनी पैसे वाचवले होते तर सोयीला अनेकांनी प्राधान्य दिलं होतं. इथे तो खेळ संपला. आम्हाला कोणीही तुम्ही काय करायला हवं होतं या आशयाचं भाषण दिलं नाही. पण या खेळाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. आजही आहे. कोणती गोष्ट ही आपली गरज आहे, सोय आहे आणि चैन आहे याचा विचार नकळतच माझ्या मनात येऊन जातोच जातो.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपला जोडीदार निवडताना ज्या अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात त्यामुळे होणारे घोळ. आपल्या नेमक्या गरजा कोणत्या, कोणत्या गोष्टी असल्याने सोय होणार आहे आणि कोणत्या गोष्टी म्हणजे चैन आहेत याचा विचार करायलाच हवा. मध्यंतरी एक मुलगी आमच्या ऑफिसला मला भेटायला आली होती. तिला असा मुलगा जोडीदार म्हणून हवा होता की जो कल्याणीनगर-कोरेगावपार्क इथेच राहणारा असेल. मी ही अपेक्षा ऐकून थोडासा चक्रावलो. या अपेक्षेमागेचं काय कारण असं विचारल्यावर ती म्हणाली की ती राहते कल्याणीनगरला, तिचं ऑफिस नगर रोडला. त्यामुळे ऑफिसला जायला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिला लागत नाही. आणि हेच लग्नानंतरही व्हायला हवंय. मला या उत्तरानंतर खरंतर हसू आलं. मी तिला विचारलं, “असं मानूया की तुझ्या अपेक्षेनुसार तुला नवरा मिळाला, आणि नंतर मग तुझ्या कंपनीने तुझं ऑफिस हिंजवडीला नेलं, तर मग तू काय करणार? नोकरी बदलणार, घर बदलणार की नवरा बदलणार?”. त्यावर ती चांगलीच विचारांत पडली, आणि म्हणाली, “मी या गोष्टीचा कधी विचारच नव्हता केला!”. हे उदाहरण अपवाद वाटेल. पण अशी कितीतरी उदाहरणं बघण्यात येतात. मुंबईत लोकलच्या वेस्टर्न लाईनवर राहणारी मुलगी सेन्ट्रल लाईनवरच्या ठिकाणी लग्न करून जायला तयार नसते या विषयावर एका टीव्ही चॅनेलने कार्यक्रम केला होता! हे केवळ मुलींच्याच नव्हे तर मुलांच्या बाबतीतही लागू होतंच. आपल्या आईने ज्या पद्धतीने कुटुंब-नोकरी-स्वयंपाक असं सगळं सांभाळलं तसंच आपल्या बायकोनेही करावं अशी नव्वदीच्या दशकातली मानसिकता अनेक मुलांची आजही आहे, ही मला त्यांच्याशीच बोलून बोलून समजलेली गोष्ट आहे.

या आणि अशा अनेक अपेक्षांच्या मागे कारण आहे ते म्हणजे स्वतःचा कम्फर्ट झोन कधीही न सोडण्याची इच्छा. आपल्या सगळ्यांचे आपापले कम्फर्ट झोन तयार होत असतात. घरात, ऑफिसमध्ये, मित्र-मंडळींमध्ये वगैरे. हळूहळू या कम्फर्ट झोन मध्ये असणाऱ्या चैनीच्या गोष्टी पटकन सोयवाल्या कॉलममध्ये उड्या मारतात आणि सोय मधल्या गोष्टी गरजेमध्ये सरकतात. अशाप्रकारे सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये गेल्या की आपल्याला ची बाधा होते. म्हणजे आपल्या सगळ्या अपेक्षांना लावणे. “माझा होणारा नवरा महिन्याला एक लाख रुपये कमावणारा असला पाहिजे.”, “माझ्या बायकोने घरात स्वयंपाक केला पाहिजे.”, वगैरे वगैरे. अपेक्षांना लागू लागला की त्या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात. मागण्यांचे डोंगर वाढले की जोडीदार शोधणं कठीण बनू लागतं. आणि साहजिकच आहे ना, आपला कम्फर्ट झोन जसाच्या तसा ठेवून कसं बरं नवीन नातं निर्माण करता येईल? अगदी मैत्रीतसुद्धा ते होत नाही.
जोडीदार निवडताना, अपेक्षा ठरवताना, आपण काय बोलतो ते ऐकलं पाहिजे. आणि आपल्या बोलण्याकडे कान देऊन, आणि मेंदूचे दरवाजे उघडे ठेवून ऐकलं तर गरज-सोय-चैन याची वर्गवारी करणं खूप सुटसुटीत होईल. गरज-सोय-चैन नुसार आपलं बोलणं कसं बदलेल याचं हे एक उदाहरण-
·         गरज – या गोष्टी अगदी आवश्यक आहेत.
·         सोय – या गोष्टी असतील तर जरा बरं पडेल.
·         चैन- या गोष्टी असतील तर किती छान!/ किती मस्त!


