Wednesday, February 20, 2013

शहाण्यांचा देश


साडेसहा दशकांची बघून ही दुरवस्था, मनी माझ्या संताप साठला,
षंढ थंड आपण, हृदयांत आपल्या का नाही अजून वडवानल पेटला?

निष्क्रीय जनता पाहून सत्तानगरीत हर्ष अपार दाटतो,
एकच नाही, हरेक रंगाचा झेंडा डौलाने फडकू लागतो.
कोणी म्हणे तिरंग्यात चरखा हेच भविष्य देशाचे,
कोणी म्हणे भगवा हेच जीवन या पवित्र भूमीचे,

तिसरे लाल विळे कोयते, तर निळे चक्र एकाचे.


कोठे अतिवृष्टी तर, कोठे दुष्काळी वैराण मुलूख सारा
थेंबासाठी तडफडे जीव कोठे, कोठे रस्त्यांवर वाहे धारा
वाहून जाती कोणी कधी तूफानात,
भटके शहरोशहरी कोणी भीषण दुष्काळात.
निसर्ग वारंवार असा सत्ताधाऱ्यां फळफळला,
दशदिशांनी पैशाचा पाऊस धो धो कोसळला. 

संपवण्या येथील अधर्म, धरतीवर कोणी अजून नाही अवतरला
इथले निष्क्रीय लोक पाहून तो केव्हाच आल्या पावली परत गेला.
बदल हवा तर तो आपणच घडवायचा, हे नाही जोवर समजायचे,
बडबड अन् चर्चा केली कितीही, परिवर्तन नाही तोवर व्हावयाचे.

भ्रष्ट सिस्टीमशी लढणाऱ्याला कोणी म्हणे हा ठार पागल आहे.
भोगणाऱ्याला कोणी म्हणे बिचारा, भ्रष्ट सिस्टीमचा बळी आहे.
पागल व्हावे की बळी जावे, निवड शेवटी तुमचीच असणार.
दुर्दैव हे, आज तरी बळी जायलाच सगळे लोक आहेत तयार.

आनंदात मश्गुल आपण की, आजचा दिवस जगता आला,
कोणी सांगावे, जर उद्या स्वार्थासाठी कोणी आपला बळी दिला.
थोडेफार भाग्य असेल तर होणार बातमी ती एका दिवसाची,
जास्त असेल भाग्य जरा, तर त्यात भर काही हजार मेणबत्त्यांची.
पुढे सगळे शांत होणार,
बळी जायला लोक रांगा तेवढ्या लावणार.

पोरगी सहज उचलून नेली, बंदूक दाखवत तिजोरी लुटून नेली,
पागल तुम्ही कधी होणार?

गांडीखाली बॉम्ब फुटला, विकून देश पुरता बरबाद केला,
पागल तुम्ही कधी होणार?
साडेसहा दशके चालू तमाशा, शहाणे होऊन बघितलात,
मला सांगा आता,
पागल तुम्ही कधी होणार?


Sunday, February 17, 2013

हे आमचे गुरुच नव्हेत !


रदेशी कपड्यांवर बहिष्काराची मोहीम सुरु झाली तेव्हा त्याला अधिक धार प्राप्त करून देण्यासाठी देशातली पहिली परदेशी कापडाची होळी पेटली ती पुण्यामध्ये मुठेच्या काठावर. या होळीचे नेतृत्व केले होते फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी तरुणाने. अशा या भडक माथ्याच्या देशप्रेमी युवकाच्या कृतीकडे अभिमानाने बघण्याऐवजी फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी, रेन्ग्लर र.पु.परांजपे यांनी, या स्वातंत्र्यवीराला होस्टेल मधून काढून टाकले आणि दंडही ठोठावला. देशप्रेमाची दीक्षा देण्याच्या उद्देशाने आपण सुरु केलेल्या फर्ग्युसन कॉलेजाच्या प्राचार्यांची ही कृती बघून लोकमान्य टिळक संतापले आणि त्यांनी केसरी मध्ये अग्रलेख लिहिला- ‘हे आमचे गुरुच नव्हेत !’.

आजची परिस्थिती काही फार वेगळी आहे असे मानायचे कारण नाही. गोऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याला आपल्या कॉलेजात बंदी घालणारे महाभाग जसे स्वातंत्र्यपूर्व काळात होते तसेच आता स्वातंत्र्य असतनाही सरकारच्या विरोधात उठणारे आवाज कॉलेजात मात्र आज दाबले जातात. परिवर्तन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कोणत्याही कॉलेजात जातो, तिथे विद्यार्थ्यांशी बोलू इच्छितो, त्यांना राजकीय परिवर्तनाच्या कार्यात खेचू इच्छितो तेव्हा आमच्या या कार्याच्या आड येतात ते तिथले प्राध्यापक आणि प्राचार्य. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेत, नाही असे नाही. पण ते अत्यल्प आहेत. बहुतांश प्राध्यापक आणि प्राचार्य हे ‘आमच्या कॉलेजात राजकारणाची ब्याद नको’ अशा मनोवृत्तीचे आहेत. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाची गोडी निर्माण व्हायला हवी, राजकीय बाबींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसायला हवा. तरुणांनी राजकारणात यायला हवे असे सगळेच म्हणतात. पण विद्यार्थ्यांना राजकीय परिवर्तनाच्या कार्यात सहभागी करून घ्यायला आमच्यासारख्या संस्थांनी जावे तर आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणारे हेच लोक असतात. राजकीय विषयांवर चर्चा घेण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टींवरही हे लोक बंदी घालतात तेव्हा यांच्या अकलेची तारीफ करावी वाटते. देश उभारणीच्या गप्पा मारणारे हे लोक तरुणांना राजकारणापासून दूर नेणारे आणि पर्यायाने देशाला अराजकाकडे नेणारे कृत्य करत असतात तेव्हा यांना ‘गुरु’ कोणत्या तोंडाने म्हणावे?

