Tuesday, July 29, 2014

पेशंट

प्रसंग एक- सिग्नल सुटायला साधारण ८-९ सेकंद बाकी असल्याचे दिसत होते... तेवढ्यात मागून
हॉर्न वाजायला सुरुवात झाली. तो वेळ खरे तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी होता. पण कोणत्याही बाजूने वाहने येणे बंद झाले आहे म्हणल्यावर ८-९ सेकंद लवकरच जाता येईल या आशेवर हॉर्न वाजायला सुरुवात झाली होती. शेवटचा सेकंद संपून हिरवा दिवा लागताच मागून वाजणाऱ्या हॉर्न्सची संख्या आणि आवाज एकदम तिप्पट चौपट झाला. आता हिरवा दिवा लागल्यावर त्या दिव्याचे प्रकाश किरण प्रकाशाच्या वेगाने म्हणजे ३ लाख किमी प्रती सेकंद या वेगाने लोकांच्या डोळ्यापर्यंत पोहचले. तेवढ्या वेळात लगेच आपल्या पुढची गाडी हलेल अशी अपेक्षा करणे हा मोठाच विनोद...

प्रसंग दोन- अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत सत्ता मिळाल्यावर, किंवा नरेंद्र मोदी यांना केंद्रात सत्ता मिळाल्यावर त्यांच्याकडे जादूची कांडी असल्याच्या अविर्भावात अपेक्षा ठेवल्या गेल्या, ठेवल्या जात आहेत. आज दिवसभर काय केलेत? पाच दिवस झाले तरी अजून एवढंही झालं नाही? ४० दिवसात तुम्हाला भ्रष्टाचार संपवता आला नाही? पन्नास दिवसात तुम्हाला पाकिस्तानला वठणीवर आणता आलं नाही? श्या... तुम्ही तर अमुक करणार, तमुक करणार अशी आश्वासनं तेवढी दिलीत. पण नुसती बोलाचीच कढी अन बोलाचाच भात असा प्रकार दिसतोय... तुमच्यात काहीच अर्थ नाही. आमची निराशा झाली आहे.

प्रसंग तीन- पेट्रोल पंप. रांगेमध्ये साधारण सहा सात जण आपापल्या दुचाक्यांसह उभे आहेत. नुकतेच पेट्रोल भरलेल्या माणसाने रोख रक्कम देण्या ऐवजी क्रेडीट कार्ड दिले आहे. साहजिकच, पेट्रोल भरणारा कर्मचारी सुमारे पंधरा फुटांवर असलेल्या क्रेडीट कार्ड मशीन जिथे ठेवले आहे त्या जागी गेला आहे. त्या मशीनमध्ये कार्ड फिरवून, पिन नंबर भरून, मशीन मधून पावती काढून त्यावर गिऱ्हाईकाची सही घेतो आहे. या सगळ्या प्रक्रियेत रांगेतल्या सहा सात जणांची अमूल्य अशी ७० सेकंद वाया गेली आहेत. रांगेतला शेवटचा एक जण मोठ्याने ओरडतो- “ओSSS.. आटपा की लवकर. आम्हाला कामं नाहीत का. एकतर कार्ड वगैरे साठी वेगळा माणूस ठेवा आणि ते झेपणार नसेल तर बंद करा कार्ड.” अशा पद्धतीने एक आवाज उठल्यावर रांगेतले उर्वरित लोकही माना डोलवून किंवा काहीतरी बोलून त्याला साथ देत आहेत. रांगेतून शेवटून दुसरा दुचाकीस्वार ‘इथे फार वेळ लागतो आहे’ असं म्हणून गाडी वळवून निघूनही गेला...

प्रसंग चार- “अरे ते हाईक डाऊनलोड कर. वॉटसऐप पेक्षा जास्त वेगवान आहे.”, परवा एक मित्र म्हणाला. माझ्या माहिती नुसार तर वॉटसऐप वर पाठवलेला संदेश अगदीच ताबडतोब पोहचतो. आता त्याहून अधिक वेगवान म्हणजे नेमकं काय? एसएमएस पेक्षा वेगवान वॉटसऐप आणि त्याहून वेगवान हाईक? तोच माझा मित्र वारंवार मोबाईल उघडून बघत होता. त्याने हाईक वर तब्बल दीड मिनिटांपूर्वी पाठवलेल्या एका संदेशाला त्याचा मित्र (किंवा मैत्रीण!) उत्तर देत नव्हता आणि ‘हाईक’च्या खासियतनुसार संदेश नुसते पोहचल्याची खूण नव्हती, तर तो संदेश त्याने / तिने वाचल्याचीही खूण होती. दीड मिनिटे लागतात उत्तर द्यायला? मित्र बिचारा अस्वस्थ झाला.