जोडीदार निवडीबाबत आपल्या अपेक्षांचं असं वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करत गेलो तर लागतील अशा गोष्टी फार थोड्या आहेत हे आपलं आपल्यालाच कळत जातं. जरा बरं पडेल या सोयीकडे नेणाऱ्या शब्दांमध्ये तडजोडीची संधी असते. उदाहरणार्थ अमुक अमुक असेल तर जरा बरं पडेल, पण नसेल तरीही हरकत नाही, कारण इतर या या गोष्टी आहेत की!. चैनीच्या गोष्टी तर बोनस असतात. बाकी सगळं जुळतंय, जमतंय आणि त्यात हे पण आहे तर किती मस्त!. या गरजा-सोयी-चैन कोणत्या आहेत आणि त्या का आहेत याचा आपण विचार करत गेलो की यातल्या कोणत्या गरजा-सोयी-चैन या पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः समर्थ आहोत आणि कोणत्यासाठी इतर व्यक्तींवर आपण अवलंबून आहोत हेही उलगडत जातं. खरंतर प्रेमात पडून लग्न करणारे हे सगळं त्यांच्याही नकळत मनातल्या मनात करतच असतात. अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत मात्र सगळ्या गोष्टी गरजेच्या कॉलममध्ये ढकलण्याची आपल्याला घाई होते. हे टाळलं पाहिजे. वस्तुनिष्ठपणे (rationally) विचार करत हे टाळलं तर मुला-मुलींचा आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांचा लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतला ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. एक महत्त्वाची गोष्ट अशी की आजची एखादी गरजेची गोष्ट उद्या चैन या कॉलममध्ये किंवा उलटं, असा प्रवास असू शकतो. त्यामुळे कोणतीच यादी ही कोणाच्याच आयुष्यात अपरिवर्तनीय नाही. म्हणून वर उल्लेख केलेला वस्तुनिष्ठ विचार एकदाच करून सोडून द्यायचा नाही, तर दर काही काळाने तो करत राहायचा. ही यादी वारंवार तपासून बघायची.

हे केवळ लग्न ठरवण्याच्या बाबतीतच लागू होतं असं नव्हे, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या इतरही बाबतीत गरज, सोय आणि चैन याबाबत सजगपणे विचार करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली तर, आपलं आयुष्य अधिक आनंददायी बनू शकेल, असा माझा विश्वास आहे. अवघड वाटत असेल तर ही सवय लावून घेणं हे आधी आपण सोय या कॉलममध्ये टाकूया आणि हळूहळू गरजेमध्ये सरकवूया, काय वाटतं?! करून तर बघूया!

(दि. ७ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)


Saturday, March 24, 2018

‘लिव्ह इन’ आणि लग्न

नुकताच चि. व चि. सौ. कां. नावाचा लिव्ह-इन दाखवणारा सिनेमा येऊन गेला. त्यात मुलगा आणि मुलगी लग्न करण्याआधी एकत्र राहून बघायचं ठरवतात. सिनेमा बघताना दोन गोष्टी माझ्या मनात आल्या. पहिली म्हणजे, लग्नाआधी जमतंय का बघू, असं म्हणत लिव्ह-इनचा पर्याय स्वीकारला गेला. म्हणजे पुढे जाऊन लग्न करण्याची तयारी त्या नायक आणि नायिका यांची होतीच. आयुष्यभर लिव्ह-इनचा पर्याय त्यांच्या डोक्यात नव्हता. आणि दुसरा मुद्दा म्हणजे लिव्ह-इन ठरवत असताना ते हे नातं अ-शारीर असेल असं ठरवतात. म्हणजे असं लिव्ह-इन नातं, ज्यात लैंगिक संबंध नसतील. (हे जरा गंमतीदार आणि अवास्तव असलं तरी, यामुळे निर्मात्यांना हा सिनेमा नैतिकतेच्या समाजमान्य कल्पनांना छेद न देणारा आणि त्यामुळेच एक फॅमिली सिनेमा आहे असं म्हणता आलं असावं!) २००५ मध्ये आलेल्या सलाम नमस्ते या सिनेमात लिव्ह-इन दाखवलंय आणि एकत्र राहायला सुरुवात करण्याआधी साधारणपणे हेच दोन्ही मुद्दे सैफअली खान आणि प्रीती झिंटा विचारांत घेतात. त्यावेळी एका चित्रपट परीक्षणात असं म्हणलं गेलं होतं की, सिनेमा ऑस्ट्रेलियात घडताना दाखवला आहे, कारण लिव्ह इन आपल्याकडे दाखवलं तर इतर सामाजिक, कायदेशीर बाजू विचारांत घ्याव्या लागल्या असत्या आणि सिनेमाच्या कथानकात लुडबुड झाली असती. परंतु, २०१७ मध्ये आलेल्या चि. व चि. सौ. कां.ला ही अडचण विशेष भेडसावत नाही. बारा वर्षात आपल्या समाजात पडलेला हा फरक आहे. सिनेमांतून तो समोर आला, इतकंच. हा जो समाजाच्या विचारांत फरक पडलाय, त्यामुळे एकदम सगळी लग्नसंस्था धोक्यात आलीये की काय?!

