Showing posts with label books. Show all posts
Showing posts with label books. Show all posts

Thursday, April 23, 2026

आठव्या घरातलं प्यादं

‘घराणेशाही’ हा शब्द ऐकल्यावर सामान्यतः राजकारणातली घराणेशाही डोळ्यासमोर येते. फार तर उद्योग
जगतातल्या घराणेशाहीची उदाहरणं सांगितली जातात. पण लेखकांची घराणेशाही हा प्रकार तसा विरळाच. माझ्या खापर पणजोबांनी प्रल्हाद कानिटकर यांनी पुस्तक लिहिलं होतं असं ऐकून आहे. माझे पणजोबा राजाराम प्रल्हाद उर्फ रा.प्र. कानिटकर यांची कित्येक पुस्तकं आजही विकली जातात. प्रसिद्ध संपादक, कथाकार आणि कादंबरीकार माधव कानिटकर म्हणजे माझे आजोबा. तर माझे आई-बाबा म्हणजे महेंद्र आणि डॉ गौरी कानिटकर यांनीही अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अशा प्रकारे लेखनाचा समृद्ध वारसा मला घरातूनच मिळाला. माझं वाचन भरपूर आणि चौफेर असावं, मी लेखन करावं यासाठी आई-बाबा, आजोबा यांनी बढावा दिला. 

कॉलेजमध्ये असतानाच आम्ही मित्रांनी एकत्र येत शासनव्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने परिवर्तन संस्था सुरू केली. परिवर्तनचे एकेक प्रकल्प सुरू झाले, अनेक आंदोलने केली, चळवळीत सहभागी झालो; त्याबरोबर राजकीय नेत्यांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क येत गेला. अनेकांना मध्यमवर्गीयांना वाटतो तसा राजकारणाविषयी तिटकारा मला कधीच नव्हता. आणि आता तर उलट राजकीय दुनियेविषयी विलक्षण आस्था आणि कुतूहल तयार होत गेलं, वाढत गेलं. परिवर्तनच्या कामामुळे बहुतांश सामाजिक-राजकीय विषय हे क्लिष्ट असतात याची जाणीव झाली. राजकारणाकडे एकरेषीय पद्धतीने बघून चालणार नाही हेही लक्षात आलं. सामाजिक-राजकीय प्रश्नांना अनेक गुंतागुंतीचे कंगोरे असतात, आणि ही क्लिष्टता मला बेहद्द आकर्षक वाटली. चित्रपट, वेबसिरीज, कादंबऱ्या यात बहुतांशवेळा राज्य किंवा देश पातळीवरच्या राजकारणाचं चित्रण केलं जातं. किंवा स्थानिक पातळीवर कोणी लिखाण केलं तरी ते ग्रामीण भागातलं असतं. जागतिकीकरणाच्या तीन दशकांत शहरांचा आकार आणि तोंडावळा बदलला आहे. आता शहरं विकासाची दिशा ठरवतात. पुढच्या दशकात भारतातली बहुसंख्य लोकसंख्या शहरी भागातच राहणार आहे. हजारो कोटी रुपयांचे अर्थसंकल्प या एकेका शहराचे आहेत. अशावेळी शहराचं राजकारण सुटसुटीत, सोपं आणि सरळ असेल हे शक्यच नाही. शहरांच्या राजकारणाच्या या क्लिष्टतेचा वेध घेणारं लेखन करावं असं माझ्या मनाने घेतलं. एका बाजूला माझा लेखनाचा समृद्ध वारसा आणि दुसऱ्या बाजूला माझ्या सामाजिक-राजकीय कामाचा अनुभव. ‘आठवं घर’ ही माझी कादंबरी दोन्हीचा मिलाफ आहे. 