प्रसंग पाच- माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची फेसबुकची टाईमलाईन-
“पुण्यात बॉम्बस्फोट”
तीन मिनिटांनी- “स्फोट घडवणारे इंडियन मुजाहिदीन चे अतिरेकी असावेत. पुण्याचे पोलिस काय झोपले होते का? मोदी सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. सर्व मित्र मंडळींना आवाहन, घरातच थांबा. साखळी स्फोट देखील होऊ शकतात.”
त्यानंतर पाच मिनिटांनी- “बॉंब नसून हा सिलिंडरचा स्फोट असावा असे ऐकतो आहे...”
लगेच दोन मिनिटांनी- “बॉंबची निव्वळ अफवाच होती. संशयित बैगची बॉंब शोधक आणि नाशक पथकाने तपासणी केल्यावर त्यात केवळ कपडे असल्याचे निष्पन्न झाले आहे ”
हे महाशय मोबाईल वरून सातत्याने जगाला ‘अपडेट’ करत होते....

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. हे सगळे बघता मला असं लक्षात यायला लागलं आहे की आपली धीर धरण्याची क्षमता दिवसेंदिवस लयाला जात चालली आहे. सगळ्याच गोष्टींचा वेग इतका वाढला आहे की विचार करायला वेळच नाही. कसलं टिपिकल आजोबा स्टाईल बोलतो आहे ना मी... पण काय करणार, साला आजकाल दर दोन वर्षांनी पिढी बदलते असं वाटतं. माझ्या बारावी पर्यंत आमच्या कॉलेजच्या ग्रुप मध्ये केवळ एकाच व्यक्तीकडे मोबाईल होता. अशा आठवणी सांगणारा मी म्हणजे मागच्या पिढीचाच झालो... असो. तर सांगायचा मुद्दा हा की, आपल्यातली, एकूणच समाजातली धीर नावाची गोष्ट संपून गेली आहे की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. आपला पेशन्स संपल्याने पेशंट झालो आहोत आपण.  

घाई घाई घाई... सगळ्याची घाई. आणि आपल्याला अपेक्षित वेळेत गोष्टी घडल्या नाहीत की प्रचंड अस्वस्थता, कधीकधी नैराश्य, वैताग... आता अपेक्षाच चुकीच्या म्हणल्यावर अपेक्षाभंग होणारच. हिरवा दिवा लागल्या लागल्या सिग्नलला उभी समोरची गाडी गायब व्हायला पाहिजे. रस्ता मोकळा असला पाहिजे ही अपेक्षा फारच बालिश. ती पूर्ण नाही झाली की आपण वैतागतो, आणि आपला सगळा वैताग गाडीच्या त्या बिचाऱ्या हॉर्नवर काढतो. मग तो हॉर्न जोरात कोकलतो. तो आवाज ऐकून पुढचा माणूस सुद्धा वैतागतो. तो राजकारण्यांना शिव्या घालतो आणि म्हणतो, ‘पंधरा दिवस झाले नवीन सरकार निवडून...अजून ट्राफिक काही कमी झालेला नाही...” तो तसाच पुढे जातो आणि पेट्रोल पंपावर त्याला दिसते ही भली मोठी रांग. त्यात कोणीतरी क्रेडीट कार्डावर पेट्रोल भरतो. तो मनातल्या मनात त्याची आई-माई काढून पेट्रोल भरून वैतागलेल्या मनस्थितीत ठरलेल्या ठिकाणी पोहचतो. आपल्याला भेटायला येणारी आपली मैत्रीण अद्याप पोहचलेली नसते. तो मोबाईल काढतो, त्यावर तिचे ‘last seen’ तपासतो. दोन मिनिटांपूर्वीपर्यंत ही ऑनलाईन होती म्हणजे ही कदाचित अजून घरून निघालीच नसावी. मग लगेच तो संदेश पाठवतो की ‘मी सीसीडी मध्ये पोचलो आहे.’ त्यावर तो संदेश तिने वाचल्याची खूण उमटते. पण उत्तर काही येत नाही. नवीन वैताग. आधीचा हा सगळा वैताग डोक्यात साठून राहिलेला आहे. तो सहज बसल्या जागी मोबाईलमध्ये फेसबुक उघडतो... कुठेतरी बॉम्बस्फोट वगैरे दिसतं... मग लगेच इकडून तिकडून माहिती वाचत, कसलीही शहानिशा न करता तो फेसबुकवर धडाक्याने पोस्ट्स टाकायला सुरुवात करतो. सगळा वैताग त्या पोस्ट्स मधून जगासमोर मांडतो आणि खरेतर फेसबुक जगतात पसरवतो. ते सगळं वाचून वैतागलेलो आपण कुठल्यातरी सिग्नलला उभे असतो, ८-९ सेकंद उरले असतानाही समोरची गाडी हलत नाहीये हे पाहून आपण जोरजोरात हॉर्न देऊ लागतो.... आणि एक चक्र पूर्ण होते! अशी कितीतरी चक्र... वैतागाची, नैराश्याची, संतापाची, हतबलतेची... 