मध्यंतरी मी इंटरनेटवर एक यादी वाचत होतो. त्या यादीत अनेक वर्षांपूर्वी अनेक मान्यवर तज्ज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ यांनी २००० साली किंवा त्यानंतर आपलं जग कसं असेल याची भाकितं वर्तवली होती. लवकरच प्रत्येकाकडे छोटेखानी हेलिकॉप्टरसारखे वाहन असेल आणि तेच भविष्यात मध्यमवर्ग वापरत असेल असं साठच्या दशकात एक भाकीत होतं. किंवा एकविसाव्या शतकात माणसं कशी राहत असतील हे रेखाटताना एका चित्रकाराने हवामान नियंत्रणासाठी संपूर्ण शहरावर एक प्रचंड मोठं काचेचं छत असेल असं दाखवलं होतं, एका प्रथितयश मासिकाने ते छापलंही होतं. १९५५ मध्ये व्हॅक्युम क्लीनर कंपनीच्या मालकाने असं म्हणलं होतं की दहा वर्षात अणूउर्जेवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर बाजारात आलेला असेल, वगैरे वगैरे अनेक भाकितं त्या यादीत होती आणि अर्थातच सपशेल चुकीची ठरली. दुसऱ्या बाजूला ज्यांचा तर विचारही नव्हता केला अशा गोष्टी आपल्या जगात अस्तित्वात आल्या आहेत. हे सगळं आठवायचं कारण हेच की, आपल्याला असे अनेकजण भेटतात जे अतिशय आत्मविश्वासाने लग्नसंस्था हळूहळू नष्ट होणार आहे आणि काही वर्षांनी सगळे लिव्ह इन मध्येच राहत असतील असं भाकीत वर्तवतात. चूक-बरोबरच्या पलीकडे जाऊन, मला हे भाकीत थोडं घाईघाईचं वाटतं. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या मंडळींची संख्या वाढली म्हणजे हजारो वर्षांची लग्नव्यवस्था एकदम उखडलीच जाईल का?! किंवा लग्न व्यवस्था आहे तश्शीच टिकून राहील अगदी हेही भाकीत जरा हट्टीपणाचं नाही का?!
शंभर किंवा पन्नास वर्षांपूर्वी लग्न व्यवस्था जशी होती तशी आज नाही. आणि आज आहे तशी अजून पन्नास वर्षांनी नसणार हे उघड आहे. बदल होतच राहतात. पण स्वरूप बदललं तरी मूलभूत अशी स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन कुटुंब सुरु करण्यासाठी तयार झालेली लग्न व्यवस्था नष्ट झाली नाही याला काही कारणं आहेत. लग्न संस्था का निर्माण झाली याकडे आपण गेलो तर ती इतके वर्ष कशी काय टिकून राहिली हे समजू शकेल. टोळीने भटकंती करणारा मनुष्यप्राणी शेतीचा शोध लागल्यावर एका जागी स्थिरावला आणि मग तिथेच घर बांधून राहू लागला. या काळात अर्थातच खाजगी मालमत्तेचा उदय झाला. माझ्यानंतर माझं शेत, घर हे कोणाला मिळावं या विचारांतून वारसाहक्काची कल्पना पुढे आली आणि त्यातून माझा वारस कोण हे नेमकं कळावं या हेतूने एका स्त्रीने एकाच पुरुषाबरोबर राहून नवीन पिढीला जन्म देण्याची प्रथा रुजली असावी असे मानले जाते. यातूनच लग्न व्यवस्था जन्माला आली. टोळी प्रकार कमी होऊन, कुटुंबांमध्ये विभागलेला मानवी समाज तयार झाला. कुटुंबव्यवस्था ही या नव्या समाजव्यवस्थेचा पाया बनली, आणि कुटुंबासाठी लग्न करणं आवश्यक होऊन बसलं. लग्न व्यवस्थेचा पाया हा असा आहे. या मूलभूत गृहितकांना धक्का लागत नाही, किंवा याबाबतच्या मानवी समजुती आणि रिती बदलत नाहीत तोवर लग्न व्यवस्थेला सहजासहजी धक्का लागेल असं मला वाटत नाही.
लग्न व्यवस्थेला धक्का न लावता, लग्नापूर्वी एकत्र राहून तर बघू, हा प्रकार मात्र वाढत जाईल असं मला मनापासून वाटतं. यामागे हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत- आर्थिक दृष्ट्‍या पूर्ण स्वतंत्र होत जाणारी माझी पिढी, आर्थिक स्वायत्ततेतून येणारं स्वातंत्र्य उपभोगण्याची संस्कृती, त्यामुळे लग्न लांबणीवर टाकायचं ठरवणं तरी दुसऱ्या बाजूला अगदी नैसर्गिक अशी, बहुतांश लोकांमध्ये असणारी भिन्नलिंगी व्यक्तींबद्दलची ओढ आणि या जोडीलाच नवनवीन तंत्रज्ञानाच्या अवाढव्य करामती! लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण तो एकमेव नाही, हे तत्त्वज्ञान आमच्या शहरी सुशिक्षित पिढीने स्वीकारलं आहे. आधी कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक असायचा, त्यात आता बदल झालाय. आता समाजाचा मूलभूत घटक हा व्यक्ती आहे. त्यामुळे इतर सर्व गोष्टींबरोबर समोरच्या व्यक्तीशी आपलं कसं जुळतंय हे आधी बघून घेण्याची इच्छा मुला-मुलींमध्ये निर्माण झाली तर त्यात आश्चर्य काय?
आमच्या आधीच्या पिढीकडून लिव्ह-इनला होणाऱ्या विरोधामागे लैंगिक शुद्धतेच्या, पावित्र्याच्या पारंपारिक संकल्पना आहेत. याविषयी गेल्या वेळच्या लेखात मी सविस्तर भूमिका मांडली आहेच. मला वाटतं, नव्या युगात, नव्या विचारांसह, नव्या तंत्रज्ञानाला विचारांत घेत, व्यक्ती-व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या कल्पनांची चांगली झडझडून फेरमांडणी करायला हवी. कोणाला आवडो अथवा न आवडो, परिस्थितीच्या रेट्याने ती फेरमांडणी होणार आहेच. पण त्यावेळची ओढाताण आणि संघर्ष आटोक्यात ठेवायचा, तर या फेरमांडणीसाठी आपणच पुढाकार घेण्याला पर्याय नाही!