एखादं कथानक डोक्यात येणं आणि त्या कथानकाची कलाकृती तयार होणं हा प्रवास मोठा रंजक असतो. कलाकृती कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार लागणारा वेळ, त्यात गुंतणाऱ्या माणसांची संख्या अशा गोष्टी बदलत जातात. उदाहरणार्थ कथा लिहायला कदाचित तुलनेने कमी वेळ लागेल आणि खुद्द लेखक फक्त गुंतलेला असणार. पण कथानकाचं रूपांतर एखाद्या चित्रपटात करायचं असेल तर त्यात शेकडोच काय हजारो हात लागतात! कथानकाचं रूपांतर कथा, चित्रपट, नाटक, कादंबरी अशा कोणत्या कलाकृतीमध्ये करायचं हा निर्णय कथानकाची क्षमता, लेखकाची आवड आणि कौशल्य, इतरांना त्यात आर्थिक गुंतवणूक करावी वाटण्याइतकं ते आकर्षक वाटणं अशा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. ‘आठवं घर’ ही कादंबरी मी लिहायला घेतली तोपर्यंत मी केवळ कथा लिहिल्या होत्या. त्यामुळे आपल्या ठरलेल्या,  वहिवाटेवरूनच जावं असा विचार स्वाभाविकपणे माझ्या मनात होता. पण लिहायला सुरुवात केल्या केल्याच मला जाणवलं की राजकारणातल्या क्लिष्टतेबद्दल लिहायचं असेल तर ‘विषयांचं सुलभीकरण करून, सोप्या प्रश्नांवर सोपे उपाय आणि प्रश्न सुटला!’ या जाळ्यात अडकून चालणार नाही. आणि राजकारणाची गुंतागुंत मांडायची तर कथेच्याच काय पण दीर्घकथेच्या परिघातही ते बसणारं नाही. त्यामुळे अखेर ‘कादंबरी’ लिहायचं मी ठरवलं. 

कथानक राजकीय असल्याने दोन-तीन आव्हानं माझ्यासमोर होती. सगळ्यात पहिलं म्हणजे कथानक घडतं ते शहर. कोणत्या शहराचं राजकारण मला सांगायचं आहे? आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाच आहे. परदेशात एखाद्या राजकारण्याला, इतिहासातली एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला तुमच्या कथेचं/चित्रपटाचं पात्र खुलेआम शिव्या घालू शकतं. खऱ्या राजकीय पक्षांची नावं घेता येतात. भारतात यातलं काहीही करणाऱ्याला अनेक वकिलांची फौज तर तैनात ठेवावी लागेलच पण सोबत मारहाण, तोडफोड, जाळपोळ यालाही सामोरं जावं लागेल. एवीतेवी मी सांगणार ती कथा काल्पनिकच आहे, तर संपूर्ण शहरच का काल्पनिक असू नये हा विचार माझ्या मनात आला. आणि त्यातून सर्जेपूर हे काल्पनिक शहर उभं राहिलं! मग शहराचा इतिहास आला, भूगोल आला, तिथे वस्त्या आल्या, शहराचा म्हणून स्वतःचा एक स्वभावही आला. त्यापाठोपाठ राजकीय पक्ष आले- तेही काल्पनिक नावं घेऊन. एवढं सगळं काल्पनिक असलं तरी मला राजकारण अस्सल लिहायचं होतं, त्यामुळे सर्जेपूरची ही काल्पनिक दुनिया आपल्या खऱ्या दुनियेचाच भाग आहे. २०१० ते २०१५ या पाच वर्षांत सर्जेपूर शहरात काय काय घडतंय याची ही कहाणी आहे. आणि याच कालखंडात देश आणि जगभर झालेल्या उलथापालथीचा परिणाम सर्जेपूरच्या काल्पनिक दुनियेवर दिसून येतो. दुसरं आव्हान होतं ते कादंबरीच्या आकाराचं. सर्व विषयांचा संबंध राजकारणाशी येतो आणि सर्व विषयात राजकारण घुसतं. एकच व्यक्ती सर्व काही करते ही गोष्ट सिनेमात बघायची सवय असली तरी प्रत्यक्षात प्रत्येक टप्प्यावर आणि पातळ्यांवर असंख्य माणसं गुंतलेली असतात. आणि ते चित्रण अस्सल ठेवायचं तर तेवढी पात्रं कादंबरीमध्ये येणं आवश्यकच. पात्रं आली की प्रसंगही आले, आणि त्याबरोबर कादंबरीचा आकारही वाढत गेला. ६०० पानांची कादंबरी, विषय राजकीय, त्यात लेखक नवीन; कोण वाचणार? अशी शंका माझ्या मनात येऊन गेली हे मान्य करायला हवं. पण सुदैवाने कादंबरीच्या प्रकाशिकेला- देशमुख आणि कंपनीच्या मुक्ता गोडबोलेला ही शंका आली नाही, आणि आली असली तरी तिने हे धाडस करायचं ठरवलं हे विशेष!