Thursday, June 5, 2014

आशेचा सूर आणि आता आपली जबाबदारी

नरेंद्र मोदी आणि भाजप यांचे त्यांच्या तुफानी विजयाबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे. कोणी
काही म्हणो, २७२ पेक्षा जास्त जागा एकाच पक्षाने जिंकणे ही गोष्ट सोपी नाही. भाजपने निवडणूक जिंकल्यापासून सर्वत्र एक उत्साहाची लहर तयार झाली आहे. आता काहीतरी बदलेल, देश सुधारेल हा आशावाद निर्माण झाला आहे. निकालानंतरचे दोन तीन दिवस अगदी सामान्य नागरिक हॉटेल मध्ये भेटल्यावर, ऑफिसेस मध्ये भेटणाऱ्याच्या, अनोळखी असला तरी, हातावर पेढा ठेवत होते. आनंद व्यक्त करत होते. असे दृश्य मी बघितलेल्या कोणत्याही निवडणुकीत मला दिसलेले नाही. सामान्य नागरिक मोदींच्या विजयाच्या निमित्ताने तयार झालेल्या आशेच्या जोरावर राजकारणात, राजकीय घडामोडींमध्ये रस घेत आहेत या गोष्टीचे दिलखुलासपणे स्वागतच केले पाहिजे. 
हे सगळे मी म्हणत असताना प्रथमच नमूद करतो की मी आम आदमी पक्षाचा सदस्य आहे आणि संपूर्ण निवडणूकभर येडीयुरप्पा-बाबू बोखारीया यांना संरक्षण देणाऱ्या मोदी यांचे भ्रष्टाचार संपवण्याचे दावे खोटे आहेत असा मी प्रचार केला आहे. माझ्या त्या मतांपासून आजही मी तसूभरसुद्धा ढळलेलो नाही. त्याबाबत माझी स्वतंत्रपणे विचार करून तयार झालेली कारणमीमांसा आहे आणि मोदी यांचा विजय झाल्याने ती बदलण्याची शक्यता नाही. पण तरीही मी या नवनिर्मित आशावादाचे मनापासून स्वागत का करतो आहे?

माझ्या मते अगदी २-३ वर्षांपूर्वीपर्यंत आपला देश हा अभूतपूर्व अशा निराशावादाचे घर बनला होता, ‘इस देश का कुछ नहीं हो सकता’ ही भावना सर्वदूर पसरली होती, भ्रष्टाचार-असुरक्षा-गरिबी याच गोष्टी केवळ आपल्या नशिबात आहेत असं देशबांधवांना मनापासून वाटू लागलं होतं. या भावनेला तडा गेला तो दिल्लीमध्ये अण्णा आणि केजरीवाल यांनी जे जनलोकपाल आंदोलन उभारले त्यावेळी. पण त्यावेळी वेगाने निर्माण झालेल्या आशावादाचे रुपांतर तितक्याच वेगाने निराशेत झाले जेव्हा अण्णा आणि केजरीवाल यांनी स्वतंत्र रस्ते पकडले. केजरीवाल राजकारणात गेल्यावर कित्येकांची राजकारणाविषयीची घृणा उफाळून आली आणि राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन निराशावादीच राहिला. यामध्ये पुन्हा बदल घडून आला जेव्हा दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. ४९ दिवसांचे आम आदमी पक्षाचे सरकार लंबकासारखे आशा-निराशेच्या टोकांना जाऊन येत राहिले. आणि ४९ दिवसांनी केजरीवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा घोर निराशा पसरली. प्रचंड निराशावादी वातावरणात आशेचा किरण दिसणे आणि त्या मार्गावर पुन्हा निराशाच पदरी पडणे यामुळे लोक अधिकच निराशेच्या गर्तेत गेले नसल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्या परीने केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी-कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आशावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ही वस्तुस्थिती आहे. पण ते घडले नाही. लोक राजकारणाविषयी निराशच होते. ही परिस्थिती फार धोकादायक. अशावेळी समर्थ आणि उज्वल भारताची स्वप्न साडेचारशे पेक्षा जास्त सभांमधून देशभर मांडणारे नरेंद्र मोदी हे आशेचा नवा किरण झाले नसते तरच नवल. आणि केजरीवालच्या नाही, तरी या आशावादाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला ही गोष्ट मोठीच आश्वस्त करणारी आहे. निवडून आल्यावर संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये केलेल्या मोदी यांच्या भाषणात भारताच्या नवनिर्माणाचा नारा आहे, देशाच्या अंतिम व्यक्तीला सोबत घेऊन विकासाच्या दिशेने जाण्याचा संकल्प दिसतो आहे, त्याचबरोबर १२५ कोटी नागरिकांना किमान एक पाउल पुढे येण्याचे आवाहनही आहे. अशा शब्दांसोबत ‘संसदेच्या पायऱ्या चढण्यापूर्वी नमस्कार करणे’ यासारख्या प्रतीकात्मक गोष्टींचाही जनतेवर परिणाम होत असतो, आशावाद निर्माण होत असतो हे नाकारण्याचा प्रकार मी करणार नाही.