आम्हाला काम करताना जाणवते, विद्यार्थ्यांची सगळ्या विषयांवर काही विशिष्ट मते आहेत, व्यवस्थेबद्दल राग आहे, परिवर्तन व्हावे अशी इच्छा आहे पण त्यांना व्यासपीठ नाही. पालक आणि गुरुजन हे दोघेही आपापल्या पद्धतीने तरुणांच्या राजकीय जाणिवांची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न करत असताना तरुणांनी जावे कोठे? मग कुठे कुठे हे लोक फ्लैशमॉब किंवा मेणबत्ती मोर्चा काढून व्यक्त होत आहेत. पण त्यांच्या या व्यक्त होण्याने जेव्हा परिवर्तन घडत नाहीये तेव्हा त्यातले बहुतांश हे ‘कुछ नहीं हो सकता’ म्हणत भंपक, उदासीन आणि निष्क्रीय नागरिक बनत आहेत तर काहीजण नुसतेच उद्विग्न होत आहेत, अस्वस्थ होत आहेत.
देशातील बहुतांश जनता आज तरुण वर्गात मोडते. याच वर्गाची होणारी राजकीय मुस्कटदाबी बंद केली पाहिजे. त्यांच्या राजकीय जाणीवांना फुलवले पाहिजे, त्यांना योग्य दिशेने नेले पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आणि तरुणांची शक्ती जेव्हा आपल्या कोशातून बाहेर येते तेव्हा प्रस्थापितांची बोबडी वळते असा जगाचा इतिहास आम्हाला सांगतो. पण इतिहास हा स्मारकं, पुतळे आणि भाषणं या पलीकडे कधी न्यायचाच नाही असे आमच्या प्राध्यापकांमध्ये आणि प्रचार्यांमध्ये पाळले जाते. आणि ते तरी काय करणार म्हणा. ते स्वतःच निष्क्रीय भंपक वर्गात मोडणाऱ्या नागरिकांपैकी असतात किंवा जे तसे नसतात ते त्यांच्या त्यांच्या शिक्षण मंडळांचे विश्वस्त वगैरे असणाऱ्या ‘शिक्षणसम्राटांचे’ मिंधे असतात. या दोन्ही गटात न मोडणारे लोक जर कोणी असतील तर राजकीय प्रक्रीयांशी इतके फटकून कसे वागतात हे माझ्या कल्पनेच्या पलिकडचे आहे. कदाचित ते निव्वळ भेकड असतात. अशा आमच्या निष्क्रीय किंवा भेकड किंवा पैशाचे मिंधे झालेल्या प्राध्यापक आणि प्राचार्यांकडून काय अपेक्षा करणार आणि काय बोलणार. त्यांच्या विद्वत्तेविषयी शंका नाही. अनेक प्राध्यापक आणि प्राचार्य आपापल्या विषयांत तज्ञ आहेत. काहीजण कदाचित इतके विद्वान असतील ज्यांच्या तोडीची दुसरी व्यक्ती त्या विषयांत, संपूर्ण देशातही मिळणार नाही. पण तरीही... असे असले तरीसुद्धा... आमचे ‘गुरु’ म्हणवून घ्यायला लायक आहेत असे मानता येत नाही.

आम्ही एका अशा महाविद्यालयीन व्यवस्थेची अपेक्षा करतो आहोत जिथे नुसते नोकऱ्या कशा कमवायच्या याचे शिक्षण न मिळता, एक सुदृढ आणि प्रगल्भ नागरिक कसे बनावे याचे शिक्षण मिळेल. आणि लोकशाहीतला प्रगल्भ नागरिक हा राजकीय प्रक्रीयांशी परिचित असतो, देशांतील घडामोडींशी जोडलेला असतो, प्रसंगी राजकीय प्रक्रियांमध्ये सहभागीही होतो. लोकशाहीमध्ये राजकारणाशी फटकून राहण्याचा बिनडोकपणा शिकवणारी महाविद्यालयीन व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे शिलेदार बनलेल्या प्राचार्य आणि प्राध्यापकांना आम्ही नाकारतो आणि लोकमान्यांचेच शब्द वापरून आम्ही ठणकावून सांगतो की ‘हे आमचे गुरुच नव्हेत !’