आजच्या ध्रुवीकरणाच्या जगात आपण एकमेकांवर शिक्के मारायला आतुर झालो आहोत. ‘हा डावा, हा उजवा’, ‘हा अमुक हा तमुक’. पण माणसं केवळ ‘नायक-खलनायक’ किंवा ‘काळे-पांढरे’ या दोन गटांत मोडत नाहीत. कोणतीही व्यक्ती कायमस्वरूपी आणि सर्वकाळ नायक वा खलनायक असते यावर माझा विश्वास नाही. त्यात राजकारणात गुंतलेल्या व्यक्तींना ज्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गोष्टी हाताळाव्या लागतात त्यानंतर त्यांचं रूप काळं किंवा पांढरं राहूच शकत नाही. या दोन्हीच्या मधल्या राखाडी छटांमध्येच राजकीय व्यक्ती सापडत राहतात. बुद्धीबळाच्या पटावरच्या सोंगट्या काळ्या-पांढऱ्या असल्या तरी राजकारणातलं प्यादं एकेक पाउल टाकत आठव्या घरात जाऊन वजीर बनतं तेव्हा त्याचा मूळ रंग जाऊन ते राखाडी बनलेलं असतं. ‘आठवं घर’ ही सर्जेपूरची कहाणी अशाच बुद्धिबळाच्या पटाची आहे. 

आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझ्या पुस्तकाची ही कहाणी सविनय सादर!

(दि. १८ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध.) 

पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा !



Friday, April 24, 2020

दख्खनचं ‘गेम ऑफ थ्रोन्स’ : रिबेल सुलतान्स

एचबीओ ची ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही टीव्ही सिरीज जगातल्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिरीज पैकी एक आहे. ‘वेस्टरॉस नावाच्या एका खंडप्राय भागावर राज्य करण्यासाठी, तिथलं सिंहासन हस्तगत करण्यासाठी झगडणारे वेगवेगळे सरदार, राजे, सैनिक. प्रेमकथा, कट कारस्थानं आणि इतर अनेक कथानकं-उपकथानकं’ अशी ही एक काल्पनिक सिरीज. या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा काल्पनिक थरार सामान्य वाटावा असा थरार याच देशात दख्खनच्या भूमीत पाचशे वर्षं घडत होता. भारताचा इतिहास सर्वार्थाने बदलला तो या भूमीने. इथल्या या इतिहासाने. हाच अत्यंत रोमहर्षक इतिहास सांगणारं पुस्तक म्हणजे मनू एस पिल्ले या लेखकाने लिहिलेलं ‘रिबेल सुलतान्स’.

‘द डेक्कन फ्रॉम खिलजी टू शिवाजी’ असं या पुस्तकाचं उपशिर्षक या अडीचशे पानी पुस्तकात साधारण काय असेल याची कल्पना देतं. इसवी सन १२०६ (दिल्लीत सुलतानशाहीची स्थापना) ते १७०७ (औरंगजेबाचा मृत्यू) या पाचशे वर्षात दख्खनच्या प्रदेशातले राजे-सुलतान यांची ही कहाणी आहे. मी सातवीत असताना या कालखंडाचा इतिहास अभ्यासात होता. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बारीदशाही आणि विदर्भातली इमादशाही अशी सगळी नावं पाठ केली होती. ‘बहामनी सुलतानशाही नष्ट होऊन त्या जागी या सुलतानशाह्या आल्या. दक्षिणेत विजयनगरचं साम्राज्य होतं. आणि मग पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं’ असं ढोबळपणे शिकलो होतो. पण दख्खनचा इतिहास याहून बराच रंगीत आहे असं लेखक सुरुवातीलाच सांगतो. आणि हळूहळू एकेका सुलतानाच्या दरबाराची, त्यांच्या राजधान्यांची सफर घडवून आणतो.