(दि. २४ मार्च २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, February 24, 2018

शुद्धतेच्या अशुद्ध कल्पना

“वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत...”, १९२३ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आपल्या पूर्वजांच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या कल्पना काय होत्या याबद्दल सांगताना हे लिहिलं आहे. या घटनेला जवळपास तब्बल शंभर वर्ष झाली आहेत. सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच र.धों. कर्वे नावाचा एक माणूस संततिनियमनाचा प्रसार व्हावा आणि स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी अहोरात्र झटत होता.

ही दोन उदाहरणं मुद्दाम दिली. गेल्या शतकात मांडले गेलेले हे विचार बघता,  आज आपला समाज फारच वेगळ्या कुठल्यातरी टप्प्यावर उभा असायला हवा अशी एखाद्या बाहेरून बघणाऱ्याची समजूत होईल. पण त्याच वेळी, लग्नाच्या वेळी जात पंचायतीने कौमार्य तपासून बघण्याच्या आत्ताच्या आपल्या समाजातल्या घटना ऐकल्या की चक्रावून जायला होतं. आणि मग यातून आपल्या शुद्धतेच्या आणि पावित्र्याच्या सगळ्या कल्पनांचा असणारा पगडा डोक्यात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वतः, शुद्धतेच्या आजच्या कल्पना स्त्री-पुरुष दोघांनाही लागू केल्या जात असल्या तरी, स्त्रिया त्यात जास्त भरडल्या जातात हे वास्तव आहे. आणि म्हणून या मुद्द्यांकडे स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य या अंगानेच बघायला हवं. 

लैंगिक स्वातंत्र्य असा उच्चार जरी केला तरी अनेकांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. “हे असलं सगळं म्हणजे स्वैराचाराला स्वातंत्र्याचा मुलामा देण्यासारखं आहे” हा विचार कित्येकांच्या डोक्यात येतोच येतो. पण स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरु होतो हे कोणी ठरवायचं? आणि कशाच्या आधारावर? निव्वळ संस्कृती आणि परंपरांचे दाखले द्यायचे तर इतिहासाचार्य राजवाडे आपल्या पुस्तकात त्या सांस्कृतिक दाखल्यांची अक्षरशः चिरफाड करतात. मग हातात काय उरतं? आपले वाडवडील कसे वागले ते बघणं? पण याही बाबतीत आपण साफ गडबडतोच की. आमच्या दोन पिढ्या आधी अविवाहित तरुण-तरुणींचे एकत्र असे सर्रास मित्र-मैत्रिणींचे गट कॉलेजात असत का? माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये ते होते. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढीने स्वैराचार केला काय? स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्या कल्पना म्हणजे कधीही न बदलता येणारी गोष्ट नव्हे. उलट स्थळकाळानुसार यात प्रचंड बदल होत गेले आहेत, यापुढेही होणार आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या कल्पना आहेत. युवाल नोआह हरारी नावाचा लेखक आपल्या सेपियन्स या सध्याच्या अत्यंत गाजणाऱ्या पुस्तकात या प्रकारच्या कल्पनांना इमॅजीन्ड रिअॅलिटी म्हणतो. म्हणजे काल्पनिक वास्तव. आणि अर्थातच हे काल्पनिक असल्यानेच परिवर्तनीय आहे.
कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असणं ही गोष्ट आता आश्चर्याची किंवा कुतूहलाची नाही. हे जे नातं निर्माण होतं हे पुढे जाऊन लग्नामध्येच अपग्रेड होईल याची शाश्वती नात्यात असणारे स्वतः मुलगा-मुलगी कोणी देईलच असं नाही. तशी शाश्वती देणंही कठीणच आहे म्हणा. कारण डिग्री हातात पडली की लग्नाचा बार उडवून टाकायची पद्धत आता शहरी सुशिक्षित वर्गात तरी नाही. आधीपेक्षा मुलं-मुली आता लवकर वयात येऊ लागल्या आहेत असं मध्ये आमच्या एका कार्यक्रमांत एक डॉक्टर वक्त्या होत्या त्या म्हणत होत्या. (१० फेब्रुवारीच्या म.टा. च्या मैफल पुरवणीत यावर एक लेखही आला होता.) वयात येणं म्हणजेच, लैंगिक उर्मी निर्माण व्हायला सुरुवात होणं आणि प्रत्यक्ष लग्न होणं यातला कालावधी बघितला तर आधीपेक्षा तो जवळ जवळ दुप्पट झालाय. हे घडत असतानाच माहिती तंत्रज्ञान आणि अर्थकारणाने आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं आहे. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मोकळेपणा आलाय. आमच्या आधीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीत शाळा-कॉलेजपासूनच मित्र मैत्रिणींमध्ये स्पर्शाची भाषा कितीतरी अधिक आहे. एकमेकांना सहजपणे मिठी मारणं ही काय दुर्मिळ गोष्ट नाही. अशा परिस्थितीत माणसाच्या शुद्धतेच्या कल्पना एकदा तपासून बघायला नकोत का? नाही तर होतं काय, की शेवटी बहुतांश तरुण मंडळी स्वतःतल्या नैसर्गिक असणार्‍या उर्मी दाबून ठेवू शकत तर नाहीतच, पण वरून मात्र खोट्या नैतिकतेचा बुरखा पांघरतात. आपल्या मध्ययुगीन सामाजिक संकल्पनांमुळे आपण आपला समाज अधिकाधिक दांभिक करण्यात हातभार लावत नाही का?

याच चर्चेतून मग आपण येऊन पोचतो ते व्हर्जिनिटी नावाच्या प्रांतात. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) ही लग्नाआधी व्हर्जिनच असली पाहिजे या विचारांमागे एक काल्पनिक वास्तव आहे. आणि ते वास्तव म्हणजे- अशीच व्यक्ती शुद्ध असते. मागे एकदा रिलेशनशिप- मनातलं ओठांवर या नावाचा आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. सगळ्या विषयांवर खुल्लम खुल्ला बोलायचा मंच असं आम्ही म्हणलं होतं त्याचं वर्णन करताना. त्यावेळी काही मुला-मुलींनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘आपण शरीराच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलतो. पण मनाच्या व्हर्जिनिटीचं काय?’. २०१७ च्या प्रपंच या दिवाळी अंकात लेखक राजन खान यांनी आपल्यातल्या व्यभिचारी निसर्ग नावाचा एक सुंदर लेख लिहिलाय. व्यभिचार हा केवळ शारीरिक पातळीवर नसतो तर तो मनाच्या पातळीवरही असतो ही त्या लेखातली त्यांची भूमिका न पटण्याचं काहीच कारण नाही. समजा मी एक व्यक्ती म्हणून सामाजिक संकल्पनांना मान देत शारीरिक दृष्ट्‍या व्हर्जिन असेन, पण मनात मात्र दुसर्‍या एका व्यक्तीने घर केले होते. त्या व्यक्तीबरोबर मी अनेक सामायिक अनुभव निर्माण करत नातं तयार केलं होतं, आता काही नाहीये, पण भूतकाळात तर होतंच, अशी परिस्थिती असेल. मग मी मानसिक दृष्ट्‍या, भावनिक दृष्ट्‍या व्हर्जिन नाही. आता काय करायचं? मी अशुद्ध आहे का? यावर मनात काय आहे या गोष्टीला महत्त्व नाही असं जर उत्तर असेल तर व्यक्तीच्या मनाला आपण किती कमी लेखतो आणि शरीराला म्हणजे बाह्य गोष्टींना महत्त्व देतो हेच सिद्ध होतं. आपला शुद्धतेचा पोकळ डौल तेवढा उघड होतो यातून. या अशुद्ध कल्पनांमधून जेवढे लवकर बाहेर तेवढं उत्तम.
समोर असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवणं, काल्पनिक वास्तवांच्या फार आहारी न जाणं याला पर्याय नाही. काल्पनिक वास्तवांच्या आहारी गेल्यावर हेच ते अंतिम सत्य या अविर्भावात आपण बोलू लागतो. जगाचा आणि तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा रेटा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपल्या दुनियेला मध्ययुगात ठेवण्याचा आपला अट्टाहास; यातून संघर्ष तेवढा उभा राहतो. लग्न करताना किंवा जोडीदार निवडताना, आणि त्यानंतर एकत्र राहतानाही या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या पिढीने तर अधिकच. नाही तर या संघर्षात सगळ्यात जास्त नुकसान आमचंच आहे. आमचं आणि आमच्या पुढच्या पिढीचं. 

(दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, February 10, 2018

हास्य महात्म्य

माझ्या कामामुळे गेल्या तीन वर्षात लग्नाला उभ्या असणाऱ्या असंख्य मुला-मुलींशी बोलता आलंय. जोडीदाराबाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारल्यावर अनेक अपेक्षांची जंत्री समोरून येते. त्यात वय-जात-पगार-उंची-शिक्षण अशा सगळ्या ठराविक गोष्टींचा समावेश आहे. ‘समजूतदार जोडीदार असावा’ हेही आहे. पण अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर बाकी कोणीही जोडीदाराची विनोदबुद्धी उत्तम असावी अशी अपेक्षा सांगितलेली नाही. मला या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं. हसणं ही एक विलक्षण गोष्ट आहे. मानव जातीला असलेलं ते एक वरदान आहे. एखादी व्यक्ती हर्षा भोगले सारखी असते की ज्याच्या प्रसन्न हसण्याने सगळं वातावरणाच प्रसन्न होऊन जातं. काही जणांचं हसणं इतकं निर्मळ असतं की त्या निर्मळतेची भूल पडावी. चोवीस वर्ष सातत्याने खेळूनही, अगदी मैदानावरच्या शेवटच्या दिवशीही विकेट
पडल्यावर सचिन तेंडूलकर तितकाच निर्मळपणे कसा हसू शकतो?!!! या निर्मळ हसण्याची पडतेच भूल. काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा. 'कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल करायचा, आठवतंय?!. एखाद्याचं खुनशी हास्य ज्यामुळे समोरच्याला कापरं भरावं. एखादीच माधुरी नाहीतर मधुबाला जिच्या केवळ एका हास्यासाठी लाखो लोक दिवाने व्हावेत. एखादीच मोनालिसा, जिच्या स्मित हास्यावर शेकडो वर्ष उलटली तरी चर्चा थांबत नाहीत.

सामान्यतः ओळखीचा माणूस समोर दिसला तर त्याच्याकडे पाहून आपण हसतो आणि समोरचाही माणूस हसूनच प्रतिसाद देतो. जगात कुठेही गेलात तरी यामध्ये फरक पडणार नाही. कारण हीच माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. 'शिष्टाचार' या नावाखाली निर्मळ आणि स्वच्छ हसण्याची फार गळचेपी केली आहे. उगीचच थोडसंच कसनुसं हसायचं किंवा हसताना आवाज करायचा नाही.. असल्या फालतू आणि फुटकळ शिष्टचारांमुळे अनेक जण मोकळेपणे हसणं विसरून गेले आहेत की काय असं मला वाटतं. माझ्या ओळखीत काही मंडळी आहेत, कदाचित त्यांच्या मते हसायला पैसे पडतात. त्यामुळे रस्त्यात वगैरे दिसल्यावर ओळख दाखवायला आपण जरी हसलो तरी ही मंडळी चेहऱ्यावर मख्ख. किंवा फार फार तर ओळख दाखवणारी अल्पशी हालचाल, एखाद दुसरी सुरकुती पडेल चेहऱ्यावर इतकीच. यामागे नेमकं काय कारण असतं हे मला कधीच न उलगडलेले कोडं आहे. लोक एकमेकांकडे बघून सहज हसत का नाहीत?
माझा एक मित्र म्युझिक अरेंजर आहे. दिवसातले १२-१४ तास तो कामात असतो. कामाचा थकवा तर येतोच. पण कामाच्या ठिकाणी असलेल्या मंडळींनाही खूप वेळच्या कामामुळे खूप ताण पडतो. अशा वेळी हा पठ्ठ्या आपल्या धमाल विनोद बुद्धीच्या सहाय्याने सगळं वातावरण सतत हसवत ठेवतो. तुफान विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहून थकवा कमी होतो आणि शिवाय कामही अतिशय उत्तम होतं असा त्याचा अनुभव आहे. बहुधा सचिन तेंडूलकर एकदा एका मुलाखतीत म्हणला होता, "टीम मध्ये धमाल वातावरण ठेवणारे दोन खेळाडू आहेत- एक युवराज आणि दुसरा हरभजन. हे दोघे सतत इतरांची थट्टा करणे खोड्या काढणे अशा गोष्टी करून टीम ला हसवत राहतात. ड्रेसिंग रूम मधेच आम्ही इतके मस्त वातावरणात असतो की साहजिकच त्याचा उत्कृष्ट परिणाम आम्हाला खेळताना दिसून येतो." 
मध्यंतरी आलीया भटने याबाबत एक फार सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात तिने चुकीचं उत्तर दिलं आणि मग त्यानंतर इंटरनेटवर लोकांनी तिची यथेच्छ थट्टा केली. तिच्या ज्ञानावर, तिच्या बुद्धिमत्तेवर अनेक विनोद झाले. पण तिने या सगळ्यावर कडवटपणे प्रतिक्रिया दिली नाही. ना ती स्वतःच्या कोशात निघून गेली. उलट तिनेही ही मजा खूप खिलाडूपणे घेतली. तिने स्वतःवरही विनोद केले. मला वाटतं सार्वजनिक जीवनातच नव्हे तर आपल्या सर्वांच्या रोजच्या खाजगी जीवनात सुद्धा अशी उदाहरणं कमी बघायला मिळतात. स्वतःवरही हसता येणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. इतकंच नव्हे तर स्वतःला आणि दुसऱ्यालाही, आहे तसं विनाअट स्वीकारण्याचं हे एक लक्षण आहे. सुदृढ नात्यासाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे काय वेगळं सांगायला नको.