असो. तर सांगायचा मुद्दा हा की देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान हे आमच्यापेक्षा वेगळ्या पक्षाचे असले तरी आता ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. आणि त्यांनी निर्माण केलेल्या आशावादाचे मी व्यक्तीशः स्वागत करतो. सत्तेचे विकेंद्रीकरण, स्थानिक पातळीवर सहभागी लोकशाही, शासनात पारदर्शकता, भ्रष्टाचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, पर्यावरणपूरक आणि समाजातील अंतिम नागरिकापर्यंत पोहचणारा शाश्वत विकास, सामाजिक सुरक्षा, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि उपासना स्वातंत्र्य या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे जतन या गोष्टी मोदी यांच्या भाजप सरकारने केल्या तर मोदींना विरोध करायचे आम आदमी पक्षालाही काहीच कारण उरणार नाही. पण हे घडेपर्यंत विरोधकच नव्हे तर भाजप समर्थकांनीही अतिशय सजग राहावे अशी माझे आवाहन असेल. किंबहुना केवळ सजग राहणे नव्हे तर या सगळ्या गोष्टी घडून याव्यात यासाठी सरकारवर, सरकारी पक्षावर दबाव तयार करावा लागेल, प्रसंगी लढावेही लागेल.
सत्ताधारी नसणाऱ्या पक्षांसाठी ‘विरोधी पक्ष’ हा शब्द मला खरे तर मुळीच आवडत नाही. यातून एक नकारात्मक भाव जातो. सरकार जे करणार त्याला विरोध तेवढा करायचा असा गैरसमज गेली अनेक वर्ष आपल्या देशात झाला आहे कदाचित. पण आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या पक्षांनी आत्तापर्यंत घडत आले त्या पद्धतीला फाटा देत ‘विरोधासाठी विरोध न करता, मुद्द्यांच्या आधारे विरोध अथवा सहकार्याची भूमिका’ घेतली पाहिजे. मला अशी खात्री आहे की आम आदमी पक्षाचे ४ लोकसभा सदस्य याबाबत कमी पडणार नाहीत.

“सर्वांसाठी सूचना, सोमवार पासून कामाला लागा, मोदी देश चालवणार आहेत, तुमचे घर नाही!” असा एक विनोदी एसएमएस गेले काही दिवस फिरतो आहे. त्याच्याच पुढे जाऊन मला सांगायला आवडेल की मित्रहो मोदी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. पण आपल्या राज्याची, आपल्या शहराची आणि अगदी आपल्या मोहल्ल्याची जबाबदारी आपल्यालाच उचलायला हवी. खरोखरच जो आशावाद आहे तसेच मोदी यांनी कितीही जरी चांगले काम केले तरी ते एकटे कुठे कुठे पुरे पडणार? याची त्यांनाही जाणीव आहे असे त्यांच्या भाषणातून तरी दिसले. म्हणूनच त्यांनी १२५ कोटी लोकांना एक पाउल पुढे येण्याचे आवाहन केले. २०११ मध्ये जेव्हा जनलोकपालसाठी आंदोलन चालू होते त्यावेळी मी एक लेख लिहिला होता, ज्यात मी म्हणले होते की जनलोकपाल येईल न येईल माहित नाही पण जरी ते आले तरी एक ‘जनलोकपाल नामक सुपरहिरो येऊन आपले सारे प्रश्न सोडवेल’ अशी भावना लोकांमध्ये असेल तर ते घातक आहे.तेच माझे मत आजही आहे. तुम्ही आम्ही स्थानिक पातळीवर राजकीय दृष्ट्या जोवर सजग होत नाही, इथे होणाऱ्या सर्वपक्षीय भ्रष्टाचाराला नेस्तनाबूत करण्यासाठी खंबीरपणे, एकजुटीने कार्यरत होत नाही तोवर स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार होतच राहणार. ‘वर’ मोदी आले की खालचे देखील सुधारतील हा आशावाद नसून भाबडेपणा आहे. वरती काहीही होवो, इथे सुधारणा होण्यासाठी इथले लोकप्रतिनिधीही प्रामाणिक आणि धडाडीचे हवेत. तुमचा नगरसेवक, तुमचा आमदार हे त्याला नेमून दिलेले काम करत नसेल तर, कोणत्याही पक्षाचा असो, त्याला आपण जाब विचारायला हवा. आणि तरीही कर्तव्य न बजावणाऱ्याला मतदानाचा अधिकार वापरून हाकलून लावले पाहिजे. ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यातही मोदी हे उत्तम आणि योग्य निर्णय केंद्र पातळीवर घेतील असा ज्या पाठीराख्यांचा दृढ विश्वास आहे त्यांनी तर या कामी विशेष लक्ष घालायला हवे. कारण नाहीतर केंद्र पातळीवरील निर्णयांचा फायदा लोकांपर्यंत न पोहचण्याचीच शक्यता अधिक. असे होऊ देणे आणि मोदींना तोंडघशी पाडणे या पाठीराख्यांना शोभेल काय? माझ्या मते, मुळीच नाही! किंबहुना मोदीच नव्हे तर कोणत्याच नेत्याच्या नशिबी पाठीराख्यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे तोंडघशी पडण्याची वेळ येऊ नये. तेव्हा भाजप-मोदी समर्थक नागरिकांची निवडणुकीत मत देऊन झाल्यावर जबाबदारी संपली नसून उलट वाढली आहे. आपल्या सर्वांवर, हा आत्ताचा आशेचा सूर जाऊन निराशावाद पसरणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. आणि आपण ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडू अशी मला आशा आहे.

