Thursday, January 19, 2012

स्वातंत्र्य की समानता?

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य आणि समता असे दोन मंत्र दिले. आणि आधुनिक इतिहासात बहुतांश देशातले अर्थकारण-राजकारण हे याच दोन मुद्द्यांभोवती फिरत राहिले. इंग्लंड-जर्मनी-रशिया सारख्या पूर्वापार स्वतंत्र बलाढ्य देशांपासून भारतासारख्या पारतंत्र्यात असलेल्या देशांपर्यंत सगळ्यांचे राजकारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होते आणि अजूनही त्यात फार फरक झाला आहे असे मला वाटत नाही.

बहुतांश विचारवंतांनी हे दोन मुद्दे परस्पर विरोधी असल्याचे मत नोंदवले आहे. त्यासाठी शीतयुद्धाचा, कम्युनिस्टांचा संदर्भ दिला जातो. रशियामधली कम्युनिस्ट राजवट जुलमी होती, गुप्त पोलिसांचा सूळसूळाट होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाही नव्हते. पण कोणी कितीही नाही म्हणले तरी बऱ्यापैकी समानता होती. रशियातल्या सर्व भागात वस्तूंच्या किंमती सारख्या होत्या. अधिकारी वर्ग वगळता बाकी सगळी जनता एकाच पातळीवर होती. हिटलरच्या राज्यात तर सर्वसामान्य लोकांचा राहणीमानाचा दर्जा खूपच चांगला होता. पण समानता अशी नव्हती आणि स्वातंत्र्य तर औषधालाही नव्हते. याउलट परिस्थिती पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेत उद्भवली. अधिकाधिक स्वातंत्र्य मिळत गेले, पण त्याच प्रमाणात विषमताही वाढली. आज अमेरिकेत ऑक्युपाय वॉलस्ट्रीट हे चालू आंदोलन हे विषमतेचाच परिपाक आहे. आर्थिक उदारीकरणामुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरी त्यानंतर आर्थिक क्षेत्रात आलेल्या स्वातंत्र्याच्या वाऱ्यांमुळे श्रीमंत गरीब ही दरी प्रमाणाबाहेर रुंदावली आहे. आज एफ.डी.आय. ला रिटेल मध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य द्यावे का याबद्दल जोरदार खडाजंगी होते याचे मूळ कारण हेच आहे की हे स्वातंत्र्य बहाल केले तर या क्षेत्रातील समानता पूर्णपणे नष्ट होईल असे मानले जाते. यामध्ये बरोबर काय चूक काय या हा या लेखाचा विषय नाही. पण आधुनिक जगातलं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे याच वादाच्या केंद्रस्थानी असणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

अनेक समाजवादी-कम्युनिस्ट लोकांना वाटतं समानता हेच खरेखुरे स्वातंत्र्य.. तर सर्वांनाच सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणे ही खरीखुरी समानता असा स्वातंत्र्यवादी मंडळींचा दावा असतो. अर्थातच ह्या दोन्ही प्रकारची मंडळींमध्ये सातत्याने रस्सीखेच चालू असते. आणि यामध्ये आपण कायमच अडकलेलो असतो. समानता हा विषय कायमच आपल्याला आकर्षक वाटतो. सर्वेः सुखिनः सन्तु हा विचार तर भारतीयांच्या डोक्यात अगदीच मुरलेला आहे. आपल्या पुराणात, संत साहित्यात, एकूणच तथाकथित संस्कृतीत समानता आहे. पण दुसऱ्याच बाजूला भिषण जाती व्यवस्था आहे जी विषमतेवरच तर आधारलेली आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक आर्थिक पातळीवर भारतात समानता तर नाहीच शिवाय सर्व समाज घट्ट सामाजिक-नैतिक बंधनांमध्ये अडकलेला आहे. बंधनं आहेत अशा ठिकाणी स्वातंत्र्य कसे नांदणार? त्यामुळे आपण ना स्वातंत्र्य उपभोगू शकतो ना समानता!



हा सोबत दिलेला ग्राफ पहा.आपली सध्याची स्थिती पहा-ना पुरेसे स्वातंत्र्य, ना समानता. हिरवी रेषा म्हणजे कसे घडायला हवे याचा आदर्श. पण प्रत्यक्षात कसे घडते ते म्हणजे लाल रेषा.. हिटलर-स्टालिन, हिंदू-मुसलमान धर्मवेडे लोक हे सगळे या ग्राफ मधल्या क्ष अक्षाच्या (X axis) खाली मोडतात. कारण त्यांचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय?! भांडवलवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणी परस्पर विरोधी दिशांना टोकाच्या जागी दिसून येते.

प्रथम हे मान्य करायला हवे आणि समजून घेतले पाहिजे की संपूर्ण स्वातंत्र्य आणि संपूर्ण समानता या अव्यवहार्य गोष्टी आहेत. हिरव्या रेषेच्या टोकाशी असलेली स्थिती म्हणजे अराजकवादी मंडळींचा (Anarchists) स्वर्गच..! पण ती गोष्ट व्यवहारात अशक्य आहे. त्यामुळे लाल रेषा आणि हिरवी रेषा एकमेकांना छेदतात तो बिंदू गाठायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिक स्वातंत्र्याच्या दिशेने आपण गेलो तर समानता कमी होत जाईल, अधिक समानतेकडे जाऊ लागलो तर स्वातंत्र्याचा संकोच होईल. म्हणूनच मी आदर्श असणारी हिरवी रेषा ही हिरव्याच रंगाच्या दोन वेगळ्या छटांनी (shades) दाखवली आहे. आपल्याला सामाजिक-राजकीय-आर्थिक क्षेत्रात हा परफेक्ट इक्विलीब्रीयम (Perfect Equilibrium) कसा साधायचा यावर विचार करावा लागेल. असा सविस्तर आणि सर्व समावेशक विचार केल्याशिवाय व्यापक अर्थाने परिवर्तन अशक्य आहे. राजकीय विचारसरणीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या ग्राफ मध्ये संबंधित राजकीय पक्ष कुठे आहे याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे, त्यातून स्वातंत्र्य समानता याचा विचार करता खरच किती प्रमाणात काय मिळणार आहे असा साधक बाधक विचार करावा लागेल.

लोकशाही,स्वातंत्र्य आणि समानता या तीन मूल्यांवर आधारित परफेक्ट इक्विलीब्रीयम असलेली एखादी सिस्टीम आपण उभारू शकतो?

*यामध्ये मांडलेले विचार संपूर्णपणे योग्य आहेत असा माझा दावा नाही. माझ्या डोक्यातले विचार मी सगळ्यांपुढे मांडतो आहे. त्या निमित्ताने स्वातंत्र्य-समानता या परस्पर विरोधी मुद्द्यांवर अधिकाधिक चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा..