माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे म्हणतात...
एवढे वैविध्य आणि विलक्षण कल्पकतेने निर्मिलेले हे सण उत्सव माणसाच्या जीवनात अढळ स्थानी आहेत. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाला विरोध करणारे कम्युनिस्ट लोकही त्यांचे त्यांचे दिवस साजरे करतातच. "क्रांती दिवस, मुक्ती दिवस" अशा नावांनी... एकूणच काय...तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी मानवाच्या जीवनातून सण उत्सव वगळणे शक्य होणार नाही.
जगातील सर्व देशांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जातींमध्ये, शहरांमध्ये, जंगलांमध्ये, खेड्यांमध्ये साजरा केला जातो असा एकमेव उत्सव म्हणजे "वाढदिवस".....!!!!
गेल्या काही वर्षात भोगवादी संस्कृती का काय म्हणतात त्याचा प्रभाव पडून सर्व काही साजरे करायची प्रथा पडली आहे असा काही लोक दावा करतात. त्यांचे म्हणणे काहीही असो, वाढदिवस साजरा करायची प्रथा या भोगवादी वगैरे संस्कृतीमुळे निर्माण झालेली नाही....त्याचे स्वरूप बदलले असेल...नव्हे बदलले आहेच...पण वाढदिवस साजराच केला जात नव्हता असे म्हणणे अडाणीपणाचे लक्षण ठरेल.... वाढदिवशी आईने ओवाळणे पूर्वीही होते...आत्ताही आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते पूर्वीही होते आताही आहेत. वाढदिवस युरोपात आहे तसा अमेरिकेतही आहे...आणि आशियातही आहे.. तालिबान्यांच्या मध्यपूर्वेतही आहे...
खरे तर वाढदिवस साजरा करावे असे या दिवसात काहीच नसते. समजा मी २० वर्षांचा झालो तर यात आनंद व्यक्त करावे असे काय आहे? कधी कधी विचार करता मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करण्यामागे माणसाची मूळची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असावी. सगळ्याच प्राण्यांमध्ये असणारी "Survival" ची प्रवृत्ती. आपण जगामध्ये इतकी वर्षे टिकून आहोत, टिकून राहिलो आहोत याचा आनंद म्हणजे वाढदिवस.....!!!!! टिकून राहण्याच्या या आनंदाला आयुष्याच्या उत्तरार्धात ग्रहण लागायला सुरुवात होते. जसजशी पन्नाशी ओलांडली जाते.. हळू हळू आपल्या आयुष्यातले दिवस कमी होत असल्याची भावना वाढते. आणि पुढे पुढे तर वाढदिवस ही एक काहीशी नकोशी बाब होऊन जाते. सुरुवातीला वाटणारे "टिकून राहिलो" हे सुख समाधान संपत जाते. आणि पाचवा सत्ता संपादनाचा वाढदिवस साजरा करतानाच पंतप्रधानाला जशी खुर्ची सोडावी लागते तसेच काहीसे आयुष्याच्या उत्तरार्धात होत जाते.
"मी टिकून राहिलो" या प्रवृत्तीतून निर्माण झालेला वाढदिवस हा "वैयक्तिक उत्सव" असतो... त्यामध्ये समाजाच्या कोणत्याही घटकाचा संबंध नसतो. त्या व्यक्तीच्या आनंदात सामील होणे हा भाग वेगळा. ते आपण करतोच...नव्हे केलेच पाहिजे... त्यामुळे लोकांचा संबंध नसणे तरीही त्यांचा सहभागी असणे असे काहीसे वाढदिवस या "व्यक्ती उत्सवाबाबत" घडते.

भारतात प्राण्यांचेही उत्सव साजरे केले जातात. बैल पोळा, वसुबारस, नागपंचमी हे त्यातलेच काही... प्रत्येकाला महत्व मिळावं, जगातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी किंमत असावी, मान असावा अशा विलक्षण समानतेच्या आणि परस्पर आदराच्या भावनेतून असे सण निर्माण झाले असावेत असं मला वाटतं. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणे हा "प्रत्येक व्यक्तीला महत्व" द्यायचा दिवस या एका विलक्षण लोकशाही केंद्रित विचारसरणीचा अप्रतिम नमुना...
महिन्याला ५०० रुपये मिळवणाऱ्या माणसाचा वाढदिवसही "एक दिवस" असतो...आणि ५ कोटी मिळवणाऱ्याचाही वाढदिवस "एकंच दिवस" साजरा केला जातो.
केवढी मोठी समानता जगातल्या सगळ्या भागात आहे....!!! माणसामध्ये समानता आणि परस्परांना आदर आणि महत्व द्यायची वृत्ती मुळातच असली पाहिजे. त्याशिवाय वाढदिवस हा वैयक्तिक उत्सव इतके हजारो वर्ष टिकला नसता...
वाढदिवशी रस्त्यातून चालताना सगळ्यांच्या नजर आपल्याकडे आहेत...आपण अतिशय महत्वाची व्यक्ती आहोत अशा थाटात आपण जात असतो... ते तसे वाटणे किती सुखावह असते... उत्सवमूर्ती बनणे, celebrity बनणे हे सगळ्यांनाच कुठे शक्य असते. पण वाढदिवशी "celebrity" म्हणून मिरवण्याचा मान प्रत्येकाला दरवर्षी मिळतो...!!!
आणि म्हणूनच जगभर साजरा केला जाणारा वाढदिवस हा "व्यक्तीकेंद्रित उत्सव" मला अतिशय प्रिय आहे....!!!!!!