Wednesday, May 28, 2014

माझे सावरकर

इतिहासातल्या ज्या काही थोड्या लोकांमुळे मी कमालीचा प्रभावित झालो त्यातले एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याच यादीत महात्मा गांधींचेही नाव मी घेतो यामुळे अनेक जण चकित होतात. टोकाचे गांधीवादी मला येऊन म्हणतात, “तुला सावरकर नीट समजले आहेत का? आणि समजले असूनही तू जर सावरकरांना मानत असशील तर तुला सावरकरच काय पण गांधीदेखील नीट समजले नाहीत.” टोकाचे सावरकरप्रेमी मला येऊन म्हणतात, “तू सावरकरांनी गांधींबद्दल जे लिहिले आहे ते तू वाचूनही हे हे म्हणत असशील तर तुला सावरकर समजलेच नाहीत. आणि साहजिकच आहे, तुला गांधीही समजले नाहीत.”
मला या सगळ्या संभाषणाची गंमत वाटते. पूर्वीच्या सिनेमात खानदान की दुश्मनी वगैरे असायची तसे सावरकर-गांधीजी यांचे त्या काळात मतभेद होते या मुद्द्यावर आजही त्यांचे तथाकथित अनुयायी तावातावाने भांडताना बघून मला हसूच येतं. आपल्यातले बहुतेक सगळे जण कुठल्या तरी कंपू मध्ये शिरायला इतके अधीर का असतात? आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला? म्हणजे हा मार्क्सवादी. समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो? म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो? म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो? म्हणजे हा संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलांचे कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो? म्हणजे हा मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”; अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे? म्हणजे हा आस्तिक” असे लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही!) गंमतीदार आहे सगळं.