जोडीदार मस्त हसणारा असावा, त्याची/तिची विनोदबुद्धी तल्लख असावी, माझ्या किंवा इतरांच्याही चांगल्या विनोदांना दाद देणारा असावा अशी अपेक्षा का बरं असत नाही? आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी अडचणी सातत्याने येत असतात. अनेक प्रश्न, अडचणी, समस्या वगैरे वगैरे मधून कोणाची सुटका झालीये? पण अशावेळी विनोदबुद्धीच कामाला येईल. जोडीदार निवडताना, विशेषतः अरेंज मॅरेजबाबत, विनोद बुद्धी हा मुद्दा कमालीचा दुर्लक्षित झाला आहे असं मला फार वाटतं.  लग्नानंतरचं सहजीवन समृद्ध होण्यासाठी हास्यविनोद, थट्टा-मस्करी या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. लग्नाकडे ‘ही काहीतरी फार गंभीर गोष्ट आहे’ अशा अविर्भावात कायम बघितलं गेलं असल्याने जणू विनोदबुद्धी आता काय कामाची नाही, असा विचार नकळतच होत असावा का? का हे फक्त लग्न ठरवण्याच्या प्रक्रीयेपुरतं मर्यादित नाहीये? एकुणातच आपण हसण्याला घाबरायला लागलोय का? आजकाल पटकन कोणाच्याही कधीही भावना दुखावल्या जातात त्यामुळे थट्टा-मस्करीचं अवकाश छोटं होतंय की काय? आपल्याला विचार करायला हवा. स्वतःवर, दुसऱ्यावर, जगावर हसता यायला पाहिजे. तसा हसणारा आणि साथ देणारा जोडीदारही पाहिजे. असं वाटण्याची शक्यता आहे की, या मी मांडतोय त्या गोष्टी फारच वरवरच्या आहेत किंवा लग्नासारख्या गांभीर्याने घ्यायच्या गोष्टीला उथळ बनवत आहेत. पाश्चिमात्य जगात ‘डेटिंग’च्या पद्धतीत विनोदबुद्धीला विशेष महत्त्व देणं हे समाजमान्य असल्यासारखं आहे, असं म्हणतात. पण डेटिंग आणि लग्न यात फरक आहे असं म्हणत विनोदबुद्धीला उथळ मानायची चूक आपण का करावी?! मानवी नाती, फक्त लग्नाचंच नातं नव्हे तर सर्वच, ही गांभीर्यानेच घ्यायची गोष्ट आहे असं मी मानतो, पण गांभीर्याने घ्यायचं म्हणजे चेहऱ्यावर इस्त्री मारून हास्यविनोद टाळून जगायचं असं थोडीच आहे?!
जोडीदार निवडताना वय-जात-पगार-उंची-शिक्षण या गोष्टी दुय्यम आहेत. मस्त हसण्याची मुभा आणि
संधी नसेल, तर सगळ्या गोष्टी असूनही सहजीवनात गडबड होईल. चढ-उतार, समस्या, अडचणी या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येतात आणि जोडीदारासह आपण त्यांना तोंड देतो तेव्हा आपणच एकमेकांचे ऊर्जा स्त्रोत असतो. आता जर त्यावेळी आपण चिडचिड करणारे किंवा सदैव गंभीर आणि काहीतरी भयंकर घडत असल्यासारखे असू तर हा ऊर्जा स्त्रोत आटेल की वाढेल?  आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्याही रोजच्या आयुष्यातले ताण-तणाव कमी होतील की वाढतील? विनोदबुद्धी असणं हे कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता उत्तम असण्याचं लक्षण आहे. पाडगावकरांनी आपल्या एका कवितेत म्हणलंय तसं, काही माणसं ‘एरंडेल प्यायल्यासारखं आयुष्य पीत असतात’, असंही जगता येईलच की, पण तो मार्ग आपल्याला हवाय का? नसेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जोडीदाराबरोबर समृद्ध आयुष्य जगण्यासाठी, आपणही दुसर्‍याचे जोडीदार होणार आहोत हे लक्षात ठेवून, दिलखुलास हसण्याची, थट्टा मस्करी करण्याची आणि अर्थातच, पचवण्याचीही (ते जास्त महत्त्वाचं!) क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे याचे प्रयत्न करायला हवेत. फार अवघड नाही हे. जमेल नक्की सगळ्यांना. असंच दिलखुलासपणे, निर्मळपणे हसणारं जग निर्माण करता येईल. करूया ना?



(दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

Saturday, January 20, 2018

नातं, आपलं जगाशी.