शाळेत शिकवलेल्या इतिहासापलीकडे फार काही माहित नसणाऱ्या किंवा अगदी थोडेफार तपशील माहित असणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक भुरळ पाडेल. मनू पिल्ले याची भाषा ओघवती आहे. नकाशे, पूर्ण घराण्यांची आकृती काढून वंशावळ दाखवणे आणि सुरुवातीलाच या पाचशे वर्षांच्या इतिहासातल्या ठळक घटना एका ‘टाईमलाईनवर’ मांडणे यामुळे वाचताना मदत होते. शिवाय माहितीचा अतिरिक्त मारा करून वाचणाऱ्याला गोंधळात टाकणं त्याने टाळलं आहे. मोजक्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगत मूळ कथा पुढे सरकते आणि वाचकाला गुंतवत नेते. या सुलतानांचं आपापसांतलं वर्तन कसं होतं, स्थानिक राजकारण कसं होतं याची माहिती मिळत जाते. जवळपास प्रत्येकवेळी गादीसाठी झालेली कत्तल हा या सुलतानांच्या इतिहासातला एक सामायिक भाग. मुलाने वडिलांना मारणे, वडिलांनी मुलाला मारणे, भावाभावांमध्ये कत्तल, गादीवर बसायला मदत करणाऱ्या मंत्र्याला मारणे, कसलाही धोका नसला तरी भविष्यात कटकट नको म्हणून अनेकांचा काटा काढणे या सगळ्यातून या सुलतानशाह्या पुढे सरकतात. या कत्तलीच्या इतिहासातून विजयनगरचं समृद्ध आणि ताकदवान साम्राज्यही अपवाद नाही.

इराणशी नाळ जोडणारे पर्शियन, तुर्की मूळ सांगणारे आणि दख्खनी म्हणवले जाणारे- म्हणजे मूळचे इथले पण धर्मांतर झालेले असे तीन मुसलमान गटाचे सत्ताधारी, विजयनगरचे हिंदू राजे या कथेत मुख्य धारेत आहेत. पण हळूहळू मूळ कोणतंही असलं तरी या सुलतानशाह्या कशा इथल्या मातीत रुजत गेल्या याची कहाणी उलगडत जाते. त्यांचं आपापसातलं राजकारण त्यानुसारच आकार घेतं. मराठे, कानडी आणि तेलुगु यांचं योगदानही अधोरेखित होतं. मूळचे इथिओपियामधून गुलाम म्हणून आणवले गेलेले आफ्रिकन लोक कसे सत्तेच्या पायऱ्या चढत गेले असे अनेक घटक या इतिहासात आहेत. या सगळ्याला पोर्तुगीजांची फोडणीही आहे. ‘विजयनगरच्या हिंदू राजाविरुद्ध पाच मुसलमान सुलतान एकत्र आले आणि त्यांनी विजयनगरचे राज्य संपवले’ हे इतिहासाचं सुटसुटीकरण आहे आणि प्रत्यक्षात इतिहास याहून खूपच क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे हे लेखक सप्रमाण सिद्ध करतो. ‘रायावाकाकामू’ नामक दक्षिण भारतीय ग्रंथात गंमतीदार नोंद सापडते. त्यात दख्खनमधले मुसलमान सुलतान म्हणजे शत्रू आहेत. पण त्यांचा शत्रू-मुघल बादशहा हा ‘शत्रूचा शत्रू तो मित्र’ या नात्याने चांगला मानला आहे. त्यामुळे मांडणी धार्मिक दिसली तरी त्याचा गाभा राजकारणाचा आहे. या ग्रंथातच अजून पुढे जात तिरुपतीच्या विष्णूने विजयनगरचा राया, पुरीच्या जगन्नाथाने ओरिसाचा गजपती राजा आणि काशीच्या विश्वनाथाने दिल्लीच्या मुघल बादशहाला नेमलं आहे अशीही मखलाशी आहे. एकुणात, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, लोभ या गोष्टी दख्खनच्या साठमारीत धर्मापेक्षाही कितीतरी जास्त प्रभावी होत्या हे लेखक मनू पिल्ले सावकाशपणे उलगडत नेतो. याबरोबर राजकीय घडामोडींसोबतच लेखक आपल्याला त्यावेळच्या समाजाचीही झलक देतो. पर्शियन आणि दख्खनी यांच्यातून विस्तवही न जाणं, सुन्नी-सुफी-शिया यांच्यात संघर्ष होणं, स्थानिक भाषांना मिळणारं प्राधान्य बघून पर्शियन मूळचे अधिकारी दुखावले जाणं अशा सामाजिक कलहांची मांडणी होते. अर्थात, लेखकही हे मान्य करतो की सगळं वर्णन केवळ दरबारी संदर्भाने आले आहे. त्यावेळच्या संपूर्ण समाजाची ही मांडणी नाही.