असो. तर मुख्य मुद्दा असा की ज्यांच्यामुळे मी विलक्षण प्रभावित झालो, नेहमी होतो, अशा
महान व्यक्तींच्या यादीत मी सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतो. सावरकरांची आज जयंती. जिकडे तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक चालू असेल, पुतळ्यांना हार घातले जातील, व्याख्याने दिली जातील तसबिरींना हार घातले जातील, कुठे सोयीस्करपणे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला जाण्याआधीच्या त्यांच्या कर्तृत्वावर तेवढा प्रकाश टाकला जाईल, तर कुठे सोयीस्करपणे ‘हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहेत’ या त्यांच्या सिद्धांताला धरून चर्चा रंगेल. या सगळ्या गदारोळात माझे सावरकर नेमके कोणते? मला भावलेले सावरकर कोणते? हा विचार मी करू लागलो आणि असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या.
चाफेकर बंधू फाशी गेले ती बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या विनायकने “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी ‘मारता मारता मरेतो झुंजेन’ ही शपथ घेतली. हा प्रसंग कल्पनेतही डोळ्यासमोर उभा केला तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा, नाशिकजवळच्या भगूर गावात गल्लीबोळात हूडपणे फिरणारा, डोक्याने विलक्षण तल्लख असणारा विनायक दामोदर सावरकर हा पोरगा. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हे विलक्षण शब्द त्याला कसे स्फुरले असतील? हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य प्रयत्न! इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे याकडे इतर देशांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बॉम्ब विषयक पत्रके भारतात पाठवणे, मग पिस्तुले पाठवणे... अटक झाल्यावर बोटीवरून समुद्रात स्वतःला झोकून देणारे आणि पुन्हा अटक फ्रेंच भूमीवर केल्यामुळे अभय मिळावे अशी मागणी करणारे वीर सावरकर. अंदमानात कोलूचे यातनाकांड स्वीकारणारे, कितीही कष्ट झाले तरी स्वातंत्र्यासाठी आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःला दूर नेणारे स्वातंत्र्यवीर. आपल्या प्रगल्भतेच्या जोरावर स्फुरणाऱ्या कवितांच्या आधारे आणि मातृभूमीच्या उद्धाराचे एकमेव स्वप्न बघत अंदमानातील भीषण कारावास सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.
सहभोजनाच्या माध्यमातून अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणारे आणि समाजसुधारणेच्या दृष्टीने एक प्रतिक म्हणून ‘पतितपावन’ मंदिराची उभारणी करणारे सुधारक सावरकर. नैतिकतेचा मुख्य पाया धर्मग्रंथ नसून बुद्धी हा आहे आणि नैतिकता ही मनुष्याने मनुष्यासाठी निर्माण केलेली गोष्ट असल्याने ती परिवर्तनीय आहे असे मानणारे सावरकर मला बेहद्द आवडतात. “परराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी ही सर्व साधने अपरिहार्यच असतात, पण या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच तत्काळ टाकून देण्याचा सल्ला देणारे सावरकर. ‘स्वतंत्र देशात सरकारच्या चुका या आपण जनतेनेच निवडून दिलेल्या सरकारने केल्या असल्याने जबाबदारी आपल्यावरही येते आणि आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये’ असा अस्सल लोकशाहीवादी सल्ला देणारे स्वातंत्र्यवीर. ‘जोपर्यंत आपली मते कोणी बळाच्या जोरावर सक्तीने दुसऱ्यावर लादीत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा विचार व भाषण स्वातंत्र्याचा अनिर्बंध हक्क इतरांनी मान्य केला पाहिजे’ असे १९३८ सालातच ‘मराठा’ मध्ये लेख लिहून संभाषण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर मला मनापासून प्रभावित करतात. राष्ट्राभिमानाविषयी बोलत असतानाच, ‘स्वदेशाच्या राक्षसी हावेला बळी पडून अन्य देशाच्या न्याय्य अस्तित्वावर व अधिकारावर अतिक्रमण करतो राष्ट्राभिमान अधर्म्य आणि दंडनीय आहे’ असे ठणकावून स्पष्ट करणारे सावरकर मला कोणत्याही साम्राज्यवादविरोधी व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी भासत नाहीत. भाषा हा कोणत्याही संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा असा भाग. आणि म्हणून मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले अपूर्व प्रयत्न. एकेका इंग्रजी शब्दाला काय सुंदर मराठी पर्यायी शब्द दिले त्यांनी. दूरदर्शन, दूरध्वनी, महानगरपालिका, मुख्याध्यापक, औषधालय, युद्धनौका, पाणबुडी... असे कितीतरी! आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा ! या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे! मराठी भाषेला अशा कित्येक शब्दांची देणगी सावरकरांनी दिली. बंदीतून मुक्तता झाल्यानंतर पाचव्या दिवशी तिरंग्याचे ध्वजारोहण सावरकरांच्या हस्ते केले गेले, त्यावेळी बोलताना, “हा राष्ट्रीय ध्वज आहे; तो हिंदूध्वजापेक्षा मोठा आहे आणि त्या ध्वजाखाली उभा राहून जातीय वा धार्मिक भावना ठेवील तो पापी होय” असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर मला बुद्धिवादी सेक्युलर वाटतात. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याविषयी बोलताना अजमेर इथल्या भाषणात सावरकर म्हणतात, “आमचे पार्लमेंट अशा स्वरूपाचे तयार होईल की त्या पार्लमेंटच्या आत पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही.” भारतीय संविधान तयार झाल्यावर “भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो” अशी तार घटना समितीच्या अध्यक्षांना तार करणारे सावरकर. ‘गायीला देवता मानणे’ हा गाढवपणा आहे अशा भाषेत धर्मश्रद्धेची चिकित्सा करणारे बुद्धीप्रामाण्यवादी सावरकर पुढे जाऊन म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत, त्या भाकड वृत्तीचा आहे.”

तुम्हाला भावणारे, आवडणारे, भिडणारे सावरकर कदाचित वेगळे असतील. पण या आणि अशा असंख्य उदाहरणांमधून प्रतीत होणारे प्रखर बुद्धिवादी, ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर मला माझे वाटतात. आजच्या सावरकर जयंतीच्या दिवशी, माझ्या सावरकरांनी लिखाण आणि वागणुकीतून जो लोकशाहीचा, बुद्धिवादाचा, स्वतंत्र पद्धतीने प्रत्येकाने विचार करण्याचा आणि विज्ञाननिष्ठेचा जो संदेश दिला आहे तो आपल्या समाजाच्या मनात ठसावा एवढीच सदिच्छा !

Monday, April 14, 2014

मित्रहो,

जेव्हापासून मी आम आदमी पक्षात आलोय, तेव्हापासून आणि विशेषतः गेले काही दिवस मी अनेकांशी चर्चा केली, वाद घातले. या दरम्यान विरोधकांचे अनेक मुद्देही मला पटले. पण तरीही, आम आदमी पक्षाकडून झालेल्या काही चुका मान्य करूनही, मी आम आदमी पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, यामागे माझी नेमकी भूमिका काय आहे ते मांडण्याचा हा प्रयत्न. आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, मुद्दे सोडून आणि व्यक्तिगत पातळीवरची चर्चा यावर होऊ नये अशी इच्छा आहे. खुलेपणाने, मन मोकळे करून विचारमंथन व्हावे. इथे कमेंट्स मध्ये झाले नाही तरी चालेल पण स्वतःच्या मनात चिंतन नक्की व्हावे अशी इच्छा आहे. 