काही दिवसांपूर्वी आमची मित्रमंडळींमध्ये चर्चा चालली होती, नातं म्हणजे नेमकं काय या विषयावर. एका मित्राने वेगवेगळी नाती सांगितली, आई-बाबा, भाऊ, बहिण, नवरा, बायको वगैरे वगैरे. पण ही सगळी कोणकोणती नाती अस्तित्वात आहेत त्याची नावांची यादी झाली. प्रत्यक्षात नातं म्हणजे काय? काय असलं पाहिजे म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नातं आहे असं आपण म्हणू शकतो? एक मैत्रीण म्हणाली, प्रेम असलं पाहिजे. पण मग जी नाती प्रेमाशिवाय असतात, त्यांचं काय? आपले आपल्या ऑफिसमधले सहकारी, कोपऱ्यावरचा दुकानदार, व्यवसायातला भागीदार अशा अनेक मंडळींशी आपलं प्रेमाशिवायही नातं असतं. म्हणजे मग नातं म्हणजे काय हे ठरवताना प्रेमाचा काही संबंध नाही. मग नातं म्हणजे काय?
मला असं वाटतं, ‘सामायिक अनुभव’, इंग्रजीत ज्याला शेअर्ड किंवा कॉमन एक्स्पीरियंन्स असं म्हणता येईल, हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. सामायिक अनुभव असेल तरच ते नातं आहे असं म्हणता येऊ शकतं. आपण आपल्या जुन्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा गप्पांमध्ये जुन्या आठवणी निघतात. किती साहजिक असतं ना हे? आपले सामायिक अनुभव आपण आठवतो आणि त्यामुळे आपण किती छान मित्र/मैत्रिणी आहोत याची जाणीव दोघांनाही होते. एकाच घरात वाढलेल्या दोन भावांचं एक सामायिक अनुभवविश्व तयार होतं आणि त्यांच्यात नातं तयार होतं. रक्ताचं नातं काहीही असलं तरी त्याला सामायिक अनुभवांची जोड नसेल तर ते नातं असेल का? आपण कित्येक वेळा बघतो की एखादी व्यक्ती जवळच्या नात्यातली असते पण कधी भेटच झालेली नाही. अशावेळी नावापुरतं नातं काही का असेना. प्रत्यक्षात ते नसतंच. ते परत निर्माण करायचं तर भेटणं, बोलणं या सारखे सामायिक अनुभव निर्माण करावे लागतात. या उलट काही वेळा एखाद्या संकटात एकत्र सापडलेले, एकमेकांना आधी न ओळखणारे लोक एकदम बांधले जातात. मुंबईत दर पावसाळ्यात बघतो आपण ते. कशामुळे होतं असं? अर्थातच- शेअर्ड एक्स्पीरियंन्स. किंवा एकत्र घेतलेला अनुभव. हा अनुभव, ही सामायिक काहीतरी असण्याची भावना दोन व्यक्तींमध्ये बंध तयार करते आणि आपण त्याला नातं म्हणतो.
नात्याला आपण आपल्या सोयीसाठी अनेक नावं दिली, नावांनुसार नात्यांना हक्क, कर्तव्ये आणि विशेषाधिकार वाटून दिले. एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या एखाद्याच व्यक्तीबरोबर सगळे सामायिक अनुभव असतील ही गोष्ट अशक्यच. त्यामुळे नातंही केवळ एकच असं असणार नाही हे उघडच आहे. एकाच व्यक्तीची अनेक नाती तयार होऊ लागली. सामायिक अनुभवांचं जाळं विस्तारत गेलं. आणि त्या नात्यांच्या बांधणीतून आपण समाज नावाची चीज उभी केली. वेगवेगळ्या प्रकारच्या सामायिक अनुभवांतून आपण जगाशी नातं तयार केलं आहे. आज माझं जगाशी, जगातल्या कित्येक गोष्टींशी भन्नाट नातं आहे याचं कारण माझे सामायिक अनुभव. एकाच स्टेडियममध्ये बसून आपल्या लाडक्या संघाला पाठींबा देणारे पाठीराखे एकमेकांशी एका नात्याने बांधले जातात कारण समोर घडणारा खेळाचा सामना आणि आपल्या आवडत्या संघाला पाठींबा देण्याची भावना या दोन्ही गोष्टी त्यांच्या सामायिक अनुभवात मोडतात.
दोन प्रकारचे मोलेक्युलर बॉंड्स असतात असं केमिस्ट्रीमध्ये शिकल्याचं आठवतंय. आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉंड्स. पहिल्या प्रकारात एक अणू दुसऱ्या अणूला आपला इलेक्ट्रॉन देतो. आणि त्या दोघांमध्ये बंध तयार होतो. तो आयोनिक बॉंड. पण दुसरा प्रकार जास्त रंजक. इथे दोन अणू एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. आणि या सामायिक इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून जो बंध तयार होतो तो कोव्हॅलंट बॉंड. पहिला प्रकार सुटसुटीत. अगदी कोरड्या व्यवहारासारखा. वस्तू घ्या, पैसे द्या, विषय संपला. पण दुसऱ्यात नुसता व्यवहार नाही. त्यामुळे या प्रकारात या बॉंड्सच्या साखळ्या तयार होतात. अधिकाधिक क्लिष्ट रचना यात तयार होऊ शकते. एकाची अनेकांशी नाती आणि नात्यांची साखळी. आपल्या समाजासारखंच की सगळं!
हे विस्ताराने मांडण्याचा उद्देश असा की या असंख्य नात्यांच्या मांदियाळीत एका नात्याला आपण जगभर अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि ते म्हणजे नवरा-बायको. अनेकदा मी माझ्याशी बोलणाऱ्या मुला-मुलींना अगदी मूलभूत प्रश्न विचारतो की त्यांना लग्न करण्याची इच्छा का आहे? त्यावर अनेकांकडून ‘शेअरिंग’ करायला जोडीदार असं एक उत्तर मिळतं. आपण हे म्हणतो, तेव्हा आपला आजचा दिवस कसा गेला एवढंच जोडीदाराला सांगणं म्हणजे शेअरिंग असं आपल्याला अपेक्षित असतं का? नक्कीच नाही. रिपोर्टिंग आणि शेअरिंगमध्ये फरक आहे ना. आपण एका व्यक्तीबरोबर हे जे लग्नाचं नातं निर्माण करू इच्छितो तेव्हा साधं दैनंदिन जगणंसुद्धा त्या व्यक्तीबरोबर सामायिक अनुभवाच्या कक्षेत कसं आणता येईल हे बघतो. नवरा बायको फिरायला जातात, जेवायला जातात बाहेर, एकत्र नाटक सिनेमा बघतात, एकत्र स्वयंपाक करतात, प्रदर्शनं बघतात, शॉपिंग करतात, वेगवेगळ्या समारंभांना जातात, काहीतरी एकत्र शिकतात, एकत्र पाळीव प्राणी पाळतात, एकत्र घर सजवतात, एकत्र नवीन पिढीला जन्म देतात, एकत्र नवीन पिढीला वाढवतात आणि या सगळ्यातून ते सातत्याने नवनवीन असे सामायिक अनुभव तयार करत असतात. सामायिक अनुभव सगळे चांगलेच असतात असं काही नाही. वाईटही असू शकतात. पण त्या सगळ्यांची गोळाबेरीज करत त्यांचं नातं कसं आहे ते ठरेल. इतरांप्रमाणेच आपल्या स्वतःबरोबरच्या नात्यालाही हे सामायिक अनुभवाचं तत्त्व लागू होईल. आपण एकटे असताना काय काय केलं, वाचलं, बघितलं, अनुभवलं यातून आपलं एक स्वतःशीही नातं तयार होत जातं.
लग्न करत असताना, जोडीदार निवडत असताना, म्हणजेच एक नवं नातं निर्माण करायला जात असताना वरवरच्या निव्वळ भौतिक गरजांशी निगडीत अपेक्षांच्या पलीकडे आपल्याला जायला हवं. आपल्याला कोणत्या व्यक्तीबरोबर, कोणत्या कुटुंबाबरोबर शेअर्ड एक्स्पीरियंन्स घ्यायला आवडणार आहे, आपल्या अनुभवांमध्ये कोणाला सामावून घ्यायला आवडणार आहे ही गोष्ट विचारांत घेणं महत्त्वाचंय. ही पहिली पायरी आहे. पुढेही अनेक पायऱ्या आहेत, पण त्याविषयी आता पुढच्या लेखांमध्ये. 
(दि.२० जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)