विजापूर, गुलबर्गा, गोवळकोंडा, विजयनगर ही दख्खनवरची मुख्य शहरं आपापल्या सत्ताधाऱ्यांच्या सुवर्णकाळात कशी बहरली, इथे आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी काय लिहून ठेवलंय यातून या शहरांची कल्पना येते. अधिकृत ऐतिहासिक दस्तऐवजांतून मिळालेले या सुलतानांच्या उत्पन्नाचे आकडे वाचले की अवाक व्हायला होतं. मी हे वाचत असताना सहजच ‘गुगल’ करून बघितलं की त्या काळात युरोपीय सत्तांची आर्थिक स्थिती काय होती. दख्खनच्या सुलतानांचे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे असं जे म्हणतात त्याची कल्पना येते. पण आपापसातल्या मध्ययुगीन लढाया आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे ही शहरं बघता बघता धुळीला कशी मिळाली याची कहाणी आपल्यासमोर उलगडते.

पर्शियन मूळ असणारा सुलतान दरबारात अस्खलित मराठीत संवाद साधणं पसंत करतो; अनेक विषयांत गती असणारा एखादा सुलतान स्वतःच एक ग्रंथ लिहितो; एक आदिल शहा सुलतान सरस्वती देवीच्या भक्तीत एवढा रमतो की तो स्वतःला विद्येच्या देवता सरस्वती आणि गणपती यांचा मुलगा मानतो. त्याची ही भक्ती बघून इतर सरदारांच्या मनात शंका येते की हा हिंदू तर झाला नाही ना; इथिओपियन गुलाम मलिक अंबर मुघल आक्रमणाविरोधात दख्खनचा रक्षणकर्ता बनतो; त्या आधी चांद बीबी मुघलांच्या विरोधातला लढा उभारते; सिंहासनाच्या खेळात पराभूत झालेल्या आणि परांगदा होऊन गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाने राहणाऱ्या मीर अलीची एका ख्रिश्चन माणसाच्या प्रेमात पडणारी आणि पळून जाऊन ख्रिश्चन होत लग्न करणारी मुलगी;  अशा वेगवेगळ्या पात्रांनी हा इतिहास कमालीचा रोमांचक केला आहे. अर्थातच त्यामुळे पुस्तक वाचताना खाली ठेववत नाही.

यात दिसणारं राजकारण आणि या सत्तांचं वैभव या सगळ्याचा स्थानिक सामान्य माणसाशी संबंध नव्हता हे जाणवतं. सामान्य माणूस पिचलेलाच होता. दुष्काळ आणि युद्ध अशा अक्षरशः अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला होता. नर्मदेच्या खालचा भूप्रदेश संधी मिळताच दिल्लीच्या अंमलाखालून वेगळा करण्याचा दख्खनी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, स्थानिक भाषा आणि संस्कृतीला त्यांनी दिलेलं महत्त्व या दोन्हीतून एक प्रादेशिकतेची अस्मितेची जाणीव या दख्खनच्या सुलतानांच्या मध्ययुगीन इतिहासाने निर्माण केली. पण त्यातून स्वार्थी आणि लुबाडणारे सुलतान आणि त्यांचे इथलेच सरदार जहांगीरदार तयार झाले. अशावेळी रयतेच्या भल्याचा विचार करणारे आणि तो विचार अंमलातही आणणारे छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या राजे-सुलतानांत वेगळे आणि उठून दिसतात. आणि म्हणूनच त्यांनी उभं केलेलं मराठा राज्य मुघल साम्राज्यालाही खाली खेचण्यात सिंहाचा वाटा उचलतं. पाच सुलतानांनी एकत्र येत विजयनगरचं साम्राज्य संपवलं. नंतर आपापसांत लढणाऱ्या सुलतानांना औरंगजेबाने एकेक करत संपवलं. आणि पुढे मराठे औरंगजेबालाही पुरून उरले. त्याबरोबरच दख्खनच्या इतिहासावरचं हे पुस्तक संपतं.

मुळातला रोमांचक इतिहास आणि तो मांडण्याची मनू पिल्ले याची ओघवती भाषाशैली यामुळे हे पुस्तक ‘वाचलेच पाहिजे असे काही असं आहे, हे निश्चित.

रिबेल सुलतान्स : द डेक्कन फ्रॉम खिलजी टू शिवाजी
लेखक - मनू एस पिल्ले
प्रकाशक - जगरनॉट बुक्स.
किंमत – रू. ५९९/-