नेमके आम्ही काय करू पाहतो आहोत
'सत्ता मिळवणे' एवढाच मर्यादित उद्देश ठेवून राजकारणात येण्याचा आम आदमी पक्षाचा विचार नाही. आम्ही राजकारण बदलू पाहतो आहोत. राजकारणाची पारंपारिक पद्धती बदलू पाहत आहोत. नरेंद्र मोदी असो नाहीतर राहुल गांधी नाहीतर राज ठाकरे; या सगळ्यांचं राजकारण हे पारंपारिक पद्धतीचं आहे, सत्ता मिळवण्यासाठी पैसा आणि मग सत्तेतून अजून जास्त पैसा या दुष्टचक्रात अडकलेलं. हे तोडण्याचा, याला पर्याय देण्याचा प्रयत्न म्हणजे आम आदमी पक्ष. म्हणून आम आदमी पक्षाकडे पैसे देऊन आणलेले लोक दिसणार नाहीत, दिसतील ते फक्त विचारांमुळे एकत्र आलेले कार्यकर्ते. प्रत्येक पै पै कोठून आला आहे हे जाहीर करण्याची धडाडीही हा पक्ष दाखवतो आहे. इतर कोणताही पक्ष हे करत नाही. उलट त्यांच्याकडील निधीपैकी ७५% निधी कोठून आला हे त्यांनी जाहीर केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. 

मी या पक्षाकडे एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून बघतो. प्रयोगच आहे हा. आणि हा प्रयोग आज तरी यशस्वी होणे गरजेचे आहे. 'आजची प्रस्थापितांची राजकारणाची ही पद्धत का बरे पडली असेल' असा मी विचार करतो तेव्हा मला वाटतं, की केवळ याच मार्गाने विजय मिळतो हा प्रस्थापित राजकारण्यांच्या मनात असणारा विश्वासच यामागे आहे. पण जर यावेळच्या निवडणुकीत असं दिसलं की, पारंपारिक भ्रष्ट राजकारण हे नव्या स्वच्छ राजकारणासमोर फिकं पडत आहे तर प्रस्थापितांमध्येही चलबिचल होईल आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि यामुळे एकूणच राजकारणात सुधारणा व्हायला सुरुवात होईल. पण जर पुन्हा प्रस्थापितच विजयी झाले तर मात्र याचा अर्थ असा होईल की बाकी काहीही असो, विजयी होण्यासाठी तुम्हाला पैसा आणि गुंडांची ताकद लागतेच. म्हणजे एका अर्थी तत्वांपेक्षा पैसा आणि गुंडांची प्रतिष्ठा समाजात वाढेल. 
आणि यातूनच 'इस देश का कुछ नहीं हो सकता' म्हणणाऱ्या निराशावाद्यांची लाट येईल. 

आपल्याला नेमके काय हवे आहे

सगळ्या चांगल्या गोष्टी आम आदमी पक्षच केवळ घडवून आणेल असा अहंभाव माझा आणि पक्षनेतृत्वाचाही नाही. पण आम आदमी पक्ष केवळ रिंगणात असल्याने होणाऱ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज काही लोक तरी स्वच्छ राजकारण करत निवडणूक लढवून संसदेत जाणं गरजेचं आहे. तिथे जाऊन त्यांनी आत प्रभावी दबाव गट म्हणून काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज तरी आम आदमी पक्षाला निवडून देऊन या पद्धतीच्या राजकारणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि खरं तर विचार करणाऱ्या सुशिक्षित सुसंस्कृत समाजाने तर अधिकच जिद्दीने उभं राहिलं पाहिजे असं माझं स्वप्न आहे.  

वारंवार हा प्रश्न येतो की आज तरी आपल्या देशाला अस्थिर सरकार परवडणारे नाही. माझं म्हणणं आहे की, तसं बघितलं तर अस्थिर सरकार केव्हाही वाईटच असतं, आज काय आणि ५ वर्षांनी काय! पण खरं सांगायचं तर अस्थिरतेला घाबरून आता चालणार नाही. गेली १५ वर्षे तर स्थिर सरकार आहेच आपल्या देशात. पण याच काळात आपली पत अधिकाधिक ढासळली आहे. राजकारणाची पातळी नको इतकी घसरली आहे. पैशाचा आणि दारूचा महापूर कसा वाहतो निवडणुकांत हे पाहतो आहोत आपण. या सगळ्या परिस्थितीत बदल हवा तर काही काळ अस्थिरता येणार हे गृहीत धरलं पाहिजे. या सगळ्या प्रस्थापितांना अस्थिर केल्याशिवाय हे जागे तरी कसे होतील? आणि इतकं होऊनही ते जागे नाही झाले तर पुढच्या निवडणुकांत आम आदमी पक्षाच्या जागा वाढतील आणि आम्हीच स्थिर सरकार देऊ. 
आज आम आदमी पक्षामुळे अस्थिरता आल्यास हीच परिवर्तनाची नांदी असेल. 

जसं हिंसा चांगली का वाईट या प्रश्नाचं उत्तर काळ-वेळ-परिस्थिती आणि उद्देश पाहून ठरतं तसंच यावेळच्या निवडणुकीच्या बाबतीत अस्थिरतेचं आहे. यावेळची अस्थिरता ही दूरचा विचार करता चांगली असेल... किंबहुना मी तर म्हणेन आज अस्थिरता अत्यावश्यकच आहे. 
गंमतीचा भाग असा की सध्या मी गलिच्छ वस्त्यांपासून प्रचंड मोठ्या सोसायट्यांपर्यंत सगळीकडे फिरतो आहे प्रचारासाठी. पण अस्थिरतेचा मुद्दा मध्यमवर्गाने उपस्थित केला तितका कोणीही केला नाही. मला वाटतं, मध्यमवर्गात असणारी स्वाभाविक 'स्थितीप्रियता' आता कुठेतरी मोडावी लागेल. आहे ते बरं चाललं आहे, थोडीफार डागडुजी करून चालवून नेऊ असा विचार करून चालणार नाही. निदान मला तरी थोड्याफार डागडुजीने काम होईल असं वाटत नाही. माझ्या मते आता सगळा राजकारणाचा गाडा गदागदा हलवून योग्य मार्गाला लावायला हवाय. खालून वरून घुसळण करायला हवीये. कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला हवंय. अगदी सर्वंकष मंथन. आता मंथन म्हणल्यावर यामधून सुरुवातीला अस्थिरतेचं वगैरे विष बाहेर येईल. पण शेवटी अमृतच बाहेर येणार हे नक्की... 
मागे एक मस्त ओळ वाचली होती- comfort zone is a beautiful place, but nothing ever grows there. 

आणि हो, उद्या आम आदमी पक्षाचे लोकही आजच्या प्रस्थापित पक्षांसारखे नालायक निघाले तर त्यांनासुद्धा हाकलून लावण्याची जिद्द आपल्या सारख्या सुशिक्षित आणि देश व समाजाविषयी सजग असणाऱ्यांनी बाळगली पाहिजे असे मी मानतो. पण बदल हवा असेल तर आजतरी जे आम आदमी पक्षाच्या निमित्ताने जे होत आहे त्याला सक्रीय पाठिंबा दिलाच पाहिजे आणि म्हणूनच आम आदमी पक्षाच्या 'झाडू'लाच मत देणे आवश्यक आहे याबद्दल मी निःशंक आहे.

Tuesday, March 25, 2014

मला हसायला आवडतं... तुम्हाला?

कधी कधी चिंता मला वाटते
हसणे फार दुर्मिळ झाले.
कारण काय? मला वाटते,
नीट ‘बघणे’ फार दुर्मिळ झाले.

आजुबाजू बघता, न हसावे असे काय आहे?
विसंगतींनी भरले जग, रडावे असे काय आहे?

पुराणे एक सत्य सांगतो,
दृष्टी तशी सृष्टी.
मनातले मळभ दूर सारले की,
हवी तितकी हास्यवृष्टी !

‘मळभ’ सरले की वृष्टी??
ही पहा, आणखी एक विसंगती.
अरेच्चा कोणीच हसलेही नाही..
कधी कधी चिंता मला वाटते,
हसणे फार दुर्मिळ झाले
आता वाटते, बघणेच काय,
नीट ‘वाचणेही’ फार दुर्मिळ झाले.

पोलीसदलाचा प्रमुख एक गुंड,
कायदेमंडळाचा प्रमुख एक पुंड,
डबक्याला म्हणावे पवित्र कुंड,
जनता म्हणावे, असली जरी झुंड.
इतक्या हास्यास्पद गोष्टी असोनही
हसणे आम्ही विसरलो.
हसणाऱ्यांना मारून-झोडून-चोप देऊन चक्क,
जगणे आम्ही विसरलो.

चित्रातून हसवले म्हणून मारले
शब्दातून हसवले त्याला कापून काढले.
हसवण्या बंदी घालणारे फतवे कोणी काढले,
दुर्दैव, फतवे ते बिनबोभाट आपण पाळले.

खरा प्रश्न सांगू काय आहे?
स्वतःच स्वतःवर हसणे बंद झाले,
मग दुसऱ्याने आपल्यावर हसणे सुद्धा
आम्ही धाक दाखवून बंद पाडले.

पुन्हा एक पुराणे सत्य सांगतो,
जे गांधीबाबा बोले ते सांगतो,
सुरुवात स्वतःपासून करणे आहे.
दुसऱ्याच्या आधी स्वतःवर हसणे आहे.

स्वतःवर खळखळून हसूया.
व्यंगावर हसूया
अडाणीपणावर हसूया
भाबडेपणावर हसूया
वेडपटपणावरही हसूया
तुम्ही हसलात तर जग हसेल,
आधी तुमच्यावर आणि मग स्वतःवरही!

प्रश्न नि चिंता सर्वांनाच आहेत हो...
पण त्यात रडण्याचा भार का घ्यावा?
त्यापेक्षा भरपूर हसा!
हलकं वाटेल नक्की, विश्वास ठेवा.

मला तर हसायला आवडतं... तुम्हाला?